Friday, August 8, 2025

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

 

#कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-

             

ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-

                          नाथ संप्रदाय हा आपल्या भारतीय धर्म परंपरेतील एक परिवर्तनवादी व स्वतंत्र विचारांचा संप्रदाय आहे.संपूर्ण नाथपंथाने विशेष करुन भगवान श्रीमत्सेंद्रनाथ , भगवान गोरक्षनाथ यांनी रुढी, परंपरा, तथाकथित विषमता निर्माण करणारे नियम,रुढीवादी व अमानवी शास्त्र या सर्वांचा विरोध करुन स्वतःचे सर्वतंत्र स्वतंत्र असे मुक्त तंत्र ,मुक्त शास्त्र व मुक्त मार्ग निर्माण केले.शाबर मंत्र ,शाबर तंत्र ,सिद्धांत ग्रंथ ,योगपर ग्रंथ ,विविध पदरचना ही सर्व नाथसंप्रदायाची मिरासी आहे व ती भगवान गोरक्षनाथांनी सर्वां करिता प्रगट केली.भगवान गोरक्षनाथांनी व संपूर्ण नाथ पंथांने जे ज्ञान सामाजात आधी मुद्दाम कवाडबंद ठेवले गेले होते ते नाथसंप्रदायाच्या ज्ञानरुपी गंगा प्रवाहातून प्रवाहित केले. भगवान आदिनाथांनी हे ज्ञान पहिले दिले ते माता पार्वतीला. याच आहेत नाथ परंपरेतील पहिल्या नाथ , ज्यांना नाथ परंपरेत उदयनाथ म्हणून ओळखले जाते.हेच नाथ परंपरेचे वैभव पुढे ज्ञानदेवांच्या सर्व वाङ्मयातून प्रवाहित झालेले दिसते.सामाजिक अज्ञानाच्या स्थितीत बदल घडविण्यासाठी ज्ञानदेवांना नाथ परंपरा हाच उत्तम विचार प्रवाह का वाटला ? हाच उत्तम मार्ग का वाटला?  हा खरोखर सखोल अभ्यासाचा व चिंतनाचा विषय आहे.

  

अवतार जन्माला येण्यापूर्वी संपूर्ण कुळ हे परम पवित्र असणे गरजेचे असते व तो नियम ज्ञानदेवांच्या कुळातही चालून आला हे क्रमप्राप्तच ठरते.ज्ञानोबारायांच्या जन्मापूर्वी तिन पिढ्या आधीपासून नाथ परंपरेचे पूर्ण लक्ष व कृपा या कुळावर होती. हा काही निव्वळ योगायोग नव्हता तर ही नियतीची पूर्व योजना होती.भगवान गोरक्षनाथांना आपले विचार ,आपले स्वतंत्र शास्त्र तळागळात पोचवून त्यातून दिव्य असे आमूलाग्र बदल घडविण्याचे कार्य करुन घ्यायचे होते व ते त्यांनी करुन घेतले ही.जे आज वारकरी संप्रदायाच्या रुपात आपल्या सर्वांसमोर अनुभवरुपात प्रगट आहे. माउली ज्ञानोबारायांचे पंजोबा त्र्यंबकपंत यांच्यात भगवान गोरक्षनाथांनी हे नाथपंथाचे भक्ती बीज पेरले ,हेच बीज पुढे गोविंदपंतांच्या रुपात अंकुरित झाले, पुढे विठ्ठलपंतांच्या रुपात याचे वृक्षात रुपांतर झाले आणि अखेरीस निवृत्ती ,ज्ञानदेव ,सोपानदेव व मुक्तीईच्या रुपात या वृक्षाला अमृतमय असे फळ लागले.


आता आपण ज्ञानदेवांच्या पंजोबाचे म्हणजे त्र्यंबकपंतांचे चरित्र बघूयात.हेच पुढे माउलींच्या कुळाचे मुळपुरुष म्हणून प्रसिद्ध झाले.हे मोठे कर्तबगार व उत्तर काळात मोठे भगवद्भक्त झाले.त्र्यंबकपंतांचे मौंजीबंधन झाल्यावर ते देवगडास(आजचे देवगिरी) येथे वेदाध्ययनासाठी गेले.शास्त्रांचे ,वेदांचे अध्ययन पूर्ण झाल्यावर ते तिथेच राजे जाधवांच्या दरबारात सेवेकरिता रुजु झाले.यथाकाळी त्यांचा विवाह उमाबाईंशी झाला.पुढे त्यांना दोन पुत्र झाले ज्यात थोरले होते गोविंदपंत व धाकटे होते हरिहरपंत.त्र्यंबकपंतांचे दोन्ही पुत्र मोठे कर्तबगार होते.यातील थोरले जे गोविंदपंत होते त्यांनी आपेगाव येथील कुलकर्णी पद सांभाळले व धाकटे हरिहरपंत हे वडिलांसोबत राजदरबारी सेवेत रुजू झाले. त्र्यंबकपंतांचे चातुर्य , बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, कामातील कौशल्य ,काटेकोरपणा व राजनिष्ठा या सर्व गुणांमुळे तत्कालिन सार्वभौम राजा जैत्रपाल उर्फ जैतुंगीने त्यांना बीड देशाचा राज्यकारभार सोपवला.राजाने त्यावेळी जो करारनामा त्र्यंबकपंतांना लिहून दिला तो बघितला तर लक्षात येईल की त्र्यंबकपंतांना एका राजाला साजेसे असे ऐश्वर्य,अधिकार,सैन्य व कार्य राजा जैत्रपालाने सोपवले होते. त्र्यंबकपंतांनी हा बीड भागातील कारभार अतिशय उत्तमरित्या चालविला.पुढे देवगिरीला जैत्रपालाचा मृत्यू झाला.त्याचा मुलगा सिंघल उर्फ सिंव्हल राजा हा राजगादीवर आला.याने त्र्यंबकपंतांचा धाकटा पुत्र हरिहरपंत याला आपला दुय्यम सेनापती नेमले.पण पुढे असे काही घटनाक्रम घडले की त्र्यंबकपंतांना प्रखर असे वैराग्य उत्पन्न होऊन ते अंतर्मुख झाले व परमार्थाकडे वळले.ती घटना अशी की, काही कालावधी नंतर देवगिरीच्या चाळीस कोस अंतरावर असलेल्या बालाघाट प्रदेशातील करंज देशमुखांनी राजद्रोह केला.तो राज्यावर ससैन्य चालून आला.तिन हजार सैन्य घेऊन त्याने राज्यात हलकल्लोळ माजवला,राज्यात धुमाकूळ घातला.त्याचा बिमोड करण्यासाठी सिंघण राजाने हरिहरपंतांना आपल्या वडिलांसह म्हणजे त्र्यंबकपंतांसह लढायला पाठवले.सोबत मोठे सैन्य घेऊन गेलेल्या त्र्यंबकपंत व हरिहरपंतांनी हे बंड मोडीत काढले. पण या लढाईत हरिहरपंत हे धारातिर्थी पडले.आपल्या कर्तबगार मुलाचा असा अवेळी मृत्यू पाहून त्र्यंबकपंतांना अतोनात दुःख झाले.त्यांना वैराग्य होऊन त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व ते आपेगावी आले.पण आता संसारात ही मन रमेना प्रपंचात समाधान मिळत नव्हते.आपले जिवन व्यर्थ जात आहे असे त्यांना वाटू लागले व ते त्यानंतर हरिभक्तीत रत झाले.हिच ज्ञानदेवांच्या अवताराची पायाभरणीची सुरुवात.भगवान गोरक्षनाथांचे या कुळावर लक्ष होतेच कारण भविष्यात नाथपरंपरेचे वैभव त्यांना ज्ञानदेवांच्या रुपात प्रगट करायचे होते यात शंका नाही.भगवान गोरक्षनाथ भ्रमण करित आपेगावी आले. प्रखर वैराग्याने पवित्र झालेल्या त्र्यंबकपंतांवर त्यांनी कृपा अनुग्रह केला.सद्गुरु भेटीनंतर त्र्यंबकपंतांना खरे समाधान लाभले.दिवसेंदिवस त्यांची साधना वाढत गेली व ते आत्मानंदात रमू लागले.पुढे त्यांनी अखंड सद्गुरु व भगवत स्मरणात आपले जिवन व्यतीत केले.पुढे ईश्वरचिंतनातच त्र्यंबकपंतांनी देह ठेवला.विशेष बाब अशी की ज्यावेळी त्यांनी देह ठेवला त्यावेळी भगवान गोरक्षनाथ तेथे स्वतः हजर होते.त्यांनी स्वतः आपल्या या शिष्याला त्र्यंबकपंताला समाधी दिली. हिच खरी नाथपरंपरेच्या कृपेची सुरुवात.पुढील भागात आपण ज्ञानदेवांच्या पितामहांच्या म्हणजे गोविंदपंतांच्या चरित्राची माहिती घेऊयात….

                   ✍🏻त्यांचाच अक्षय जाधव पाटील आळंदी


संदर्भ ग्रंथ :- १) आदी,तिर्थावळी - नामदेवराय कृत

                  २) ज्ञानदेवलिलामृत

                  ३) भक्तविजय - महिपती कृत

                  ४) ज्ञानेश्वरविजय - निरंजन माधव

                  ५)ज्ञानदेवविजय - श्रीमामामहाराज देशपांडे कृत

                  ६)श्रीज्ञानेश्वर महाराज - ल.रा पांगारकर

                  ७)श्रीज्ञानदेव चरित्र - भिंगारकरबुवा

                  ८) ब्रह्मचित्कलामुक्ताई - वक्ते बाबा

1 comment:

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...