Tuesday, February 13, 2024

जगदगुरु श्रीतुकोबारायांची जयंती🙏🏻🌸☘️

 


#वसंत_पंचमी🙏🌸🌺

            माघ शुद्ध पंचमी ही तिथी ज्याप्रमाणे भगवती श्रीशरदा मातेची प्रगट तिथी म्हणुन ओळखली जाते ,भारतात साजरी केली जाते त्याप्रमाणे ही तिथी आपल्या महाराष्ट्रात आणि सबंध जगात एका महान संत, तत्ववेत्ता, चिंतक , मार्गदर्शक असलेल्या जगद्गुरु श्रीतुकोबारायांची ही जन्मतिथी बद्दल प्रसिद्ध आहे.आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या सकलसंतांचे चुडामणी असलेले श्रीतुकोबाराय हे लोकविलक्षण विभूती आहेत.श्रीतुकोबारायांच्या चरित्राचे स्मरण जरी केले तरी डोळ्यापुढे उभा राहतो त्यांचा विलक्षण जिवन प्रवास,अफाट आणि अचाट अभंग गाथा, तुकोबारायांनी  केलेले अपार कष्ट ,त्याग,जिवनातील दु:खद घटनांकडे तटस्थपणे सामोरे जाऊन अंगी प्रखर वैराग्य बाणवून अखंड भगवत स्मरणात कंठलेला काळ.या सर्व घटना बघितला तरी बुद्धी ,वाचा कुंठीत होते.

 "आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी " 

या सारख्या अभंगातून आपले अवतारित्व सांगणार्या तुकोबारायांनी भगवान श्री रामराया सारखे मानवी जिवन जगून दाखविले व त्यातून ब्रह्मस्थितीचा अनुभव घेऊन तो इतरांपर्यंत पोचविला ही ,तो अनुभव इतरांना ही करवीला. महाराजांच्या अलौकिक सामर्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या द्रष्ट्या ,लोकराजालाही आपल्याकडे आकृष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायांनी मार्गदर्शन केले ,पुढील वाटचालीची दिशा दाखवली हे सर्वश्रुत आहेच. तुकोबारायांनी समाजाला दिशा तर दाखविलीच पण वेळेप्रसंगी समाजव्यवस्थेच्या विरोधात जाऊन 

"वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।।" 

   असे पडखर बोल समाजाला ठणकावून सांगितले व दंभ,कर्मठता आणि पाखंडावर तिखट शब्दांत वेळोवेळी ताशेरे ओढले. श्रीतुकोबारायांनी आपल्या गाथेत लोकांना भक्तीचे महत्व तर प्रतिपादित केले आहेच पण त्याचबरोबर विलक्षण अशी लोकजागृती ही केली आहे. समाज हा बुरसटलेल्या ,भोंगळ अशा अंध भक्ती,दंभ,कर्मठता आणि पाखंडाच्या काळोखाखाली दबलेला होता त्या जळमटाला तुकोबारायांनी प्रकर्षाने दूर करण्याचे महान कार्य केले.याचे एक महत्वाचे कारण म्हणजे प्रत्यक्ष तुकोबारायांना या सर्व दिव्यातुन जावे लागलं होते.याची झळ तुकोबारायांना बसलीच होती. श्रीतुकोबारायांच्या कुळात त्यांच्या जन्माच्या आठ पिढ्या अगोदर पासून पंढरीची वारी होती हे सर्वश्रुत आहे.त्यांचे पूर्वज श्रीविश्वंभर बुवा यांच्या साठी प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथ हे देहूत अवतरले होते.आज ही आपण जे मुळ स्वयंभू पांडुरंगाचे मंदिर देहूत बघतो,ज्या विठुरायाच्या सगुण विग्रहाचे दर्शन देऊळवाड्यात घेतो ते तुकोबांकडे वंश परंपरेने आले होते.त्यांचे माता-पिता श्री बोल्होबा व मातोश्री कनकाई हे पंढरीचे निष्ठावान वारकरी होते.अतिशय सत्शिल असे हे दाम्पत्य होते.आपल्या घरी असलेली वंशपरंपरागत ,पंढरीची वारी,विठुरायाच्या भक्तीचे वर्णन करतांना तुकोबाराय लिहीतात, 

" माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ".

   तुकोबांकडे जशी भक्ती ची परंपरा होती तसेच वंशपरंपरागत देहूचे महाजनपद ही होते.हे घराणे मुळचे सुखवस्तु , ऐश्वर्यसंपन्न असे होते. वयाच्या तेराव्या वर्षा पर्यंत तुकोबांचा काळ आई-वडीलांच्या छत्रछायेखाली अतिशय सुखात गेला.वयाच्या बाराव्या वर्षी लग्न झाले.पहिल्या पत्नीला दम्याचा आजार असल्याचे कळल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांचे दुसरे‌ लग्न लावून दिले.एकंदरीत सर्वसामान्य मानवाप्रमाणे तुकोबांचे सुखवस्तु असे जिवन होते.पण खरं दिव्य तर यानंतर सुरु झाले.आपल्याला तुकोबांचा सर्व जिवनभाग माहिती आहेच पण संकटकाळी खचुन न जाता ते वैराग्यशिल अंतःकरणाने त्याला सामोरे गेले.नुसते सामोरे गेले नाहीत तर अखंड प्रभु स्मरणात तल्लिन राहुन आत्मसाक्षात्काराची पातळी ही त्यांनी गाठली.

                   खरंतर तुकोबांना आत्मसाक्षात्कार झाला असे म्हणने ही चूकच ठरेल कारण "आम्ही वैकुंठवासी" म्हणानारे तुकोबा मुळातच आपल्याला "साच भावे वर्ताया" म्हणून फक्त जगुन दाखवायला,जगाला परमार्थाची वाट दाखवायला देह धारण करते झाले होते यात शंका नाही. आपल्या सर्वांना त्यांनी दाखवून दिले की इतक्या विपरीत ,भयावह आणि दु:खद परिस्थितीतही भगवंताला शरण जाता येतंच आणि ब्रह्मपदी पोचता येतं ‌.या परिस्थितीचे वर्णन मला कसे हितकारक ठरले याचे वर्णन तुकोबांनी आपल्या अभंगातुन केले आहे  ते असे की , "बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ।।" आणि एका अभंगात ते म्हणतात ,"बरे झाले निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पिडा केली ।।" दु:खाकडेही इतक्या तटस्थ आणि उपकारक दृष्टीने बघणे हे खरंच एकमेवाद्वितीयच उदाहरण आहे .

एक - दोन नाही तर पहिले वडिल मग आई ,त्यानंतर भावजई ,मग भावाचा गृहत्याग,पहिली पत्नी ,नंतर पोटचे लाडके मुल या सर्वांचा एकापाठी एक झालेला मृत्यू त्यातचं आलेला भयावह दुष्काळ अशी संकटांची साखळीच सुरु झाली. जिचा डोळे बंद करुन विचार जरी केला तरी अंगावर काटा उभा राहतो.पण या प्रसंगी तुकोबांनी काय केले याचे जर प्रामाणिकपणे चिंतन केले तर जिवनात नैराश्य,दुबळेपणा याला कधीही सामोरे जावेच लागणार नाही. या काळात तुकोबांनी केलेले साधन इतके अफाट होते की याचा आपण नुसता विचारही करणे दुरापास्त आहे .आजही भामचंद्र,भंडारा डोंगरावर नुसते उभे जरी राहले आणि देहू गावाचे अवलोकन केले तर लक्षात येईल की त्या तिनशे/चारशे वर्षाआधीच्या काळी तुकोबा या जंगल सदृश भागात इतक्या उंचावर पैदल जायचे कसे,तिथे कसल्याही साधनांशिवाय तेरा -चौदा दिवस,महिनोन महिने राहायचे कसे सर्व कसे दंतकथेचा भागच वाटेल.आजही गाडीने जरी रोज या डोंगरावर जायचे म्हटले तरी कंटाळा येईल तिथे तुकोबांनी केलेली साधना ही खरंच एक आश्चर्य आहे.  श्रीतुकोबाराय पंढरीच्या वारीला आळंदीहून माउलींच्या पादुका घेऊन जायचे असे एकदा वाचनात आले होते.नक्कीच माउलींच्या चरित्राचा ,ज्ञानदेवीचा ,एकनाथ महाराजांचा व नाथ भागवताचे वाचन ,मनन, चिंतन तुकोबारायांनी केले असणार यात शंका नाही. वारकरी संप्रदायाला पुन्हा नव्याने नवजिवन ,नवचेतना व नवदिशा देण्याचे काम तुकोबांनी केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

                         वारकरी संप्रदायाचे नियम व आचारधर्म पाळणारेच खरे वारकरी याचे प्रतिपादन करतांना सडेतोड शब्दात तुकोबा लिहीतात, 

"एकादशीस अन्नपान । जे नर करती भोजन । श्वानविष्ठेसमान । अधम जन ते एक ।।"  तसेच एका ठिकाणी म्हणतात "नेम नाही जया एकादशीव्रत । जाणावे ते प्रेत इहलोकी" इतक्या स्पष्ट शब्दात त्यांनी वारकरी संप्रदायाचे नियमच अधोरेखित केले आहे. 

         तुकोबारायांवर बाबाजी चैतन्य महाराज यांची झालेला कृपा,अनुग्रह ,त्यानंतर अखंड हरीनाम स्मरण ,कठोर साधना त्यातून वेदाचे सारं असलेल्या गाथेचे प्रगटीकरण, आविर्भाव ,त्यानंतर धर्ममार्तंडांनी दिलेला त्रास , संपूर्ण अभंग गाथा इंद्रायणीत बुडविण्याचा आदेश ,पण भगवती इंद्रायणी मातेने लाह्या सारखे तारलेले अभंग ,शरणं आलेले धर्ममार्तंड ,ब्रह्मस्वरुप झालेले तुकोबा आणि सर्वांना सांगून झालेले वैकुंठगमन हा सर्व प्रवास एका लेखातुन  मांडणे केवळ अशक्यप्राय आहे.कारण हा प्रत्येक प्रसंग आपल्या जिवनात वाट दाखवणारा कवडसा आहे.या प्रत्येक प्रसंगातुन काहीतरी शिकवन मिळतेच मिळते.या प्रत्येकाचे स्वतंत्र चिंतन घडले‌ तर त्याचा उलगडा होईल.

"विदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । इतरांनी वहावा भार माथा ।।" असे निक्षून सांगणार्या तुकोबांनी आपल्या अभंगातून याच वेदांचे सार मांडले आहे.एक एक अभंग एका एका प्रबंधासारखा ,टिके सारखा गहन आहे.एका एका अभंगावर एक एक लेख होऊ शकतो इतके ते सटिक ,गर्भरुप आहे. हे सर्व अभंग श्रीतुकोबारायांचे स्वानुभव आहे.ज्यात भक्ती , ज्ञान, वैराग्य, प्रबोधन,योग,नाम ,दंभ,धर्म ,नियम अशा विविध काय तर जगातील सर्व विषयांचा उहापोह केलेला आहे. शब्द मर्यादा लक्षात घेता लेखनीला विराम देतो पण एक सांगू शकतो की तुकोबारायांचे समग्र चरित्र हे आपल्यासाठी एक पथदर्शक दिपक आहे. थोड्या शब्दात जेव्हा मांडायला घेतलं तर ते अशक्यप्राय वाटुन मी न लिहायचे ठरवले होते पण परत श्रीतुकोबांरायांच्या सर्व जिवनाचे एकदा स्मरण केले आणि मला जे काही प्रसंग स्वतःला दिशा दर्शक वाटतात,मला ज्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे,ज्याने मन ,बुद्धीला स्तिमित केले तेच इथे मांडले आहेत.

              श्रीतुकोबाराय हे आम्हाला नित्य वंदनीय, आमच्या जिवनाचे आधाररुप आहेत त्यामुळे ही शब्द सुमनांजली वाहने हे माझे कर्तव्यच ठरते.कित्येक लोक जिवनातील कठीन प्रसंगी भंडारा डोंगर,देहूच्या इंद्रायणी घाटावर जाऊन तुकोबांच्या चरित्राचे नुसते स्मरण करतात आणि नवसंजीवनी घेऊन घरी परत येतात.हा माझाच काय आपल्यातील कित्येकांचा स्वानुभव आहे. बहुतेक गोष्टी किंवा क्रम हा अस्ताव्यस्थ, असंबद्ध वाटेल पण त्याला माझा नाइलाज आहे.कारण तुकोबांच्या चरित्र सागरातील मोती वेचायला माझी झोळी असमर्थ आहे.या फाटक्या झोळीत आजवर जे वेचायला जमले तेच इथे शब्दात मांडायचा प्रयत्न केला.


तुकाराम तुकाराम |

नाम घेता कापे यम ||धृ||

धन्य तुकोबा समर्थ |

जेणे केला हा पुरुषार्थ ||१||

जळी दगडासहित वहया |

जैश्या तरियेल्या लाहया ||२||

म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा |

तुका विष्णू नोहे दुजा ||३||

          एवढ्या अभंगाचे स्मरण करून तुकोबांच्या चरणी ही भावसुमनांजली अर्पन करतो...

      ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✍️✒️

#रामकृष्णहरी🙏🌸🌺

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺

Thursday, February 1, 2024

सद्गुरु भालचंद्र महाराज कनकवली यांची १२० वी जयंती🙏🏻🌸🚩🕉️





सद्गुरु भालचंद्र महाराज कनकवली यांची १२० वी जयंती :- 

                                महाराष्ट्र ही संत भूमी ,अवधूतांची भूमी आहे.या भूमीत आजवर अनेक संत ,महापुरुष ,सिद्ध , अवलिया, अवधूत, योगी होऊन गेलेत.अशाच या अवधूतांच्या मांदियाळीत गेल्या काही शतकापूर्वी होऊन गेलेले एक अलौकिक संत म्हणजे भालचंद्र महाराज कनकवली. कोकणाच्या पुण्यभूमीत आजवर अनेक महापुरुष होऊन गेले, या पुण्यपावन असलेल्या भगवान परशुरामांच्या भूमीत त्यांच्या तेजाने जणु अनेक संतांच्या रुपात देह धारण करुन लोककल्याण केले.टेंब्ये स्वामी महाराज,साटम महाराज,राऊळ महाराज असे अनेक महापुरुष हे याच कोकणातील होते. सद्गुरु साटम महाराज हे कोकणातील दानोलीचे अवतारी सिद्ध योगी ज्यांच्या अलौकिक लिला आजही कोकणात घराघरातून स्मरण केल्या जातात.त्यांच्या कृपा कटाक्षाने , अनुग्रह प्रसादाने अनेक सिद्ध योगी तयार झाले होते असा विलक्षण अधिकार महाराजांचा होता.सद्गुरु साटम महाराजांच्या  याच अलौकिक शिष्य मांदियाळीतील एक महापुरुष म्हणजे सद्गुरु श्रीभालचंद्र महाराज कनकवली.आज आपण याच अवधूत महात्म्ये असलेल्या भालचंद्र महाराजांच्या दिव्य चरित्राचे स्मरण करणार आहोत.

श्रीभालचंद्र महाराजांचा जन्म कोकणातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असलेल्या पाया नावाच्या एका लहान खेड्यात देशस्थ ब्राम्हण कुटुंबात दिनांक ८ जानेवारी १९०४ रोजी पौष कृष्ण षष्टी ला झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव परशुराम ठाकुर असे होते.यांचे मुळपुरुष हे महान शिवभक्त होते.श्रीमहाराजांचे वडिल हे गावाचे कुलकर्णी होते व अत्यंत सत्शिल व धार्मिक गृहस्थ होते. महाराजांचे बालपण हे अलौकिक असेच होते.त्यांना बालपणापासून देवभक्ती करायला आवडत असे.त्यांचे बालपणीचे खेळ ही तसेच विलक्षण होते.घरातील वातावरण ही तसेच देवभक्तीचे होते.आपल्या बाल सवंगड्यांना गोळा करुन बाल भालचंद्र दगड गोळा करुन त्यांची परमेश्वर रुपात पुजा करित असे. असे आनंदात ,खेळण्यात दिवस जात असता अचानक एक अघटित घडले.वयाच्या पाचव्या वर्षीचं त्यांचे आई व वडिल हे लागोपाठ स्वर्गवासी झाले.अगदी बालवयातच महाराज मातृपितृ छत्राला पोरके झाले.आई वडिलांच्या जाण्याने बाल भालचंद्रावर दुःखाचा डोंगरच कोसळला.पुढे ते त्यांच्या काका काकी जवळ म्हापण या गावी राहायला आले.तेथेच ते प्राथमिक शाळेत ही जाऊ लागले. बाल भालचंद्र शिक्षणात अतिशय हुशार होता.त्यामुळे संपूर्ण गावात त्याची ख्याती झाली. पुढे इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईला आपल्या मावशीकडे राहायला गेले.मॅट्रीक चे शिक्षण सुरु होते पण परिक्षेत अपयशाचे कारण झाले व त्यांची वृत्ती अचानक अंतर्मुख झाली. ते बाह्य जगताचे भान विसरले.सामान्य लोकांना ते वेडे वाटू लागले पण यांना जणु आपल्या जन्माचे रहस्य ,मुख्य कार्यच गवसले होते.काही काळ ते म्हापण गावी आपल्या काका काकी कडे येऊन राहिले पण मुक्त जीवाला बंधनात किती दिवस करमेल? आधी काही काळ ते अखंड नामस्मरणात काळ व्यतीत करु लागले.पण काही कालातच ते घर सोडून दुरवर निघून गेले. बराच काळ कोकणात ते फिरले ,अनेक ठिकाणी राहीले व फिरत फिरत कोल्हापूरातील गारगोटी येथील आपल्या चुलत्याकडे आले.भालचंद्रांची अस्ताव्यस्थ अवस्था पाहून सर्वलोक अचंबित झाले.चुलतीने त्यांना आंघोळ घातली ,नवे कपडे घातले व त्यानंतर ते काही महिने तिथेच व्यवस्थितपणे राहिले.पण पुन्हा ते तिथेही न राहता दूर निघून गेले.बराच काळ भालचंद्र बाबा त्या अवस्थेत अनेक ठिकाणी फिरत राहिले.देहातीत अवस्थेत त्यांना बाह्य जगताचे भान राहिले नाही.कुणी दिले तर खात नाहीतर सतत चालत राहत.वाट्टेल तिथे झोपायचे पुन्हा चालत राहायचे असा त्यांचा अखंड क्रम सुरु झाला.या ही अवस्थेत त्यांचे अखंड नामस्मरण सुरु होते.पण त्यांच्या बाह्य वेषावरुन लोकांना ते वेडे वाटत होते.जवळपास सहा महिने ते गारगोटी च्या परिसरात देहभान हरपून फिरत असता त्यांची गाठ गारगोटी चे थोर सत्पुरुष सद्गुरु श्री मुळे महाराज यांच्याशी पडली.श्रीमुळे महाराजांनी त्यांना ताबडतोब “इथे न थांबता लगेच दानोलीच्या सद्गुरु योगीराज श्रीसाटम महाराजांकडे जा व त्यांची सेवा कर”असा आदेश दिला.मुळे महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून बाल भालचंद्र गारगोटी ते दानोली पायीच निघाले.अंबोलीचा अवघड घाट पायीच पार करुन ते श्रीसाटम महाराजांच्या दर्शनास दानोलीत येऊन पोचले. सद्गुरु श्रीसाटम महाराजांना आपल्या प्रिय शिष्याला ओळखायला वेळ लागला नाही. श्रीसाटम महाराजांनी बाल भालचंद्रावर तात्काळ कृपा अनुग्रह केला व त्यानंतर भालचंद्र महाराज श्रीमहाराजांची सेवा करत दानोलीत काही काळ राहिले.

दानोलीत सद्गुरु सेवा करित असता एक दिवस साटम महाराजांनी भालचंद्र बाबांना आता दूर जाण्याची आज्ञा केली.मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही त्याप्रमाणे सद्गुरुनी आपल्या प्रिय शिष्याला केलेली ही आज्ञा होती.सद्गुरु आज्ञा होताच भालचंद्र महाराज लगेच भ्रमंती करायला निघाले व फिरत फिरत कनकवली या गावी येऊन पोचले. कनकवलीत जेव्हा भालचंद्र महाराज आले तेव्हा ते दिगंबर अवस्थेत होते.त्यांची दाढी ,जटा ,नखे वाढलेली होती.मौन मुद्रा व दिगंबर अवस्था बघून प्रथमतः हा कुणी वेडा मनुष्य आहे अशीच कनकवलीच्या लोकांची धारणा झाली.लोक वेडा म्हणून त्यांना हिणवू लागले,लहान मुले ही त्यांना त्रास देऊ लागली.पण महाराज मात्र आपल्या निर्वीकल्प वृत्तीच स्थिर झाले होते.या बाह्य उपाधींचा त्यांना काहीही फरक पडत नव्हता .आत्मानंदात स्थिर झालेल्या महात्मांना याचे भान ही कसे राहिल.एकदा एका झाडाखाली महाराज लोकांच्या छळाल विटून ध्यान लावून बसले.तिथेच जवळ काळ्या मुंग्याच्या वारुळातील मुंग्या महाराजांच्या कडे आल्या व ध्यानमग्न देहावर जणू त्यांनी आक्रमण केले.मुंग्या कडाडून चावा घेत होत्या पण ध्यानाच्या गुढ विश्वात स्थिर झालेल्या महाराजांना याचे साधे भान ही नव्हते.गम्मत म्हणजे हे बघून ही लोकांना महाराजांचा अधिकार लक्षात आला नाही.पुढे महाराज कणकवलीतील काशीविश्वेश्वर मंदिराजवळ असलेल्या मारुती मंदिरात वास्तव्य करु लागले.ते अखंड एकाच जागी अन्न पाणी सोडून ध्यान मग्न अवस्थेत बसून होते.त्यांची ही अवस्था लोकांना त्रासदायक वाटू लागली .काही मंडळींनी महाराजांना मारहान ही केली. पण त्यांच्यावर काहीही प्रतिक्रिया न देता महाराज आपल्या आनंदात निमग्न होते.पुढे कणकवलीत प्लेग ची साथ पसरली सर्व गाव दूर गेले पण महाराज मात्र गावातच होते.तरीही महाराजांना काहीही झाले नाही. बारा तेरा वर्षाचा खडतर काळ कणकवलीत गेला तरीही महाराजांचा अधिकार ,त्यांची महती कुणालाही कळली नाही.मारोती मंदिरात राहत असता लोकांनी महाराजांना तिथून ही काढून दिले.महाराज त्यानंतर कामत महाराज या समाधी मंदिरात येऊन राहिले.तिथेही लोकांनी त्यांना राहू दिले नाही.तेव्हा रामचंद्र कामत यांनी महाराजांना एक पडवी बांधून दिली तिथेच महाराज बरेच वर्ष ध्यान करित पडून राहत. वर्षामागून वर्ष जात होते.महाराजांची ब्रह्म बैसका कधीही मोडली नाही.ते अखंड ध्यानावस्थेत होते.कुणी त्यांना वंदन करी ,कुणी टिंगल पण महाराजांना या सर्व बाह्य गोष्टींनी काहीही फरक पडत नव्हता. लोकांची हेटाळणी,टवाळी ,छळ काही केल्या कमी झाला नाही.पण महाराज मात्र आपल्या ध्यानात अखंड निमग्न होते.आपल्या शिष्याची अशी हेटाळणी सद्गुरूंना कशी बरे सहन होईल? सद्गुरु साटम महाराज हे कोकणातील त्यावेळी सर्वात विलक्षण व प्रसिद्ध सत्पुरुष .महाराज आपल्या शिष्याकरिता अचानक ऐके दिवशी कणकवली येथे आले.महाराजांनी आपल्या या प्रिय शिष्याला ह्रदयाशी कवटाळले,त्यांना कुरवाळले.साटम महाराज आपल्या प्रिय शिष्याशी संवाद साधते झाले. हा प्रसंग ,ही भेट झाल्यावर लोकांच्या लक्षात आले की ऐवढे मोठे महापुरुष जर भालचंद्रांच्या भेटीला आले म्हणजे हे नक्कीच कुणी सामान्य व्यक्ती नाहीत.त्यानंतर मात्र कणकवलीवासी भालचंद्र महाराजांना पुज्य भावाने बघायला लागले.लोक त्यांना नमस्कार करायला लागले. लोक त्यांना आता नागडे बाबा म्हणून ओळखू लागले.

नागडे बाबांची किर्ती दिवसेंदिवस पसरू लागली.लोकांना त्यांच्या दिव्य अधिकाराची प्रचिती यायला लागली.भालचंद्र बाबांच्या दर्शनाला लोकांची रिघ लागली.लोक त्यांची आरती करु लागले.सावंतवाडी संस्थानाचे राजे बापुसाहेब भोसले व राणी पार्वतीबाई हे ही खास महाराजांच्या दर्शनाला येत असत.महाराजांच्या दर्शनास्तव लोक दूरदूरुन येत व गर्दी करत.भालचंद्र बाबा जवळपास तिन तपे मौन धारण करुन होते.त्यांच्या नुसत्या दर्शनाने लोकांचे दुःख ,दैन्य दूर होत असत.महाराजांनी कधी कुणाला उपदेश केला नाही तर ते अखंड नामस्मरण करित असत.महाराजांना देहाचे भान नव्हते त्यामुळे खाने-पिने, स्नान अशा गोष्टीकडे त्यांचे लक्ष नव्हते. एकदा गारगोटीचे मुळे महाराज कणकवलीत आले .त्यावेळी ते भालचंद्र बाबांकडे आले ,त्यांना पाहताच मुळे महाराजांना खुप आश्चर्य वाटले .त्यांनी कणकवलीतील आंवडाबाई या स्त्रीला महाराजांची सेवा करण्याची आज्ञा केली.त्यानंतर काशीबाई,मालीनीबाई या थोर गुरुभक्त स्त्रियांनी महाराजांची सेवा शुद्ध अंतःकरणातून केली.उत्तर भारतातील धर्मराज नावाच्या व्यक्तिने ही महाराजांची खुप खुप सेवा केली.तो महाराजांची सर्व प्रकारे सेवा सुश्रुशा करित असे. अनेक भक्त बाबांची सेवा अखंड करित असत. बाहेर गावची मंडळी महाराजांना आपल्या बरोबर गाडीत घेऊन जात.मुंबई ,पुणे अशा विविध ठिकाणाहून महाराजांना आपल्या घरी ,गावात घेऊन जाण्यासाठी लोक आसुसलेले असत.अशातच महाराजांची अंतरंग वृत्ती कधाही ढळली नाही. महाराजांनी अनेक लोकांचे दुःख ,दैन्य ,कष्ट दूर केले.अनेकांवर नुसत्या दृष्टीक्षेपानेच कृपा अनुग्रह केला. या दरम्यान महाराजांचा खुप प्रवास होत असे. अनेक लोक त्यांना आपल्याकडे घेऊन जात असत.असेच मुंबईच्या भक्ताकडे महाराज गेले असता अघटित घडले.महाराजांना दर्शन कार्यक्रमासाठी लालबाग येथे मारोती मंदिरात भक्तांनी आणले होते.तो दिवस होता १६ डिसेंबर १९७७ .लोकांची दर्शनाला प्रचंड गर्दी झाली होती.भक्तांचे भजन सुरु होते. महाराज नामस्मरण करित बसले होते.रात्रीचे सुमारे आठ वाजले होते.अचानक बाबांनी आपल्या प्राण ब्रह्नरंध्रात नेऊन सर्वांसमक्ष देह ठेवला ..महाराजांनी देह ठेवला ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.सर्व भक्त मंडळीच्या दुःखाला पारावार उरला नाही.महाराजांचा देह गाडीतून कणकवलीला आणण्यात आला.मार्गशिर्ष शुद्ध सप्तमी या दिवशी महाराजांच्या देहाची पुजा करुन कणकवली येथील आश्रमात महाराजांच्या देहाला मध्यभागी समाधी देण्यात आली. आज ही महाराजांची कृपा अनेक लोकांना अनुभवायला मिळते. नुसत्या दर्शनाने आजही लोकं दुःख मुक्त झाल्याचे अनेक उदाहरण आहेत. आज महाराजांच्या समाधी मंदिराला भव्य दिव्य असे रुप प्राप्त झाले आहे.अनेक लोक महाराजांच्या समाधी दर्शनाला दुर दूरून कणकवलीत येतात.अशा सद्गुरु भालचंद्र महाराजांचा कृपा आशिर्वाद आपल्या सर्वांच्या सदैव पाठिशी राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो व ही शब्द सुमनांजली श्रीचरणी अर्पण करतो…
                 🖋️✍🏻 त्यांचाच अक्षय  जाधव आळंदी

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...