गौर पौर्णिमा भगवान श्रीचैतन्य महाप्रभुंचा आविर्भाव दिन🌸❤️
नमो महावदान्याय,कृष्ण प्रेम प्रदायते ।
कृष्णाय कृष्ण चैतन्य,नामने गोर-तविशे नमः ॥
हे परम दानी अवतार ! आपण स्वतः श्री कृष्ण चैतन्य महाप्रभुंच्या रुपात प्रगट होणारे कृष्ण आहात.आपणच श्रीराधारानीचा सुवर्ण रंग धारण केला आहे आणि आपणच श्रीकृष्ण प्रभुंच्या शुद्ध प्रेम भक्तीला व्यापक रुपाने वितरीत करत आहात.आम्ही आपल्याला सादर प्रणाम करतो.
वैष्णव भक्ती योग मार्गाचे परमोच्च प्रचारक ,प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण व राधारानींचे संयुक्तिक अवतार,कृष्ण भक्तीचे परम प्रचारक व कृष्ण नाम संकिर्तनाचे आद्य आचार्य भगवान श्रीचैतन्य महाप्रभु हे १४ व्या शतकात होऊन गेलेले एक दिव्य भगवत अवतार आहेत.श्रीप्रभुंबद्दल ,त्यांच्या अवतार लिलां बद्दल चैतन्य चरितामृत ,चैतन्य भागवत या ग्रंथात विस्तृत पणे लिहीले गेले आहे.महाप्रभुंच्या चरित्रातील एक एक घटना इतकी दिव्य आहे की कुणालाही आनंददायक आश्चर्याची अनुभूती होईल.चैतन्य महाप्रभुंचा अवतार हा राधा-कृष्णांचा संयुक्तिक अवतार मानला गेला आहे.त्याची अनुभूती ही अनेक संतांना आली आहे व त्याला सर्व संतांनी एकमुखाने दुजोरा ही दिला आहे.श्रीप्रभुंचे महान कार्य म्हणजे कलियुगात सर्वांना नाम संकीर्तनाची दिक्षा महाप्रभुंनी दिली.श्रीकृष्ण नाम संकीर्तन प्रत्येकाला मोक्ष मार्गावर नेणारी नाव आहे व त्या शिवाय दुसरा तरणोपाय या कलियुगात नाही ही शिक्षा महाप्रभुंनी दिली.समाजातील दुषित मतभेद,वैषम्य ,रुढीं व कर्मठतेला फाटा देत श्रीप्रभुंनी उपनिषदातील अठरा शब्दीय बत्तीस अक्षर महामंत्र ( हरे कृष्ण ) याचे प्रगटीकरण केले व याचेच नाम संकीर्तन करुन सर्वांचा उद्धार केला.
चैतन्य चरितामृताच्या आधारे श्रीमहाप्रभुंचा जन्म सन १४८६ ला फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पश्चिम बंगाल मधील नवद्विप नावाच्या गावात झाला होता.ज्याला आपण मायापुर म्हणून ओळखतो.श्रीमहाप्रभुंचा जन्म सिंह लग्नात चंद्रग्रहनाच्या वेळी झाला.त्यावेळी सर्व लोक हरीनाम घेत गंगास्नानास जात होते.श्रीमहाप्रभुंच्या वडिलांचे नाव जगन्नाथ मिश्र व आईचे नाव शची देवी होते.परम धार्मिक ,महावैष्णव असे हे दाम्पत्य होते.जणू यांच्या जन्मो जन्मीच्या भक्तीचे फळच महाप्रभुंच्या रुपात यांना लाभले होते.महाप्रभुंची कुंडली तत्कालिन विद्वानांनी बघितली तेव्हाच सर्वांनी भविष्य वर्तविले होते की हे बालक आजन्म श्रीहरी नाम संकार्तनाचा प्रचार प्रसार करेल.श्री महाप्रभुंचे पाळण्यातील नाव विश्वंभर असे ठेवले गेले. परंतु सर्व लोक महाप्रभुंना निमाई म्हणत असत.तसेच प्रभुंचा रंग हा सुवर्णासम होता म्हणून त्यांना गौरांग ,गौर हरी,गौर संदर ही म्हटले जात असे.चैतन्य भागवत व चैतन्य चरित्रामृतात श्रीमहाप्रभुंच्या अतिशय दिव्य अशा बाललिला वर्णन केल्या आहेत.भगवान श्रीकृष्णासमच श्रीमहाप्रभुही अतिशय खट्याळ व दिव्य अशा बाललिला करते झाले.श्रीगौरांग महाप्रभु बालपणापासूनच विलक्षण प्रतिभा संप्पन्न होते.तसेच ते अत्यंत सरळ ,प्रेमळ व भावुक स्वभावाचे होते.ते जेव्हा विविध बाल लिला करित असत तेव्हा प्रत्येक व्यक्ति त्यांच्यापुढे हतप्रभ होत असत.महाप्रभुंचे व्रतबंध व इतर सर्व संस्कार यथायोग्य वेळी संपन्न झाले .त्यानंतर त्यांची शिक्षाक्रम,अध्ययन सुरु झाले.अगदी कमी वेळात गौरांग महाप्रभु न्याय व व्याकरणादी शास्त्रीत पारंगत झाले.त्यांनी कमी वयातच मायपूर मध्ये शाळा ही काढले व काही काळ अध्यापकाचे काम ही केले.तरीही बालपणापासून महाप्रभु राम-कृष्णाच्या स्तुती करण्यात मग्न राहत असत.त्यांना त्याचेच अत्यंत प्रेम होते. वयाच्या १५ व्या वर्षी महाप्रभुंचा विवाह लक्ष्मीप्रिया यांच्याशी झाला.पण काही वर्षातच सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यु झाला.वंश वृद्धी करिता त्यांच्या वडिलांनी गौरांग प्रभुंचा दुसरा विवाह करुन दिला.तो नवद्विपचे राजपंडित सनातन यांच्या पुत्री विष्णुप्रिया यांच्याशी झाला.महाप्रभुंचे जिवन आता तारुण्यवस्थेला आले अशातच त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले.
श्रीगौरांग प्रभु आपल्या वडिलांचे श्राद्ध करण्याकरिता गया श्रेत्री गेले होते.त्यावेळी त्यांची भेट ईश्वरपुरी नावाच्या संतांशी झाली.त्यांनी गौरांग प्रभुला दशाक्षरकृष्णमंत्राची दिक्षा दिली.दिक्षा देल्याबरोबर श्रीमहाप्रभु मूर्च्छित झाले व जमिनीवर पडले.त्यादिवसानंतर महाप्रभुंचे संपूर्ण जिवनच बदलले.ते प्रत्येक क्षण कृष्ण स्मरणात लिन राहू लागले.कृष्ण नाम घेता क्षणी त्यांचे तिव्र अष्टसात्विक जागे होऊ लागेल.हे कृष्ण प्रभु म्हणत ते जोरात हसत ,तर कधी रडत.कधी बेहोश होत तर कधी पळत.श्रीमहाप्रभुंची अवस्था एखाद्या वेड्या व्यक्ति समान झाली.कृष्ण भावनेचा तिव्र उगम श्रीमहाप्रभुंच्या ह्रदयात भरुन वाहू लागला.महाप्रभु त्या कृष्ण स्मरण अमृताने पार प्रेम वेडे झाले.तेव्हा तात्काळ आता व्रज ,गोकुळात जाऊन कृष्ण प्रेमातच जिवन व्यतीत करावे असे प्रभुंवा वाटू लागले पण तेवढ्यातच “वृंदावन ,गोकुळात जायला अजून अवकाश आहे” अशा आकाशवाणी झाली त्यामुळे मग प्रभु आपल्या गावी परतायला निघाले.ईश्वरपुरी महाप्रभुंना दिक्षा दिल्यानंतर अंतर्धान झाले.पुढे ते कुठे गेले याची त्यांनी कुणालाही माहिती होऊ दिली नाही कारण स्वयं भगवान राधा कृष्ण गौरांग रुपात आपले शिष्य झाले .आता जर आपण प्रगट रुपात राहलो तर शिष्य म्हणून गौरांग प्रभु आपल्याला नमस्कार करतील व ते आपल्याला सहन होणार नाही .म्हणून ईश्वर पुरी महाराज गुप्त झाले. महाप्रभु नवद्विपला आल्यानंतर त्यांची कृष्ण प्रेमातील जी अवस्था झाली होती ती अतिशय दिव्य अशा होती.”हे कृष्णा,मायबापा तु कुठे आहेस? मला का भेटत नाहीस ? मज पाप्यावर दया कर! मला भेट दे! “ असे म्हणून रडत असत,मुर्च्छित होत असत. श्रीमहाप्रभुंचा हा प्रेमावेश इतका तिव्र व प्रचंड असे की त्याचे वर्णन करण्यास कुणातही सामर्थ्य नाही. श्रीमहाप्रभुंचे दिव्यत्व इतके अनाकलनीय होते की या प्रेमावेशात महाप्रभुंना जो कुणी स्पर्श करित असे त्याला ही त्या प्रेमावेशाची अनुभूती होत असे. पुढे महाप्रभुंचे चित्त संपूर्ण कृष्णमय झाले होते.त्यांना इतर कुठल्याही गोष्टींचे भान राहिले नाही.त्यामुळे त्यांची पाठशाळा ही बंद झाली. आपल्या विद्यार्थांना घेऊन सर्वात प्रथम गौरांग महाप्रभुंनी
“हरे हरये नमः कृष्ण यादवाय नमः ।
गोपाल ग़ोविन्द राम श्रीमधुसूदन ॥
या नामाचे संकीर्तन केले.ही महाप्रभुंच्या संकीर्तनाची सुरुवात होती.यापुढे कृष्ण नाम संकीर्तनाने महाप्रभुंनी त्रिभुवन भरुन टाकले होते. काही कालावधीनंतर महाप्रभुंनी भक्त भावाचे प्रगटीकरण केले.भक्तीत असणाऱ्या सेवा ,प्रेम ,करुणा ,नम्रता असा अनेक गुणांचे प्रत्यक्ष प्रगटीकरण महाप्रभु करु लागले.प्रभुंचे हे दिव्य आचरण बघून लोक अचंबित होत असत.यापुढे महाप्रभुंमध्ये भगवंतांच्या विविध भावाचे प्रगटीकरण होत होते.विविध भावाने महाप्रभुंनी अनेक भक्तांवर कृपा केली .प्रत्येक प्रसंग अतिशय दिव्य आहे पण शब्द मर्यादेस्तव आपल्याला ते येथे घेणे शक्य होणार नाही. पण महाप्रभुंनी आपल्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला हरीनामाचे अमृत प्रदान केले व त्यांना नाम संकीर्तनाला लावले.महाप्रभुंनी पुढे गृहस्ताश्रमाचा त्याग केला व संन्यास आश्रमाचा स्विकार केला.त्यांचे संन्यास आश्रम स्विकारल्यानंतरचे नाव “श्रीकृष्ण चैतन्य भारती “ असे होते. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभु आता काषाय वस्त्र परिधान करते झाले.पहिलेच स्वर्ण कांती असलेले महाप्रभु आता काषाय वस्त्राने अधिकच तेजस्वी दिसू लागले.प्रभुंच्या चरित्रात अनेक लिलाप्रसंग आहेत ज्यात त्यांचा दंड त्याग ,भक्त उद्धार ,प्रेमावेश असे अनेक प्रसंग आहेत. एकदा प्रभु संकीर्तन करत करत एका घनघोर जंगलातून जात होते .श्री महाप्रभुंच्या कृष्ण प्रेमाच्या तेजामुळे जंगलातील सर्व हिंस्र प्राणी ,पशु,पक्षी महाप्रभुंच्या नामसंकीर्तनाच भाग घेऊन नाचु लागले ,डोलू लागले होते.यावरुन आपल्याला प्रभुंच्या सामर्थ्याची कल्पना येईल.
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
या उपनिषदातील महामंत्राला उलटे करुन ,
“हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥”
या १८ शब्दांच्या महांत्राला श्रीमहाप्रभुंनी सर्व सामान्य जनांसाठी प्रगट करुन आपल्या सर्वांवर अनंत कोटी उपकार केले आहेत.या महामंत्राचा जप व संकीर्तन करण्याची आज्ञा महाप्रभुंनी सर्वांना केली.या महामंत्राचे कलियुगातील हे दिव्य प्रगटीकरण ही महाप्रभुंची या त्रिविध तापात अडकलेल्या जिवांना उद्धाराची परमोच्च कृपा करुणा आहे.संन्यास आश्रम घेतल्यानंतर महाप्रभु प्रथमच भगवान जग्गनाथ पुरीच्या दर्शनाला गेले.तेव्हा श्रीभगवंतांना बघून महाप्रभु नाचायला लागले ,ते इतके भाव विभोर झाले की त्यांना तात्काळ मुर्च्छा आली व ते खाली पडले.पुढे पुरीचे प्रकांड पंडित सार्वभौम भट्टाचार्य यांना महाप्रभुंनी भक्तीचे परमोच्च महत्व पटवून दिले व षड्भूजरुपात दर्शन दिले.त्यानंतर सार्वभौम भट्टाचार्य महाप्रभुंना शरण आले व त्यांचे शिष्य झाले.महाप्रभुंवर लिहीलेले प्रसिद्ध काव्य “चैतन्य शतक” हे त्यांनीच लिहीले आहे.तसेच पुरीचे राजे सम्राट गजपती हे ही महाप्रभुंचे अनन्य भक्त बनले. पुढे महाप्रभुंनी दक्षिणेची यात्रा केली .श्रीरंग ,रामेश्वर,पंढरपुर ,जेजुरी असा लाखो स्थानी जाऊन त्यांनी या स्थानांना उर्जीत अवस्था प्रदान केली.लाखो लोकांना नाम संकीर्तनाला लावले.ही यात्रा करित असता ते कार्तिक पौर्णिमेला वृंदावनात येऊन पोचले.आजही वृंदावनात या पौर्णिमेला गौरांग प्रभुंचा आगमनोत्सव साजरा केला जातो.वृदांवनात महाप्रभुंनी अक्रुर घाट व ईमली घाट येथे वास्तव्य केले.प्राचिन वृंदावनाला प्रगट करण्याचे श्रेय महाप्रभुंकडेच जाते.श्रीचैतन्य महाप्रभुंनी दक्षिणेकडील यात्रा केली ,पश्चिम भारताकडे कृष्ण नाम संकीर्तनाचा प्रचार केला .प्रचंड अशी तिर्थयात्रा ,प्रचार प्रसाराचे कार्य करुन श्रीमहाप्रभु जगन्नाथ पुरी महाश्रेत्री आले.बराच काळ श्रीमहाप्रभु पुरीत वास्तव्य करुन होते व पुढे सन १५३३ ला वयाच्या ४७ व्या वर्षी भगवान जगन्नाथ महाप्रभुंच्या रथ यात्रेपुढे संकीर्तन करित असता जगन्नाथ प्रभुंच्या विग्रहा विलीन झाले. असा या दिव्य भगवत अवताच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी प्रणिपात.आजच्या या पुण्यपावनी गौर पौर्णिमेला ही शब्द सुमनांजली श्रीचैतन्य महाप्रभुंच्या चरणी अर्पण करतो व श्रीमहाप्रभुंच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या वर ही श्रीकृष्ण प्रेमाचा परम कृपा अनुग्रह करावा.
वैराग्य-विद्या-निज-भक्ति-योग-शिक्षार्थम एकः पुरुषःपुराणः ।
कृपांबुधिर यस् तम अहं प्रपद्ये ॥
स्वतः जगतगुरु भगवान कृष्ण हेच कलयुगातील जीवांमध्ये श्रीकृष्ण चेतना,भक्ति , संकीर्तन निष्ठा व वैराग्य उत्पन्न करण्यासाठी चैतन्य देवांच्या रूपात अवतरित झाले.त्या अकारण करुणासिन्धु कल्किपावनावतार ,कृष्ण नाम संकीर्तन सुधासिन्धु मध्ये नित्य निमग्न, भगवान चैतन्य महाप्रभु गौरांग हरींचा मी अनन्यभावाने शरणागत आहे.
🖋️✍🏻 त्यांचाच अक्षय जाधव आळंदी


No comments:
Post a Comment