#कथा_ज्ञानदेवांची_भाग१ :-
अज्ञानाच्या गाढ निद्रेत निद्रिस्त झालेल्या समाजाला खडबडून जागे करणारा सुर्योदय ज्ञानोबांच्या रुपात महाराष्ट्राने बघितला.श्रीगीतेत भगवंतांनी म्हटलेच आहे की, “ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते,त्या त्या वेळी मी अवतार धारण करतो.” महाविष्णू ज्ञानदेवांचा अवतार ही भगवंतांच्या गीतेतील वचनाला सत्य करण्यासाठीच झाला होता हे त्रिकालबाधीत सत्य आहे. त्यांच्या अवतारासाठी समाजातील अशीच ग्लानी आणणारी परिस्थिती कारणीभूत ठरली.कर्मकांड,रुढी,परंपरा यांचा आधार घेऊन समाजातील अज्ञानी लोकांचे झालेले शोषण व या सर्वांमुळे समाजात विषासारखी पसरलेली विषमतेची दरी यामुळे समाज पोखरून निघालेला होता.धर्म फक्त शाब्दपांडित्याच्या दिखाव्याचा भाग झाला होता.शब्दापांडित्याने बरबटलेल्या लोकांमुळे मुळ धर्माच्या ज्ञानावर जणू अज्ञानाचे जळमट बसले होते.जणू काही हे धर्माला लागलेले ग्रहणच होते व या अज्ञानाच्या ,संशयाच्या ग्रहणाला दूर करण्यासाठी श्रीभगवंतच स्वतः ज्ञानदेवांच्या रुपात अवतरले. गेल्या हजार वर्षात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेलेलं हे अभिजात सुर्योदयाचे वरदान परमेश्वराकडून आपल्याला लाभले असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.असे ज्ञानदेव ,अशा ज्ञानदेवांचे चरित्र,अशा ज्ञानदेवांनी केलेले कार्य हे गेल्या हजार वर्षांतील एकमेवाद्वितीय असे आहे.ज्ञानोबांचा जन्म /अवतार हा फक्त ज्ञानेश्वरी पुरता मर्यादित नव्हता तर त्यामागची भूमिका,त्यामागचे त्यांच्या अवताराचे प्रयोजन,त्यामागे त्यांनी केलेल्या कार्याचा विस्तार,त्यांनी मांडलेला विचार व त्यांनी स्थापन केलेल्या संप्रदायाचा हेतू या सर्वांचे जर चिंतन आपण केले तर एक गोष्ट लक्षात येते की ज्ञोनोबांनी समाजाला,या व्यवस्थेला नवी दिशा दिली ,नवा सुर्योदय दिला.तर अशा ज्ञानदेवांचे चरित्र आजपासून आपण बघणार आहोत.
“शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी” असे जगद्गुरु तुकोबारायांचे वचन आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला ज्ञानोबारायांच्या चरित्रातून दिसून येतो.ज्या कुळामध्ये अनेक पिढ्यांपासून भगवंतांच्या कृपेचे बी पेरल्या गेलेले असते,भगवद भक्तीच्या बीजाचे बीजारोपण झालेले असते त्याच कुळामध्ये भगवंत अवतार घेतात,त्याच कुळामध्ये भगवंतांचे अंश अवतरतात.हाच नियम ,निसर्गाची हिच सगळी क्रिया आपल्याला माउलींच्या कुळामध्ये बघायला मिळते.ज्ञानेश्वर माउलींच्या कुळामध्ये अनेक शूरवीर,थोर पुरुष होऊन गेले.या कुळातील सर्व थोर पुरुषांनी आपल्या शुद्ध कर्माने कुळाचे पावित्र वाढवले जणू काही ज्याप्रमाणे बी पेरण्यासाठी आधी शेतीची मशागत केली जाते त्याचप्रमाणे या सर्व पुरुषांनी माउलींच्या जन्माकरिता कुळाची शुद्धी केली ,एका पवित्र कुळाचे निर्माण केले. श्री ज्ञानदेवांचे मुळपुरुष माउलींपासून सहावे पुरुष म्हणजे माउलींच्या पंजोबांचे पंजोब श्रीहरिहरपंत. मुळचे हे कुटुंब पैठणपासून सात मैल अंतरावर असलेल्या आपेगावचे.हे शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण.यांचे गोत्र पंचप्रवरान्वीत वत्स होते.हरिहरपंतांकडे शके १०६० म्हणजे इ.स ११३२ च्या ही पूर्वीपासून पिढीजात कुलकर्णीपण होते.म्हणजे माउलींच्या जन्माच्या दोनशे वर्षापूर्वीपासूच हे कुळ आर्थिकदृष्ट्या सुखवस्तु होते.यांचे मुळ आडनाव हे “जावळे” पण पिढीजात कुलकर्णीपणामुळे हे कुळ कुलकर्णी या नावानेच विख्यात झाले.हरिहरपंतांच्या स्वच्छ वृत्ती व प्रामाणिकपणा यामुळे तत्कालीन राजे भिल्लम जैत्रपाल यांची त्यांच्यावर मर्जी बसली होती व त्यांना राजाश्रय ही मिळाला होता.या हरिहरपंतांना पुढे तिन अपत्ये झाली.पहिले थोरले रामचंद्रपंत ,मधले केशवपंत व धाकट्या कन्या मोहनाबाई. यापैकी मोहनाबाईंचा विवाह देवगिरीच्या नरहरपंत माचवे यांच्या मुलाशी झाला.मधल्या केशपंतांचा बालपणीच मृत्यू झाला.त्यामुळे हरिहरपंतांनंतर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी ही रामचंद्रपंतावर येऊन पडली.रामचंद्रपंत पुढे सर्व कुलकर्णीपण बघू लागले.हे अतिशय सत्शील होते.यथाकाळी यांचा विवाह झाला व पुढे यांना गोपाळपंत नावाचा एक मुलगा झाला. गोपाळपंतांनी आपल्या वडिलांच्या मृत्युनंतर संपूर्ण कुटुंब व कुलकर्णींपणाचा भार सांभाळला. याच गोपाळपंतांचे चिरंजीव म्हणजे ज्ञानेश्वर माउलींचे आजोबा त्र्यंबकपंत.पुढे आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने व पवित्र चारित्र्याने त्र्यंबकपंत हेच ज्ञानोबांच्या कुळाचे मूळपुरुष म्हणून विख्यात झाले.त्यांचा राज्यकारभार तर दैदिप्यमान होताच पण हे थोर भगवदभक्त ही होते.यांच्या चरित्रा पासूनच माउलींच्या चरित्राची खरी सुरुवात होते किंवा ज्ञानेश्वर माउलींच्या चरित्राची मुहूर्तमेढ रोवली गेली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.याचे कारण ही आपल्याला त्यांचे चरित्र जाणून घेतल्यावर होणार आहे.ही सर्व माहिती आपण पुढील द्वितीय लेखात बघूयात..
✍🏻त्यांचाच अक्षय जाधव पाटील आळंदी
संदर्भ ग्रंथ :- १) आदी,तिर्थावळी - नामदेवराय कृत
२) ज्ञानदेवलिलामृत
३) भक्तविजय - महिपती कृत
४) ज्ञानेश्वरविजय - निरंजन माधव
५)ज्ञानदेवविजय - श्रीमामामहाराज देशपांडे कृत
६)श्रीज्ञानेश्वर महाराज - ल.रा पांगारकर
७)श्रीज्ञानदेव चरित्र - भिंगारकरबुवा
८) ब्रह्मचित्कलामुक्ताई - वक्ते बाबा


❤️❤️
ReplyDelete