Monday, December 5, 2022

सगुणभगवद्स्वरूप भाग ५ :- शांतिसागर दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर.🙏🌸🚩🌿


 

सगुणभगवद्स्वरूप भाग ५ :- शांतिसागर दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर.

शान्तिर्मूर्तिमती तपोबलधुरा ,योगाग्निशुध्दाशय: । 
श्रौतस्मार्तसुकर्ममर्मपरमो वेदान्तविद्योदया: ।।
श्रीमद्सद्गुरुवासुदेव करुणागग्ङाम्बुधाराधर: ।
नानाऽऽप्येकरस:सदा विजयते,नाना तराणेकर: ।।

पंचम दत्तावतार भगवान श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचे एकमात्र गृहस्थाश्रमी अधिकारी शिष्यरत्न म्हणजे सद्गुरु श्रीनाना महाराज तराणेकर. प.पू.श्री नानाचा शिष्य परिवार संपूर्ण जगभरात पसरलेला आहे.मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात दत्त संप्रदायाला पोचवण्याचे प्रचंड मोठे कार्य श्रीनाना माउलींनी केले.थोरल्या स्वामी महाराजांची अतिशय प्रसादीक रचना "करुणा त्रिपदी" आज संपूर्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि जगभरातील दत्त भक्तापर्यंत पोचविण्याचे मोठे श्रेय सद्गुरु श्री नाना महाराजांकडे जाते.आजही "त्रिपदी परिवार" या संघटनेच्या रुपात नानांनी सुरु केलेले हे दत्त संप्रदायाचे भव्य कार्य जोमाने कार्यरत आहे.हे वर्ष सद्गुरु श्री नाना माउलींचे १२५ वे सुवर्ण जन्म वर्ष आहे.त्यानिमीत्त ही शब्दसुमनांजली नानांच्या चरणी अर्पण करुन नानांच्या दिव्य व अलौकिक चरित्राचे आपण चिंतन करुयात.

नाना महाराजांचे मुळ गाव खानदेशातील घाटनांद्रे हे होते.नानांच्या सात पिढ्या आधीचे मोरभट हे त्यानंतर मध्यप्रदेशातील तराणा या गावी आले व तेथेच स्थायिक झाले‌.हेच तराणा येथील जोशी ही होते.ते अतिशय वेदशास्त्रसंपन्न व आचारसंपन्न असे घराणे होते.पू.नानांचे आजोबा आत्माराम शास्त्री हे अतिशय सदाचारी गृहस्थ व आचारसंपन्न गृहस्थ होते.यांना एकून सहा अपत्ये होती त्यातील तिसर्‍या क्रमांकाचे पुत्र म्हणजे शंकर शास्त्री हे नानांचे पिताश्री.हे श्रेष्ठ दर्जाचे उपासक होते.ते उत्तम वैदिक,कर्मकांडावर जास्त भर, याज्ञिक व पुराण सहा शास्रांचे अध्ययन झालेले ब्राह्मण होते.वे.शा.संपन्न शंकरशास्त्री तराणा येथे स्वतः ची वेदपाठ शाळा ही चालवत असत.तराणा येथील एक विठ्ठल मंदिर शंकर शास्त्री यांना दानामध्ये लाभले होते.येथील पंढरीनाथांची मनोभावे ते सेवा करित असत.श्री नानांचे वडिल शंकर शास्त्रींना सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचा अनुग्रह होता. तराणा येथे शंकर शास्त्रींनी इ.स १८८२ मध्ये श्री स्वामी महाराजांच्या हस्ते दत्तमूर्तीची स्थापना केली होती.श्री स्वामी महाराज स्वतः येऊन त्यासाठी तराणा येथे राहिले होते.अशा परमपावन कुळात ज्यावर आधीच श्री थोरल्या स्वामी महाराजांची कृपा होती तेथे शके १८१८ इ.स १३ /८/ १८९६ श्रावण शुद्ध पंचमी,गुरुवार या दिवशी नानांचा जन्म झाला.यथाकाळी या दिव्य बाळाचे बारसे झाले व बाळाचे नाव "मार्तंड" असे ठेवण्यात आले.पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे बाळ मार्तंड वाढू लागला.लहापणी बाळ मार्तंडाचे भजनात तल्लिन होऊन देहभान हरपत असे.वयाच्या आठव्या वर्षी नानांचे मौंजीबंधन झाले.श्रीशंकर शास्त्री नियमांच्या बाबतीत अतिशय कठोर होते.ते नानांकडून त्रिकाल गायत्री जप करुन घेत असत.नानांचे वेदाध्ययन आपल्या पिताश्रींकडेच सुरु झाले.नाना चौथी पर्यंत शाळेतील शिक्षण ही शिकले पण एक प्रसंग घडला व ते परत शाळेत गेले नाही.सन १९०४ साली श्री थोरले स्वामी महाराज हे पुन्हा एकदा तराणा येथे मुक्कामी आले.त्यावेळी ते बाळ मार्तंडाला आपल्या जवळ बसवून घेत,त्याला आपल्या बरोबर नदीवर स्नानासाठी घेऊन जात ,तसेच त्याला आपल्या हाताने प्रसाद देत.जणू यातूनच ते आपल्या या शिष्यावर कृपा अनुग्रह करत होते.पुढे नाना वेदांच्या पुढील अध्ययनासाठी इंदूर च्या नरहर शास्त्रींच्या वेदपाठशाळेत गेले.श्री टेंब्ये स्वामी महाराजांचे शिष्य इंदूर चे तांबे स्वामी हे नानांचे सहाध्यायी होते. वयाच्या अकराव्या वर्षी नानांना सद्गुरु प्राप्तीची विलक्षण ओढ लागली.त्यांनी आपल्या वडिलांना आपल्याला अनुग्रह देण्याची विनंती केली पण शंकर शास्त्रींनी "मी तुझा गुरु नाही,मी इतरांना अनुग्रह देऊ शकतो पण दत्तप्रभु़ची तुला अनुग्रह देण्याची मला आज्ञा नाही." त्यांनी नानांना गुरु प्राप्ती साठी गुरुचरित्राचे सप्ताह करण्याची आज्ञा केली.अकरा वर्षाच्या नानांनी लागोपाठ सहा सप्ताह पूर्ण केले व सातव्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी प्रत्यक्ष श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज हे वायुमार्गाने नानांपुढे प्रगट झाले व‌ त्यांनी नानांना अनुग्रह दिला.अनुग्रह देताक्षणीच नाना गाढ समाधीत गेले.श्री थोरल्या महाराजांनी बाळ नानांचे या समाधी तून उत्थान केले व आपल्याला आता मोठे दत्त कार्य करायचे आहे असा उपदेश केला.तेवढ्यात नानांचे वडिल ही तिथे आले.प्रत्यक्ष श्री स्वामी महाराज तिथे आलेले बघितल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला व आपल्या बाळावर झालेली स्वामी कृपा बघून त्यांचे जिवन धन्य झाले. 
(श्री नाना माउलींच्या चरित्रातील हा अतिशय अलौकिक आणि दिव्य प्रसंग आहे.नानांच्या चरित्रातील हा मेरुमणी आहे.प्रसंग अतिशय सुंदर, अलौकिक, चिंतनीय आहे.पण शब्द मर्यादेमुळे तो इथे देणे शक्य नाही.तरी ११ वर्षांच्या नानांना गुरु प्राप्ती साठी  लागलेली तळमळ, बाळ नाना ४९ दिवस सलग गुरुचरित्र पारायण काय करतात आणि स्वामी महाराज प्रगट होऊन त्यांना अनुग्रह काय देतात सर्व काही शब्दातीत आणि अलौकिक आहे.याचा आनंद स्वतः चरित्र वाचल्यावरच येईल.आपण जरुर हा प्रसंग पुढे सविस्तर बघू.)

सद्गुरु अनुग्रहानंतर नानांच्या कठोर तपाला जणू सुरुवात झाली.नाना रोज गुरुमंत्राचा जप ,नित्य कर्म,गुरुचरित्र,शिवलिलामृताचे वाचन करत असत.यात किंचीत ही तडजोड ते करत नसत.तसेच वडिलांकडून नानांचे वेदाध्ययन,याज्ञिकीचे दीक्षा ग्रहण करणे ही सुरु होते.याचदरम्यान‌ नानांचे गायत्री ची अनुष्ठान ही सुरु होते व श्री स्वामी महाराजांचे नानांना स्वप्नात अखंड मार्गदर्शन ही सुरु होते.काही दिवसांनी नानांच्या वडिलांनी नानांकडून सलग तिनं वर्षे शास्त्रशुद्ध,मम नियम पूर्वक श्री गणेशाची ,रामाची ,कृष्णाची जप अनुष्ठाने करुन‌ घेतली.श्री शंकर शास्त्रींना नियमात व अनुष्ठानात जराही सैलपना चालत नसे.म्हणून की काय नानांच्या जिवन उपासनेने उजळून निघाले.नानांच्या वयाची अठरा वर्षं पूर्ण होताच शंकर शास्त्रींनी इंदूर येथील शंकरराव डाकवाले यांची कन्या भिमाबाई यांच्याशी नानांचा विवाह लावून दिला.भिमाबाईंचे सासरी म्हाळसा हे नाव ठेवण्यात आले.पुढे लवकरच शंकरशास्त्रींनी आपली इहलोकीची यात्रा संपवली व ते दत्त चरणी लीन झाले.हा आघात अचानकच नानांवर झाला.पण पुढे तिनं महिन्यात नानांच्या मातोश्री थोर पतिव्रता श्री लक्ष्मी बाई यांनी ही आपला देह ठेवला.हा जणू वज्राघातच नानांवर झाला.पण सद्गुरुंची इच्छा म्हणून नाना निश्चल व शांत होते.आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यास नाना सज्ज झाले.ऐन तारुण्यात नानांवर वेदपाठशाळा व गावातील जोशीपण सांभाळण्याची जबाबदारी आली.त्यावेळी अनेक प्रयोग नानांना माहिती नव्हते तेव्हा भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु श्री स्वामी महाराजांनी नानांना स्वप्नात येऊन सर्व प्रयोग यथासांग शिकवले होते.
पुढे नानांना एक मुलगा झाला त्याचे नाव शंकर असे ठेवण्यात आले.लवकरच नानांच्या पत्नी म्हाळसा बाई यांचे निधन झाले . या अवघड परिस्थितीत नाना आपल्या धाकट्या भावंडांचे शिक्षण करत होते,मुलाला सांभाळत होते,मंदिरातील पूजा ,घरातील व्यवस्था ,यजमानांच्या पूजा अशा चौफेर जबाबदारी पार पाडत होते.यात नानांना अतिशय कष्ट पडत असत पण त्यांची मन:शांती तुसभरही ढळली नाही.नातेवाईक व आप्तांनी लहान मुलाकरीता तरी लग्न कर असा नानांना आग्रह केला व लहान‌ शंकरासाठी नानांनी १९२४ ला दुसरे लग्न केले.या दुसर्‍या पत्नीचे नाव ही म्हाळसा असेच ठेवण्यात आले.यांना पुढे एक मुलगी झाली व नानांचा संसार पुन्हा आनंदात सुरु झाला.तराण्यातील दत्त मंदिरातील सर्व पूजा व सेवेचे नियम हे गाणगापूर येथील मंदिरानुसार नाना करित असत.पुढे नानांच्या दुसर्‍या पत्नीचे ही अचानक निधन झाले व नानांचा संसार संपुष्टात आला.सद्गुरु माउलींची इच्छा असे समजून नाना शांत होते.त्यांच्या अंतरंगातील शांती अढळ होती.गुरु चरणांवर अढळ श्रद्धेमुळे नाना शांतचित्त होते. काही दिवसांनी नानांच्या दत्त मंदिरात एक महायोगी आले.त्या योग्यांनी नानांना अष्टांग योग शिकवीला.नाना काही दिवसांतच योगांगात निष्णात झाले.पुढे एकदा नर्मदा किनारी त्या योगी साधू ने सांगितलेल्या पत्यावर नाना गेलं तेव्हा माहिती झालं की असा कुणीही योगी या ठिकाणि राहत नाही.नानांच्या लक्षात आले की थोरले स्वामी महाराजांनीच आपल्याला योग शिकविण्यासाठी ही लिला केली होती.हळू हळू काळ पुढे सरकु लागला.नाना आपल्या नित्य अनुष्ठान ,साधनेत निमग्न होते.अचानक एके दिवशी दत्तप्रभुंनी नानांना तिर्थयात्रा करण्याची आज्ञा केली आणि मग नाना माउलींच्या जिवन चरित्रातील एक सुवर्ण यात्रा भाग सुरु झाला.नानांनी आपले दोन्ही लेकरं आपली चुलत बहिण कोंडुताईंच्या हवाली केली व नानांनी तीर्थयात्रेस निघाले.या काळी नानांचा आचारधर्म अतिशय कडक असे.ते कडक सोवळे पाळत असत तसेच साधना,उपासना व नित्यकर्मात कसलीही तडजोड करित नसतं.नानांनी आपला हा नियम तिर्थयात्रेतही मोडला नाही हे विशेष.
{ प.पू.नाना माउलींनी केलेली तिर्थयात्रा हा वेगळा लेखमालेचा विषय आहे.नानांच्या सर्व तिर्थयात्रा या अतिशय विलक्षण आहे.प्रत्येक प्रसंग दिव्यत्वाने आणि दैवी‌शक्ती च्या अलौकित्वाचे प्रगटीकरण आहे.या एका लेखात तरी त्या सर्व तिर्थयात्रांची हकिकत बघणे शक्य नाही तरी थोडक्यात त्यांच्या बद्दल माहिती देतोच.भविष्यात नानांच्या कृपेने त्या वर ही वेगळी लेख माला जर लिहीता आली तर आपल्याला त्याचा ही आनंद घेता येईलच.} 
                      
नानांची पहिल तिर्थयात्रा होती ती म्हणजे काशी ची.गुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे नानांनी संपूर्ण काशी‌ यात्रा शास्त्रशुद्ध पद्धतीने केली.त्यावेळी नानांना शिवदर्शनाची विलक्षण ओढ लागली.तेव्हा एका निर्जन स्थळी नाना मंत्र जप करत निर्वाण मांडून बसले.तेव्हा भगवान आशुतोष महादेवांनी नानांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन कृतार्थ केले होते. असेच नाना पुढे नाना मथुरेच्या , वृंदावनाच्या यात्रेला गेले असता कृष्ण स्मरणाने व्याकुळ झाले.नाना भगवंतांच्या विरहात बेभान झाले व देवांच्या दर्शनास आतुर झाले.नानांनी देव दर्शन देत नाही मग जगून काय फायदा म्हणून यमुनेत प्राण त्याग करण्याचा विचार केला.नानांची निष्ठा आणि अनन्य भाव बघून भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभु आपल्या दिव्य सुकुमार बाल गोपाल रुपात प्रगट झाले.नानांशी थोडे बोलून देवांनी नानांच्या हातावर आपल्या झारीतील तिर्थ घातले व नानांना प्रगाढ समाधी लागली.असे सुंदर गोपाल कृष्णाचे ही दर्शन नानांना झाले होते. श्री थोरल्या स्वामी महाराजांनी नानांना नर्मदा परिक्रमा यम नियमांसह करण्याची आज्ञा केली.नानांनी अतिशय दुर्गम अशी जलेरी नर्मदा परिक्रमा आचरली.यावेळी नानांनी अतिशय कडक असे शास्त्र नियम पाळले.याच दरम्यान एकदा नानांना भोवळ आली व ते एका झाडाखाली बसले तेव्हा प्रत्यक्ष भगवती नर्मदा माईंनी बाल रुपात येऊन नानांना‌ सोन्याच्या लोट्यात दूध पाजले होते.याच परिक्रमेत नानांनी एका निर्मनुष्य मंदिरात राहणार्‍या ब्रह्म पिशाच्च्याला मुक्ती दिली होती. एका यात्रेत नाना हिमालय,केदारनाथ ,बद्रिनाथांच्या दर्शनास गेले होते.पर्वतातून फिरत असता नाना गुरुकृपेने रस्ता इ
चुकले‌ व एका भव्य गुंफेपुढे येऊन पोचले.त्या गुफेत आत गेले असता त्यांना महाभारत काळातील एका योग्याचे दर्शन ,भेट व मार्गदर्शन लाभले होते.हा योगी महाभारतातील एक सैनिक होता व भगवान श्रीकृष्णांनी त्याला हिमालयात योग साधना करण्याची आज्ञा केली होती त्यामुळे तो तिथे वास्तव्यास होता.नानांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली हा संवाद जवळपास तीन दिवस अखंड सुरु होता.हा प्रसंग अतिशय दिव्य आणि अलौकिक आहे.एकदा गिरणारी दत्त दर्शनाला गेले असता ,नानांना दत्त शिखराच्या ही वरती गुप्त स्थानी असलेल्या नवनाथांच्या साधनेची जागा बघायची होती.तेव्हा प्रत्यक्ष दत्त प्रभुंनी गुराख्याचे रुप घेऊन नानांना त्या स्थानापर्यंत नेले होते. तसेच नाना जवळपास सन १९६१ पर्यंत आपल्या सद्गुरु माउली श्री टेंब्ये स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला दर वर्षी न चुकता जात असत.तसेच उत्तर आयुष्यात नाना आपल्या भक्तांसह एकदा अनसुयामातेच्या  क्षेत्राची यात्रा करण्यास गेले होते तेव्हा प्रत्यक्ष भगवती अनसुया मातोश्रींनी नानांना दर्शन दिले होते.अशा अनेक विलक्षण यात्रा केल्या नंतर नानांना दत्त क्षेत्राला जाऊन काहितरी अनुष्ठान करावे असे सतत वाटत असे.नानांनी गाणगापूर येथे ५१ गुरुचरित्राचे पारायण करण्याचा संकल्प केला व ते गाणगापूर येथे गेले.यथावकाश गाणगापूर ला राहून नानांनी ५१ पारायण पूर्ण केले.नानांचा मुक्काम गाणगापूरी होता व गुरुप्रतिपदेचा उत्सव जवळ‌ आला.या उत्सवात गाणगापूर ला यति पूजनाचा सोहळा पार पडला जातो.त्यावेळी संन्यासी जनांचे पाद्य पूजन करतात.भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पुजार्‍याला दृष्टांत दिला आणि सांगितले की या या ठिकाणी मार्तंड तराणेकर नामक व्यक्ती मुक्काम करुन आहेत,त्यांना मठात बोलावून त्यांची पाद्यपूजा यति पूजन करावे.त्या वर्षी गृहस्थाश्रमी नानांचे गाणगापूर येथे यति पूजन झाले होते.तसेच ग्वाल्हेर कडे अवधूत वृत्तीत फिरत असता नानांना एका राम मंदिरात प्रत्यक्ष भगवान रामरायांचे व लक्ष्मणजींचे दर्शन झाले होते.

पूर्वायुष्यात नानांनी अनेक मोठं मोठे यज्ञ संपन्न केले होते.नानांनी जवळपास बत्तीस यज्ञ केले होते.एका विष्णू याग यज्ञ प्रसंगी नाना एका खेड्यात गेले होते.तेथे विस्तव मिळाला नाही व यज्ञाचा मुहूर्त ही टळून चालला होता तेव्हा सर्व लोकांपुढे नानांनी समीधेवर फक्त आपली दृष्टी टाकली आणि यज्ञ प्रज्वलित केला होता.हा प्रसंग अनेक लोकांनी बघितला होता.तसेच नानांना अनेक संतांचा सहवास लाभला होता.धार मध्यप्रदेश येथील नित्यानंद महाराज हे नानांना भेटायला‌ येऊन गेले होते.तसेच बडे दादाजी धुनीवाले यांचा तर नानांवर विशेष स्नेह होता.पुण्याचे सद्गुरु श्री गुळवणी महाराज व नानांचा हृद्य संबंध होता.वज्रेश्वरीचे नित्यानंद महाराज,नाशिकचे गणेशबाबा,नारेश्वरचे रंगावधूत महाराज,नागपूरचे बापुमहाराज खातखेडकर,देवासचे शीलनाथ,इंदूर चे माधवनाथ,मामा साहेब दांडेकर,धुंडा महाराज देगलूरकर या सर्वांचे नानांशी अतिशय प्रेमाचे नाते होते.या सर्व संत मंडळी व नाना अनेकदा भेटले होते.एकदा त्यांचा येथील दत्त जन्माच्या उत्सवात तूप कमी पडले.सर्वत्र पाने मांडली गेली ,लोक जेवायला बसले.सर्वजन गोंधळात सापडले.तेव्हा नानांनी नदीतील पाणी घागरीत भरुन आणण्यास सांगितले.तसे केल्या क्षणी ते पाणी तुपात रुपांतरीत झाले होते.उत्सव झाल्यावर नानांनी तेवढ्याच घागरी तूप नदीत सोडण्याची आज्ञा भक्तांना केली होती. पुढे नाना तराणा सोडून इंदूर येथे राहण्यास गेले.सुरवातीच्या काळात ते भाड्याच्या घरात राहत असत.नंतर त्यांनी‌ आपल्या नुतन वास्तुत प्रवेश केला.इंदूर येथे नानांनी अनेक लिला चमत्कार केले,अनेक भक्तांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले.नानांचा अनेक ठिकाणि मुक्काम व दौरा होत असे.मुंबई, पुणे ,नाशिक अशा विविध ठिकाणी नानां भक्तांसाठी जात असत.नानांचा नावलौकिक व प्रभाव इतका प्रचंड होता की नाना जिथे ही जात तिथे त्यांच्या दर्शनाला हजारो भक्तांची रांग लागत असे.नानांच्या कृपा करुणेच्या हकीकती आजही अनेक ग्रंथांतून शब्द बद्ध केल्या आहेत.त्यांचा उल्लेख जरी केला तरी अनेक लेख लिहावे लागतील.पू.नानांनी घराघरात त्रिपदी व दत्त उपासना पोचवली.अनेकांना सन्मार्गाला लावले ,अनेकांचे दु:ख दूर केले.नानांनी हेच तेज आपल्या शिष्यात ही समाविष्ट केले.खामगावचे आगाशे काका, वाशिम चे पंडित काका धनागरे ,भुसावळचे पेटकर काका हे नानांचे मुख्य शिष्य.या शिष्यांनी ही नानांच्या नावाची पताका व दत्त भक्ती चे‌,दत्त संप्रदायाचे भक्त कार्य भविष्यात केले.अशा या दत्त संप्रदायातील थोर विभूतींनी शुक्रवार दिनांक १६/४/१९९३ चैत्र वद्य दशमी या दिवशी आपला देह दत्त चरणी लिन केला. नानांनी नागपूर येथे ज्या ठिकाणी देह ठेवला त्या ठिकाणी आज नानांचे भव्य पादुका मंदिर व स्मारक उभे राहिले आहे. खरंतर नानांच्या चरित्रावर लिहीण्यासाठी एक लेख अपुराच आहे.ही शब्दसेवा नाना माउलींच्या चरणी अर्पण करतो व नानांनी आम्हा सर्वांना दत्तचरणाची अखंड सेवा करण्याची बुद्धी‌ द्यावी ही श्रीचरणांशी कोटी कोटी प्रार्थना...
     ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

श्रीदत्त शरणं मम 🙏🌸🌿
महाराज ज्ञानेश्वर माउली समर्थ 🙏🌸🌿

2 comments:

  1. जय नाना🙏🙏

    ReplyDelete
  2. जय नाना माऊली 🙏🙏🏼💐

    ReplyDelete

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...