Tuesday, February 13, 2024

जगदगुरु श्रीतुकोबारायांची जयंती🙏🏻🌸☘️

 


#वसंत_पंचमी🙏🌸🌺

            माघ शुद्ध पंचमी ही तिथी ज्याप्रमाणे भगवती श्रीशरदा मातेची प्रगट तिथी म्हणुन ओळखली जाते ,भारतात साजरी केली जाते त्याप्रमाणे ही तिथी आपल्या महाराष्ट्रात आणि सबंध जगात एका महान संत, तत्ववेत्ता, चिंतक , मार्गदर्शक असलेल्या जगद्गुरु श्रीतुकोबारायांची ही जन्मतिथी बद्दल प्रसिद्ध आहे.आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या सकलसंतांचे चुडामणी असलेले श्रीतुकोबाराय हे लोकविलक्षण विभूती आहेत.श्रीतुकोबारायांच्या चरित्राचे स्मरण जरी केले तरी डोळ्यापुढे उभा राहतो त्यांचा विलक्षण जिवन प्रवास,अफाट आणि अचाट अभंग गाथा, तुकोबारायांनी  केलेले अपार कष्ट ,त्याग,जिवनातील दु:खद घटनांकडे तटस्थपणे सामोरे जाऊन अंगी प्रखर वैराग्य बाणवून अखंड भगवत स्मरणात कंठलेला काळ.या सर्व घटना बघितला तरी बुद्धी ,वाचा कुंठीत होते.

 "आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी " 

या सारख्या अभंगातून आपले अवतारित्व सांगणार्या तुकोबारायांनी भगवान श्री रामराया सारखे मानवी जिवन जगून दाखविले व त्यातून ब्रह्मस्थितीचा अनुभव घेऊन तो इतरांपर्यंत पोचविला ही ,तो अनुभव इतरांना ही करवीला. महाराजांच्या अलौकिक सामर्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या द्रष्ट्या ,लोकराजालाही आपल्याकडे आकृष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायांनी मार्गदर्शन केले ,पुढील वाटचालीची दिशा दाखवली हे सर्वश्रुत आहेच. तुकोबारायांनी समाजाला दिशा तर दाखविलीच पण वेळेप्रसंगी समाजव्यवस्थेच्या विरोधात जाऊन 

"वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।।" 

   असे पडखर बोल समाजाला ठणकावून सांगितले व दंभ,कर्मठता आणि पाखंडावर तिखट शब्दांत वेळोवेळी ताशेरे ओढले. श्रीतुकोबारायांनी आपल्या गाथेत लोकांना भक्तीचे महत्व तर प्रतिपादित केले आहेच पण त्याचबरोबर विलक्षण अशी लोकजागृती ही केली आहे. समाज हा बुरसटलेल्या ,भोंगळ अशा अंध भक्ती,दंभ,कर्मठता आणि पाखंडाच्या काळोखाखाली दबलेला होता त्या जळमटाला तुकोबारायांनी प्रकर्षाने दूर करण्याचे महान कार्य केले.याचे एक महत्वाचे कारण म्हणजे प्रत्यक्ष तुकोबारायांना या सर्व दिव्यातुन जावे लागलं होते.याची झळ तुकोबारायांना बसलीच होती. श्रीतुकोबारायांच्या कुळात त्यांच्या जन्माच्या आठ पिढ्या अगोदर पासून पंढरीची वारी होती हे सर्वश्रुत आहे.त्यांचे पूर्वज श्रीविश्वंभर बुवा यांच्या साठी प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथ हे देहूत अवतरले होते.आज ही आपण जे मुळ स्वयंभू पांडुरंगाचे मंदिर देहूत बघतो,ज्या विठुरायाच्या सगुण विग्रहाचे दर्शन देऊळवाड्यात घेतो ते तुकोबांकडे वंश परंपरेने आले होते.त्यांचे माता-पिता श्री बोल्होबा व मातोश्री कनकाई हे पंढरीचे निष्ठावान वारकरी होते.अतिशय सत्शिल असे हे दाम्पत्य होते.आपल्या घरी असलेली वंशपरंपरागत ,पंढरीची वारी,विठुरायाच्या भक्तीचे वर्णन करतांना तुकोबाराय लिहीतात, 

" माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ".

   तुकोबांकडे जशी भक्ती ची परंपरा होती तसेच वंशपरंपरागत देहूचे महाजनपद ही होते.हे घराणे मुळचे सुखवस्तु , ऐश्वर्यसंपन्न असे होते. वयाच्या तेराव्या वर्षा पर्यंत तुकोबांचा काळ आई-वडीलांच्या छत्रछायेखाली अतिशय सुखात गेला.वयाच्या बाराव्या वर्षी लग्न झाले.पहिल्या पत्नीला दम्याचा आजार असल्याचे कळल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांचे दुसरे‌ लग्न लावून दिले.एकंदरीत सर्वसामान्य मानवाप्रमाणे तुकोबांचे सुखवस्तु असे जिवन होते.पण खरं दिव्य तर यानंतर सुरु झाले.आपल्याला तुकोबांचा सर्व जिवनभाग माहिती आहेच पण संकटकाळी खचुन न जाता ते वैराग्यशिल अंतःकरणाने त्याला सामोरे गेले.नुसते सामोरे गेले नाहीत तर अखंड प्रभु स्मरणात तल्लिन राहुन आत्मसाक्षात्काराची पातळी ही त्यांनी गाठली.

                   खरंतर तुकोबांना आत्मसाक्षात्कार झाला असे म्हणने ही चूकच ठरेल कारण "आम्ही वैकुंठवासी" म्हणानारे तुकोबा मुळातच आपल्याला "साच भावे वर्ताया" म्हणून फक्त जगुन दाखवायला,जगाला परमार्थाची वाट दाखवायला देह धारण करते झाले होते यात शंका नाही. आपल्या सर्वांना त्यांनी दाखवून दिले की इतक्या विपरीत ,भयावह आणि दु:खद परिस्थितीतही भगवंताला शरण जाता येतंच आणि ब्रह्मपदी पोचता येतं ‌.या परिस्थितीचे वर्णन मला कसे हितकारक ठरले याचे वर्णन तुकोबांनी आपल्या अभंगातुन केले आहे  ते असे की , "बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ।।" आणि एका अभंगात ते म्हणतात ,"बरे झाले निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पिडा केली ।।" दु:खाकडेही इतक्या तटस्थ आणि उपकारक दृष्टीने बघणे हे खरंच एकमेवाद्वितीयच उदाहरण आहे .

एक - दोन नाही तर पहिले वडिल मग आई ,त्यानंतर भावजई ,मग भावाचा गृहत्याग,पहिली पत्नी ,नंतर पोटचे लाडके मुल या सर्वांचा एकापाठी एक झालेला मृत्यू त्यातचं आलेला भयावह दुष्काळ अशी संकटांची साखळीच सुरु झाली. जिचा डोळे बंद करुन विचार जरी केला तरी अंगावर काटा उभा राहतो.पण या प्रसंगी तुकोबांनी काय केले याचे जर प्रामाणिकपणे चिंतन केले तर जिवनात नैराश्य,दुबळेपणा याला कधीही सामोरे जावेच लागणार नाही. या काळात तुकोबांनी केलेले साधन इतके अफाट होते की याचा आपण नुसता विचारही करणे दुरापास्त आहे .आजही भामचंद्र,भंडारा डोंगरावर नुसते उभे जरी राहले आणि देहू गावाचे अवलोकन केले तर लक्षात येईल की त्या तिनशे/चारशे वर्षाआधीच्या काळी तुकोबा या जंगल सदृश भागात इतक्या उंचावर पैदल जायचे कसे,तिथे कसल्याही साधनांशिवाय तेरा -चौदा दिवस,महिनोन महिने राहायचे कसे सर्व कसे दंतकथेचा भागच वाटेल.आजही गाडीने जरी रोज या डोंगरावर जायचे म्हटले तरी कंटाळा येईल तिथे तुकोबांनी केलेली साधना ही खरंच एक आश्चर्य आहे.  श्रीतुकोबाराय पंढरीच्या वारीला आळंदीहून माउलींच्या पादुका घेऊन जायचे असे एकदा वाचनात आले होते.नक्कीच माउलींच्या चरित्राचा ,ज्ञानदेवीचा ,एकनाथ महाराजांचा व नाथ भागवताचे वाचन ,मनन, चिंतन तुकोबारायांनी केले असणार यात शंका नाही. वारकरी संप्रदायाला पुन्हा नव्याने नवजिवन ,नवचेतना व नवदिशा देण्याचे काम तुकोबांनी केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

                         वारकरी संप्रदायाचे नियम व आचारधर्म पाळणारेच खरे वारकरी याचे प्रतिपादन करतांना सडेतोड शब्दात तुकोबा लिहीतात, 

"एकादशीस अन्नपान । जे नर करती भोजन । श्वानविष्ठेसमान । अधम जन ते एक ।।"  तसेच एका ठिकाणी म्हणतात "नेम नाही जया एकादशीव्रत । जाणावे ते प्रेत इहलोकी" इतक्या स्पष्ट शब्दात त्यांनी वारकरी संप्रदायाचे नियमच अधोरेखित केले आहे. 

         तुकोबारायांवर बाबाजी चैतन्य महाराज यांची झालेला कृपा,अनुग्रह ,त्यानंतर अखंड हरीनाम स्मरण ,कठोर साधना त्यातून वेदाचे सारं असलेल्या गाथेचे प्रगटीकरण, आविर्भाव ,त्यानंतर धर्ममार्तंडांनी दिलेला त्रास , संपूर्ण अभंग गाथा इंद्रायणीत बुडविण्याचा आदेश ,पण भगवती इंद्रायणी मातेने लाह्या सारखे तारलेले अभंग ,शरणं आलेले धर्ममार्तंड ,ब्रह्मस्वरुप झालेले तुकोबा आणि सर्वांना सांगून झालेले वैकुंठगमन हा सर्व प्रवास एका लेखातुन  मांडणे केवळ अशक्यप्राय आहे.कारण हा प्रत्येक प्रसंग आपल्या जिवनात वाट दाखवणारा कवडसा आहे.या प्रत्येक प्रसंगातुन काहीतरी शिकवन मिळतेच मिळते.या प्रत्येकाचे स्वतंत्र चिंतन घडले‌ तर त्याचा उलगडा होईल.

"विदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । इतरांनी वहावा भार माथा ।।" असे निक्षून सांगणार्या तुकोबांनी आपल्या अभंगातून याच वेदांचे सार मांडले आहे.एक एक अभंग एका एका प्रबंधासारखा ,टिके सारखा गहन आहे.एका एका अभंगावर एक एक लेख होऊ शकतो इतके ते सटिक ,गर्भरुप आहे. हे सर्व अभंग श्रीतुकोबारायांचे स्वानुभव आहे.ज्यात भक्ती , ज्ञान, वैराग्य, प्रबोधन,योग,नाम ,दंभ,धर्म ,नियम अशा विविध काय तर जगातील सर्व विषयांचा उहापोह केलेला आहे. शब्द मर्यादा लक्षात घेता लेखनीला विराम देतो पण एक सांगू शकतो की तुकोबारायांचे समग्र चरित्र हे आपल्यासाठी एक पथदर्शक दिपक आहे. थोड्या शब्दात जेव्हा मांडायला घेतलं तर ते अशक्यप्राय वाटुन मी न लिहायचे ठरवले होते पण परत श्रीतुकोबांरायांच्या सर्व जिवनाचे एकदा स्मरण केले आणि मला जे काही प्रसंग स्वतःला दिशा दर्शक वाटतात,मला ज्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे,ज्याने मन ,बुद्धीला स्तिमित केले तेच इथे मांडले आहेत.

              श्रीतुकोबाराय हे आम्हाला नित्य वंदनीय, आमच्या जिवनाचे आधाररुप आहेत त्यामुळे ही शब्द सुमनांजली वाहने हे माझे कर्तव्यच ठरते.कित्येक लोक जिवनातील कठीन प्रसंगी भंडारा डोंगर,देहूच्या इंद्रायणी घाटावर जाऊन तुकोबांच्या चरित्राचे नुसते स्मरण करतात आणि नवसंजीवनी घेऊन घरी परत येतात.हा माझाच काय आपल्यातील कित्येकांचा स्वानुभव आहे. बहुतेक गोष्टी किंवा क्रम हा अस्ताव्यस्थ, असंबद्ध वाटेल पण त्याला माझा नाइलाज आहे.कारण तुकोबांच्या चरित्र सागरातील मोती वेचायला माझी झोळी असमर्थ आहे.या फाटक्या झोळीत आजवर जे वेचायला जमले तेच इथे शब्दात मांडायचा प्रयत्न केला.


तुकाराम तुकाराम |

नाम घेता कापे यम ||धृ||

धन्य तुकोबा समर्थ |

जेणे केला हा पुरुषार्थ ||१||

जळी दगडासहित वहया |

जैश्या तरियेल्या लाहया ||२||

म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा |

तुका विष्णू नोहे दुजा ||३||

          एवढ्या अभंगाचे स्मरण करून तुकोबांच्या चरणी ही भावसुमनांजली अर्पन करतो...

      ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✍️✒️

#रामकृष्णहरी🙏🌸🌺

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺

No comments:

Post a Comment

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...