Tuesday, July 26, 2022

महावैष्णव संतश्रेष्ठ सद्गुरु श्री सावता महाराजांची ७२७ वी पुण्यतिथी 🙏🌸🌺🚩

 


एका जनार्दनी सांवता तो धन्य । तयाचे महिमान न कळे काही ।। 

           आज आषाढ कृष्ण चतुर्दशी संतश्रेष्ठ श्रीसावता महाराजांची ७२७ वी पुण्यतिथी. वारकरी संप्रदायात असंख्य संतांची मांदियाळी होऊन गेली.प्रत्येकाचे चरित्र ,त्यातील लिला, त्यातील भक्तीरस हा अगदी भिन्न भिन्न. प्रत्येकाने आपल्या अवतार काळात काहीतरी वेगळाच ठसा समाजावर उमटवून परब्रह्म भगवंताला आपलंसं केलं.या सर्व संतमांदियाळीतील एक म्हणजे संतश्रेष्ठ श्री सावता महाराज. सावता महाराज म्हणजे कर्म मार्गाची प्रत्यक्ष मुर्तीचं.कर्म मार्गाच्या आचरणातुनही भगवंताला आपलंसं करता येतं जणु हाच उपदेश त्यांनी सर्व मानवजातीला दिला.


धन्य ते अरण रत्नाचीच खाण । जन्मला निधान सावता तो ।।

सावता सागर प्रेमाचा आगर । घेतला अवतार माळ्याघरी ।।

धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता । साठविला दाता त्रैलोक्याचा ।।

नामा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला । वंश उद्धरिला माळीयाचा ।।

               अशा या संतश्रेष्ठ श्री सावता महाराजांचा जन्म पंढरपूर जवळील अरण या गावी झाला होता. माळी ही जात असल्याने सतत आपल्या मळ्यातच त्यांनी काम करतांना पांडुरंगाची भक्ती केली .त्यातच ते रममान झाले.पंढरपूर पासून अगदी जवळचं राहुनही ते कधीही पंढरपूरला गेले नाही. असे कर्मयोगी सावतोबा एकमेवाद्वितीयच. सावता महाराज हे ज्ञानेश्वर माउली आणि नामदेवरायांच्या समकालीन. सावता महाराजांची अभंग रचना अगदी थोडीच उपलब्ध आहे.काशीबा गुरव नावाच्या गृहस्थांनी त्यांचे अभंग लिहून ठेवले व संपूर्ण विश्वासाठी ठेवाच दिला आहे. सावता महाराजांच्या अल्प अभंगातुनही त्यांची उत्कट भक्ती ,त्यांची निष्ठा यांचे दर्शन होते. "कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी" म्हणणारे सावता महाराज आपल्या मळ्यातच पंढरीचा अनुभव घेत होते. अंतर्बाह्य फक्त आणि फक्त विठ्ठलभक्तीत रंगुन गेलेल्या सावतोबांनी श्रीपंढरीनाथांच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण केले होते. या अनन्यभक्तीने आपल्या मळ्यातच त्यांना भगवंतांची अद्वैतानुभूती आली आणि ते स्वत:च विठ्ठलस्वरुप झाले. त्यामुळे "ओतप्रोत भरला पांडुरंग" अशी त्यांची अवस्था झाली आणि म्हणुन ते पंढरीच्या सगुण पांडुरंगाला भेटायला कधीही पंढरीला गेले नाही.

याच भक्तीचा परिपाक म्हणून की काय प्रत्यक्ष पंढरीनाथच त्यांच्या भेटीला अरणगावात आले.जणु त्यांच्या कर्मभक्तीची ही पोचपावतीच होती. निष्ठेने भगवतस्मरण करता करता जर कर्म केले तर भगवंताला ही आपलंसं करता येतं हेच सावतोबांच्या चरित्रातुन दिसून येतं. आजही ज्याप्रमाणे आषाढ शुद्ध पक्षात सर्व संत श्रीपांडुरंगाला भेटायला येतात त्याचप्रमाणे प्रत्यक्ष पांडुरंग हे आषाढ कृष्ण पक्षात श्रीसावता महाराजांना भेटायला अरण गावी जातात.आषाढ वद्य चतुर्दशी हा सावता महाराजांचा समाधी दिन तर अमावस्या हा काल्याचा दिवस . काल्याच्या दिवशी पंढरपूर वरून निघालेली देवाची पालखी अरणगाव येथे येते . पालखी आल्यावर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता होते. सावता महाराजांना अवघे ४५ वर्षाचे आयुष्य लाभले.ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेण्याच्या एक वर्षा आधी आषाढ वद्य चतुर्दशी या दिवशी त्यांनी आपले प्राण पांडुरंगाचे चरणी विलीन केले.

सावता महाराजांची समाधी श्रीक्षत्र अरण

                   श्री सावता महाराजांनी कर्म आणि भक्ती यांची अतिशय सुंदर सांगड घालुन जगापुढे मोठा आदर्शच निर्माण केला. पंढरीला कधीही न जाता फक्त विशुद्ध अंतःकरणाने भगवंतांची शुध्द भक्ती व कर्म करता करता त्यांचे ठेवलेले अखंड अनुसंधान हाच भगवंतांच्या प्राप्तीचा राजमार्ग आहे हेच त्यांनी दाखवून दिले.धर्माचरणातील दिखावा ,बाह्य अवडंबर आणि कर्मठता याबाबत त्यांनी कसलीही भिड ठेवली नाही. याबाबत त्यांनी चांगलाच कठोर समाचार घेतला. शुद्धांतकरण , नितीमत्ता, सदाचार ,समभाव, कर्मप्राधान्य या सर्व गुणांचीच त्यांनी स्वत:च्या चरित्रातुन शिकवण दिलेली दिसुन येते. श्री भगवंतांना प्राप्त करुन घ्यायचे असले तर तप ,तिर्थयात्रा, कर्मकांड, व्रतवैकल्ये इत्यादी काहीही करायची काडीमात्र गरज नाही गरज आहे ती फक्त जेथे असाल ,जसे असाल ,जे काही करत असाल तर त्या परिस्थितीत अनन्यशरणागत होऊन शुद्धांतकरणपूर्वक त्यांची भक्ती ,चिंतन आणि स्मरण करने. बसं हाच संतश्रेष्ठ सावतोबांच्या चरित्रातील मेरुमणी. आज त्यांच्या पुण्यतिथी दिनी आपल्याला ही या जन्मात कधीतरी शद्ध अंत:करणपूर्वक भगवंतांची भक्ती करता यावी हाच आशिर्वाद आपण त्यांच्या करकमलातुन मागुयात‌. श्री संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम!!!🙏🌺🌸

   ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✍️✒️

सकल संत चुडामणी भक्तश्रेष्ठ सद्गुरु श्री नामदेवरायांची ६७१ वी पुण्यतिथी☘️🌺🌸🙏🚩

 


सकल_संत_चुडामणी_नामदेवरायांची_६७१_वी_पुण्यतिथी :-
                      आज आषाढ वद्य त्रयोदशी भक्त शिरोमणी, भक्तश्रेष्ठ, सनत्कुमारांचे,भक्तराज श्रीप्रह्लादांचे अवतार सद्गुरु श्रीनामदेवरायांची ६७१ वी पुण्यतिथी.श्रीनामदेवरायांचे वर्णन आपण काय करणार? ज्यांच्या किर्तनात प्रत्यक्ष भक्तवत्सल पंढरीनाथ टाळ घेऊन नाचत असे,ज्यांच्या हातून जेवत असे,ज्यांनी देह ठेवल्यावर प्रत्यक्ष पंढरीनाथ अश्रू ढाळत चंद्रभागेच्या वाळवंटात बसले होते.अशा भक्तश्रेष्ठाचे चरित्र वर्णन आपल्यातील कुणीही करण्यास असमर्थच आहे. तरीही या दिव्य चरित्राचे स्मरण,चिंतन घडावे म्हणून हे लिखाणाचे धारिष्ट्य करत आहे. श्री नामदेवरायांचे सर्व चरित्रच अतिशय दिव्य आणि अलौकिक असे आहे. अगदी जन्म झाल्यापासून ते त्यांची भक्ती,त्यांचे किर्तन,त्यांचा परिवार,त्यांचे माउलींवरील प्रेम,त्यांचे माउलींसोबत तिर्थाटन,त्यांच्यावर झालेली गुरुकृपा,माउली आदी सर्व भावंडांच्या समाधी प्रसंगी देवांसोबत त्यांची उपस्थिती,त्यांची व समस्त परिवाराची समाधी अशा एकमेवाद्वितीय अलौकिक घटनाक्रमाने हे चरित्र मंडीत आहे.शांति ब्रह्म नाथ बाबांनी श्रीनामदेवरायांच्या चरित्रावर बरेच अभंग रचले आहेत.तसेच अनेक ठिकाणी नामदेवरायांच्या चरित्रासंदर्भातील विविध अभंग विविध संतांनी प्रगट केले आहेत.आपण या लेखात त्यातील काही भागाचे चिंतन करण्याचा प्रयत्न करुयात.  
                               "शुद्ध बिजा पोटी" या उक्ती प्रमाणे नामदेवरायांचे मुळ पुरुष यदुशेट परम विठ्ठल भक्त होते.नामदेवरायांच्या घरात पूर्वापारच विठ्ठल भक्तीचे बिजारोपन झालेले होते.पंढरीची वारी ही नित्य अनेक कालापासून सुरु होती.यदुशेट हे परभणी जिल्ह्यातील नरसी ब्राह्मण या ग्रामीण भागात राहत.तेथेच ते कपडे विकण्याचा व शिवण्याचा व्यवसाय करीत.यांचे पूर्ण घराणे हे वारकरी होते. यदूशेट पासुन पाचवे वंशज म्हणजे दामाशेटी.हे आपल्या नामदेवरायांचे पिताश्री.आपण बहूतेक लोकांनी काकड आरती मध्ये दामाशेटी यांचा उल्लेख ऐकलाच असेल. त्यांची पत्नी गोणाई या ही धर्मपरायण होत्या.या भगवदभक्त दाम्पत्याचे पोटी दोन अपत्य जन्मास आले.त्यात पहिली आऊबाई आणि दुसरे नामदेवराय.नामदेवरायांचा जन्म शके ११९२ प्रभवसंवत्सरी कार्तिक शुद्ध एकादशी रविवारी सुर्योदयावेळी झाला. पुढे आषाढी-कार्तिकी वार्या करता करता दामाशेटी हे पंढरपूर येथेच स्थाईक झाले. पंढरीतील महाद्वाराजवळच घर घेऊन दामशेटी आपल्या परिसरासोबत राहू लागले.बाळ नामा आपल्या पित्यासोबत राहून व सतत विठ्ठल नाम गजर ऐकून त्या नामात तल्लीन होत असे.सकाळ संध्याकाळ पांडूरंगाचे दर्शन ते आपल्या वडिलांसोबत घेत असत.गम्मत अशी की वडिलांनी नामदेवांना धुळाक्षरे गिरवायला शिक्षकांकडे पाठविले तर बाळ नामदेव त्या धूळ पाटीवर ही 'विठ्ठल' नामच गिरवीत असे.तसेच गुरुजींनी काही पाठ करायला सांगितले तर फक्त विठ्ठल विठ्ठल हेच नामस्मरण करत असे.अशाप्रकारे नामदेवांना बालपणापासूनच विठ्ठल नामाचा आणि भजन,कीर्तनाचा छंदच होता. नामदेवरायांच्या चरित्रातील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे नैवेद्याची.ती आपल्या सर्वांना ठाऊक असेलच तरी ती लेखात घेतो आहे. दामाशेटींचा एक नियम होता,ते रोज पांडुरंगाला नैवेद्य दाखवूनच अन्न ग्रहण करीत.एके दिवशी दामाशेटींना कापड विकण्याकरिता परगावी जावयाचे होते.त्यावेळी त्यांनी नामदेवास देवांना नैवेद्य दाखवायची आज्ञा केली‌.आठ वर्षाचे नामदेव आईने दिलेला नैवेद्य घेऊन राऊळात आले.देवांसमोर नैवेद्य ठेवला त्यांना असे वाटले की आपले वडील रोज नैवेद्य देवांना देतात व देव तो प्रत्यक्ष खातात.ते ही तिथेच हात जोडून उभे राहिले.बराच वेळ झाला पण देव काही नैवेद्य खाईनात.म्हणून ते देवांना विनवू लागले, "देवा! माझे बाबा रोज तुला नैवेद्य देतात,तो तू खातो.आज मी लहान मुलं असल्याने तो तु खात नाहीस का ? तू जर जेवला नाहीस तर घरी कुणीही जेवणार नाही.माझी आई सुद्धा रागवेल." असे म्हणत ते स्फुंदून स्फुंदून रडू लागले.आपण जर भोजन नाही केले तर सिंहासनावर डोके आदळून प्राण देईन असा निर्वाणीचा हट्ट त्यांनी देवापुढे मांडल्याबरोबर नामदेवरायांच्या शुद्ध प्रेमासाठी प्रत्यक्ष जगन्नाथ भगवान श्रीपंढरीनाथ तिथे सगुण रुपात प्रगटले.त्यांनी नामदेवरायांना आलिंगन दिले ,त्यांची समजूत काढून देव त्यांच्या हातुन जेवले.घरी आल्यावर आईने नैवेद्याबद्दल विचारले तेव्हा नामदेवांनी जे घडले ते आईस सांगितले पण आईला ही लबाडी वाटली.गम्मत अशी की दुसर्या दिवशी दामाशेटी घरी परतल्यावर गोणाईने ही गोष्ट त्यांना सांगितली .दुसर्या दिवशी सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांनी नामदेवरायांना आपल्या सोबत नैवेद्य घेऊन मंदिरात नेले.तिथे गेल्यावर नामदेवरायांच्या हातात त्यांनी ताट दिले पण देव त्यांना म्हणाले, "आज दामाशेटी सोबत आहेत त्यामुळे मला नैवेद्य खाता येणार नाही." तेव्हा नामदेव म्हणाले, "देवा तुम्ही कपटी आहात.कारण तुम्ही मला भेट देता व वडिलांना देत नाही.तेव्हा तुम्हाला काय म्हणावे? नंतर खरंच पांडुरंग तिथे प्रगटले व त्यांनी दामाशेटींना दर्शन दिले आणि तो नैवेद्य भक्षण केला‌.यावर नामदेवरायांचेच अतिशय सुंदर अभंग आहेत.शब्दमर्यादेस्तव‌ ते इथे देता येणार नाहीत.एकवार नाही तर असे अनेक प्रसंग आहेत ज्यात पांडुरंग नामदेवांना नित्य बोलत,त्यांच्या हातुन जेवत,त्यांच्याशी भांडत जणू नामदेवरायांनी देवांना आपल्या प्रेमपाषात बांधून ठेवले होते.त्या काळाच्या पद्धतीनुसार नामदेवरायांंचे वयाच्या नवव्या वर्षी लग्न करण्यात आले.गोविंदशेट सदावर्ते यांची कन्या राजाई या नावदेवरायांच्या पत्नी म्हणून घरात आल्या. पुढे प्रपंच वाढत गेला.नामदेवरायांना चार मुले व चार मुली झाल्या.पण त्यांचे लक्ष सदैव पांडुरंगाच्या नावात ,भजनात ,कीर्तनात तल्लीन झालेले असे.नामदेवरायांच्या कीर्तनात प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथ प्रगटून टाळ वाजवित असतं. नामदेवरायांच्याच काळात ज्ञानेश्वर माउली,गोरोबा काका,चोखोबाराय यांचेही अवतार कार्य सुरु होते.या सर्वांचे नामदेवरायांवर विलक्षण प्रेम होते.अनेक संत मंडळी नामदेवरायांना भेटत असत.
                                    श्रीनामदेवरायांच्या जिवनातील सर्वात महत्वाची लिला किंवा भाग म्हणजे सद्गुरु श्रीविसोबांकडे जाण्याची देवांनी त्यांना दिलेली आज्ञा‌.हा प्रसंग प्रत्येकासाठी महत्वाचा आहे.एके दिवशी सर्व संत मंडळी ज्यात ज्ञानोबा आदी भावंडे, गोरोबाकाका, चोखोबा सर्व जण चंद्रभागेच्या वाळवंटात बसलेले होते‌.मुक्ताईंच्या प्रेरणेने सकल संतांची परिक्षा गोरोबा काकांनी घेतली. तेव्हा भगवंतांचे अतिप्रिय नामदेवरायांना गोरोबाकाकांनी कच्चे मडके ठरविले.तेव्हा नामदेवराव पांडुरंगाकडे आले व तक्रार करु लागले. त्यावर देव म्हणाले , "नामदेवा तुला सद्गुरुंचा अनुग्रह हा घ्यावाच लागेल‌.गुरुशिवाय ज्ञान नाही,ज्ञानाशिवाय आत्मस्वरुपाची ओळख नाही,गुरुवाचुन मोक्ष नाही." असे निर्वाणीचे शब्द देवांनी नामदेवांना ऐकविले. नामदेवांनी देवाला विचारले की गुरु कुठे मिळणार.तेव्हा देवांनी त्यांना औंढ्या नागनाथाजवळ जाऊन विसोबा खेचराला शरणं जाण्याची आज्ञा केली‌. विसोबा खेचरांची व त्यांची भेट ही मोठी विलक्षण होती.ती हकिकत बहूतेक लोकांना ठाऊक आहेच.त्याची पुनरावृत्ती टाळतो‌.विसोबा हे ज्ञानेश्वर माउलींचे अनुग्रहीत होते.या खेचर नाथांनी नामदेवरायांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले.त्यांना आत्माज्ञान देऊन परिपूर्ण केले‌.नामदेवराय म्हणतात,

खेचरे खेचरी बुद्धि अगोचरी ।
नामा झडकरी देवो केला । 
अहं सोहं भाव हारपल्या श्रृती ।
नामयाची तृप्ती खेचरी झाली ।।
         या अभंगात गुरुकृपेनंतर आलेल्या आत्मानुभवाचे वर्णन नामदेवरायांनी केले आहे‌.
श्री नामदेवरायांनी परिसा भागवत आणि जनाबाई सारख्या अनेक भक्तांना अनुग्रह देऊन आपली पूर्ण कृपा केली.त्यांच्यावर केलेली कृपा व त्या भक्तांच्या चरित्र लिला इतक्या सुंदर आहेत की तो एक स्वतंत्र चिंतनाचा मुद्दा ठरेल.श्रीजनाबाई यांचे चरित्र आपल्यातील बहूतेक लोकांनी ऐकलेच असेल.परिसा भागवताची कथा ही अतिशय सुंदर आहे.ती पुढे कधीतरी जरुर बघुयात.
श्रीनामदेवरायांची किर्ती सर्वदूर पोचली होती.ज्ञानेश्वर महाराज, सर्व भावंडे व नामदेवराय यांनी केलेली तिर्थयात्रा हा तर एक वेगळ्या विस्तृत लेखाचा विषय आहे.कारण तिर्थयात्रेला जाण्याआधी ज्ञानेश्वर माउली आणि नामदेवराय यांच्यात झालेले संभाषण, या यात्रेदरम्यान घडलेले विविध दिव्य चमत्कार जसे वाळवंटात कोरड्या विहिरीत पाणी प्रगट होणे,औंढ्या नागनाथाचे मंदिरच किर्तनावेळी फिरणे,तसेच विविध तीर्थ करतं जेव्हा ही संत मांदियाळी श्रीक्षेत्र काशीला पोचली तेव्हा काशीला भगवान शंकराचे एका राजाच्या रुपात या सर्वांचे स्वागत करणे,या सर्व संतांनी देवांना तात्काळ ओळखून नमस्कार करणे, तसेच काशीचे महापंडित श्री मुद्गलाचार्य यांनी यज्ञ आरंभ केला होता त्यावेळी त्या यज्ञाप्रसंगी अग्रपुजेचा मान ज्ञानेश्वर माउलींना सर्व संतांच्या संमतीने मिळाला होता.असे अनेक विविध अलौकिक घटनाक्रम या यात्रेदरम्यान घडल्या होत्या.शब्दमर्यादेस्तव आज जरी तो देता आला नसला तरी "तिर्थयात्रा" या नावे त्यावर स्वतंत्र लेख व्हावा अशी माझी इच्छा आहे.( आज आपण जे माउलींचे सर्वत्र फेट्यातील छायाचित्र बघतो ते याच यज्ञप्रसंगातील आहे )
 याच वेळी श्रीनामदेवराय,श्रीनिवृत्तीनाथ ,श्रीमाउलींची भेट ही त्या काळातील थोर आणि विलक्षण महात्म्ये श्रीकबीरदास यांच्याशी झाली.तसेच पूर्वी दत्तप्रभुंनी सांगितल्याप्रमाणे निवृत्तीनाथ ,माउली आणि नामदेवरायांना दत्तप्रभु,मत्सेंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची भेट झाली.त्यानंतर ही सर्व मंडळी यात्रा करीत करीत पंढरपुरास परतले. पुढे पंढरीनाथांची आज्ञा घेऊन श्रीज्ञानेश्वर माउलींनी आळंदीत समाधी घेण्याचा विचार केला.दिवस ठरला कार्तिक वद्य त्रयोदशी.या वेळी पांडुरंग आणि नामदेवराय हे हजर होते.तसेच त्यानंतर चांगदेव महाराज,सोपान काका, मुक्ताई आणि निवृत्तीनाथ यांच्याही समाधी प्रसंगी नामदेवराय स्वतः हजर होते. या सर्वांच्या समाधी नंतर नामदेवरायांना अतिव दु:ख झाले.ज्ञानदेवांच्या आठवणीने हळवे झालेले नामदेवरायांचे मन आता पंढरपूरात रमेना किंवा पंढरीचा व भगवत भक्तीचा महिमा सर्वदूर पोचवावा हा संकल्प मनी धरुन नामदेवराय पंढरीहून उत्तरेकडे निघाले असे म्हणने जास्त संयुक्तिक ठरेल.नामदेवराय एकटेच तिर्थयात्रा करत द्वारका,हरिद्वार ,मारवाड प्रांत करीत पंजाबात येऊन पोचले.तेथे ते बरेच वर्षे राहिले.तेथील लोकांना हरीभक्तीचे अमृत पान करविले.अनेक अभंग रचना केल्या.पंजाब आदी प्रांतातील लोकांच्या मनात हरीभक्तीचा असा काही अंकुर नामदेवरायांनी रुजविला की आजही त्यांची किर्ती उत्तरेकडे गर्जत आहे.आजही त्यांचे ६१ अभंग हे शिखांच्या "गुरुग्रंथसाहेब" या ग्रंथात समाविष्ट आहेत.
पण पुन्हा पांडुरंगाच्या भेटीस्तव नामदेवराय पंढरपूर येथे परतले.त्यांनी आता आपल्या समाधीचा विचार देवांना कळवीला.पुढे आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ ला नामदेवरायांनी आपल्या परिवारातील त्यांच्या पत्नी राजाई,आई गोणाई,वडील दामाशेटी,नारा,विठा,महादा व गोंदा हे चार पुत्र,लाडाई ,गोडाई,साखराई व येसाई या चार सुना,लिंबाई ही कन्या व आऊबाई ही बहिण तसेच त्यांच्या स्वनामधन्य शिष्या जनाबाई असे ऐकुन पंधरा जनांनी पंढरपुरी महाद्वारात भगवान पंढरीनाथांच्या समक्ष समाधी घेतली व देवांच्या चरणी अखंड विसावले.हा जगातील आजवर झालेला एकमेवाद्वितीय चमत्कारच आहे.अशी घटना इतरत्र कुठेही घडल्याचा साधा उल्लेख देखील नाही.
          श्रीनामदेवरायांनी जवळपास अडीच हजारांहून अधिक अभंगांची रचना केली आहे.त्यात भक्ती , ज्ञान,वैराग्य, ज्ञानेश्वर महाराज आणि इतर भावंडांचे समाधी वर्णन ,भुपाळ्या ,आरत्या असे अनेक विषय आहेत.त्याच बरोबर त्यांनी हिंदी पदांचीही रचना केली आहे. अशा या भक्तराजांची ,भक्तश्रेष्ठांची आज पुण्यतिथी.ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पन करतो आणि आपल्या सर्वांकडून नामदेवरायांनी श्री भगवंतांची अखंड भक्ती करुन घ्यावी ही कळकळीची प्रार्थना करतो.
         ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

Sunday, July 24, 2022

आज गणेशपुरी निवासी सद्गुरु भगवान श्री नित्यानंद बाबांची ६१वी पुण्यतिथी🌺🚩🌸🙏

 


आज_नित्यानंदबाबांची_६१वी_पुण्यतिथी🌺🌸🙏

                                भारतभूमीत आजवर असंख्य सिद्ध,महासिद्ध,संत, सत्पुरुष,योगी,महायोगी,साधु होऊन गेलेत.त्याच सिद्ध मांदियाळीत गेल्या शतकात होऊन गेलेल्या महासिद्धांपैकी एक, एव्हाना त्यांच्यातील अग्रगण्य असलेले महासिद्ध म्हणजे श्री भगवान नित्यानंद बाबा. श्रीबाबांच्या चरित्राचा सुगंध सर्वदूर साता समुद्रापार जगभर पसरला , त्यांचा किर्ती सुगंध जगभर दरवळला. बाबांच्या दिव्यतेमुळे जगभरातील असंख्य भक्त त्यांच्याकडे आकर्षित झाले. श्रीबाबांच्या बाबतीत त्यांच्या पूर्वायुष्यातील कुठल्याही गोष्टींचे ठोस पुरावे नाहीत ,त्यांच्या जन्माबद्दल ,परिवाराबद्दल , पूर्वायुष्यातील कुठल्याही साधनेबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. 

                            भक्तांमधे अशी श्रद्धा आहे की श्रीबाबा गणेशपुरी ला अवतरण्याआधी पन्नास साठ वर्षांपूर्वी दक्षिण कर्नाटकातील कान्हनगडजवळील "गुरुवन" नामक स्थानी तारुण्यावस्थेत प्रगट झाले होते. ते कधीकधी बोलतांनी या स्थानाचा उल्लेख करीत असत.या स्थानाला त्यांची तपोभूमी म्हणुन ओळखले जाते.तेथील डोंगरांमध्ये असंख्य गुहा आहेत व याच गुहेत श्रीबाबांनी दीर्घकाळ ध्यान धारणा केली होती.या स्थानाच्या जवळ कुठेही पाण्याची सोय नव्हती तेव्हा श्री बाबांनी याच गुहेत एक झरा उत्पन्न केला आणि तेव्हापासून हा झरा आजही अविरत अखंड सुरू आहे.या झर्याला आज "पापनाशिनी गंगा" असे म्हटले जाते.हे स्थान मंगळूर जवळच आहे.आजही मंगळूर चे लोक श्रीबाबांच्या पुण्यतिथी दिनी येथे मोठा उत्सव करतात.दक्षिण भारतातील केरळ आणि मंगळूरमध्ये भगवान नित्यानंद यांनी बर्याच लीला आणि चमत्कार केले.त्यांनी पायीच असंख्य ठिकाणी प्रवास केला.या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक लोकांना रोगमुक्त केले व अनेकांचे दु:ख ,यातना आणि दारिद्रय दूर केले.आजही हे सर्व लोक गणेशपुरीला बाबांच्या दर्शनाला येतात.श्रीबाबा हे एकांतप्रिय होते.ते एकटेच राहत.ते बहुदा पायीच प्रवास करत.कित्येक लोकांना अनुभव आहे की श्री बाबा हे मनोवेगाने प्रवास करीत असत.श्री बाबांच्या चरणी अष्टमहासिद्धी नांदत असतं व यांचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे. श्रीबाबांचे जिथे कुठे वास्तव्य असे तिथे असंख्य चमत्कार ,लिला घडत पण बाबा या सर्वातुन नित्य अलिप्त असत. बाबांच्या चरित्रातील हे दिव्य प्रसंग पुढे कधीतरी सविस्तर बघुच ,त्या प्रत्येक लिलांचे चिंतन जर मांडले तर एक लिलाकोषच तयार होईल.आजही गणेशपुरीला भक्तांना या दिव्य लिलांचा नित्य अनुभव येतच आहे.

              श्री भगवान नित्यानंद बाबा हे १९३० साली मुंबई जवळील वज्रेश्वरी या ठिकाणी प्रगट झाले. वज्रेश्वरी हे अतिशय पुरातन व भव्य असं जगदंबेच ठिकाण आहे. चिमाजी आप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा ऐतिहासिक उल्लेख आहे.याच मंदिराजवळ गरम पाण्याचे कुंड आहे.या कुंडाना 'रामकुंड' असे म्हणतात.येथेच सुरवातीच्या काळात नित्यानंद बाबा वास्तव्यास होते.त्यांनी येथेच जवळ एक विश्रामगृह निर्माण केले व तेथील गरम पाण्याच्या कुंडांची डागडुजी ही केली. पुढे भक्तांच्या आग्रहाखातर बाबा वज्रेश्वरी पासून एक दिड मैल अंतरावर असलेल्या गणेशपुरी येथे राहण्यास गेले.येथील भिमेश्वर महादेव मंदिराजवळ गरम पाण्याचे कुंड आहे तेथेच श्री बाबांचा निवास होऊ लागला.पुढे आपल्या अवतार काळातील तिस-पस्तीस वर्ष त्यांनी याच ठिकाणी वास्तव्य केले.याच ठिकाणी जगभरातून असंख्य लोक येऊ लागले व याच पवित्र जागी त्यांनी आपला देह ठेवला. बाबांचे रुप अतिशय तेजस्वी होते, कुणीही त्यांच्या कडे बघितले की मोहुन जात असे. त्यांची त्वचा दिव्य तेजाने चमचमणार्या कृष्णवर्णी रत्नासमान होती.त्यांच्या मुखावर नित्य मंद स्मित विलसत असे आणि याच मंद स्मित हास्या मुळे भक्त त्यांना नित्यानंद प्रभु म्हणु लागले. बाबांची दिनचर्या अगदी सुटसुटीत होती.ते नित्य सूर्योदयापूर्वी ,भल्या पहाटे स्नान करीत.ते अत्यल्प आहार घेत.त्यांची राहणी अतिशय साधी होती.ते मितभाषी आणि नित्य अखंड मौन धारण करीत.फारच क्वचितच ते कुणाशी काही बोलत.त्यांच्या कडे बघितले तरी भक्तांना आत्मानंदाचा अनुभव येत असे.ते नित्य आत्मानंदात डुंबून राहिलेले असतं. क्वचित प्रसंगी जर कुणी त्यांना काही प्रश्न विचारला तर ते गुढ तत्वज्ञानही सहज समजेल अशा सोप्या शब्दात समजावून सांगत असत.त्यांना हिंदी,मराठी, इंग्रजी,कन्नड,तेलगू,तामिळ व मल्याळी अशा अनेक भाषा अवगत होत्या.कधीकधी ते संस्कृत श्लोक ही म्हणत असत. श्री भगवान नित्यानंद प्रभुंना सर्व भक्त "बाबा" म्हणत.त्यांच्या नुसत्या दृष्टिक्षेपात ,दर्शनाने ही असंख्य लोकांचे दु:ख दुर होत असतं.ते कधी कधी आपल्या गूढशब्दातून,हावभावातुन भक्तांच्या प्रश्नांचे उत्तरे देत. श्रीबाबांच्या निवासाला "कैलास निवास" असे नाव होते.जणु भगवान शंकरांचेच हे निवास स्थान.ते कैलास भुवनाच्या चार भिंतींच्या आत एका दगडी चौथऱ्यावर कांबळे पसरून त्यावर अगदी साधेपणाने बसलेले असत.तिथूनच ते आपल्या दूरच्या व जवळच्या भक्तांची काळजी घेत. ते क्वचितच आपले हे दिव्य स्थान सोडुन अन्यत्र कुठे गेले .कधीकधी ते आपल्या निखळ आनंदाच्या स्थितीत मुलांबरोबर आसपासच्या परिसरात फिरायला जात. त्यांचे लहान मुलांवर खुप प्रेम होते.ते त्यांना गोळ्या ,बिस्कीट ,कपडे व इतर भेटवस्तु देत असत.जवळपासची मुले सामान्यतः त्यांच्या अवतीभोवतीच असतं आणि दिवसभर कैलास भुवनात त्यांचा किलबिलाट चालू असे. भगवान नित्यानंदांची समदृष्टी होती.आपल्या कडे येणारा भक्त हा कुठल्या जातिचा आहे ,वर्णाचा आहे, तो किती शिकलेला आहे , अशिक्षित आहे ,त्याचा समाजात किती मान आहे या असल्या कुठल्याही गोष्टींना त्यांच्याजवळ स्थान नव्हते.ते प्रत्येकाशी समानच वागत.त्यांच्यासाठी सर्व जन समानच होते. त्यामुळे सर्वांना नित्यानंद बाबा माझेच आहेत असे वाटे. यामुळे बाबांजवळ हिंदू, मुस्लिम,शिख, ख्रिस्ती,पारशी,जैन अशा विविध धर्माचे लोक येत,त्यांच्या चरणी गर्दी करत. 

श्रीबाबांचा तरुण वयातील दुर्मिळ फोटो 


                श्री बाबा हे परमावधूत होते. ते कधीही झोपत नसतं.त्यांच्या कुठल्याही अंतरंगातील शिष्याने त्यांना कधीही झोपलेले बघितले नाही. श्री बाबा हे महासिद्ध ,महायोगी होते. त्यांनी असंख्य लोकांना ,भक्तांना ज्ञानमार्ग,योगमार्ग व भक्तिमार्गाला लावले.अशा या दिव्य महासिद्धांनी इ.स १९६१ ला आषाढ शुद्ध द्वादशीला मंगळवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी १० वाजुन ४० मिनीटांनी योगमार्गाने आपला प्राण ब्रह्मरंध्रात खेचून ओंकार पूर्वक अनंतात विलीन केला .अशा प्रकारे आपल्या स्थुल देहाचा त्याग करुन श्री बाबांनी महासमाधीत घेतली. श्रीबाबांचा देह पुढे ४८ तास सर्व जगभरातील भक्तांसाठी दर्शनाला कैलास भवनात ठेवण्यात आला.पुढे बाबांना गणेशपुरीला मुळ निवासस्थानी ज्याला "वैकुंठ" असे संबोधले जातअसे तिथेच वैदिक मंत्रपूर्वक समाधी देण्यात आली.या जागी आज एक मोठे भव्य मंदिर उभे आहे.त्यात श्री बाबांची सुंदर मूर्ती स्थापन आहे.हे स्थान आता जगभरातील भक्तांचे तिर्थक्षेत्र बनले आहे. आजही बाबा भक्तांच्या हाकेला धावतात ,आजही त्यांचे कार्य तसेच अविरत सुरू आहे.आजही याचा अनुभव असंख्य लोक घेत आहेत.खरंतर बाबांच्या दिव्य चरित्राचे चिंतन हे एका पोस्टमधून करणे कदापी शक्यच होणार नाही.शब्दाची मर्यादा आहे त्यामुळे कुठेतरी थांबणे अगत्याचे आहेच.पण बाबांच्या चरित्राचे चिंतन विस्तृतपणे आपण नक्कीच पुढे बघू.बाबांसारखे महसिद्ध आणि त्यांची लिला चरित्रे ही नित्य नुतन व तेजस्वी असतात.त्यातुन आपल्याला तेजस्वी जिवन जगण्याची प्रेरणा मिळते. पुढील भागात बाबांच्या काही लिला व त्यांनी दिलेला संदेश आपण वेगळा पाहु. अशा महासिद्ध श्री नित्यानंद प्रभुंच्या ,श्री बाबांच्या चरणी माझा शिरसाष्टांग दंडवत प्रणाम. श्रीबाबांच्या चरित्राचे चिंतन आपल्या सर्वांना घडो व त्यांनी आपल्या सर्वांवर कृपा करुणा करावी हीच त्यांच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग पूर्वक प्रार्थना.

       ✍️✒️ त्यांचाच चि.अक्षय जाधव आळंदी✒️✍️


#ओम_नमो_भगवते_नित्यानंदाय 🙏🌸🌺

#श्रीदत्त_शरणं_मम्🙏🌸🌺

#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ 🙏🌸🌺

Friday, July 8, 2022

एकमेवाद्वितीय_विलक्षण_महापुरुष_प्रज्ञाचक्षु_ज्ञानेशकन्या_सद्गुरु_श्रीगुलाबराव_महाराज यांची १४१ वी जयंती 🙏🌸🌺🚩

 


एकमेवाद्वितीय_विलक्षण_महापुरुष_प्रज्ञाचक्षु_ज्ञानेशकन्या_सद्गुरु_श्रीगुलाबराव_महाराज 🌸🌺🙏

         

         🌸🌿 ज्ञानेश्वर माउली समर्थ 🌿🌸

अलौकिक अशा या पंचलतिका गोपी अवतार असलेले श्री गुलाबराव महाराज म्हणजे गेल्या पाचशे वर्षात झालेला श्रीभगवंतांचा सर्वात मोठा चमत्कारच होते. अवघे ३४ वर्षाचे अल्प आयुष्य /अवतार कार्य .या ऐवढ्या कमी वेळात त्यांनी १३० ग्रंथांची रचना केली,जगातील सर्व नास्तिकवादाचे सप्रमाण खंडन केले, आयुर्वेद, संगीत,योग ,भक्ती, ज्ञान , मनोविज्ञान , व्याकरण,भाषा, काव्यशास्त्र, वेदांत अशा संस्कृत,हिंदी ,मराठी,वर्हाडी आणि व्रजभाषेत एकून १३० ग्रंथ आणि सहा हजार पृष्टांचे अलौकिक आणि अतिदिव्य असलेल्या साहित्याची रचना केली.        


                श्रीगुलाबराव महाराजांचा जन्म १८८१ साली अमरावती-अकोला मार्गावर असलेल्या लोणी टाकळी या आजोळी खेड्यात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव गोंदुजी व आईचे नाव अलोकाबाई. सुमारे ८-९ महिन्याचे असतांना श्रीमहाराजांचे डोळे आले.तेव्हा त्यांची नीट चिकीत्सा झाली नाही.त्यांतच एका गांवठी वैद्याने चिंचेच्या पाल्याचा रस बाल गुलाबच्या तेजस्वी डोळ्यात घातला.त्यामुळे महाराजांचे डोळे कायमचेच गेले.त्यांना अंधत्व प्राप्त झाले.हे फक्त बाह्यत: आलेले अंधत्व होतं. पण महाराज आपले चर्मचक्षू नाहीसे झाले तरी आपल्या प्रज्ञाचक्षूंनी सारी विश्वरचना अगदी सहजगत्या अवलोकन करुन शकत होते.बालपनीच महाराजांना मातृ वियोग झाला. महाराजांचे पालन पुढे त्यांच्या आज्जी सौ.सावित्रीनानी यांनी केले.

महाराजांचे लौकिक शिक्षण झाले नव्हते व घरची  प्रतिकुल परिस्थीती असे असतांनाही महाराजांचे कार्य पाहता त्यांचे अवतारित्व लक्षात येतं.महाराजांना अस्खलित संस्कृत बोलता येत असे.त्यांचे संस्कृत ऐकून लोक चाट पडत असतं.श्रीमहाराजांनी भक्तीला अद्वैताची बैठक देऊन भक्तीशास्राची नव्याने मांडणी केली.त्यात त्यांनी माधुर्यभक्तीचे सर्वश्रेष्ठत्व दाखवुन दिले. श्रीमहाराजांच्या  शिष्या म्हणजे त्यांच्या पत्नि.सौ.मनकर्णिका आई.मुळातच श्रीमहाराजां सारख्या अवतारी पुरुषाची पत्नि झालेल्या मणकर्णिका मातेचा अधिकार ही कमी नव्हता. या साध्विला ही महाराजांनी नित्य उपदेश करुन मार्गदर्शन केले.सौ.मणकर्णिका आईंना सर्व लोक मायबाई म्हणत.यांनी सर्वोतोपरी श्री महाराजांची सेवा केली.पतीची गुरुभावाने सेवा,त्यांना स्वहस्ते जेऊ घालणे, त्यांच्याबरोबर गाणी,अभंग ,ओव्या वैगेरे म्हणू लागणे,उच्च व मधुर स्वरात ज्ञानेश्वरीचे नित्य प्रेमाने पठन करणे,श्रीमहाराज कितीही रागावले असता अति शांत राहून त्यांच्या वृत्यानुकुल वागणे,मंडळींची दगदग सोसणे,भजन निरुपणादिकात रात्रभर जागुन मंडळी जेथल्या तेथे झोपली ,तर त्यांच्या अंगावर पांघरुन इ.घालून काळजी घेणे,यांसारख्या गोष्टीत ही पुण्यशिल साध्वी अहोरात्र गढलेली असे. पुढे लवकरच मायबाईंनी आपला देह ठेवला व त्यांचे और्ध्वदेहिक महाराजांनी स्वत: केले.तेव्हा त्यांनी तिला ज्ञानयोग्य शरीर प्राप्त होण्याचा संकल्प करुन पिंड दिला. 

                           महाराजांच्या जिवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे करुणाब्रह्म, महाविष्णु संतश्रेष्ठ भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचा प्रत्यक्ष अनुग्रह.श्रीज्ञानेश्वर माउलींनी श्री महाराजांना स्वत:च्या मांडीवर घेऊन स्वनामाची मंत्रदिक्षा दिली.श्रीमाउलींनी महाराजांचा आपली कन्या म्हणुन स्विकार केला व त्यांनतर श्रीगुलाबराव महाराज हे ज्ञानेशकन्या झाले...गुलाबराव महाराज माउलींना तात म्हणु लागले. याबद्दल श्रीगुलाबराव महाराजांनी फार सुंदर अभंग रचला आहे तो असा.

"माझा सदगुरु करुणाघन | आळंदीपती कल्याणनिधान | जेणे आपुलिया नामाचा मंत्र देऊन | कृतार्थ केले मजलागी ||

कैवल्य कनाकाचिया दाना | जो न कडसी थोरसाना | द्रष्टयाचे दर्शना | पाठाऊ जो ||

या साच करावयास निजवचना | न देखोनी मम पात्रपणा | अंकी घेवोनि खुणा | सांगितल्या स्वनामाच्या ||" 

ज्ञानेश्वर माउलींच्या प्रत्यक्ष अनुग्रहानंतर महाराजांचे कार्य हे विस्तारले. महाराजांचे जीवनपुष्प लौकिक अर्थाने पूर्णपणे विकसीत अवस्थेत कुठे बघायला मिळत असेल तर ते श्रीमहाराजांच्या श्रीकृष्ण पत्नी या नात्याने केलेल्या मधुरा भक्तीत. माउलींचा अनुग्रह झाल्यापासून ते स्वत:ला ज्ञानेशकन्या म्हणून संबोधीत.पुढे त्यांच्या अलौकिक माउलीने आपल्या लाडक्या कन्येचा विवाह प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाशी करुन दिला.श्रीमहाराजांच्या प्रेमानंदाला उधाण आले. वासुदेवाची पत्नी म्हणुन त्यांनी मधुरा भक्तिला प्रारंभ केला.अविरत श्रीकृष्ण भक्तित रममान होऊ लागले.परंतु या मधुरा भक्तीबद्दल समाजात अतिशय गैरसमज होता.अनेक विद्वानांनीही याबद्दल समाजाची दिशाभूल केली होती. पुढे महाराजांनीच श्रीभगवान नारद मुनींच्या आदेशाने मधुराद्वैतसंप्रदायाची स्थापना केली. या मधुरा भक्तीचे परमश्रेष्ठत्व प्रतिपादन करण्यासाठी अमर असे अलौकिक वांङमय निर्माण केले.या मधुराभक्तीचे सुंदर मंडण त्यांनी आपल्या अनेकविध ग्रंथात केले.पुढे श्रीमहाराजांनी १९०३ साली कात्यायनी व्रताला प्रारंभ केला.मार्गशिर्ष महिन्यात श्रीकृष्ण प्राप्तिसाठी गोपींनी हे कात्यायनी व्रत केले होते.या उपक्रमानंतरच्या काळात श्रीमहाराजांच्या माधुर्यामृत आनंद सागराला भरतीच आली.विविध शास्त्राच्या रहस्यमय निरुपणांचा वर्षाव होऊ लागला. श्रीमहाराजांनी माधुर्यप्रेमाने भक्ती करण्याचे व माधुर्य संप्रदाय स्थापनेचे कारण हेच. ते म्हणत मी `पंचलतिका नावाची एक गोपी आहे.' आणि खरोखरीच स्वत: गोपी असल्यामुळे स्त्रियांप्रमाणे ते गळ्यातं मंगळसूत्र धारण करीत,वेणी घालत, कुंकू लावत.पुढे पुढे तर श्रीकृष्णपत्नित्वाला साजणारा त्यांचा गोपीवेश नित्याचा झाला. मधुराद्वैत संप्रदायाची शास्त्रानुसार सोपपत्तिक मांडणी करण्यासाठीच प्रामुख्याने श्रीमहाराजांचा अवतार होता.मधुराद्वैताची प्रतिष्ठापना करण्यासाठी ,त्या मताच्या प्रतिकूल असणार्या अवैदिक अपसिद्धान्ताचे खंडण करणे, त्यांचे मुख्य कार्य होते. एकदा निरुपणाचे वेळीही "बहुनि मे व्यतितानि जन्मानि" हे भगवदवचन श्रीमहाराजांच्या बाबतीत सार्थ ठरविणारी गोष्ट घडली.उमरावतीच्या मंडळींच्या आग्रहावरुन त्यांनी ज्ञानेश्वरीच्या निरुपनाला पहिल्या ओवीपासून प्रारंभ केला होता. 'ॐ नमोजी आद्या' या ओवीवर प्रवचन झाल्यावर "आता वाच्यवाचका | अभेदू लाहे नेटका | नामरुपें टका | तूते झाला ||" ही तिसरी ज्ञानेश्वरीतील ओवी श्रीमहाराजांनी म्हटली.ही ओवी ज्ञानेश्वरीच्या आजच्या कुठल्याही प्रतीत नाही.ही ओवी म्हणताच सर्व श्रोते टकमका आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागले.ही चुळबूळ महाराजांच्या लक्षात येताच ते म्हणाले,"भावार्थ दिपीका हा माउलींचा ग्रंथ एकंदर १०,००० ओवींचा आहे.परंतु हेतुत: सध्या ९००० ओव्याच त्यांनी आपल्या हाती दिल्या आहेत." या उर्वरीत १००० ओव्या महाराजांना मुखद्गत होत्या.


            महाराजांनी आपल्या अवतार कार्यात शांकर अद्वैत व भक्ती यांचा पूर्ण समन्वय प्रतिपादन केला.भक्तीच्या नव्या १६ प्रकारांची मांडणी केली.ज्ञान,उपासना व भक्ती यातील भेद विवेचन केले.भगवदविग्रहाचे म्हणजे श्रीभगवंतांच्या सगुण विग्रहाचे अनध्यस्तविवर्तत्व  ही नविन परिभाषा जगापुढे मांडली.नाममहात्म्य अर्थवाद आहे या आरोपांचे सविस्तर खंडन केले.समन्वयाच्या नऊ प्रकारांचे विवेचन केले. उत्क्रांतिवाद,अनुवाद, अज्ञेयवाद, संशयवाद वैगेरे पाश्र्चात्य तत्वज्ञानांची भारतीय सिद्धांताशी तुलना आणि त्यांचे मुल्यमापन केले.नीतिशास्त्रातील युरोपियन मतांचे खंडन केले. पाश्र्चात्य व भारतीय मानसशास्त्रांची तुलना केली.अॅलोपॅथी व आयुर्वेद यांची तुलना करुन त्यांनी स्वत:च्या मानसायुर्वेदाची निर्मिती केली. इस्लाम,ईसाई, पारशी,बौद्ध,जैन,वैगेरे सर्व वैदिक धर्माच्या शाखा आहेत या सिद्धांताचे प्रमाण पुरस्सर शास्त्रीय विवेचन केले.लो.टिळक,विवेकानंद,रामतिर्थ वैगेरेंच्या काही मतांची परखड चिकित्सा केली. महाराजांनी बुवाबाजीचा ही वेगळा समाचार घेतला होता. महाराजांनी या बुवाबाजी विरोधात आपल्या ग्रंथात,पत्रातुन चांगलाच समाचार घेतला आहे. धर्मसंकर, धर्मसुधारणा आणि धर्मसमन्वय यातील भेदाचे विवेचन केले आहे.वेदांवर आणि पुराणांवर समन्वयात्मक सूत्रग्रंथांची रचना केली आहे. आर्य वंश नाही,आर्य बाहेरुन आले नाहीत,शुद्र वर्ण हा आर्याचाच भाग आहे या सिद्धांताचे मुद्देसूद प्रतिपादन त्यांनी केले.तीन हजार वर्षांपूर्वी आर्य संस्कृती विश्वव्यापक होती व त्यांनी या ऐतिहासिक सिद्धांन्ताची पुन:स्थापना केली. महाराजांनी पाश्चिमात्य डार्विन, स्पेन्सर ,अॅनीबेझंट वैगेरेंच्या उत्क्रांतीवादाचे ही सप्रमाण खंडन केले .सुधारणा व बहुमतवाद या संबंधी परखड विचार मांडले.तसेच शिक्षणासंबंधीही मूलभूत विचार मांडले.प्राचिन सुत्र कायम ठेवून नवीन साहित्यशास्त्राची निर्मीती केली.कौटुंबिक व सामाजिक संबंधात प्रश्नोत्तर रुपाने मांडनी केली.मुलांसाठी वेगळा उपदेश दिला,स्त्रियांसाठी खास गितांची निर्मीती केली.लोकगितातुन समाजप्रबोधन केले.नविन १२३ मात्रावृत्तांची रचना केली. महाराजांनी स्वत:ची वेगळी अशी लघुलिपीची (सांकेतिकलिपी) निर्मीती केली. त्यांनी स्वत: "नावंग" नामक भाषेची निर्मिती केली होती.तसेच नविन व्याकरण सूत्र निर्माण केले,नाटक लेखन केले,आख्यानांची रचना केली,खेळातून परमार्थप्राप्तीचा उपाय म्हणजे मोक्षपट याची निर्मीती केली.

अशा या लोकविलक्षण, एकमेवाद्वितीय, प्रज्ञाचक्षु पंचलतिका गोपी अवतार ,ज्ञानेशकन्या श्रीगुलाबराव महाराजांचे चरित्र अतिचमत्कारिक ,अतिदिव्य व एकमात्र आहे.एवढे विलक्षण चरित्र महाराजांशिवाय इतरत्र कुणाचेही नाही असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.महाराज हा एक चमत्कारच होते. अवघ्या ३२ व्या वर्षी त्यांनी आपल्या तातांजवळ पुण्यात देह ठेवला. अशा या ज्ञानेशकन्येच्या  सुकोमल चरणी अनंत कोटी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम..

#ज्ञानेश्वर_माउली_समर्थ 🙏🌸🌺

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺

              ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

       


🌸🙏सद्गुरु श्रीगुलाबराव महाराजांचे भव्य असे वाङमय स्मारक मंदिर श्रीक्षेत्र आळंदी येथे उभारण्यात येत आहे. श्री महाराजांची ग्रंथ संपदा मागविण्यासाठी व स्मारकाला आर्थिक मदत करण्यासाठी आपण महाराजांचे वंशज ह.भ.प.श्री नारायण महाराज मोहोड आळंदी यांच्याशी खालील क्रमांकावर संपर्क करु शकता. 🙏🌸

भ्रमणध्वनी :- ९८२३२३६०६६

Sunday, July 3, 2022

मिरजेच्या सद्गुरु दत्त दिगंबर श्रीअण्णाबुवा महाराज यांची आज १५० वी पुण्यतिथी 🙏🚩☘️🌸

 


मिरज येथील थोर संत सद्गुरु श्री अण्णाबुवा महाराज यांची आज १५० वी पुण्यतिथी :- 

                                     हिंदूस्थान ही संतभूमी, देवभूमी आहे.आसेतु हिमालय या भूवर आजवर कोटी परहंस, संन्यासी,अवधूत ,सिद्ध,योगी,ज्ञानी संत होऊन गेलेत.हे संत कुठल्या संतत्वाच्या एका विशिष्ट परिभाषेत बसणारे कधीही नव्हते आणि नाहीत.प्रत्येकाचा मार्ग,वर्तन,अवस्था या अगदी भिन्न.कुणी नामयोगी तर कुणी हटयोगी,कुणी ज्ञानी तर कुणी परमहंस संन्यासी,कुणी राजयोगी तर कुणी सर्वसंग परित्याग केलेले महासिद्ध.या सर्व संत महापुरुषांना जर आपण एका विशिष्ट चाकोरीबद्ध नियमात बसवायचा प्रयत्न केला तर ती आपलीच गाढवचूक ठरेल.कारण हे प्रत्येक जण भलेही प्रवचन ,किर्तन करत नसतील,भलेही हे लोकांना उपदेश देत नसतील पण यांच्या जिवनात , प्रत्येक कृतीत , प्रत्येक शब्दात उपनिषद आणि शास्त्रांचे ज्ञान पदोपदी स्त्रवत असते.फक्त आपणच ते समजून घेण्यास असमर्थ ठरतो.असो आज अशाच एका दिव्य, जन्मसिद्ध महात्म्यांची १५० वी पुण्यतिथी.श्री सद्गुरु अण्णाबुवा महाराज हे गेल्या काही शतकात होऊन गेलेल्या अशाच विलक्षण अवलियांच्या मांदियाळीतील एक सिद्ध आहेत.श्रीअण्णाबुवां महाराजांच्या चरित्राचे आज आपण ओझरते दर्शन घेऊयात.

                                     श्रीअण्णाबुवां महाराजांचा जन्म हा कोल्हापूर जवळील मौजे मंडपाळे या गावात विश्वंभरपंत कुलकर्णी या सदाचारी ऋग्वेदी देशस्थ ब्राह्माणा घरी झाला. सद्गुरु रामदास स्वामी महाराज यांनी स्थापन केलेल्या अकरा मारोती पैकी एक असलेल्या प्रतापमारुति हा याच मंडपाळे गावात आहे आणि विश्वंभरपंत हे या गावाचे वंशपरंपरागत कुलकर्णी होते.महाराजांच्या आईचे नाव अनसुया असे होते.बुवा महाराजांच्या जन्मतिथी व सालाबद्दल लिखीत स्वरुपात आज कुठलिही नोंद वा माहिती उपलब्ध नाही.यथावकाश बाळाचे बारसे पार पडले व पुढे जगविख्यात होणार्या या बालकाचे "दत्त दिगंबर " असे नाव ठेवण्यात आले. अण्णाबुवा बालपणापासूनच अतिशय खोडकर ,मितभाषी आणि आपल्यातच रंगणारे होते.वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना शाळेत घातले गेले.पण या लौकिक शिक्षणात बाळ दत्ताला काडीचाही रस नव्हता.ब्रह्मविद्येचे पान ज्यांनी केले आहे तो पाण्याच्या मिटक्या तरी का मारत बसेल?? अण्णाबुवा महाराज अवघ्या पाच वर्षांच्या वयात अखंड भगवत स्मरणात दंग असत. शाळेला जातो असे सांगून ते घराबाहेर पडत व थेट जंगलात जात.जंगलात जाऊन एका ठिकाणी बसुन अखंड एकाग्र मनाने भगवतस्मरण, नामस्मरणात दंग होत.शाळा सुटण्याची वेळ झाली की मग घरी परतत.एक दिवस शिक्षकांकडून आई अनसुयेला दत्ता शाळेत येत नाही हे कळले.एवढा लहानगा दत्ता शाळेत न‌ जाता करतो तरी काय? याचा शोध घ्यायचे त्यांनी ठरविले.गुराख्यांकडून त्यांना कळले की दत्ता रानात फिरताना आम्हाला दिसला आहे.मातोश्री थेट रानात गेल्या आणि बघतात तर काय.एका विशाल आम्रवृक्षाखाली ही पाच वर्षांची बाल दत्तमूर्ती पद्मासनात बसुन गहन गूढ अशा ध्यानात निमग्न झाली होती.आपल्या बाळाला योग कुणी शिकविला? याला पद्मासनात बसून ध्यान कुणी शिकविले? याचा विचार करत त्या तिथेच बाळ दत्ता पुढे कौतुकाने बघत बसून राहिल्या.या विचारात असतांना बाळ दत्ताची ध्यान समाधी उतरली.त्यांनी डोळे उघडताच पुढे मातोश्री अनसुया दिसल्या.त्यांनी लागलीच आईच्या पायावर डोके ठेवले.आईने त्यांना हृदयाशी कवटाळले व आनंदाने बोलत दोघेही घरी परतले.विश्वंभरपंतांच्या कानी ही गोष्ट अनसुया बाईंनी घातली पण त्यांना हे काही रुचले नाही.एव्हाना दत्त दिगंबर आता आठ वर्षांचा झाला होता त्यामुळे त्यांचे मौंजीबंधन संस्कार उरकून घेण्याचे माता-पित्याने ठरविले.पण या ही वेळी दत्तांनी एक विलक्षण गोष्ट‌ केली.ते मौंजीबंधनाला उभे राहण्यास नकार देऊ लागले.एका पंडितासारखे ते बोलायला लागले की, "मी साक्षात परब्रह्मच आहे.ब्रह्म निर्गुण निराकार ,सनातन आणि सर्वतंत्र-स्वतंत्र .तेच मी आहे.ब्रह्म मुळातच व्रतस्थ त्याचा व्रतबंध कसला आपण मांडता? इथे मुंजीचा कोण आणि ती लावणार तरी कोण? मुळात द्वैतच नाही तिथे विधिची मातब्बरी कसली.ब्रह्माला जातिबंधन नाही ते‌ शुद्र नाही आणि ब्राह्मण ही नाही.संस्काराने शूद्राचा द्विज झाला तरी ती प्रक्रिया ब्रह्माला थोडीच लागू होते?? या बाल दत्ताच्या मुखातील हे खडे सवाल आणि निवाडे ऐकून सर्वांची मती गुंग झाली.काय बोलावे कुणालाही सुचेना‌.त्यातच मुंजीचा मुहूर्त ही टळून गेला.आलेले द्विज वर्ग खट्टू होऊन बाल दत्ताचा हा वात्रटपणा असह्य झाल्यामुळे परतायला लागले.पण तेवढ्यातच कुणी वृद्धाने काही कानमंत्र दत्ताच्या कानी सांगितला व ते मुंजीला उभे राहिले.विश्वंभरपंतांनी सर्वांची क्षमा मागत सर्वांना परत बोलावले आणि कशीबशी बाळ दत्तांची मुंज पार पडली. पुढे शाळेत शिकत नाही म्हणून विश्वंभर पंतांनी त्यांना वेदपाठशाळेत घातले.पण तिथेही इतर कुणी चुकले तर त्यांचीही दत्ता थट्टा करत असे.जनरितीप्रमाणे वागणे ,बोलने ,शिष्टाचार यांना ते काडीचीही किंमत देत नसत.पण याचा उलट परिणाम होऊन दत्ताला वेड लागले आहे किंवा काही भूतबाधा झाली आहे असे लोकांना वाटू लागले. आई -वडिलांनी त्याला श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे घेऊन जाण्याचे व तेथेच सेवा करावी असे ठरविले.

                      काही काळ नृसिंहवाडी येथे बाळ दत्ताला घेऊन आई-वडिल राहीले. तिथे संगम स्नान,श्रींचे पादतिर्थ घेणे,त्यांचा अंगारा सर्वांगी लावणे आणि मंदिराभोवती नेमलेल्या प्रदक्षिणा घालणे ही तिन्ही सेवा ते बाळदत्ताकडून करुन घेऊ लागले.काही काळांनी प्रत्यक्ष भगवान श्री नृसिंहसरस्वती दत्त प्रभुंनी उभयतांना दर्शन दिले व सांगितले की "या अभिनव बाल दत्तात्रेयांच्या रुपात मीच तुमच्या पोटी अवतरलो आहे.मागे मंडपात राहून आपण माझे संगोपन केले त्यावर मी प्रसन्न झालो आहे.आता या अवताराचे माझे बालपण सरले आहे.यापुढे आता तुम्हाला माझी संगती घडण्याजोगी दशा राहिली नाही.तुम्हा उभयतांना माझा विरह जड जड वाटेल.पण तरी आता तुम्हा उभयतांना मला सोडून जावेच लागेल.या अवतारी तुमची नी माझी संगती इथवरच होती.आता आपण माघारी घरी परतावे.हा अवतारी दत्त तुम्हांसोबत घरी राहुन कधीच लाभणार नाही.हा आता घरी कुठला ,कोणत्याच ठिकाणी स्थिर राहणार नाही.जगदुद्धारार्थ हा निरंतर विश्वंभर संचार करत राहील.हा पुढे भक्तांना भवसागर पार करवेल.याचे हे कार्य करु देण्यासाठी सध्या याला नृसिंहवाडीतच एकट्याला ठेवून त्याचा कायमचा निरोप घ्या.यापुढे मीच स्वतः याची काळजी वाहीन व त्याचा योगक्षेमही चालवीन!" माता-पित्यांनी श्रीदेवांची आज्ञा शिरसावंद्य मानून मोठ्या जड अंतःकरणाने वाडीचा निरोप घेतला.आपल्या या प्रिय पुत्राला नृसिंहवाडी येथे सोडून जातांना त्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना ही करवत नाही.पण प्रत्यक्ष देवांनी दर्शन देऊन आश्वासन दिले असल्याने एकिकडे त्यांचे मन निश्चिंत ही असेल यात शंका नाही.

                                   एवढ्या दिवस वाडीत राहल्याने तेथील सर्व लोकांना दत्ता परिचितच होते.पण आता ते एकटे होते.अतिशय विलक्षण मनोभूमिकेत ते निःसंग होऊन नृसिंहवाडीच्या पुण्यभूमीत वास्तव्य करु लागले.वाटेल तिथे मागून खावे,वाटेल त्यांच्या घरी जाऊन निजावे ,अंगावरील वस्त्र जिर्ण झाल्यामुळे दिगंबर अवस्थेतच फिरत राहावे हाच त्यांचा दिनक्रम झाला होता.पण या अवधूतांना सांभाळण्याचे सोडून काही नतद्रष्ट लोकं त्यांना त्रास देत असत.एकदा असाच एक विलक्षण प्रसंग घडला.या वाडीस्थ लोकांच्या बैठकीच्या अड्यापुढून दत्ता जाऊ लागला.तोच याची खोडी करण्याचा विचार या मंडळींना आला.जवळूनच एक बाई भाजीपाला विकण्यासाठी जाऊ लागली.त्यांनी तिच्याकडून हिरव्यागार ढिगभर मिर्च्या विकत घेतल्या.आज दत्ताला या मिरच्या खाऊ घालण्याचे त्यांनी ठरविले.त्यातील एकाने दत्ताला न‌ विचारताच एका मागून एक मिरची तोंडात टाकायला सुरुवात केली.आत्मानंदात तल्लीन असलेल्या दत्त दिगंबराला देहावस्थेचेही भान राहिले नव्हते.ते आपल्याच मस्तीत मस्त होते.त्यांना या मिरचीतही ब्रह्माचीच अनुभूती होत होती.अशा अवस्थेत दत्तांनी अनेक मिरच्या फस्त केल्या पण त्यांच्या तोंडून एक चकार शब्दही आला नाही.उलट ते आपल्या आनंदात स्थिर होते.शेवटी एकही मिरची उरली नाही तेव्हा ही मंडळी थांबली.शेवटी बैठक मोडून सर्व जन खट्टू होऊन हे आपण करायला नको होते हा विचार करत घरी परतली.या एका घटनेने सर्व नृसिंहवाडी हलवून सोडली.दत्ताच्या या योग सामर्थ्याने सर्व जन आश्चर्यचकित झाले‌.ही परिक्षा घेणारे क्षेत्रस्थ महाभाग घरी पोचले खरे‌ ,पण मनात याच घटनेचे कोलाहल माजले होते.रात्री हे सारे निजले न निजले तोच प्रत्येकाला अदृश्य वेताच्या काडीचे फटके पडू लागले. या सर्वांना चांगलाच मार देऊन भगवान श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांनी सर्वांना बजावून सांगितले की , "हा बाल दत्त दिगंबर कोणी उपेक्षणीय भिकारी टाकारी नाही.याला असे समजून जर याची निंदा कराल ,याला छळाल तर लक्षात ठेवा.तो माझीच विभूती आहे.त्याला वेळीच निट ओळखा.त्याच्या कार्यात खीळ घालू जाल तर आता सारखीच हाडे खिळखिळी होतील!" असा दम देऊन दत्तप्रभु गुप्त झाले. पुढे यातील कुणीही दत्ता दिगंबराच्या वाटी गेले नाही.पण या प्रसंगामुळे दत्त दिगंबरांची किर्ती दूरवर पसरली.वाईचे एक मोठे सावकार जे अतिशय धार्मिक वृत्तीचे होते यांच्या कानावर ही वार्ता पोचली.त्याला पुत्र संतान हवे होते व यासाठी तो दिवसरात्र देवांच्या मंदिराचे उंबरे झिजवत असे.त्यामुळे लवकरात लवकर या योगी पुरुषाचे पाय धरावेत ,त्यांना शरण जावे असे मनोमन त्यांनी ठरविले.हा सावकार लवकरच वाडीत दत्त दिगंबर महाराजांच्या म्हणजे बुवा महाराजांच्या दर्शनाला आला.त्याने महाराजांची काही दिवस अनन्य भावाने सेवा केली व त्या सेवेचे फलस्वरुप लवकरच त्याला मुलगाही झाला.यासाठी त्याने नृसिंहवाडी येथे मोठ्याप्रमाणात अन्नदान ही केले. दत्त दिगंबर महाराज ही याने अतिशय संतुष्ट झाले.एक कुष्ठाने त्रस्थ झालेला ब्राह्मण अक्कलकोट येथे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करित राहिला होता.त्याला एकदा स्वामींनी जवळ बोलावले व त्याला सांगितले की , "अक्कलकोटहून दूर पश्चिमेला कृष्णेकाठी मिरज नामक क्षेत्र आहे.तिथे सध्या त्रिमूर्तीचे नवे प्रति दत्त अवतार दत्त दिगंबर अण्णाबुवा म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांना तुम्ही शरणं जा व रोगमुक्त व्हा." खरंतर स्वामींना याचे कुष्ठ दूर करता आले असते पण अण्णाबुवांचे थोर महात्म्य लोकांना कळावे यासाठी स्वामींनी ही लिला केली असे वाटते.या लिलेच्या वेळी अण्णाबुवा महाराज मिरजेत आले होते.हा कुष्ठी ब्राह्मण अण्णाबुवांना येऊन शरणं गेला.बुवा महाराजांनीही त्याचे कुष्ठ काही दिवसात घालविले व त्याला आशिर्वाद देऊन परत अक्कलकोटला पाठविले.पुढे अण्णाबुवांनी आपले परमप्रिय शिष्य श्री.केशव मोरेश्वर कुलकर्णी म्हैसाळकर यांना स्वतः जाऊन आपला कृपा अनुग्रह दिला.याच केशवरावांनी महाराजांचे ओवीबद्ध चरित्र लिहीले आहे.महाराजांच्या अनेक आठवणी,लिला ,उपदेश यांची नोंद करुन ठेवल्याचे परम पुण्यकारक काम केले व आपल्या सर्वांना या परम पावन चरित्र गंगेचे जल प्राशनाचे भाग्य उपलब्ध करुन दिले. केशवरावांवर महाराजांचे अतिशय प्रेम होते ते आनंदात असले की त्यांना, "विठ्या ,विठ्या परदेशा" म्हणून जोरजोराने हाका मारत.केशवरावांना अनुग्रह झाल्यापासून महाराज बहूतेक वेळा त्यांच्या घरीच असत.केशवराव व इतर शिष्य त्यांचे पाय रगडत,कुणी अंग संवाहन करित,कुणी पायाला तूप लावत तर कुणी भजन म्हणत असत. पुढे एका प्रसंगी याच केशवरावांच्या मातोश्री ऐलाबाई यांना बुवा महाराजांना खायला द्यायचे वाटीभर चणे महाराजांनीच पूर्ण एका भजनातील भक्तांच्या जथ्याला स्वतः वाटले व सर्वांना वाटून झाल्यावर ऐलाबाईंना वाटी परत देतांना त्यात थोडे दाणे शिल्लक ठेवले होते.

                                   प.पू.श्री अण्णाबुवा महाराज हे स्वच्छंद विहार करणारे ,सतत भक्त कार्यासाठी ,भक्त कल्याणासाठी झटनारे भ्रमण करणारे अवधूत महात्मा होते.श्रीअण्णा बुवांचा संचार दूरवर सतत अखंड सुरु असायचा.त्यांनी या दरम्यान अनेक भक्तांचे कष्ट , सांसारिक दु:ख दूर करुन त्यांना नामस्मरण ,हरी भक्ती कडे वळवले.इचलकरंजीचे रामचंद्र पंत मुजुमदार यांचा नुसत्या एका दृष्टीक्षेपात जुना पोटशुळाचा रोग क्षणार्धात संपविला. म्हैसाळच्या भास्करपंत उत्तुरकरांच्या कुटुंबाचे गेलेले डोळे नुसत्या अण्णाबुवा महाराजांचे चरण तिर्थ डोळ्यांना लावल्यावर व पोटात घेतल्यावर ठिक झाले.सांगलीकर श्रीमंत धुंडिराज चिन्तामण उर्फ तात्यासाहेब पटवर्धन यांचा अचानक माजलेला व अनावर झालेल्या हत्ती गावात धावत सुटला.तोच तेथे अण्णाबुवा प्रगटले,आपल्या नुसत्या हस्त स्पर्शाने अण्णाबुवांनी त्याला शांत केले.एवढेच काय तर तो अण्णा बुवांना आपल्या भावासारखा भेटला व शांत होऊन मेहुतासोबत निघून गेला.अण्णाबुवा महाराज भूक लागली की वाटेल त्यांच्या घरी जात व पोटभर जेवत असत.प्रत्तेकाला वाटे की त्यांनी आपल्या घरी यावे आणि अन्न ग्रहण करावे.पण हे सर्वोतोपरी स्वारींच्या इच्छेवर अवलंबून असे.एकदा बुवा महाराज फिरत फिरत दुपारी एका प्रतिष्ठित गृहस्थाकडे आले व त्यांना जेवन मागितले.दुपार टळून गेली होती त्यामुळे घरातील सर्वांचे जेवून झाले होते.आता अण्णां महाराजांना काय द्यायचे या विचारात तो गृहस्थ अगदी हवालदिल झाला.पण अण्णाबुवा हे परमकृपाळु आणि आज या भक्तावर कृपा करण्यासाठीच ते त्यांच्या घरी आले होते.त्या गृहस्थाने स्वैपाक होईपर्यंत थांबण्याची अण्णांना प्रार्थना केली आणि नवल असे की कधीही न थांबणारे अण्णा त्यांच्या घरी थांबले.जेवन सिद्ध झाल्यावर स्वारी पानावर बसली व आनंदात जेऊ लागली.थोड्यावेळात पाटावर बसलेल्या अण्णाबुवांच्या जागी त्या गृहस्थांना प्रत्यक्ष दत्तप्रभुंचेच दर्शन होऊ लागले.तो गृहस्थ हे दर्शन घेऊन इतका आनंदीत झाला की त्याने वारंवार अण्णाबुवांना साष्टांग दंडवत घातले.भोजन होताच श्रींनी लिंबोणीच्या झाडाखाली हात धुता धुता वर पाहिले आता सांगितले की "या लिंबोणीला दोन आंबे लागतील ! पुढल्या दारी असलेल्या बाभळीलाही फळ लागेल." इतर लोकांना याचे हसू आले पण त्या यजमानाची दृढ श्रद्धा अण्णांवर होती व हा नक्कीच काहीतरी आशिर्वाद आहे व भविष्यात याचे मर्म आपल्याला कळेल म्हणून तो गप्पा झाला.काही काळ लोटल्यावर त्याची पतिव्रता पत्नि जी पुष्कळ वर्षे झाली अपत्यहिण होती व त्यामुळे सारे लोक तिला वांझ म्हणून हिनवीत असत.तिला दोन जुळे पुत्र झाले व त्याची दुसरी पत्नी तिलाही एक मुलगा झाला.अण्णाबुवांच्या शब्दांची प्रचिती या घरातील सर्वांना आल्यावर ते सारे त्यांचे अनन्य भक्त झाले‌.अण्णाबुवा महाराज इतके कृपाळू कनवाळू होते की आपल्या भक्तांसाठी ते रात्रंदिवस राबत.त्यांनी आपली प्रतिष्ठा डावलून कलावंत तंतुवाद्यकारांची व गंगाबाई तेलिणीचीही हरकामे केली.चालू सामत्याच्या दोर्या बुवांनी ओढल्या,घरातील तसेच दुकानातील लाकडे फोडली.उन्हाळ्यात पाणी दुर्मिळ होई तेव्हा ते हांडेच्या हांडे आपल्या माथ्यावर वाहून आणत.या भक्तांची लेकरे,बाळे खेळवित.गंगातेलिणीचे तेलाचे घाण्यावर घाणे काढले.असे कृपाळू असलेले प्रत्यक्ष दत्तप्रभु अण्णामहाराज भक्तांकरीता कल्पवृक्ष होते‌.नाममहिमा सांगत अण्णाबुवा महाराज दूरवर फिरत असतं.त्यामुळे त्यांचे पायही दुखत असत.पुढे लोककल्याण करता करता श्रींचा देह अगदी झिजून गेला.त्यांनी काही वर्षा आधीच आपली समाधी तिथी सांगून ठेवली होती.ती म्हणजे आषाढ शुद्ध चतुर्थी शके १७८४ .तसे श्रींना काही विशेष दुखने उद्भवले नव्हते.बोलता बोलता त्या तिथीला सकाळी दहा वाजता त्यांनी आपला देह ठेवला व आपल्या स्वधामी दत्तलोकी गमन केले.त्याच दुपारी हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्रीकृष्णाघाटावर एका विशिष्ट जागी दहनविधी केला गेला.पुढे श्रींची कृष्णा घाटावरील समाधीवर पादुका स्थापन करण्यात आल्या.बाळासाहेब नरगुंदे सराफ व अन्य भक्तांना झालेल्या प्रेरणेमुळे तिथे चांगले भव्य असे दुमजली मंदिर बांधण्यात आले.पुढे नृसिंहवाडी चे थोर संत सद्गुरु म्हादबा महाराज हे अनेक वेळा श्रीअण्णाबुवांच्या समाधी मंदिरात येत असत.हे ठिकाण श्री म्हादबा महाराजांचे प्रिय स्थान होते.कोल्हापूर चे दत्त सद्गुरु श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज हे ही श्री अण्णाबुवांच्या समाधी दर्शनाला येऊन गेल्याची नोंद आहे.त्यावेळी अण्णाबुवा महाराजांनी श्रीकृष्ण सरस्वती महाराजांशी समाधी तून संवाद साधला होता.

अशा या दिव्य महापुरुषाची आज १५० वी पुण्यतिथी.ही खरंतर त्यांचीच कृपा की आजच्या परमपावन दिनी त्यांच्या जिवन चरित्राचे चिंतन आपल्याला घडले.माझी ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पन करतो आणि आपल्या सर्वांवर श्री सद्गुरु अण्णाबुवा महाराजांनी अखंड कृपा करावी हीच कोटी कोटी प्रार्थना श्रीचरणी करतो.

    ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️


श्रीदत्त शरणं मम् 🙏🌸🌺

Saturday, July 2, 2022

भक्तवत्सल भक्तभिमानी सद्गुरु योगीराज श्री मामा महाराज देशपांडे यांची १०८ वी जयंती🌸🌺🙏☘️



नमस्कार_श्रीपाद_दत्तात्रेयाला!!! 🙏🌸☘️🌺
                            दत्त संप्रदाय,नाथ संप्रदाय, भागवत संप्रदायाचे अध्वर्यू आणि शक्तीपात योग परंपरेतील एक थोर विभूतीमत्व, ज्ञानेश्वरी व संत वाङमयाचे थोर अभ्यासक व भाष्यकार,भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे व भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांचे पूर्णकृपांकित आणि प्रत्यक्ष टेंबे स्वामी महाराजांचेच पूर्णावतार असलेले विसाव्या शतकातील एक अतिशय दिव्य , अलौकिक असे संत योगीराज सद्गुरु माउली श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा श्री मामासाहेब देशपांडे महाराज यांची आज १०८ वी जयंती. सद्गुरू मामा माउलींचे संपूर्ण चरित्रच अलौकिक लिलांची खाण आहे.प्रत्येक प्रसंग ,प्रत्येक घटना इतक्या विलक्षण आहेत की बुद्धी स्तिमीत होते.मामांचे माता आणि पिता हेच विलक्षण संतदांम्पत्य होते.मातोश्री पार्वती देवी या तर प्रत्यक्ष भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या अनुग्रहीत यांना स्वामींनी "आमची लेक" म्हणून गौरविले होते.पिताश्री दत्तोपंतांशी प्रत्यक्ष भगवंत संवाद साधायचे.अशा या दिव्य दांम्पत्यापोटी दत्तप्रभुंनी अवतार घेतला यात नवल ते काय??? भगवंतांना अवतार घेण्यासाठी ते कुळ ,ती कुसही तेवढीच पवित्र लागते आणि हे घराणे ,हे दांपत्य असेच दिव्य आणि अलौकिक संतरत्न होते. सद्गुरु श्री मामांच्या चरित्राचे ओझरते दर्शन या लेखातून त्यांनीच आपल्या सर्वांना घडवावे ही प्रार्थना श्रीचरणी करतो.
                               हे देशपांडे घराणे मुळचे खेड शिवापूरचे पण पुढे कुळ शाखेचा विस्तार झाला व त्यातील एक शाखा ही 'नसरापूर' या भोर संस्थानातील गावी आली.याच गावाजवळ बनेश्वर हे ऐतिहासिक शिवमंदिर आहे तसेच जवळूनच 'शिवगंगा' ही नदी देखील वाहते.मुळचे पराक्रमी व अतिशय धर्मनिष्ठ असे हे घराणे होते.मामांच्या कुळात तिनं पिढ्यांपासून दत्तभक्तीची परंपरा अखंड सुरु होती.मामांचे आजोबा श्री राघोपंत हे एकनिष्ठ दत्तभक्त होते.यांचा पारमार्थिक अधिकार मोठा होता.प्रत्यक्ष दत्तप्रभुंनी यांना आपल्या पादुका प्रसाद रुपात दिल्या होत्या.यावरुन त्यांचा अधिकार व योग्यता लक्षात येते.यांची पत्नी जाणकीबाई या ही अतिशय प्रेमळ व धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या.त्यांना आपल्या वडिलांकडून वारस्याने वैद्यकी व ज्योतिषशास्त्राचे ज्ञान मिळाले होते.त्या या विद्येत पारंगत होत्या.यांच्याच पोटी इ.स १८७३ ला मामांचे पिताश्री श्रीदत्तोपंत यांचा जन्म झाला.दत्तपंत हे अतिशय धार्मिक व सात्विक वृत्तीचे होते.यथावकाश दत्तपंतांचे मौंजीबंधन आदी सर्व संस्कार पार पडले.धर्म शास्त्राचे अध्ययन ही उत्तम रितीने पार पडले.१८८७ साल उजाडले.आता दत्तोपंत अठरा वर्षांचे झाले.जाणकीबाई आता घरी सुन यावी यासाठी शोधास लागल्या.शेवटी त्यांना पुण्यातील सोनटक्के यांची कन्या "बाई" ही आपली सुन म्हणुन पसंत पडली.पुण्यात मोठ्या आनंदात हा विवाह सोहळा पार पडला व सोनटक्क्यांची "बाई" आता  देशपांड्यांची "पार्वती" झाली.याच आपल्या मामांच्या मातोश्री आणि सद्गुरु.  या पार्वती देवी कुणी सामान्य स्त्री नव्हत्या यांचा अधिकार विलक्षण थोर होता.( मातोश्रींचे महात्म्य आणि अधिकार जर लिहायला बसले तर अनेक लेख होतील आणि शब्द पुरणार नाहीत.सद्गुरु शका ताईंनी मातोश्रींचे "स्वामीतनया" हे अतिशय सुंदर असे चरित्र लिहीले आहे.ते आपण जरुरच वाच.एकमेवाद्वितीय असे ते चरित्र आहे.शब्दमर्यादेस्तव मातोश्रींच्या चरित्राचा विस्तार इथे करणे अशक्यप्राय आहे.) स्वामी आज्ञेने नारायण पंत म्हणजे मातोश्री पार्वती देवींचे वडिल हे आपला सर्व परिवार घेऊन पुण्यात येऊन राहिले व स्वामी कृपेने अतिशय उत्तम स्थिरस्थावर ही झाले.अक्कलकोटवरुन निघतांना छोट्या बाईला श्री स्वामीरायांनी आपल्या मातृवात्सल्याने कुरवाळले,आपल्या उजव्या मांडीवर बसवून कौतुकाने त्यांच्या चेहेऱ्यावरुन हात फिरविला आणि म्हणाले, "ही आमची पोर आहे बरे का!" पुढे पुण्यात आल्यावर स्वामीरायांनी लौकिक दृष्ट्या देह त्याग केल्यावर एक दिवशी प्रगट होऊन मातोश्री पार्वती देवींना व त्यांचे वडिल बंधू नरहरपंत यांना विधिपूर्वक शुभमुहूर्तावर स्वामी कृपेची परंपरेची शक्तीपात दिक्षा देऊन कृतार्थ केले. या दोन्ही भावंडांचा अधिकार आणि यांच्यावर स्वामीरायांची इतकी विलक्षण कृपा होती. स्वामींनी यांना आज्ञा केली होती की नागपंचमीला पुण्यातील शनीपार येथे येणार्या नाथपंथी साधुंना आमच्यानावे शिधा द्यायचा व तो आम्हाला पोचला याची ग्वाही म्हणून आम्ही आपल्या घरी प्रगट होऊ.पुढे असेच होत असे शनीपारला शिधा दिल्यावर स्वामी माउली मामांकडे प्रत्यक्ष प्रगटत असत. मामा लहान असतांना असाच एक विलक्षण प्रसंग घडला.स्वामी घरी प्रगट झाले व त्यांचे दर्शन मातोश्रींना व नरहरी मामांना झाले.पण मामांना काही स्वामी दिसत नव्हते.तेव्हा मामा रडायला लागले.मातोश्रींजवळ हट्ट करायला लागले.ते म्हटले,"आई तुला जर स्वामी समर्थ दर्शन देतात तर मला का बरे त्यांनी दर्शन देऊ नये?" त्यावर मातोश्री म्हटल्या , "अरे त्यांनी तुला दर्शन देण्यासाठी तुझ्याजवळ पुरेसा तपाचा साठा नाहीये." बाल श्रीपाद तथा मामा लगेच म्हणाले, "जर स्वामी महाराज दर्शन देणार असतील ,तर मी तपाचरण करेण ही खात्री बाळग!" मामांचे हे वाक्य पूर्ण होते न होते तोच या दोघा माय-लेकांपुढे प्रकाश झोतातून भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रगटले.त्यांनी मामांना दर्शन दिले.पुढे मामांनी आपला शब्द आजिवन अखंड पाळला.आपले संपूर्ण जिवनच मामा तप:पूत रितीने ,व्रतस्थ पद्धतीने जगले.श्रीस्वामीरायांच्या शब्दाबाहेर एक क्षणही ते गेले नाही.हे एक विलक्षण दिव्यच आहे.मामांचे वडिल श्रीदत्तोपंत हे प्रत्यक्ष भगवान श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे अनुग्रहीत व कृपा प्राप्त शिष्य होते.यांची प्रतिमासी पौर्णिमेला श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे वारी करण्याचा नियम होता.होणारे अपत्य टिकत नसल्याने दोघांचे ही अंत:करण अतिशय दु:खी होते अशातच १९१२ ला दोघेही श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे देवांच्या दर्शनाला आले.देवांपुढे आपली व्यथा मांडल्यावर त्यांना तात्काळ देवांचा टेंबे स्वामी महाराज यांच्याकडे जाण्याचा आदेश झाला. सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथेच होते. श्रीदत्तोपंत आणि सौ.पार्वतीदेवींना महाराजांनी आशिर्वाद दिला होता की , "यापुढे गर्भ श्रीकृपेने टिकेल.मुलगा होईल.तो ईश्वरसाक्षात्कारी असेल आणि दीर्घायुषी ही असेल.तो थोर दत्तभक्त असेल.तरीही काही कठीण प्रसंग आलाच तर दत्तस्मरण करा.संकटाचे निवारण होईल. परमेश्वरकृपेने सगळे ठीक होईल." लवकरच देवांचा ,श्री स्वामी महाराजांच्या कृपेचा प्रत्यय दत्तोपंत व मातोश्रींना आला.मातोश्रींना दिवस गेले व पोटी एक थोर विभूतीमत्व वाढायला लागले. १९१४ साली मंगळवार दिनांक २३ जून रोजी जेष्ठ महिन्याच्या अमावास्येला मातोश्री पार्वती देवींना प्रसुती वेदना सुरु झाल्या.कळा वाढून लागल्या पण त्यांनी जिवघेणे रुप धारण
केले‌.मातोश्रींनी श्री स्वामी महाराजांचे स्मरण व धावा सुरु केला.त्याच वेळी इकडे गरुडेश्वरी रात्री अकरा वाजता श्री टेंबे स्वामी महाराज आपला देह ठेवण्याच्या तयारीत होते.ते डोळे मिटणार तेवढ्यात मातोश्रींनी धावा सुरु केला.मिटलेले डोळे स्वामी महाराजांनी क्षणभर उघडले व पुन्हा मिटले.आपला देह तिथेच ठेऊन ते इकडे पुण्यात पार्वतीमातोश्रींपुढे प्रगट झाले.श्री स्वामी महाराजांनी आपला उजवा हात उंचावून पार्वतीदेवींना अभय दिले.त्याबरोबर प्रसुती वेदना थांबल्या.श्री स्वामी महाराज म्हणाले, "काळजी करु नकोस.गुरुवारी मुलगा होईल.त्याचे नाव 'श्रीपाद' ठेव!  धीर धर.आमच्या पूर्णांशेकरुन हा मुलगा होईल.तुमचे कल्याण असो!" असे म्हणून स्वामी महाराज अंतर्धान पावले व परत गरुडेश्वरी आले.समाधी घेण्यासाठी पुन्हा डोळे मिटणार तोच जवळ असलेल्या हैदराबादच्या श्री.शंकरराव आजेगांवकरांनी त्यांना विचारले, "महाराज आपण एकदा डोळे मिटलेत.पुन्हा उघडलेत आणि आता परत मिटणार आहात, हे काय ?" त्यावर श्री स्वामी महाराज म्हणाले, "भक्त कार्या करण्यासाठी गेलो होतो!" त्यानंतर साधारण रात्री अकरा वाजता अमावस्या उलटून प्रतिपदा लागल्यावर स्वामी महाराजांनी आपला देह ठेवला.गुरुवारी श्री स्वामी महाराजांच्या परमपवित्र देहाला नर्मदा माईंच्या जलात समर्पित करण्यात आले व इकडे गुरुवारी पहाटेच मातोश्रींना प्रसुती वेदना सुरु झाल्या.गुरुवारी सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी पुत्ररत्न झाले.श्री स्वामी महाराजांनी सांगितलेल्या प्रमाणे मुलाचे नाव "श्रीपाद" असे ठेवण्यात आले.मुलाचे बारसे,कान टोचने हा सर्व विधी देवासमोर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथेच पार पडला.
                                       शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे बाळ श्रीपाद वाढू लागले.१९१६ ला दत्तोपंतांनी आपले बिर्हाड पुन्हा नसरापूर येथे हालविले.नसरापुर येथे असंख्य अलौकिक अशा घटना घडल्या आहेत.पण त्या प्रस्तुत लेखात मांडणे शक्य नाही.मामांच्या बालपणापासून घडलेल्या या घटना मातोश्रींच्या "स्वामीतनया" तसेच मामांच्या "श्रीपाद चरित्रसुधा" "चक्रवर्ती" आणि असंख्य वाङमयाद्वारे विविध ग्रंथातुन मांडल्या आहे आपण त्यातून त्या वाचू शकता.बाल श्रीपाद आपल्या बहिणीकडे बेळगावला गेले होते.तेव्हा पहाटे देवघरात त्यांचे भाऊजी श्री दत्तूअण्णांनी  त्यांना आपल्या जागी ध्यानाला बसविले.त्यावेळी ध्यानात बाल श्रीपादाला श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी दर्शन देऊन कृतार्थ केले होते.तसेच सन १९२१ ला सात वर्षाचे श्रीपाद बनेश्वरच्या जंगलात हरवले तेव्हा हातात खुळखुळ्याची काठी ,पांढरी कफनी घातलेल्या थोर सिद्ध असलेल्या बुवा साहेब महाराजांनी दर्शन दिले ,रात्रभर आपल्याजवळ ठेवून घेतले व सकाळी गावात आणून सोडले. श्रीमामांचे बालपण अतिशय विलक्षण गोष्टींनी भरलेले आहे.त्यांची हिमालय यात्रा,नर्मदा परिक्रमा बद्रीनाथ - केदारनाथ यात्रा ही बालपणीच आपल्या पिताश्री समवेत घडली होती.प्रत्येक यात्रेची आपली एक विशेष कथा आहे. संतांचे जिवन म्हणजे आपल्यासाठी एक कवडसाच असतो जो आपल्याला सतत वाट दाखवित असतो.तसेच मामांचे ही जिवन चरित्र आहे.लवकरच एक अघटित घडले.१९२८ चे साल उजाडले व दत्तप्रभुंनी दत्तोपंतांना आदेश केला की आता आपले कार्य पूर्ण करुन देह ठेवावा.त्यामुळे अगदी अकस्मात दत्तोपंतांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.थोड्याच दिवसांत सिताराम पंत म्हणजे मामांचे काका यांनी सर्व जमिन मालमत्तेवर आपला अधिकार सांगितला आणि मातोश्रींना काहीही न देता घराबाहेर काढले.खरंतर मातोश्रींच्या जागी इतर कुणीही असते तर कोर्टात गेले असते पण देवांची इच्छा म्हणून त्या निश्चल वृत्तीने सर्व आघात सहन करत होत्या. पार्वतीदेवींनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा धावा सुरु केला.कृपाळू मायाळू स्वामी माउली आपल्या या लेकीसाठी तात्काळ धावून आले. "डगमगू नकोस.मी तुझ्या सोबत आहे!" असा आशिर्वाद स्वामीरायांनी मातोश्रींच्या दिला व ते अंतर्धान पावले. चौदा वर्षांचा श्रीपाद,पाच वर्षांचा यशवंत अशी स्वतःची दोन मुले आणि एक वर्षांचा नातू यांना घेऊन मातोश्री पुण्यात आपल्या भावाकडे आल्या.पुण्यातील मंडई जवळच न्यायमूर्ती रानडे यांच्या वाड्याजवळ एक खोली त्यांनी भाड्याने घेतली व आपला हा छोटा संसार घेऊन त्या राहू लागल्या.( याच ठिकाणी धनकवडी चे सद्गुरु श्री शंकर महाराज हे मातोश्री व मामांना भेटायला येत असत) खरंतर जवळ भाऊ ,त्यांची मुलगी अनसूया जावाई रामभाऊ कुलकर्णी हे सर्व होते पण त्यांनी कुणाचाही आधार घेतला नाही.कारण मातोश्रींचा भक्कम आधार म्हणजे श्रीभगवंत हेच होते.आपल्या जवळील जे होते ते विकून संसार चालविण्याचा त्या प्रयत्न करु लागल्या.त्यावेळी श्रीपाद हे चवदा वर्षांचे होते. काही काळ शिक्षण घेतले पण आपल्या घरातील आर्थिक स्थिती बघता मामांनी शालेय शिक्षण बंद केले आणि धंदेशिक्षण घेण्यास सुरुवात केली.फावल्या वेळेत साबण ,तेल ते विकत असत.वर्तमानपत्र टाकणे, शिकवण्या घेणे हे ही सुरुच होते.प्रत्येक मार्गाने बाल श्रीपाद आपल्या मातोश्रींना मदत करत असत.मातोश्रींच्या पारमार्थिक अधिकार अतिशय उच्च कोटीचा होता.त्या अखंड भगवंतांच्या अनुसंधान स्थिर असत.दत्तुअण्णा गेल्यापासून अखंड बारा वर्षे त्यांनी जमिनीला पाठ लावली नव्हती.एक भुक्त राहून त्या अखंड श्रीस्मरणात तल्लिन असतं.त्यांचा रात्रीचा साधनेचा क्रम ही ठरलेला असे.रात्री आठ ते अकरा त्या बैठकीला म्हणजे साधनेला बसत.अकरा वाजता उठून ,हातपाय धूत व थोडे पाणी पीत.नामस्मरण करीत येरझार्या घालत.रात्री साडेअकरा ते अडीच पर्यंत साधना करत.अडीच ते तिन पुन्हा पाणी पिऊन येरझार्या घालत.पुन्हा तिनं ते पाच साधना करीत.मामा आपल्या मातोश्रींचे हे दिव्य तपाचरण बघत असत.याचा मोठा परिणाम त्यांच्या मनावर झाला होताच.मातोश्रीं नेहमी सांगत की "अनुभव येवो अथवा न येवो, देहाची तिनं चिमूट राख होई पर्यंत साधन करत राहणे हेच शिष्याचे परमकर्तव्य आहे." मातोश्रीं या मामांच्या सद्गुरु.मामांनी तरुणपणी भारतील स्वतंत्र संग्रामात ही भाग घेतला होता.पुण्यात मामांचे मोठे नाव होते पण मातोश्रींनी मामांना मार्गदर्शन करुन त्यांचे अवतारकार्य लक्षात आणून दिले.यथावकाश मातोश्रींनी मामांचे लग्न लावून दिले.खरंतर मामांना लग्न न करता आपल्या उपजत प्रवृत्तीनुसार संन्यास घ्यायचा होता पण तसे न करता संसार करण्याची आज्ञा मातोश्रींची झाली व मामांनी ती शिरसावंद्य मानली. १९४१ ला मातोश्रींनी मामांना मस्तकावर हात ठेवून अनुग्रह दिला.अनुग्रह देल्याक्षणी मामा गुढ समाधीत स्थिर झाले.मामा या दिव्य स्थितीत बराच वेळ होते. समाधी उतरल्यावर त्यांनी मातोश्रींना नमस्कार केला तेव्हा मातोश्री त्यांना म्हणाल्या , "बरोबर बारा वर्षांनी आता सारखा आत्मसुखाचा अनुभव ज्यांच्या सान्निध्यात येईल,ते तुझे मंत्रगुरु असतील असे समज!"तसेच त्यानंतर मामांना कटाक्षाने ज्ञानेश्वर माउलींची सेवा करण्याची आज्ञा मातोश्रीनी दिली.पुढे त्याच वर्षी मातोश्रींनी मामांना समोर बसवून म्हटले, "सख्या ,तुला महात्मे देह कसा ठेवून बाहेर कसे पडतात ते बघायचे ना? मग बैस इथे आणि ध्यान देऊन बघ!" आणि काय आश्चर्य मातोश्रींनी मामांसमोर आपला प्राण कुडीबाहेर नेला व भगवंतांमध्ये विलीन केला.मामांना नेमकं काय घडलं हे लक्षातच आले नाही पण मातोश्रींनी त्याद्वारे आपल्या नश्वर देहाची खोळ सांडलेले होती.हे असे महायोग्यांना ही दुर्लभ असा समाधी सोहळा लिलया करणार्या मातोश्री किती मोठ्या अधिकारी असतील याची साधी कल्पनाही आपण करु शकत नाही.
                                    मातोश्रींनी देह ठेवल्यावर मामा फारच अस्वस्थ झाले.पण मामांची ही दु:खी मनस्थिती ओळखून मातोश्रींनी मामांना भगवंतांच्या रासलिलेचे दर्शन प्रत्यक्ष घडविले होते.तसेच पुढे कामा निमीत्त गुजरात राजकोट येथे असतांना कैवल्यधाम येथे जाऊ लागले.मुळातच योगी असलेल्या मामांना हटयोगाची आवड निर्माण झाली व ते त्याच्यात पारंगत ही झाले.मामा त्यात इतके तरबेज झाले की ,प्राणनिरोधन -योगाच्या आधारे ते स्वतः ला जमिनीत पुरुन घेत आणि त्या अवस्थेत कितीतरी काळ राहात.एकदा मामांनी आपल्याला असेच पुरुन घेतले तोच त्यांना त्या खड्ड्यात मातोश्रींचे दर्शन झाले.त्या मामांना म्हणाल्या, "सख्या,हा आपला मार्ग नाही.जो एकांत तू खड्डयात बसून मिळवतो आहेस ,तो एकांत बाहेर लोकांमध्ये बसून मिळवता आला पाहिजे.बाहेर व्यवहार चालू असतांनाही,आतला एकांत व  भगवंतांशी ऐक्य साधता आले पाहिजे." मामांनी यानंतर हा मार्ग सोडला. सन १९३६ पासून १९४८ सालापर्यंत म्हणजे सलग बारा वर्ष मामांनी पडशीची वारी केली.त्यानंतर पुढील बत्तीस वर्षे १९८० सालापर्यंत श्री.केशवराव देशमुख महाराजांच्या दिंडीतून पायी वारी केली.नंतर मात्र अखेर पर्यंत आषाढी एकादशीला बसने किंवा गाडीने मामा पंढरपूरला देवांच्या दर्शनासाठी जात. सन १९४८ ला मामांनी बनेश्वर येथील रम्य शिवालयात आपले पहिले श्रावणाचे अनुष्ठान केले.याच काळात त्यांना भगवान आशुतोष महादेवांचे दिव्य दर्शन घडले होते.पुढे मामा दर वर्षी गिरणार वारीला जात असत
या दरम्यान त्यांना दत्तप्रभुंनी अनेकदा दर्शन देऊन कृतार्थ केले.तसेच मामा अनेकदा हिमालय, विष्णू प्रयाग,देवप्रयाग,मानसरोवर अशा अनेक दिव्य क्षेत्री वारंवार जात राहिले.आदल्या अवतारातही त्यांचे हे सर्व क्षेत्र अतिशय आवडीचे होते.या सर्व वेगवेगळ्या प्रवासाचे अतिशय अलौकिक आणि चमत्कारिक असे प्रवास वर्णन वाचून थक्क व्हायला होते.प्रत्येक प्रवासात श्रीभगवंत मामांच्या सोबत होते आणि याची अनुभूती त्यांना पदोपदी येत होती.या सर्व लिला आपण मामांच्या चरित्रात विस्तृतपणे वाचाव्या ही विनंती.सन १९५३ ला अनपेक्षितपणे देवांच्या कृपेने मामांनी आपल्या जिवनातील पहिले ज्ञानेश्वरी चे प्रवचन केले व त्यांच्या जिवन चरित्राचा एक अलौकिक भाग असलेले या दिव्य प्रवचनमालेचा तो अविरत ज्ञानयज्ञ प्रज्वलित झाला.ज्यामुळे अनेक हृदयात ज्ञानेश्वरी चे ज्ञान रुजल्या गेले. या आधिच मामांना विष्णूप्रयाग येथे श्रीज्ञानेश्वर माउलींनी प्रयाग संगमात आत खोल पाण्यात ओढुन आपले दिव्य दर्शन दिले व  ज्ञानेश्वरी चे ज्ञान मामांच्या हृदयात प्रविष्ट केले.मामांना यानंतर ज्ञानेश्वरी चा अर्थ सहज उलगडू लागला.काहीही न वाचताच ज्ञानेश्वरीतील गुढगम्य ज्ञान त्यांना स्फुरले जाऊ लागले. पुढे १९५४ ला मामा पंढरीची वारी करुन सोलापूरला आले.तेथेच त्यांची आपल्या सद्गुरु माउली योगीराज श्री गुळवणी महाराज यांच्याशी भेट झाली.हा पण प्रसंग अतिशय विलक्षण आहे.महाराजांपुढे जाता क्षणी मामांना तोच आत्मानंदाचा दिव्य अनुभव आला जो मातोश्रींनी अनुग्रह दिल्यावर आला होता.या प्रसंगाला बरोबर बारा वर्ष उलटली होती व त्याच वर्षी गुरु महाराजांची भेट मामांना झाली.पुढे गुरुपोर्णिमेला योगीराज श्री गुळवणी महाराजांनी मामांना रीतसर मंत्रदिक्षा दिली,परंपरेचा दिव्य मंत्र दिला व परंपरेचे उत्तराधिकारही दिले.हे सर्व करण्याची टेंबे स्वामी महाराजांनी गुळवणी महाराजांना आज्ञाच झाली होती.पुढे गुळवणी महाराजांनी मामांना कुरवपूर ला अनुष्ठानाला पाठवले.या अनुष्ठान पुर्तीला प्रत्यक्ष भगवान श्रीपाद श्रीवल्लभ प्रभुंनी मामांना दर्शन देऊन आपल्या प्रसाद पादुका  दिल्या.त्यानंतर अनेक लिला मामां महाराजांच्या चरित्रात घटीत झाल्या.योगीराज श्री गुळवणी महाराजांची अनन्य भावाने सेवा करुन मामांनी त्यांच्या पूर्ण कृपेला संपादन केले.हा मामांच्या चरित्रातील एक विस्तृत भाग ठरेल एवढा तो दिव्य आहे. एकदा मामा श्री गुळवणी महाराजांसमवेत नारेश्वरला रंगावधूत स्वामी महाराजांच्या भेटीला गेले होते तेव्हा गुळवणी महाराज बापजींना म्हटले होते, "श्रीपादराव म्हणजे प.पू.श्री.थोरल्या महाराजांचीच पूर्ण विभूती समजावी.ही कोणी सामान्य व्यक्ती नाही.श्रीदत्तकृपेचे ते पूर्ण धामच आहे!" १९६१ मामांनी ह.भ.प केशवराव देशमुख महाराजांची हस्तलिखीत गद्य ज्ञानेश्वरीचे गुरु महाराजांच्या आज्ञेने प्रकाशन ही केले.१९६८ साली केशवराव महाराज मामांच्या स्वप्नात आले आपल्या माडीवर ज्ञानेश्वरी चे प्रवचन करण्याची आज्ञा केली. मामांनी महाराजांच्या घरातील भाग असलेली माडी विकत घेतली.त्याला "श्रीज्ञानेश्वरी निवास" असे नाव ठेवले व पुढे १९ एप्रिल १९७१ ला प.पू.श्रीगुरु महाराजांच्या हातुन त्याचे उद्घाटन केले.मामांनी याच ठिकाणी दररोज ज्ञानेश्वरीवर प्रवचने सुरु झाली.या माडीत मामांच्या मुखातून ज्ञानेश्वरीचे अमृतच स्त्रवत असे.मामांचे प्रवचन ऐकायला बरेच लोक जमत असत.याच दरम्यान मामांचे ज्ञानेश्वरी,कृपा योग या विषयांवर विविध ग्रंथाच्या लेखनाचे काम ही सुरुच होते.ज्ञानेश्वरीतील गुढ रहस्ये मामा अगदी सहज आणि सुंदर शब्दांत श्रोत्यांना समजावून सांगत असत.आचार्य अत्रेंच्या विनंतीवरुन आणि गुरु महाराजांच्या आज्ञेने मामा ज्ञानेश्वरीच्या प्रचारार्थ इंग्लंडमध्ये ही जाऊन आले.तिथे ही मामांनी आपला काटेकोर आचारधर्म पाळला.आपल्या दिनक्रमात कसलाही बदल केला नाही.१९७३ ला मामांना श्रीगुरु महाराजांनी आपले वेगळे स्थान निर्माण करण्याची आज्ञा दिली.भविष्यात शक्तिपात दिक्षेचा होणारा बाजार आणि होणारा गोंधळ यांची पूर्ण कल्पना मामांना दिली.संप्रदायाचे विस्तृत कार्य आपल्याद्वारे होणार आहे याची जाणीव करुन दिली.मामांनी गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून १९७३ लाच "माउली" आश्रमाचे काम सुरु केले. २६ डिसेंबर १९७३ ला माउली आश्रमाची वास्तुशांती करण्यात आली.गुरु महाराजांची प्रकृती ठिक नव्हती त्यामुळे त्यांनी आपल्या पादुका आणि बंद्या रुपयांची थैली एका शिष्याकरवी माउलीत प्रसाद रुपाने पाठवली. पुढल्या वर्षी म्हणजे १९७४ ला प.पू.योगीराज श्री गुळवणी महाराजांनी आपल्या देहाची खोळ सांडली,आपला देह दत्तचरणी लिन केला.त्याआधी गुरु महाराजांनी मामांना अनेक आज्ञा केल्या,संप्रदायाचे कार्य कसे करायचे,सर्व जबाबदारी ही मामांनी कशी पार पाडायची व मामांच्या कडून हे कार्य कशाप्रकारे वाढेल आणि विस्तारेल यांची पूर्ण कल्पना दिली. देह ठेवण्याधी अनेक गोष्टी मामांना सांगुन गुरु महाराजांनी त्यांचे मस्तक कुरवाळत आश्वासन दिले की, "आम्ही सदैव तुमच्या बरोबरच आहोत" व मामांना परत पाठवले.पुढे माउलीतुन अनेक आर्त मुर्मुक्षू जिवांना मामांनी दिक्षा दिल्या.अनेकांच्या पिशाच्च बाधा,ग्रह बाधा ,प्रेत बाधा ,अनेकावीध दु:ख दूर केले.माउलीत अनेक अनुष्ठान केलेत. प्रत्येकावर केलेल्या कृपेचे वर्णन करायचे झाले तर अनेक वर्ष यावर लेखमाला होतील आणि वाचुन कुणीही थक्क होईल इतक्या त्या दिव्य लिला आहेत.मामांनी भक्तांना घेऊन अनेक यात्रा केल्या.या यात्रेत अनेक चमत्कार भक्तांनी अनुभवले.अनेकांना ज्ञानेश्वरी वाचायला,जगायला प्रेरीत केले. मामा हे यज्ञप्रिय होते.मामांनी अनेक ठिकाणी विविध स्वाहाकार केले.त्यातील शतचंडीचा स्वाहाकार,कर्हाडचा महारुद्र स्वाहाकार आणि नृसिंहवाडी येथील अतिरुद्र स्वाहाकार विशेष भव्य झाले.नृसिंहवाडी येथील स्वाहाकारा प्रसंगी योगीराज श्री गुळवणी महाराज स्वतः ज्योतीरुपाने हजर असल्याचे अनेकांनी बघितले.महाराजांनी मामांना दिलेला आपला शब्द पाळला. याच दरम्यान मामांनी आपल्या अतिप्रिय आणि आपले उत्तराधिकारी असलेल्या शिष्यद्वयांना निवडले होते.हे शिष्यद्वय म्हणजे सद्गुरु श्री शकु़ंतला ताई आगटे आणि सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे.पू.मामांनी आपल्या या दोन शिष्य रत्नांवर पूर्ण कृपा केली ,आपले सर्व संप्रदायाचे ज्ञान यांच्या द्वारे करण्याची योजना आखली व ती पूर्णत्वास ही नेली.मामांच्या या दिव्य शिष्यांनी केलेले अलौकिक कार्य आजही अखंड अविरत सुरू आहेच आणि आपल्याला ते दिसुन ही येत आहे.
                                 प.पू.मामा महाराजांच्या चरित्रात इतक्या विलक्षण लिला आहेत,इतक्या अचाट लिला आहेत की वाचुन थक्क व्हायला होतं.मामांचा विविध संत मंडळींशी असलेला प्रेम स्नेह हा तर एक लेखमालेचा स्वतंत्र विषय होईल.यावेळी हेळवाकहून प्रकाशित होणारे "अमृतबोध" मासिक याच मामांचा व इतर संतांच्या हृदय संबंधांना समर्पित करण्यात आले आहे.यातून मामांचे इतर संतांशी असलेल्या संबंधाविषयी प्रकाश टाकण्यात आला आहे. जसे नारेश्वर येथील रंगावधूत स्वामी महाराज यांचे शिष्य पंडितजी हे तर मामांना टेंबे स्वामीच मानायचे.त्यांना मामांच्या ठाई अनेकवेळा थोरल्या स्वामींचे दर्शन घडले होते.तसेच नृसिंहवाडी येथील म्हादबा महाराज मामांना दत्तप्रभु मानायचे. फलटन चे गोविंद काका उपळेकर महाराज यांचा विशेष स्नेह मामांवर होता.वेळापूर चे भाईनाथ महाराज मामांना आपल्या भावाप्रमाणे मानत.तर विश्वनाथ बाबा डव्हा,धुंडा महाराज देगलूरकर,मामा साहेब दांडेकर अशा अनेक संत मंडळी मामांना पुज्य मानत असत.प.पू.आनंदमयी मा तर मामांना प्रत्यक्ष भगवदविभूतीच मानत.प.पूअवधूतानंद महाराजांना नृसिंहवाडी येथील दत्तपादुकांवर मामांनी दर्शन दिले होते‌.आंबेकर महाराज,अमलानंद महाराज हे मामांच्या बद्दल सदैव धन्योद्गार काढत. सन १९८९ च्या चैत्रात श्री स्वामी समर्थ महाराज मामांपुढे प्रगटले आणि त्यांना आदेश दिला की, "पुढल्या वर्षी तुम्हाला आमच्याबरोबर यायचे आहे.उर्वरीत अवतारकार्य भराभर उरकण्याचा प्रयत्न करा.तुमची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला आयुष्य वाढवून देऊ." त्यावर मामांनी समर्थांना नमस्कार करुन म्हटले, "देवा ,माझे शरीर आता खूप थकले आहे.आपल्या आज्ञेप्रमाणे मी वागेन!" हे ऐकताच समर्थांनी मामांना कुरवाळले आणि ते अंतर्धान पावले.मामांनी पुढील एका वर्षात आपले सर्व कार्य आटोपून ,प्रत्येक जबाबदारी आपल्या उत्तराधिकारी सद्गुरु द्वयांना समजावून सांगितली.सगळ्या प्रकल्प आणि संस्थेच्या जबाबदारीतून मामा मोकळे झाले.सर्व कार्याची रुपरेषा मामांनी ठरवली.याचदरम्यान देवांसाठी १९९० ला दत्तधाम या दिव्य दत्तक्षेत्राची निर्मिती केली.त्याठिकाणी भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांसाठी अलौकिक स्थान निर्माण केले.वर्षभरात अनेक भक्तांना भेटून माउलीत भंडार्याला यायचे आहे असे सांगितले.शेवटच्या दिवसात आपल्या प्रिय शिष्य व उत्ताराधिकारी सद्गुरु द्वयांना आपल्या अंतिमक्रिया व प्रसाद पादुका आपल्या बरोबर देण्याची कल्पना दिली.दिनांक २० मार्च मंगळवारी रात्री सुमारे साडे नऊ वाजता श्रीमामांनी सर्व साधकांना प्रेमाने निरोप दिला.रात्री १२ वाजता श्री मामांनी सर्वांना आपापल्यि जागी जाण्यास सांगितले.सर्व गेल्यावर शुचिर्भूत झाले.मग ते आपल्या जागी गादीवर येऊन ,लोडाला टेकून बसले.त्याच वेळी श्री अक्कलकोट स्वामी महाराज व मातोश्री प्रगटल्या.मामांनी "स्वामी" म्हणून हात जोडून नमस्कार केला व "आई" म्हणून नमस्कार केला. दोघांनाही नमस्कार करुन वेगाने सुषुम्नेत प्राण वर खेचले.आंतर-खेचरी मुद्रा लावली.जीभ दातांमध्ये ताणून धरली आणि प्राण ब्रह्मरंध्री नेले.पूर्वाषाढा नक्षत्राचा दुसरा चरण संपण्यापूर्वी त्यांनी योगबलाने देहाची खोळ सांडली. एक महायोगी,दत्तावतारी महासिद्ध, ज्ञानेश्वरी चे थोर भाष्यकार, प्रत्यक्ष दत्तप्रभु आपल्या स्वधामी निघून गेले. श्री रोहन दादा उपळेकर यांनी आपल्या "सद्गुणरत्नाकर प.पू.श्रीमामा" या ग्रंथात मामांच्या दोन अतिशय दिव्य आठवणी दिल्या आहेत त्या इथे देऊन लेखाची समाप्ती करतो.
१) कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्रीमद् चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराज १९८१ साली सातार्यात अकरा महिने राहिले होते.त्यावेळी प.पू.मामा आपल्या उत्तराधिकारी सौ.शकुंतला ताई आगटे यांना बरोबर घेऊन आचार्यांच्या दर्शनाला गेले.प.पू.मामा दर्शनाच्या रांगेत उभे होते.तेवढ्यात स्वतः परमाचार्यांनी आतून एका शिष्याला ; "बाहेर टेंबे स्वामी उभे आहेत,त्यांना सन्मानाने आत घेऊन ये!"असे सांगून पाठविले.तो बाहेर आला पण त्याला कुणी संन्यासी दिसले नाही.त्यामुळे तो परत आत गेला.त्यावर हसून परमाचार्य म्हणाले, "अरे त्यांना आता टेंब्ये स्वामी म्हणत नाहीत,मामा असे म्हणतात." शिष्याने मामांची रांगेत चौकशी केली व मामांना घेऊन तो आत गेला.प्रत्यक्ष शिवावतार परमाचार्यांनी मामांचे अत्यानंदाने स्वागत केले.त्यांना क्षेमालिंगन दिले व दोघेही अस्खलित संस्कृत मध्ये खूप वेळ बोलत होते.वस्तुत: मामा संस्कृत भाषा शिकलेले नव्हते आणि या सर्व वेळेत आचार्य मामांना टेंब्ये स्वामी म्हणूनच संबोधत होते.
२) सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींची कृपा असलेल्या थोर विभूती प.पू.ताई दामले यांना लहानपणी डोळ्यांची व्यथा होती.त्यासाठी त्यांनी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे असतांना प.पू.टेंब्येस्वामी महाराजांचे चरणतिर्थ डोळ्यांत घालण्याचा उपाय केला होता.श्रीस्वामी महाराज कृष्णामाईवर स्नान करुन आले की त्यांची ओली पावले घाटाच्या पायर्यांवर उमटत.ते चरणतिर्थ प.पू.ताई दामले आपल्या पदराने टिपून घेत आणि डोळ्यात घालीत.या उपायाने त्यांची व्याधी पूर्ण दूर झाली.खरे तर त्या असे करतात हे स्वामी महाराजांना माहिती असण्याचा संबंधच नव्हता.पुढे अनेक वर्षांनी प.पू.ताई दामले यांची प.पू.मामांशी एकदा पुण्यात भेट झाली.त्यावेळी दारात पू.मामांच्या पायांवर त्यांनी दूध -पाणी घालून स्वागत केले.प.पू.श्रीमामा घरात आले आणि अचानक मागे वळून प.पू.ताई दामलेंना म्हणाले, "आता ते पाणी पदराने टिपून घ्यायची गरज नाही बरे! आपले काम झाले आहे." या वाक्याचा संदर्भ फक्त ताईंनाच कळला, बाकी कुणालाही कळले नाही.त्याचवेळी प.पू.ताई दामलेंना प.पू.मामांच्या जागी प्रत्यक्ष प.पू.श्री टेंब्ये स्वामी महाराजांचे दिव्य दर्शनही झाले.

                       अशा प्रत्यक्ष श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे पूर्णविभूती असलेले सद्गुरु माउली श्री मामा यांच्या दिव्य चरित्र सागरातील काही मोती निवडून त्यांच्याच कृपेने या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला.आजवर कधीही इतका गोंधळ झाला नव्हता ,काय मांडावे ,काय निवडावे या विवंचनेत लिहायलाच नको म्हणून लिखान बंद ही केले.पण पुन्हा चरित्र वाचतांना त्यातील दिव्य लिला पुन्हा प्रेरणा देऊन गेल्या.हा लेख म्हणजे मामा माउलींच्या चरित्राचा एक कणच आहे.आपण जरुर मामांच्या विविध चरित्र आजवर प्रकाशित झालेले साहित्य,आठवणी वाचाच.आपण पुण्यातील सिंहगड रोड वरील मामांच्या निजस्थानी "माउली" आश्रमात जाऊन मामांच्या या दिव्य क्षेत्राच्या पवित्रतेचा ,उर्जेचा लाभ घेऊ शकता,जवळच असलेल्या "श्रीपाद निवास" या वास्तूतुन हे सर्व साहित्य घेऊन वाचु शकता.मी तर म्हणेल एकदा वाचाच. शुद्ध अध्यात्म आणि त्याचे शुद्ध ज्ञान या ग्रंथातून वाचायला मिळते.श्री रोहन दादा उपळेकर यांनी लिहिलेला "सद्गुणरत्नाकर प.पू.श्रीमामा" हा ही अत्यंत वाचणीय ग्रंथ झाला आहे.तो ही जरुर वाचाच.यात अगदी सुटसुटीतपणे मामांच्या एकेक अलौकिक गुणांची मांडणी केली गेली आहे.मी प्रत्येक लिला या एका लेखात लिहीण्यास असमर्थच आहे तरी मामांनीच कृपा करुन हे लिहून घेतलं.प.पू.मामांच्या सुकोमल चरणी ही शब्दसुमनांजली अर्पण करतो आणि इथेच थांबतो.

          ✒️✍️  त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...