Thursday, February 23, 2023

श्रीअक्कलकोट स्वामी महाराजांचे उत्तराधीकारी श्रीबाळप्पा महाराजांची पुण्यतिथी🌿🌸🙏🌺

 



भगवान_श्रीअक्कलकोट_स्वामी_माउलींचे_उत्तराधीकारी_श्रीबाळप्पा_महाराजांची_पुण्यतिथी🙏🌸🌺

                               पूर्ण दत्तावतार भक्तवत्सल भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचे शिष्योत्तम,पार्शद,स्वामी गादीचे उत्तराधिकारी सद्गुरु श्री बाळप्पा महाराज यांची आज ११३ वी पुण्यतिथी.श्रीस्वामी माउलींच्या शिष्य प्रभावळीतील अतिशय विलक्षण थोर सत्पुरुष ज्यांच्या थोर अधिकाराने त्यांनी स्वामीरायांच्याही प्रेमाचा अधिकार प्राप्त केला,ज्यांना स्वामीरायांनी आपली समाधी लिला करण्यापूर्वी आपल्या समक्ष आपल्या गादीवर बसवून पुढे संप्रदाय वाढविण्याचे ,चालवण्याचे कार्य सोपवले.असा दृश्य स्वरुपात झालेले अतिशय विरळच प्रसंग स्वामी चरित्रात घडलेले आहे.जणु त्यांना अक्कलकोट ला आपल्या सिंहासनावर स्वामीरायांनी पट्टभिषेक करुन आसनस्थ केले.अशा या अनन्य स्वामीदासांची आज पुण्यतिथी.गुरु शोधार्थ घर सोडून निघालेले बाळाप्पा ते प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी समर्थ माउलींचे उत्ताराधीकारी बाळप्पा महाराज असा विलक्षण जिवन प्रवास आपण संक्षिप्त स्वरुपात बघुयात.प.पू.श्री बाळप्पा महाराजांचा जिवन प्रवास नक्कीच गुरुसेवा ही काय असते,कशी असती आणि किती कठीण असते याचा विवेक आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही.

                            बाळाप्पा महाराजांचा जन्म कर्नाटकातील धारवाड येथील हावेरी या खेड्यात एक सुखवस्तु सावकारी सराफी व्यवसाय असलेल्या धनिक संपन्न अशा यजुर्वेदी ब्राह्मण घरात झाला. बालपणापासुनच वैराग्यशिल आणि धार्मिक अशी बाळप्पांची वृत्ती होती.पुर्वीच्या रिवाजाप्रमाणे त्यांचे बालपणीच लग्न झाले‌.यथावकाश त्यांना दोन मुलगे आणि एक कन्या अशी अपत्येही झाली.परंतु मुळातच विरक्त असलेल्या बाळप्पांचे मन संसारात रमले नाही.आपल्या कन्येचा विवाह त्यांनी केला व दोन्ही मुलांचे उपनयन संस्कार पार पाडले व आता ते घर सोडण्याचा विचार करु लागले. आपण का जन्माला आलो? आपल्या जन्माचे प्रयोजन काय ? केवळ प्रपंच हाच आपला अंतिम उद्देश आहे का? असे अनंत विचार त्यांच्या मनात घोळत होते.या प्रश्नांची उकल करण्यासाठी आता सद्गुरु चरणांचा आश्रय घ्यावा असे त्यांना सतत वाटु लागले.वयाच्या तिसाव्या वर्षी शेवटी त्यांनी सद्गुरु शोधास्तव‌ गृहत्याग केला.त्यांनी आधी शिवचिदंबर महाप्रभुंच्या मुरगोड कडे प्रस्थान केले.तिथे त्यावेळी महाप्रभुंचे चिरंजीव हे गादीवर होते.तेथील पुजार्यांनी महप्रभुंच्या झालेल्या दिव्य लिलांचे वर्णन केले ते ऐकून बाळाप्पा थक्क झाले.पुजार्याकडून त्यांना चिदंबर महाप्रभु आणि अक्कलकोट स्वामी महाराज यांच्या भेटीची हकिकत कळली.अजानुबाहु स्वामी हे अजुनही सदेही अक्कलकोट येथे वास्तव्यास आहेत ही ही कळले.पण त्यांच्या मनात आधी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे जाऊन अनुष्ठान करावे हा विचार होता.त्यामुळे ते गाणगापूर ला गेले. श्रीक्षेत्र गाणगापूर येथे प्रखर कठोर असे अनुष्ठान केल्यावर त्यांना दत्तप्रभुंचे स्वप्न दर्शन झाले पण स्पष्ट आज्ञा नसल्या कारणाने त्यांनी अनुष्ठान सुरुच ठेवले.पुढे एक ब्रह्माण स्वप्नात आला व "तुम्ही अक्कलकोटला जावे" असा स्पष्ट आदेश त्यांना मिळाला.दोन महिने संगमावर अनुष्ठान झाल्यावर त्यांना तिथेच पहाटे संगमस्नान करण्यास गेले.तिथे काठावर धोतर ठेवले होते.आल्यावर उचलले तर त्याखावी लाल असा विंचु दिसला.त्यांनी त्यास न मारता ते आपल्या नित्यकर्मात गुंग झाले.त्याच रात्री त्यांना भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घडले व त्यांना अक्कलकोट ला येण्याचे संकेत स्वामींनी दिले.स्वामीरायांच्या दर्शनानंतर दुसर्या दिवशी त्यांना माधुकरी या वेळी पाचही घरी पुरणपोळीच मिळाली.हा शुभसंकेत लक्षात घेऊन त्यांनी त्याच दिवशी अक्कलकोट ला प्रस्थान केले.

                              चैत्र शुद्ध दशमी शके १७८८,२५ मार्च १८६६ या दिवशी बाळप्पा अक्कलकोटला आले. तेथील मुरलीधर धर्मशाळेत आपले सामान ठेवून त्यांनी स्नान उरकले‌ व एक पैशाची खडीसाखर घेऊन स्वामी दर्शनासाठी निघाले.स्वामी स्वारी त्यावेळी खासबागेत आपल्याच मस्तीत दंग आनंदात निमग्न होती.स्वामीरायांपुढे पोचल्यावर ते बेभान होऊन श्रीचरणांकडे जाऊन पोचले.श्रीस्वामीरायांच्या सुकोमल चरणांवर शिर ठेवले.नंतर खडीसाखर स्वामींपुढे ठेवली व बाजुला झाले.हे सर्व झाल्यावर स्वामीदेवांची पहुडलेली स्वारी उठली त्यांना इतका आनंद झाला होता की तो आनंद प्रत्येकाला जाणवत होता.स्वामी ऊठुन झाडाजवळ गेले व प्रत्येक झाडाला प्रेमाणे आलिंगन देऊन लागले.जणु यातुन त्यांनी आपले बाळाप्पा वरील जन्मोजन्मीचे प्रेमच व्यक्त केले.त्यानंतर बाळप्पा महाराज हे अक्कलकोट लाच अनुष्ठानरत झाले.रोज स्वामी दर्शनाचा त्यांनी नियम केला.पण या काळात त्यांच्या मनात एक रुखरुख लागली होती ती म्हणजे त्यांना कधीही काहीही केल्या स्वामींच्या हाताने प्रसाद मिळाला नाही.एकदा गर्दीतुन चोळप्पांनी बाळप्पांच्या हातावर खारकांचा प्रसाद टाकला.प्रसाद मिळता क्षणी बाळाप्पा धावतच सुटले तोच स्वामींनी चोळप्पांना रागविले आणि प्रसाद परत आणावयास सांगितले.सेवेकर्यांनी धावत जाऊन प्रसाद परत आणला.या सर्व घटनेने बाळाप्पा खुप खिन्न झाले.पण त्यांना काय ठाऊक स्वामी माउली त्यांना आपल्या स्वानंद सिंहासनावर विराजमान करणार आहेत ते.पुढे बाळप्पांना द्वारकेला जाण्याची आज्ञा झाली व तिर्थयात्रेहून परत आल्यावर त्यांना स्वामींनी आपल्या हातातील तुळशीची माळ दिली.हा पहिला प्रसाद बाप्पांना लाभला.त्यानंतर चैत्र महिन्यात बाळप्पांनी मुरलीधर मंदिरात आपले पहिले अनुष्ठान केले.पण त्यावेळी त्यांचे आपले अधेमधे मन लागत नसे.रोज ते माधुकरीला जाण्याआधी श्रीस्वामीरायांच्या चरणी आपले मस्तक ठेवत व मनसोक्त दर्शन घेत असत.यावेळी स्वामी दर्शनास गेले असता.श्री स्वामी महाराजांनी त्यांच्या पाठीवर जोरदार हाताचा फटका दिला.पण या प्रसादाने पुढे त्यांचे चंचल मन अगदी स्थिर झाले‌.या आगळ्या वेगळ्या स्वामी प्रसादाच्या लाभाने त्यांचे अनुष्ठान फळाला आले. पुढे बाळप्पा जास्तीत जास्त स्वामी सेवेत रत होऊ लागले.चोळप्पांच्या संमतीने लवकरच इतर सेवेकर्‍यांसमवेत ते स्वामींची अखंड सेवा करण्यासाठी पेठेत राहण्यास गेले.बाळप्पा अगदी निस्सिम व समर्पणाने स्वामी सेवा करू लागले.एक दिवस अचानक त्यांच्या बेंबीतून रक्त येऊ लागले.काही वेळात बेंबीतून एक कागदाची पुडी पडली .ती बाळप्पांनी उघडली‌ तर त्यात विष होते.बाळप्पांची निस्सिम सेवा बघून कुणी नतद्रष्टाने मत्सरापोटी बाळप्पांना विष दिले होते.तरीही पुढे त्यांची स्वामी सेवा उत्तरोत्तर वाढतच आणि दृढ होत गेली.एकदा स्वामी देवांनी बाळप्पांना आवाज दिवा‌ व आपल्या जवळ बोलावले.त्यावेळी स्वामीराय खडीसाखर खात होते.ती तोंडातील खडीसाखर त्यांनी काढली व आपल्या हाताने बाळप्पांना खाऊ घातली.बाळप्पा स्वामी प्रसादासाठी आसुसले होतेच त्यांनी क्षणाचाही विचार न करता ती खडीसाखर क्षणात खाऊन टाकली.जणू या प्रसादाद्वारे स्वामी रायांनी बाळप्पांच्या शरीरात आपल्या कृपेचा प्रत्यक्ष अंशच रुजविला.तरीही या दरम्यान अनेक सेवेकर्‍यांनी बाळप्पांचा अतोनात छळ केला,त्यांना अक्कलकोटहून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले पण श्रीस्वामीरायांनी आपल्या या पट्टशिष्याला आता सख्य भक्तीचे दानचं दिले त्यामुळे कुणीही त्यांनी तेथून हलवू शकले नाही.पुढे सुंदराबाईंनी बाळप्पांना हरएक प्रकारे त्रास दिला.या त्रासाला कंटाळून बाळप्पांनी अक्कलकोट सोडण्याचा विचार केला तोच स्वामी महाराजांनी बाळप्पांना एका सेवेकर्‍या करवी मृगाजिन व व्याघ्राजिन दिले.चाणाक्ष बाळप्पांना लगेच कळले की स्वामीरायांची आपल्याला अक्कलकोट सोडण्याची आज्ञा नाही.नंतर स्वामी आज्ञेनी‌ त्यांनी अक्कलकोटातील जागृत असलेल्या हाक्याच्या मारोती जवळ अनुष्ठान सुरु केले.सुरुवातीला बाळप्पा गणेशाची अथर्वशीर्ष म्हणून उपासना करीत.तर स्वामीराय एका सेवेकर्‍याला बाळप्पांना उद्देशून म्हणाले "तो तरटी वाणित आहे". बाळप्पांना याचा गुढार्थ लगेच कळला व त्यांनी ते अनुष्ठान बंद केले‌ व "श्री स्वामी समर्थ" या स्वामी मंत्राचे जप अनुष्ठान सुरु केले.त्यावेळी स्वामींना एका सेवेकर्‍याने विचारले की आता बाळप्पा काय विणतो आहे तर स्वामी राज म्हटले, "आता तो कांबळी विणीत आहे." स्वामीरायांनी बाळप्पास जपाचा हिशोब ठेवण्यास सांगितले होते.त्याप्रमाणे ते तो हिशोब चोख ठेवीत. या अनुष्ठाना दरम्यान सुंदराबाईंनी स्वामी रायांपुढे बाळप्पांच्या अनुष्ठानाचा विषय काढला‌ तर स्वामीराय म्ह्टले, "तो कुलदीपक आहे." या स्वामीरायांच्या एका वाक्यातच त्यांनी बाळप्पांचा अधिकार ,त्यांच्यावरील आपली कृपा सर्वांना दाखवून दिली होती.आता आपल्या गादीचा वारसदार कोण यावर या द्वारे स्वामींनी शिक्कामोर्तब केला होता. पुढे बाळप्पांच्या या अनुष्ठानाची सांगता स्वतः स्वामीरायांनी एका भक्ताद्वारे ब्राह्मणभोजनाने केली. पुढे सन १८७४ ला श्रावण वद्य १ ला स्वामी सुतांनी आपला देह मुंबईत ठेवला आणि बरोबर एक वर्षांनी स्वामी देवांनी आपली समाधी लिला करण्याचे योजले.

                            स्वामी समर्थांनी आपल्या सर्व भक्तांना काही दिवस आधी जवळ बोलावून काही तरी वस्तू प्रसाद रुपाने दिली.पण बाळप्पांना मात्र नेहमी प्रमाणे काहीच दिले नाही.पण न राहवून बाळप्पांनी काकूळतीला येऊन , "महाराज ,सर्वांना प्रसाद दिलात,मला आपण काय देणार?" हा प्रश्न विचारला.त्यावेळी श्रीस्वामी महाराजांनी आपल्या उजव्या हातातल्या करंगुळीत असलेली "श्री स्वामी समर्थ" ही अंगठी काढली व ती स्वहस्ते बाळप्पांच्या हातात घातली व महाराज उद्गारले, "माझे शिक्कामोर्तब तुला देत आहे.माझा शिक्का यआवच्चंद्रदइवआकरौ तू पुढे चालव." असा आशिर्वाद मिळताच बाळप्पा गदगदीत झाले , कृतकृत्य झाले.त्यांनी स्वामी चरणांना मिठीच मारली.श्री स्वामीरायांनी बाळप्पास आपल्या जवळ बसविले.आपल्या कंठातील रुद्राक्ष त्यांच्या गळ्यात घातला.अंगावर छाटी घातली.हातावर भगवे निशाण दिले.प्रासादिक चरणपादुका दिल्या व  मस्तकावर वरदहस्त ठेवून, "औदुंबर छायेत बस.स्वतंत्र मठ स्थापन करुन पादुकांची प्रतिष्ठापना कर.बाग करुन त्यात फुलझाडे लाव व वार्षिक ठरलेले उत्सव करीत जा."अशाने सुयोग्य फळ मिळेल." या अर्थाचा श्रीमद भागवताचा एक श्लोक ही स्वामी रायांनी म्हटला. लगेच चैत्र वद्य १३ शके १८०० ,सन १८७८ ला स्वामीरायांनी आपली समाधी लिला केली. पुढे तीन वर्ष स्वामी आज्ञेने बाळप्पा निराशन व्रत करुन राहिले पण स्वामी विरहाने ते अतिशय व्याकुळ झाले.त्यांनी अन्न तर त्यातले होते पण आता फराळ आणि पाणी ही त्यागले व विरहाकुल ते समाधी पुढे दिवसरात्र बसून राहिले.काही काळाने श्री स्वामी भगवंत बाळप्पांच्या पुढे प्रगट झाले व म्हटले, "तुला  मी ज्या पादुका दिल्या आहेत,तेथे चैतन्य रुपाने मी प्रत्यक्ष वास करीत आहे.या पुढे मी तुझी सेवा तेथेच घेईन.पूर्वीप्रमाणे माझी सेवा करीत जा." या नंतर मात्र बाळप्पांच्या मनातील सर्व संदेह पूर्ण मिटला.त्यांनी त्या प्रसाद पादुका पेटीतून बाहेर काढल्या व त्यांची स्थापना चौरंगावर केली.जवळच भगवे निशान ठेवले.महाराजांना प्रत्यक्ष जे उपचार करीत ते या दिव्य  पादुकांवर सुरु केले.पण स्वामींनी आपल्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करण्यास आपण खरंच समर्थ आहोत का? अशी शंका त्यांना आली तोच स्वामींनी त्यांना प्रगटून पुन्हा अभय दिले की , "इथे तू काही करत नसून,जरी मी देहाने अंतर्धान पावलो तरी तुझ्या द्वारे मीच कार्य करणार आहे.सर्वत्र माझी सत्ता आहे.तू केवळ निमित्तमात्र आहेस.पादुकांच्या द्वारा सर्वत्र संचार करुन लोकसंग्रह करावा." सुरवातीला पेठेतील पुजार्‍याकडे बाळप्पांचा मुक्काम असायचा.तेथेच ते नित्य पूजा व उत्सव करीत असत.पुढे स्वामी कार्यास्तव बाळप्पा महाराजा वर्‍हाड,खानदेश,विदर्भ,, कोल्हापूर,पुणे, मुंबई आदी प्रांती भ्रमण करु लागले. प.पू.बाळप्पा महाराजांनी अखंड फिरून स्वामी नामाची ध्वजा सर्वत्र फडकवीली.स्वामी नामाच्या ते अखंड स्मरणात असतं.शरण आलेल्या भक्तांना ते स्वामींचे तिर्थ आणि अंगारा देत व त्यांना संकटातून,आधी-व्याधीतून मुक्त करत.बाळप्पा महाराजांनी अनेक स्वामी मठाची स्थापना केली.त्यांना अनेक भक्त शरणं आले व शिष्य संप्रदाय मोठ्याप्रमाणात वाढला.बाळप्पा महाराजांच्या अनेक दिव्य लिला चरित्रात आल्या आहे.त्यांना शरणं आलेल्या आर्त,अर्थार्थी,मुमुक्षु ,ज्ञानी ,जिज्ञासु साधकाला ते त्यांना समजेल असे मार्गदर्शन करीत व मार्ग दाखवित.पुढे त्यांनी गंगाधरपंत शिगवेकर यांची आपले उत्तराधिकारी म्हणून निवड केली.पुढे सन १९०१ ला बाळप्पा महाराजांनी स्वतंत्र मठाची स्थापना केली.हा मठ आज गुरुमंदीर या नावाने आपल्या सर्वांना श्रुत आहेच.पुढे माघ शुद्ध चतुर्थी शके १८२६  ,सन १९०४ ला बाळप्पा महाराजांनी चतुर्थाश्रम धारण केला‌ व ब्रह्मानंद सरस्वती हे नाम धारण केले. श्री बाळप्पा महाराजांनी स्वामी आज्ञेनंतर कधीही अन्न प्राशन केले नव्हते पण त्यांनी केलेले कार्य ,प्रवास बघितला तर बुद्धी सुन्न होते.पुढे पौष‌ पौर्णिमा ,शके १८३१ ,सन १९१० रोजी श्री ब्रह्मानंद सरस्वती तथा बाळप्पा महाराजांनी प्रिय शिष्य गंगाधरपंत यांना गुरुगादीचे सर्व अधिकार विधीपूर्वक बहाल केले.आज्ञापत्रही दिले.त्यांना स्वामींचा दंड,छाटी व माळ दिली‌ व आपण अखेरची निरवा निरव करु लागले. अखेर फाल्गुन मास उजाडला.चतुर्थीचा दिवस ,मंगळवार अंगारक योग.पहाटेच्या सुमुहूर्तावर श्री ब्रह्मानंद सरस्वती तथा बाळप्पा महाराज उर्ध्व दृष्टी लावून बसले.त्यानंतर त्यांनी स्नान केले.मग आपल्या आसनावर न बसता गाभार्‍यात गेले.तिथे स्वामी पादुकांना डोळे भरुन पाहिले.पुढे आसन स्वामी प्रतिमेपुढे घेण्यात आले.त्यावर येऊन बसल्यावर श्री बाळप्पा महाराज हातात जपमाळ घेऊन अखंड स्वामींकडे बघत होते.हळूच ते म्हटले, "अरे असे पाहता काय! मी कोठेच जाणार नाही.या आसनावरुन उठेन व आत जावून बसेन." असे म्हटल्यावर काही काळ स्वामी नाव घेत घेत अचानक ओंकाराचा उच्चार करीत स्वामी चरणी लीन झाले.पुढे बाळप्पा महाराजांच्या देहाची यथासांग पूजा करण्यात आली.महाराजांची मिरवणूक काढण्यात आली.वटवृक्ष देवस्थानात व पेठेतल्या समाधी मठात मिरवणूक नेण्यात आली.त्यानंतर गुरुमंदिरातील चैतन्य पादुकांसमोरच ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज तथा बाळप्पा महाराजांना समाधी देण्यात आली.अशा या अतिशय अलौकिक,दिव्य व थोर स्वामी शिष्याची आज पुण्यतिथी.श्री बाळप्पा महाराज म्हणजे स्वामी सेवेचे सगुण मूर्तीमंत रुपच होते.प्रत्येक स्वामी भक्ताने,गुरुभक्ताने कशाप्रकारे गुरुसेवा करावी याचा हे चरित्र परीपाठच आहे.या मंगल दिनी ही माझी शब्द सुमनांजली मी स्वामी चरणी ,बाळप्पा महाराजांच्या चरणी अर्पण करतो व आपल्या सर्वांकडून ही स्वामी चरणांची अखंड सेवा घडावी ही कोटी कोटी प्रार्थना करतो.

    ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

                  फाल्गुन शुद्ध चतुर्थी


#श्रीस्वामीसमर्थजयजयस्वामीसमर्थ 🙏🌸🌿

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌿

#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ 🙏🌸🌿

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...