Wednesday, March 23, 2022

नाथषष्ठी संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचा ४२३ वा समाधी दिन🌸🙏🌺🚩

 


शरणं_शरणं_एकनाथा_पायी_माथा_ठेविला🙏🌸🌺
              आज नाथषष्ठी आम्हाला नित्य वंदनीय,प्रात: स्मरणीय असलेले शांतिब्रह्म आणि समस्त वारकरी संप्रदायाचे नाथ बाबा तथा सद्गुरु श्री एकनाथ महाराज यांचा ४२३ वा समाधी दिन.समस्त वारकरी संप्रदायातील मुख्य उत्सवापैकी एक असा हा नाथषष्ठीचा उत्सव.भूवैकुंठ पंढरीच्या आषाढी वारी नंतर माउलींची आळंदीतील कार्तिक वारी ,तुकोबांची बिजेची वारी व नाथांची पैठणची षष्ठीची वारी या उत्सवाला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. शांतिब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरित्रात या तिथीला विशेष महत्व आहे त्याचे कारण ही तेवढेच विलक्षण आहे.एकनाथ महाराजांचे सद्गुरु प.पू.श्रीजनार्दन स्वामी महाराज यांची ही जन्मतिथी तसेच त्यांना दत्तप्रभुंचा अनुग्रह ही याच दिवशी झाला.सद्गुरु श्री जनार्दन स्वामींनी देह ही याच दिवशी ठेवला होता.शिवाय जनार्दन स्वामींची आणि एकनाथ महाराजांची भेट आणि स्वामींचा एकोबांना अनुग्रह ही याच तिथीला झाला.या सर्व पावन घटना याच तिथीला झाल्यामुळे नाथांनी इ.स.१५९९ साली आपले अवतार कार्य पूर्ण करुन गंगा गोदावरीमध्ये जलसमाधी घेतली. नाथांच्या चरित्रातील या सर्व पावन घटना या एकाच तिथीला घडल्यामुळे या तिथीला "पंचपर्वा षष्ठी" असे म्हटले जाते.असा हा योग फक्त आणि फक्त नाथांच्याच चरित्रात बघायला मिळतो.इतरत्र कधीही व कुठेही असे घडलेले नाही.
                          समर्थ सद्गुरु श्रीभानुदास महाराज यांच्या कुळात जन्माला आलेले एकोबा आपल्या पणजोबांच्या किर्तीला पुन्हा नव्याने सुवर्ण झळाळी देतात असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.एकनाथ हे नाव जरी कानावर पडले तरी श्रीनाथांचे दिव्य चरित्र आपल्या मन:चक्षुपुढे उभे राहते.नाथबाबांचा जन्म , गुरु प्राप्तीसाठी केलेला गृहत्याग , देवगिरी किल्ल्यावर आपले सद्गुरु श्री जनार्दन स्वामींची भेट, जनार्दन स्वामींनी घेतलेले परिक्षा, नाथांनी स्वामी महाराजांची केलेली एकमेवाद्वितीय अशी कठोर सेवा, नाथांनी शुलभंजन पर्वतावर केलेले तप,तिथेच स्वामी महाराजांसमवेत घडलेले दत्त दर्शन, जनार्दन स्वामी महाराज यांनी दिलेली कृष्ण उपासना, नाथांची तप:पूर्ती नंतर पुन्हा पैठणला परतने,पैठणला आले की गृहस्थाश्रमात प्रवेश व सरस्वती बाईंचे नाथांच्या जिवनात आगमन, नाथांचा दिव्य संसार , नाथांनी शुद्रांना पितृजेवनाच्या पंगतीत ब्राह्मानाआधी दिलेले जेवन, काशीहून आणलेली गंगा गाढवाला पाजणे , एका वेश्येच्या घरी जाऊन केलेले अन्नग्रहण , गंगेवर स्नानास गेलेल्यावर एका यवनाचे नाथांवर थुंकणे व नाथांनी १०० वेळा गंगा स्नान करणे, नाथांची विविध आणि अद्वितीय अशी रचना, भगवान श्री कृष्णचंद्र प्रभुंचे श्रीखंड्याच्या रुपात पैठणला नाथांच्या वाड्यात १२ वर्ष वास्तव्य करणे,बारा वर्ष परब्रह्म परमात्मा प्रभुकृष्णाचे नाथांच्या घरी राबने , विजयी पांडुरंगाचे नाथांकडे आगमन , नाथांचे एकनाथी भागवताच्या दशम स्कंदावर टिका लिहीने व त्यामुळे त्यांना काशीला धर्मसभेपुढे बोलावने ,धर्मसभेने काशीस नाथांची आणि एकनाथी भागवताची हत्तीवरून मिरवणूक काढने ,त्यानंतर नाथांचे सर्वसामान्य जनतेला ज्ञान कळावे म्हणून भारुडाची रचना करणे, दत्तप्रभुंचे नाथांच्या वाड्यात बाहेर पहारा देणे व नाथषष्ठीला नाथमहाराजांचे गंगा गोदावरी मातेच्या पात्रात किर्तन सुरु असतांनाच जलाशयात जल समाधी घेणे असे एक नाहीत तर अनंत लिलांनी भारलेले नाथ महाराजांचे दिव्य लिला चरित्र आहे.या प्रत्येक लिलांचे ,चरित्रातील घटनेचे वर्णन करण्याचे ठरविले तर त्यावर एक एक विस्तृत असा लेख तयार होईल.नाथांचे चरित्र इतके विलक्षण विशाल आणि अनंत भगवद लिलांनी भरलेले आहे,इतक्या विविध पैलूंनी नटलेले आहेत की त्याचे सर्व बाजुंनी चिंतन मांडले तर प्रत्येक घटनेवर एक एक प्रबंद तयार होईल.संतचुडामनी संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या चरित्रात नवविधा भक्तीचे सर्व सारंच आपल्याला बघावयास मिळते.श्रीएकनाथ महाराजांच्या चरित्रातील मेरुमणी म्हणजे भगवान करुणाब्रह्म श्री ज्ञानेश्वर माउलींचा नाथांना झालेला दृष्टांत आणि त्यांच्याद्वारे माउलींनी नाथाकरवी केलेले ज्ञानेश्वरी  शुद्धीकरणाचे अतिशय महत्वाचे कार्य.ज्ञानेश्वरीच्या मुळ संहितेत कालौघात घुसलेले व घुसवलेले अपपाठ शोधून काढुन त्यांनीच प्रथम प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरीची प्रत तयार केली.नाथांनी आपल्या सर्वांवर केलेले हे उपकारच आहेत.या ऋणातून आपण केव्हाही उतराई होऊच शकत नाही.म्हणुनच "ज्ञानियांचा एका ,नामयाचा तुका" अशी म्हणं वारकरी संप्रदायात प्रसिद्ध आहे. तसेच एकनाथ महाराजांना माउलींना आपल्या स्वनामाचा "ज्ञानदेव" या नामाचा अनुग्रह दिला.माउलींनी आपल्या स्वनामाचा अनुग्रह फक्त तिनचं संतांना दिला आहे त्यातील एक म्हणजे नाथ महाराज.दत्तप्रभुंची राजधानी म्हणजे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील घाट हा नाथ महाराजांनीच बांधला आहे. भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, एकनाथी भागवत ,चिरंजीव पद इत्यादी सर्व ग्रंथ मिळून एकूण लाखभर ओव्या व चार हजार पेक्षा जास्त अभंग ,भारुडे,आरत्या असे प्रचंड वाङ्मय त्यांनी सहज लीलेने निर्माण केले आहे.नाथ महाराजांनी रचलेली "त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्त हा जाणा" ही दत्तप्रभुंची आरती आज सर्वश्रुत आहे ,आज ती आरती सर्वत्र भक्तीभावाने म्हटली जाते. नाथांच्या स्वरुपात प्रत्यक्ष शांतीच सगुणरुप घेऊन अवतरली होती असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.नाथांचे चरित्र अतिशय दिव्य प्रत्येकाला नित्य वंदनीय, नित्य स्मरणिय, नित्य मार्गदर्शक आणि नित्य अनुकरणीय असेच आहे.प्रत्येकाने जिवनात एकदा तरी एकनाथ महाराजांचे चरित्र एकदा तरी वाचायलाच हवे असं माझं स्पष्ट मत आहे.व्यक्तिश: आजवर झालेले सर्व संत मंडळी माझ्यासाठी परम वंदनीयच आहेतच पण कुठेतरी नाथबाबा,चोखोबा आणि संत कान्होपात्रा या तिन्ही संतांनी हृदयात वेगळे घरचं केले आहे.त्याला कारण ही मला तसेच वाटते.हे तिन्ही संत समाजाचे तिन टोकं आहेत.समाजव्यवस्थेतील तिन भाग आहेत.भगवंतांना फक्त आणि फक्त शुद्ध प्रेम आणि विशुद्ध भक्ती अभिप्रेत आहे.या तिन्ही संतांनी आपल्या सद्गुरुंवर ,भगवंतांवर फक्त शुद्ध भक्ती आणि प्रेम केले.त्याच भावाने त्यांनी भगवंतांना आपलेसे केले.मग नाथाघरी भगवान श्रीखंड्या रुपाने राबले, चोखोबांच्या घरी सुईन झाले,चोखोबांची गुरे ओढली, कान्होपात्रांना तर प्रत्यक्ष आपल्या चरणी विसावा दिला. भगवंतांच्या प्राप्ती साठी जात,धर्म,पंथ,लिंग या कसल्याही गोष्टींची बाधा होत नाही हेच जणू त्यांनी सर्व जगाला दाखवून दिले.एकनाथ महाराजांचे रविंद्र भटांनी लिहिलेले "एका जनार्दनी" ,लिला गोळे यांनी लिहीलेले "शांतिब्रह्म" ,पांगारकरांनी संपादित केलेले "श्रीएकनाथ महाराज चरित्र" यातले कुठलेही एक चरित्र जरुर वाचाचं. एकनाथ महाराज नुसते संत नाहीत तर ती साकार रुपात असलेली करुणा,शांती होती.त्यांचा समाजातील तळागाळातील लोकांसाठी असलेला कळवळा बघितला तर लक्षात येतं की हे खरे ब्रह्म ,हेच खरे संत. संतत्वाची दासबोधात समर्थांनी केलेली परिभाषा म्हणजे एकनाथ महाराज.आजच्या या परम पावन नाथषष्ठी च्या दिनी नाथांचे स्मरण करुयात.नाथांच्या चरणी ही शब्दसुमनांजली ,त्यांनीच करुन घेतलेली ही शब्द सेवा त्यांच्याच चरणी अर्पन करतो. 
        ✒️✍️ अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

2 comments:

  1. खुप सुंदर 🙏 रामकृष्ण हरि 🙏💐

    ReplyDelete
    Replies
    1. शांतिब्रम्ह एकनाथ महाराजांविषयी खूप सुंदर लेखन केले आहे 🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी

      Delete

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...