Saturday, April 30, 2022

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी निवासी सद्गुरु श्री नारायण स्वामी महाराज 🌸🌺🙏

 

श्रीमन् नारायण स्वामिन् । दयाब्धे तारकपद दायिन ।।

श्रीमन् नारायण स्वामिन् । दयाब्धे तारकपद दायिन ।।🙏🌸

                  आज चैत्र वद्य अमावस्या भगवान श्रीदत्तात्रेय प्रभुंचे अत्यंत लाडके शिष्य ,भक्तोत्तम, दत्तप्रभुंची राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे ज्यांना देवांच्या पुजेआधी अग्रपूजेचा मान प्रत्यक्ष दत्तप्रभुंनी दिला आहे ,ज्यांना प्रत्यक्ष भगवान श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांनी अनुग्रह देऊन कृतार्थ केले होते आणि जगद्गुरु श्रीतुकोबाराया नंतर जे एकमात्र आहेत ज्यांचे सदेह वैकुंठगमन झाले होते असे श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् सद्गुरु नारायण स्वामी महाराज यांची आज पुण्यतिथी अर्थात समाराधना दिवस.श्रीस्वामी महाराजांचा अधिकार इतका थोर होता की अत्यंत मधुर कंठाचे धनी असलेल्या स्वामी महाराजांनी भजन गायला सुरुवात केली की जगतजननी करवीर निवासिनी भगवती महालक्ष्मी अंबाबाई आणि भगवान श्रीदत्तात्रेय प्रभु हे सगुण रुपाने श्रीस्वामी महाराजांपुढे बसुन ऐकत असत.श्री स्वामी महाराज हे योगीराज श्री गुळवणी महाराज यांच्या कुलाचे सद्गुरु.अत्यंत विलक्षण आणि अफाट असे स्वामी महाराजांचे दिव्य चरित्र आहे.भगवंतांचा श्रीस्वामी महाराजांवर इतका लोभ होता की त्यांचा विरह देवांनाही सहन होत नव्हता म्हणून की काय तर आपल्या उत्सव मूर्तीच्या स्वरुपात दत्तप्रभु नित्य श्री स्वामी महाराजांच्या बरोबर त्यांच्या समाधी मंदिरात नृसिंहवाडी येथे वास करुन असतात.श्रीस्वामी महाराजांचे चरित्र अतिशय दिव्य आहे ,त्यातील प्रत्येक लिला ही एक स्वतंत्र चिंतनाचा व लेखाचा भाग होईल इतकी ती दिव्य आहे ,पण शब्द मर्यादेमुळे आपल्याला अगदी संक्षिप्त स्वरुपात श्री नारायण स्वामी महाराजांच्या चरित्राचे चिंतन व स्मरण करायचे आहे.या लेखाला आधार म्हणजे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील पुजारीकुलोत्पन्न ब्रम्हर्षी प.पू.श्रीआत्मारामजी शास्त्री जेरे वाडीकर यांनी लिहीलेले संस्कृत व मराठी चरित्र हेच आहे‌. प्रत्येकाने आवर्जून वाचावे व त्यावर चिंतन करावे असे हे दिव्य चरित्र आहे.श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची स्वामी श्री नारायण स्वामी महाराजांचे चरणी अत्यंत श्रद्धा प्रेम होते.श्री टेंबे स्वामी महाराजांनी श्री नारायण स्वामी महाराजांवर १२ संस्कृत श्लोकांचे संक्षिप्त चरित्र ही लिहीले आहे.

                                      श्री.प.प श्रीमद् नारायण स्वामी महाराज यांचा जन्मकाळ आणि जन्मस्थान हे आज ज्ञात नाही.तरी श्री नारायण स्वामी महाराज यांची व मुरघोड निवासी भगवान श्री शिव चिदंबर महाप्रभु यांची भेट झाल्याचा व देवलपूर येथे श्री स्वामी महाराज व चिंदबर महाप्रभु यांचा एकत्र तिन महिने सहवास ,वेदान्त चर्चा झाल्याचा उल्लेख ,वर्णन चिंदबर महाप्रभुंच्या चरित्रात आले आहे. त्यामुळे हे दोघेही महापुरुष समकालीन होते हे निश्चित होते.यावरुन शके १६५० नंतरच्या काळात श्री नारायण स्वामी महाराज यांचा जन्म झाला असावा असा अंदाज धरता येतो. श्री स्वामी महाराजांचा जन्म हा विसापूर येथील जोशी कुळात झाला होता.त्यांचे वडिल देशस्थ ऋग्वेदी प्रसिद्ध याज्ञिक होते.एका सत्शिल दाम्पत्याचे स्वामी महाराज हे चतुर्थपुत्र होते.नारायणाच्या मौंजिबंधनानंतर वडिलांनी यांना वेद व शास्त्र शिकण्यासाठी वेदपाठशाळेत पाठविले.काही काळातच ते वेदशास्त्रसंपन्न विभूषित झाले.त्यांची योग्यता व किर्ती ऐकून त्याकाळातील रिवाजाप्रमाणे अनेक सद्गृहस्थ आपली कन्या त्यांना देण्यास उत्सुक होते.  लवकरच त्यांचा विवाह झाला.पण ही नववधू लवकरच स्वर्गवासी झाली.त्यानंतर करवीर क्षेत्रातील "तारळे" गावातील राम दिक्षीत गुळवणी नावाच्या सद्गृहस्थांनी आपली उपवर कन्या नारायणास दिली.अर्थास नारायण शास्त्रींचा हा दुसरा विवाह.या पत्नीपासून त्यांना तिनं अपत्य झाली.त्यात विश्वंभर शास्त्री हे मोठे चिरंजीव व नंतरच्या दोन कन्या.अशाप्रकारे उत्तम गृहस्थाश्रम शास्त्रीबुवांचा सुरु होता.एकवेळी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत एक विद्वत्सभा झाली.त्यात श्रीनारायण शास्त्री ही गेले होते.पण त्या सभेत त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले.त्यामुळे त्यांचे मन अतिशय खट्टू झाले.त्यानंतर त्यांनी मनोमन काशीस जाऊन उत्तम प्रकारे शास्त्राध्ययन करण्याचे ठरवीले.घरी येऊन पत्नीला सांगुन काशीस आले.तेथील विश्वविख्यात गुरुंना ते शरणं गेले.अहोरात्र कष्ट करुन गुरुकडून उत्तम प्रकारे शास्त्रज्ञान संपादन करुन ते वेदशास्त्रसंपन्न झाले.पण सद्गुरुंना त्यांच्या मनातील हेतू माहित होता व जर यांनी वादविवादाचा मार्ग स्विकारला तर यांचा अध:पात होईल,माझ्या शिष्याची अधोगति होणे म्हणजे परंपरेने माझीच अधोगती आहे तरी याला खरा कल्याणाचा मार्ग दाखवावा असे गुरुंनी ठरविले.दुसर्या दिवशी गुरुंनी नारायणांकडे गुरुदक्षिणा मागीतली व गावी परत जाण्याची आज्ञा केली.पण ही गुरुदक्षिणा काही वेगळी होती.गुरुंनी आधी नारायणाच्या हातावर गंगोदक सोडले व तसा संकल्प सोडण्यास सांगितले.हे केल्यानंतर गुरुंनी नारायणांकडे पुढील गुरुदक्षिणा मागितली , "नारायणा आजपासून मरेपर्यंत कोणाशीही वाद करायचा नाही.ही आम्हास गुरुदक्षिणा पाहिजे आहे." नारायण शास्त्री ही तयारीचे शिष्य होते.त्यांनी क्षणाचाही विलंब न करता हे दान सद्गुरुंच्या दिले व साष्टांग नमस्कार घातला.पण यानंतर नारायण शास्त्री खिन्न झाले.आता आपल्याला गावी कुणालाही तोंड दाखवता येणार नाही याची चिंता वाटू लागली.पण कृपाळू गुरुंनी त्यांच्या मनातील हे भाव जाणले व त्यांना उपदेश करुन त्यांच्या मनातील या अज्ञानाचे हरण करुन ज्ञानाचा प्रकाश प्रगट केला.त्यामुळे त्यांच्या मनातील दुःख दूर होऊन त्यांना समाधान प्राप्त झाले. पुढे गुरुंनी त्यांना आशिर्वाद दिला व सांगितले, "नारायणा! तुझे भाग्य थोर आहे.एका वाक्यात तुझे अज्ञान दूर होऊन तुला बोध झाला.आता तू घरी जा.लवकरच कृष्णा पंचगंगा संगमतीर निवासी अनंतकोटी ब्रह्मांडनायक भक्तकामकल्पदृम श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तुझ्यावर कृपा करुन स्वतःच तुला चतुर्थाश्रम देतील व कृतकृत्य करतील.माझा पूर्ण आशिर्वाद तुला आहे." असे बोलून त्यांना गुरुंनी त्यांना दृढालिंगन दिले‌ व घरी जाण्याची आज्ञा केली.घरी आल्यावर नारायण शास्त्री पुन्हा गृहस्थाश्रमात उदासिनपणे प्रपंच करु लागले.दोन कन्या झाल्यावर त्यांच्या पत्नी निवर्तल्या.यामुळे आता त्यांना चतुर्थाश्रमाची ओढ लागली.आपल्या थोरल्या चिरंजीवास पुण्यात त्यांनी शास्त्राध्यायन करण्यास ठेवले व दोन्ही कन्येस आपल्या आप्तांच्या घरी कोल्हापूरात ठेवून ते तात्पुरते निरुपाधीक झाले.चतुर्थाश्रमाची तयारी म्हणून कोल्हापूर जवळील दोन चार मैलांवर असलेल्या कात्यायनीच्या निर्जन रम्य डोंगरात देवी मंदिराजवळ एक झोपडी बांधून ते तेथे भजन करत राहिले.इथेच ते भजनानंदात मग्न होऊन एकांतात राहू लागले.

                            याच काळात एक अतिशय दिव्य व अलौकिक घटना घडली.(प्रसंग अतिशय मोठा आहे त्यामुळे तो इथे मांडत नाही.पण श्री नारायण स्वामींची अत्यंत निष्काम निर्हेतूक भक्ती व आदिशक्ती करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईंची अकारण कृपा करुणेचा अफाट आविष्कार या घटनेतून होतो.अतिशय भक्तिरसपूर्ण असा हा दिव्य प्रसंग आहे.आपण पुढे तो वेगळ्या लेखातून बघूयात) त्यावेळी आई जगदंबा नारायणी अंबाबाई स्वामींपुढे प्रगटली स्वतः त्यांना आशिर्वाद दिला.तो आशिर्वाद म्हणजे , "शास्त्रीबुवा,लवकरच श्रीमन्नृसिंह दत्तगुरु तुमच्यावर अनुग्रह करुन तुम्हाला कृतार्थ करतील त्याविषयी मनांत चिंता बाळगू नये.महाराजांनी अनुग्रह केल्यानंतर चतुर्थाश्रम स्विकारुन काही दिवस येथे राहून तुमचे अत्यंत मधूर भजन मला ऐकवावे." असा आशिर्वाद देऊन आईसाहेब अंतर्धान पावल्या व शास्त्रीबुवा आपल्या नित्यक्रमात मग्न झाले.पुढे काही काळाने दत्तप्रभुंनी श्रीनारायण स्वामी महाराजांना अंत:प्रेरणा दिलं व श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बोलविले.स्वामी महाराज वाडीला व्रतस्थ पद्धतीने साधकांचे कठोर जिवन जगु लागले.एका रात्री आपल्या दोन्ही कन्यांनाही इथेच वाडीत राहावयास बोलावून घ्यावे असा स्पष्ट देवांचा आदेश श्री नारायण स्वामी महाराज यांना झाला. लागलीच श्री स्वामी महाराज दोन्ही मुलींना घेऊन वाडीत आले.हल्ली जिथे नारायण स्वामींचे मंदीर आहे त्याच जागी श्रीस्वामी महाराज एक छप्परवजा घर बांधून मुलींसह श्रीसेवा करत राहू लागले.याकाळात श्रीस्वामी महाराजांची दिनचर्या अतिशय कडक व शिस्तबद्ध होती.याप्रमाणे कालक्रमण सुरु असतांना दोन्ही मुलींना वारंवार शौच होण्याचा विकार झाला.पण यातुनच श्री भगवंतांनी आपल्या वात्सल्याचे प्रगटीकरण केले आहे.तो प्रसंग असा की, एकदा त्यांनी रात्री मुलींना जेऊ घालून झोपवले व स्वत: समाधी लावून बसले. नेमके त्या मुलींना शौचास लागल्याने जाग आली. त्यांनी बाबांना हाक मारली, पण ते तर समाधीत होते. त्यांना ऐकू जाण्याचा प्रश्नच नव्हता. पण भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज चटकन श्री. नारायणशास्त्रींचे रूप घेऊन आले व त्या दोघींना परसाकडेला घेऊन गेले. त्यांची स्वहस्ते शुद्धी केली व पुन्हा आणून झोपवले. सकाळी हा प्रसंग श्री.नारायणशास्त्रींना कळला. प्रत्यक्ष देवांना आपल्यासाठी असे हीन कृत्य करावे लागले, याचे त्यांना अतीव वाईट वाटले. त्यांनी लवकरच आपल्या मुलींना योग्य वर शोधून त्यांची लग्ने लावून दिली व सद्गुरुसेवेसाठी मोकळे झाले.पुढे लवकरच विश्वंभरशास्त्री नावाच्या आपल्या मुलाचा विवाह करुन शास्त्रीबुवा सांसारिक सर्व उपाधीतून कायमचे मुक्त होऊन संन्यासाश्रम स्विकारण्यास परमयोग्य झाले.

                             आता शास्त्रीबुवांना श्रीगुरु महाराजांच्या कृपाअनुग्रहासाठी आत्यांतिक तळमळ सुरु झाली.एक दिवस शेजारती नंतर श्रीनारायण शास्त्री गुरुपादुकांजवळ आले त्यांनी अत्यंत दिनभावाने साष्टांग प्रणिपात केला व अत्यंत नम्रभावाने आपणास संन्यासाश्रम देण्याची कृपा श्रींनी करावी अशी कळकळीची प्रार्थना केली व ते आपल्या झोपडीत परतले.त्याच रात्री शास्त्रीबुवांच्या स्वप्नात श्रीगुरु महाराज आले व त्यांना आश्वासन देऊन "काही चिंता करु नको योग्य मुहूर्त पाहून मी तुला संन्यास दिक्षा देईन" असे म्हणून तात्काळ गुप्त झाले.त्यानंतर लगेच शास्त्रीबुवांना जाग आली व आता आपल्याला प्रत्यक्ष देशांकडून संन्यास दिक्षा मिळणार या विचाराने धन्य झाले.काहीदिवसांनी त्यांना पुन्हा श्रीगुरु महाराजांचा दृष्टांत झाला व संन्यासदिक्षेचा मुहूर्त जवळ आला आहे तेव्हा प्रपंचाची निरवानिरव करावी पण कुणालाही कळू न देता ही व्यवस्था करावी असा स्पष्ट आदेश झाला.शास्त्रीबुवांनी देवांची आज्ञा तंतोतंत पाळली .पुढे एक दिवस शास्त्रीबुवा पहाटेच्या वेळी कृष्णा-पंचगंगा संगमावर स्नानाकरीता गेले व बुडी मारणार इतक्यात त्यांचा पाय घसरला.आपल्याला कुणीतरी आत ओढतोय अशी त्यांना जाणिव झाली.काही वेळाने आत मोठा झगमगीत प्रकाश दिसला.त्यात सुंदर मंदिर होते,वेदपाठी पुष्कळ ब्राह्मण बसलेले होते,त्यांच्याजवळच रत्नजडीत सिंहासनावर दण्डकमण्डलु व रम्यकाषायांबरधारी परमतेजस्वी सद्गुरु श्रीगुरु महाराज वेदश्रवण करतांना दिसले.काही वेळानी श्रींनी शास्त्रीबुवाना स्वतः प्रैषोच्चारपूर्वक महावाक्योपदेश व दंड,कमंडलू ,काषायवस्त्रादि सर्व देऊन नारायण सरस्वती असे नाव प्रसिद्ध केले.काही काळ आपल्या जवळ ठेवून यति धर्माचा उपदेश केला व नंतर ज्या जागेवर ते बुडाले त्याच ठिकाणी आणून सोडले.नारायण स्वामी महाराज संन्यासी स्वरुपात दण्डकमण्डलु काषय वस्त्रात गुरुपादुकांच्या मंडपात आले व त्यांनी श्रीपादुकांना परमप्रेमाने दंडवंदन केले.त्यांना संन्यास वेषात पाहून सर्वजन थक्क झाले‌.मठाधिपतीच्या सांगण्यावरुन त्यांना आपण संन्यास कुठे घेतला,केव्हा घेतला आपले गुरु कोण हे सर्व विचारु लागले पण देवांची आज्ञा नसल्या कारणाने त्यांनी कुणालाही काही सांगितले नाही.त्यामुळे मठाधिपतीच्या सांगण्यावरुन सर्वांनी श्रीनारायण स्वामी महाराजांवर बहिष्कार घातला.पण त्यामुळे एक अतिशय वाईट गोष्ट घडली ती अशी की नारायण स्वामी महाराजांना श्रीगुरु पादुकांना पाणी घालण्यावर आणि दत्तदर्शनावर बंदी घालण्यात आली.यामुळे श्रीस्वामींना अतिशय कष्ट होऊ लागले.त्यांनी आपल्या कुटीचे दार बंद करुन एकांतात अखंड भजन सुरु केले.गम्मत अशी की भक्तवत्सल भगवान श्री नृसिंह सरस्वती दत्त प्रभु सिंहाचे रुप घेऊन त्यांच्या पुढे बसून भजन ऐकून लागले.एकान्तात बसुन हे काय करतात हे बघायला मठाधिपती आले आणि पाहतात तर काय याच्या पुढ्यात सिंह बसुन भजन ऐकतो आहे.ही अघटीत लिला बघून मठाधिपती श्री नारायण स्वामी महाराजांना शरणं आले व शिष्य झाले.त्यानंतर प्रत्येक पुजारी वर्गाच्या स्वप्नात प्रत्यक्ष गुरु महाराज गेले व मी त्यांना स्वतः संन्यास आश्रमाची दिक्षा दिली आहे त्यांना बिलकुल त्रास देऊ नये व झालेल्या अपराधी ची क्षमा मागुन त्यांच्याकरीता मठभिक्षेचा समारंभ करा अशी आज्ञा केली.त्यानंतर सर्व लोक श्रीस्वामी महाराजांना शरणं आले ,सर्वांना मोठा मठभिक्षेचा समारंभ केला.त्यानंतर स्वामी महाराज आज जेथे नारायण स्वामींचा मठ आहे तिथेच राहू लागले.

                    श्रीगुरुंनी नारायण स्वामी महाराजांना तिर्थयात्रेस जाण्याची आज्ञा केली.श्रीगुरुंची आज्ञा शिरसावंद्य मानून श्रीस्वामी महाराज यात्रेस निघाले.या यात्रेत कर्नाटक मुक्कामात देवलपुरांत प्रत्यक्ष शिवावतार महास्वामी श्री चिदंबर दिक्षीत स्वामी महाराज यांचा मुक्काम आहे असे समजताच त्यांच्या भेटीस्तव श्रीस्वामी महाराज देवलपुरास गेले.( या भेटीत श्रीस्वामी महाराज व शिवचिदंबर महप्रभुंनी अतिशय दिव्य लिला केल्या.हा प्रसंग शिव चिदंबर महाप्रभुंच्या चरित्रात अतिशय विस्तृत आला आहे.पुढे आपण त्यावर स्वतंत्र लेखाद्वारे चिंतन करण्याचा प्रयत्न करुयात.शब्द मर्यादेस्तव हा प्रसंग थोडक्यात मांडतो.)चिदंबरमहाप्रभुंच्या प्रेमामुळे नारायण स्वामी तीन महिने त्यांच्या सानिध्यात देवलपुरात राहिले. वाडीला परतल्यावर त्यांचा नित्यक्रम सुरु झाला.पण करवीरनिवासीनी आई भगवती अंबाबाईला संन्यास दिक्षेनंतर भजन ऐकविण्याच्या वचनाची त्यांना आठवण झाली.त्या वचन पालनासाठी कोल्हापूरी जाण्याचा ते विचार करु लागले.त्यांनी देवांची आज्ञा मागितली.देवांनी ही परत लवकर या ,असे सांगुन त्यांना प्रेमाने आज्ञा दिली.तात्काल स्वामी महाराज कोल्हापूरास आले.श्रीजगदंबेला दंडवंदन करुन देवालयाच्या आवारातच असलेल्या मठांत मुक्काम केला.श्रीजगदंबेला व दत्तप्रभुंना भजन श्रवणार्थ बसण्यासाठी मठात दोन कट्टे तयार करविले.रोज शेजारती झाल्यावर ते एकान्तात श्री जगदंबा व दत्तप्रभुंचे आव्हान करायचे व ते आसनारुढ झाल्यावर आपल्या प्रेमळ अशा भजनास आरंभ करायचे.काय ती स्वामींची योग्यता ,काय तो अवर्णनीय अधिकार की प्रत्यक्ष आदिशक्ती भगवती जगतजननी करवीर निवासिनी अंबाबाई आणि भगवान श्रीदत्तात्रेय प्रभु त्यांचे भजन स्वत: समोर बसून ऐकत असत. याच कोल्हापूर मुक्कामात श्री नारायण स्वामी महाराज "कौलव" या गावी आले होते.या कौलव‌ गावी योगीराज श्री गुळवणी महाराज यांचे पंजोबा श्रीनागेश भटजी गुळवणी यांच्या घरी स्वामी महाराज आले.त्यांच्या कृपेने नागेश भटजींच्या घरात मुलगा झाला.नागेश भटजींनी स्वामी कृपा म्हणून त्या मुलाचे नाव नारायण हेच ठेवले.पुढे याच नारायणास चार मुले‌ व तीन मुली झाल्या.यातील जेष्ठ अपत्य दतंभट्ट हे योगीराज श्री गुळवणी महाराज यांचे पिताश्री.याच वेळी श्री स्वामी महाराज दुर्गमान गडावर आई जगदंबेची आज्ञा म्हणून गेले.त्यांच्याबरोबर नागेशशास्त्री व इतर शिष्य मंडळीही होते.त्यावेळी जंगलातील एका वाघाच्या पायाला झालेली जखम श्रीस्वामी महाराजांनी स्वतः सुई व वनौषधीच्या साह्याने बरी केली.( अतिशय चमत्कारीक व दिव्य असा हा वाघाचा प्रसंग आहे पण येथे तो लिहीण्याचे टाळले आहे.त्यावर एक स्वतंत्र लेख तयार होईल.) कोल्हापूरास परतल्यावर महाराजांचा भजनाचा नित्यक्रम पुन्हा सुरु झाला.करवीर संस्थानाचे छत्रपती श्रीबाबासाहेब महाराज हे श्री नारायण स्वामींचे अनन्य भक्त बनले.श्री स्वामी महाराजांचीही पूर्ण कृपा त्यांच्यावर होती.एकदा भजन संपल्यावर आई जगदंबेनी व दत्तप्रभुंनी त्यांना आज्ञा केली की पन्हाळागडावरील एका दिव्य गुहेत शक्तिपुत्र व वसिष्ठ महर्षींचे नातू पराशर मुनी एकान्तवास करुन राहिले आहेत.त्यांचे आपण दर्शन करुन परत या.अशी आज्ञा होतास दुसर्या दिवशी शिष्यांना घेऊन स्वामी महाराज पन्हाळा गडाकडे जाण्यास निघाले पण हे महर्षी पराशर महामुनींना अंतर्ज्ञानाने कळाले.नारायण स्वामींना यायचा त्रास होऊ नये म्हणुन त्यांनी योगबलाने पांढर्या शुभ्र सुंदर बैलाचे रुप घेतले व अर्ध्या रस्त्यातच स्वामी महाराजांना भेटण्यास आले.श्रीस्वामी महाराजांनी तात्काळ त्यांना ओळखले.त्यांची तिथेच भेट झाली व स्वामी महाराज कोल्हापूरी परतले.यानंतर राजापुरची गुप्त झालेली गंगा स्वामी महाराज आले म्हणून परत प्रगटली.तसेच अनेकाविध चमत्कार झाले‌ हे सर्व एका संक्षिप्त लेखात लिहीने अशक्यप्राय आहे त्यामुळे ते संपूर्ण गाळले आहेत.एका अतिशय सुंदर आणि भक्तिरसाने परिपूर्ण प्रसंग स्वामी चरित्रात आहे तो मुद्दाम येथे देतो आहे‌. एकदा एक गलित्कुष्ठ झालेला ब्राह्मण श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे व्याधी मुक्ती साठी देवांच्या सेवेकरीता येऊन राहिला होता.पुष्कळ दिवस श्रीचरणांची सेवा केल्यामुळे एक रात्री श्रीगुरु महाराजा त्याच्या स्वप्नात आले व‌ त्याला म्हणाले , "अरे विप्रा ,श्री नारायण स्वामी महाराज रोज कृष्णा पंचगंगा संगमावर स्नानास जातात.ते तेथे स्नान करुन लागले की त्यांच्या पाठीमागच्या बाजूस तु स्नान कर.त्या तिर्थामुळे तुझी संपूर्ण रोग दूर होईल‌ व तु व्याधीमुक्त होशील." स्वप्न दृष्टांतानुसार ब्राह्माणाने तसेच करण्यासाठी सकाळीच श्रीस्वामी महाराजांच्या मागे जाण्याचा मानस केला.श्रीस्वामी महाराज नदीत उतरणार तो हा मनुष्य संगमावर नदीत त्यांना उभा दिसला त्यांनी त्याची विचारपूस केली तेव्हा त्यांना त्या ब्राह्मणाला झालेला देवांचा दृष्टांत कळला.श्रीनारायण स्वामी महाराजांनी त्याला एका विशिष्ट जागेवर स्नान करुन नेसलेले वस्त्र नदीत फेकून देण्यास सांगितले व नुतन वस्त्र परिधान करण्याची आज्ञा केली.तसे करता क्षणी त्याची व्याधी नाहीशी झाली.हा चमक्तार झाल्याबरोबर श्री स्वामी महाराजांनी त्याला आज्ञा केली की सुर्योदय होण्याचे पूर्वी तू वाडीतून एक अक्षरही कोणाशी न बोलति बाहेर निघून जा नाहीतर पुनः तुझे शरीर पूर्ववत होईल.स्वामींची आज्ञा ऐकल्यावर तो‌ तात्काळ वाडीबाहेर गेला.पण तो गेला असे पाहून स्वामी महाराज स्नान न करताच दण्डास परशुमुद्रा बांधून 'येथून आता बाहेर जावे' असे मनात आणून श्रीगुरु महाराजांना निरोप देण्याकरिता मंडपात आले व वंदन करु लागले.मंदिरद्वार बंदच होते.परंतु स्वामींचे वंदन जाणून सर्वज्ञ प्रभू म्हणाले , "अहो स्वामी? दण्डास परशुमुद्रा बांधून ,हे वंदन कशाला? कोठे परगावी प्रमाणाची तयारी दिसते?" त्यावर स्वामी महाराज म्हणाले "मी येथे राहू नये अशी श्रीचरणांची इच्छा दिसते‌.म्हणून आता कुठेतरी देशोधडीला लागावे असे वाटत आहे.आता हे शेवटचे वंदन करण्या साठी आलो आहे."  श्रीगुरु म्हणाले, "तुम्हास झाले तरी काय? इतका उद्वेग कशामुळे झाला?"  स्वामी महाराज म्हणाले, "मला काही सांगायचे ही नाही व वादही घालायचा नाही.काशीत गंगोदक घेऊन तशी प्रतिज्ञाच केली आहे." असे बोलून जाण्याच्या निश्चयाने नारायण स्वामींनी देवांना वंदन करण्यास आरंभ केला. हे रागावले असे जाणून दयाघन भक्तवत्सल प्रभु श्रीनृसिंह सरस्वती महाराज दार उघडून प्रत्यक्ष बाहेर आले व आपल्या हाताने स्वामींचा दंड आपल्याजवळ घेऊन आई रागावलेल्या मुलाची समजूत घालते त्याप्रमाणे ब्रह्मांडनायक दत्तप्रभु श्रीगुरु माउलींनी नारायण स्वामींना आलिंगन देऊन त्यांची समजूत केली व म्हणाले ,"आम्ही उगीच हे तुमच्याशी कौतुक केले.त्याबद्दल इतके रागवण्याचे काही कारण नाही.तुमच्यासारखे प्रेमळ भक्त येथून गेल्यावर आम्हास चैन कसे पडेल? तुमची इच्छा नसेल तर आता इत:पर काही तुम्हास अशी पीडा होणार नाही.आता वेळ झाली.तरी तुम्ही स्नानास जा." अशी आज्ञा करुन महाराज अन्तर्धान झाले.धन्य ते परमशिष्य श्री नारायण स्वामी महाराज व धन्य ते भक्तवत्सल भक्तभिमानी भक्तकामकल्पदृम श्रीगुरु श्रीपाद नरहरी दत्त प्रभु.

           अशा या श्रेष्टोत्तम ,शिष्योत्तम,भक्तोत्तम श्रीमद् नारायण स्वामी महाराज अनेकाविध लिला केल्य व आता अवतार कार्य पूर्ण करुन ब्रह्मलोकांत गमन करावे असा मानस केला.चैत्र अमावस्या  शके १७२७  म्हणजेच इसवी सन १८०५ , श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री नारायण स्वामींना नेण्यासाठी किंकिणीचा आवाज करीत पुष्पक विमान आले.  तो आवाज कृष्णा प्रवाहात स्नान करीत असणाऱ्या गोपाळ स्वामींनी ऐकला आणि ते तसेच स्नान सोडून धावतच नारायणस्वामींच्या मठात आले; आणि त्यांनी श्रीचरणी मस्तक ठेवून वंदन केले.  

त्यावर नारायणस्वामी त्यांना म्हणाले की, "आमचे लौकिक कार्य झाले, आता आम्ही येतो" असे म्हणून नारायणस्वामी त्यांना घ्यायला आलेल्या विमानात बसून डोळ्यादेखत निघून गेल्याचे गोपाळस्वामिनी प्रत्यक्ष पाहिले आहे.दिव्यदर्शने दिव्यदृष्टीशिवाय घडु शकत नसतात म्हणून हे 'दिव्य' दर्शन  गोपाळस्वामी शिवाय अन्य कोणालाही घडले नाही.

आजच्या या परमपावन तिथीला श्री स्वामी महाराजांच्या चरित्राचे स्मरण करुन श्रीचरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो व श्रीदत्तचरणांची सेवा अखंड घडावी हेच एक मागणं स्वामी महाराजांच्या चरणी मागतो‌.

      ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

Thursday, April 28, 2022

सद्गुरु श्रीचिले महाराज आणि श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचे विलक्षण प्रेम आदराचे नाते🌺🌸🙏

 

पैजारवाडीचे दत्तप्रभु भक्तवत्सल भक्तभिमानी सद्गुरु माउली श्री चिले देवांची ३६ वी पुण्यतिथी :-


सद्गुरु_श्रीचिले_महाराज_आणि_सद्गुरु_श्रीकृष्ण_सरस्वती_दत्त_महाराज :-

                    श्रीपैजारवाडीचे दत्त श्रीचिले महाराज यांना श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजां बद्दल अनन्य प्रेम व आदारभाव होता. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज तथा कुंभार स्वामी महाराज यांना चिले देव "आबासाहेब" याच नावाने सदैव संबोधत असत हे विशेष.त्याला कारण ही तसेच कारण श्रीकृष्ण सरस्वती दत्त प्रभु हे प्रत्यक्ष भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचे शिष्य आणि चिले महाराज स्वामी माउलींबद्दल वडिलांसमान आदर आणि पुज्यभाव ठेवीत.त्यामुळे आपल्या गुरुपरंपरेतील प्रभावळीतील जेष्ठ म्हणून चिले महाराज कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा अतिशय आदर करीत असत.आपल्याकडे दर्शनाला हार फुले घेऊन आलेल्या असंख्य भक्तांना ते कुंभार गल्लीतील "आबासाहेबांच्या" समाधी मंदिरात तो हार ,पुजा साहित्य अर्पण करण्यास सांगत असत.करवीरात ते आबासाहेबांच्या वैराग्य मठी म्हणजे समाधी मठीच्या पायर्यावर कित्येकदा बसुन राहत. 

                  आबासाहेबांबद्दलचा आत्यंतिक आदर आणि प्रेमभाव प्रकट होणारा एक विलक्षण प्रसंग चिले देवांच्या चरित्रात घडला आहे तो असा की, एकदा कुणा एका नतद्रष्ट माणसाने आबासाहेबांच्या समाधी मठीच्या पायरीवर रात्रीच्या अंधारात येऊन घाण टाकली व ही बातमी चिले महाराजांना अंतर्ज्ञानानेच कळली..ते तडक कुंभारगल्लीत आले ,आपल्या सोबतच्या भक्ताला लक्स साबन आणायला लावले व आपल्या हाताने ती घाण साफ करुन सर्व पायर्या व संपूर्ण कुंभार गल्ली धुऊन काढली. असे विलक्षण प्रेम आणि आदर भाव चिले देवांचा श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांबद्दल होता.

"हम गया नहीं जिंदा है" श्रीस्वामी समर्थ माउलींचे समाधी लिला नाट्य🙏🌺🌸

 

🙏🌺🌸 "हम गया नहीं जिंदा है" 🌸🌺🙏

                                   अक्कलकोटस्थ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ माउलींनी प्रज्ञापुरीत आजच्याच तिथीला म्हणजे चैत्र वद्य त्रयोदशीला आपल्या समाधी लिलेचे नाट्य करुन आपला सगुण देह भक्तांच्या नजरेआड केला व समाधीतुन आपल्या पुढील कार्यास प्रयाण केले‌. वरील सर्वत्र परिचित असलेले " हम गया नहीं जिंदा है" हे अभय वचन आज १४४ वर्षांनीही आपण सर्व लोक अनुभवतोय.श्रीस्वामीरायांची प्रत्यक्ष प्रचिती आजही तेवढ्याच ज्वलंत पद्धतीने येते ,आपल्या शरणागत भक्तांच्या हाकेला ,त्यांचा योगक्षेम चालवायला आजही स्वामीराया तत्पर आहेत आणि याची प्रचिती असंख्य स्वामी भक्तांनी घेतली आहे.आजच्या दिवशी आपण समाधी नंतर घडलेल्या काही मुख्य लिला बघणार आहोत ज्यातुन स्वामीरायांनी आपल्या समाधीचे लिला नाट्यच केले याची कल्पना आपल्या सर्वांना येईल.

१) बिडकर महाराजांना प्रत्यक्ष प्रगटून अभय वचन देणे

२) बाळप्पांना पुढील कार्यास जातोय याची कल्पना देणे 

३) समाधी नंतर ५ दिवसांनी प्रगटने

  

#स्वामी_समाधी_नंतर_स्वामींच्या_अतर्क्य_लिला:-

         

१) "हम गया नहीं जिंदा है" हे स्वामींचे अभय वचन आपल्या सर्वांना सुपरिचित आहेच.पण या स्वामींच्या अभय वचनाची हकिकतही अतिशय विलक्षण आणि आपल्या सर्वांसाठी खुप आश्वासक आहे.हे वचन एका प्रसंगापुरते मर्यादित नाही तर आजही या वचनाचा अनुभव आपण सर्व लोक घेत आहोत. 

भगवान श्री अक्कलकोट स्वामी माउलींचे शिष्योत्तम श्री रामानंद बिडकर महाराज यांच्या संबंधातील अतिशय महत्वाचा प्रसंग समाधी नंतर घडला. श्री बिडकर महाराज यांचे कै.लक्ष्मण बापट यांनी लिहीलेले चरित्र अतिशय दिव्य,प्रत्येकाला मार्गदर्शक आणि अतिशय प्रासादीक असे आहे.आपण सर्वांनी ते जरुर वाचा.(शब्द मर्यादेमुळे इथे महाराजांचे वेगळे असे चरित्र मांडत नाही) तो प्रसंग असा की, श्री बिडकर महाराज ज्यावेळी स्वामी सेवेला अक्कलकोटी जातात तेव्हा स्वामींनी त्यांना "यापुढे पुन्हा इकडे येऊ नये,नर्मदा प्रदक्षिणा करावी" असा आदेश दिला.स्वामीरायांचा स्पष्ट आदेश मिळाल्यामुळे बिडकर महाराज पुन्हा अक्कलकोटला गेले नाही व तिथून ते तडक नर्मदा परिक्रमेला गेले.नर्मदा परिक्रमा सुरु असतांना त्यांना असंख्य दिव्य अनुभव आले, अनेक दर्शने झाली.वाटेतच त्यांना नर्मदा मातेने दर्शन देऊन कृतार्थ केले.अशाप्रकारे पदोपदी गुरुकृपेचा अनुभव घेत महाराजांचे मार्गक्रमण सुरु होते.पुढे प्रवासात महाराज महेश्वर या गावी आले.त्याच ठिकाणी त्यांना 'ज्ञानप्रकाश' या मासिकात श्रीस्वामी समर्थ समाधीस्थ झाल्याची अतिशय दु:खद वार्ता  समजली.बिडकर महाराजांवर जणू आकाशच कोसळले.ते लहान मुलांसारखे ओक्साबोक्सी रडू लागले.ही बातमी कळल्यापासून महाराज अतिशय अस्वस्थ आणि विमनस्क स्थितीत होते. त्याच रात्री भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराज श्री बिडकर महाराजांपुढे प्रगटले त्यांना दर्शन देऊन "हम गया नहीं जिंदा है" असे सांगून  धीर दिला‌ व जेथे प्रदक्षिणा सुरु केली तेथेच प्रदक्षिणा पुरी करावी अशी आज्ञा करुन ते पुन्हा गुप्त झाले.त्यामुळे बिडकर महाराजांच्या व्यथित मनाला खूप आधार मिळाला. म्हणजे मुळातच स्वामींची समाधी ही एक लिला होती. कारण त्यांनी त्यानंतरही सदेही अनेक ठिकाणी प्रगटून आपण नित्य आहोत याची ग्वाही आपल्या सर्वांनाच जणू दिली आहे.


२) बाळाप्पा महाराजांना समाधी घेतल्यावर पुन्हा जागृत होऊन मार्गदर्शन:-

        भगवान श्री अक्कलकोट स्वामी माउलींचे उत्तराधीकारी श्रीबाळप्पा महाराज यांच्या चरित्रातील स्वामी समाधी लिलेसंदर्भातील एक विलक्षण हकिकत आहे.श्री स्वामीरायांनी समाधी घेण्याआधी बाळप्पांना आपल्या उजव्या हातातल्या करांगुलीतील "श्रीस्वामी समर्थ" नाम कोरलेली अंगठी स्वतः बाळप्पांच्या हातात घातली व म्हटले , 'माझे शिक्कामोर्तब तुला देत आहे.माझा शिक्का यावच्चंद्रदिवाकरौ तू पुढे चालव.' असा आशिर्वाद दिला व बाळप्पांना आपल्या बाजुला आपल्या आसनावर बसविले.आपल्या कंठातील रुद्राक्ष त्यांच्या गळ्यात घातला.अंगावर छाटी घातली.हातात भगवे निशाण दिले.प्रसाद म्हणून चरण पादुका दिल्या व मस्तकावर वरदहस्त ठेवून , 'औदुंबर छायेत बस.स्वतंत्र मठ स्थापना करुन पादुकांची प्रतिष्ठापना कर.' असा आदेश दिला.

                   पुढे श्रीस्वामी महाराजांनी चैत्र वद्य त्रयोदशीला समाधी लिला केली.त्यावेळी बाळप्पा तिथेच होते. चोळप्पांच्या घराजवळील ध्यान‌ गुंफेत स्वामींना समाधीत बसवण्यात आले.त्यावेळी स्वामींना अत्तर लावावे अशी बाळप्पांची तिव्र इच्छा झाली.काही काळाने बाळप्पा अत्तर कुपी घेऊन समाधी गुंफेत गेले ,स्वामींना मनसोक्त अत्तर लावले व बाहेर येणार तेव्हढ्यात श्रीस्वामीरायांनी आपले नेत्रकमल उघडले व म्हणाले ,"काय ,झाले ना समाधान? आता गुंफा बंद करावी आम्हाला आता येथून उत्तर हिंदुस्थानात पुढील कार्यासाठी गमन करावयाचे आहे." स्वामींच्या समाधी गुंफेचे द्वार बंद करण्यात आले.स्वामीरायांची सगुण देहाच्या लिला मात्र अक्कलकोटच्या धरणीवर आता बंद झाल्या होत्या.यामुळे बाळाप्पा अतिशय खिन्न झाले होते.बाळप्पांनी अन्न पाण्याचा त्याग केला व विरहाकुल अवस्थेत ते समाधीसमोर दिवसरात्र बसून राहिले.अचानक त्यांच्या समोर श्रीस्वामी समर्थ माउली प्रगट झाले व म्हणाले , "तुला मी ज्या पादुका दिल्या आहेत,तेथे चैतन्यरुपाने मी प्रत्यक्ष वास करीत आहे.या पुढे तेथेच मी तुझी सेवा घेईन.पूर्वीप्रमाणे माझी सेवाशुश्रुषा करीत जा." श्रीस्वामी समर्थ महाराज सदेह प्रकटल्यानंतर बाळप्पांच्या मनातील उरलासुरला संदेह मिटला व ते स्वामीरायांनी दिलेल्या कार्यासाठी तत्पर झाले.


३) समाधी नंतर सदेही भक्ताघरी प्राकट्य:-

              श्रीस्वामी माउलींनी समाधी घेण्याआधी घडलेली विलक्षण आणि एकमेवाद्वितीय अशी अतर्क्य हकिकत. अक्कलकोट जवळील निलेगाव येथील जहागिरदार सांडणीस्वार यांना स्वामीरायांनी आम्ही शनिवारी तुमच्या घरी येऊ असे वचन दिले होते. पण स्वामी महाराज हे मंगळवारीच आपली समाधी लिला करते झाले.त्यामुळे सेवेकर्यांना असे वाटले की आता हे काही शक्य नाही.परंतु पाच दिवसांनी स्वामीराज एकटेच नाही तर आपल्या संपूर्ण भक्त परिवारासह निलेगावात अवतरले.ही आजवर घडलेली एकमेवाद्वितीय अशी लिला आहे कारण स्वामी एकटेच नाही तर सेवेकरी,गाई,गुरे एवढेच काय तर अक्कलकोटातील निर्जीव भासणारा मेणा,मंचक आदी साहित्यासह  स्वामी तिथे प्रगट झाले होते.निलेगावातील गढीबाहेर स्वामीराय आल्याचे वृत्त कळताच स्वतः भाऊसाहेब जहागिरदार धावत श्रींच्या दर्शनासाठी पुढे गेले.त्यांनी सहकुटुंब दर्शन घेतले.निलेगावातील ग्रामस्थांनीही स्वामींचे दर्शन घेतले.नंतर त्या सर्वांना श्रीस्वामीरायांनी आज्ञापिले, 'सर्वांनी भोजनार्थ आपल्या घरी जावे.' भाऊसाहेबांना स्वामीराज म्हणाले की , 'उद्या तुमच्या घरी येऊ.' तरीही भाऊसाहेब रात्री भोजन झाल्यावर काही गावकर्यांना सोबत घेऊन स्वामीरायांना ,सेवेकर्यांना काही हवे नको ते पाहावे म्हणून गढीबाहेर आले.पण तिथे पोचल्यावर पाहतात तर काय ! स्वामी माउली तेथून निघून गेले होते.त्यांनी काही लोकं स्वामी शोधार्थ पाठवले पण हाती काहीच लागले नाही.दुरदूर पर्यंत कुठेही स्वामींरायांचा वा सेवेकर्यांचा थांगपत्ता नव्हता.दुसर्या दिवशी भाऊसाहेब जहागिरदार श्रींची वाट पाहून भोजनार्थ बसले असता अचानक महाराज भोजनाच्या खोलीत प्रगटले.काहीही संभाषण न करता गुप्तही झाले.हे सर्व अघटीत पाहून भाऊसाहेब गडबडून गेले.तो थोड्या वेळानंतर एक घोडेस्वार स्वामींच्या समाधीचे वृत्त घेऊन गढीत शिरला आणि स्वामीराज समाधीस्थ झाल्याची बातमी जहागिरदारांना दिली.जहागिरदारांना या स्वामीकृपेच्या अद्भुत आणि विलक्षण लिलेमुळे गहिवर आला.स्वामींनी आपल्या भक्ताला दिलेले वचन पूर्ण करण्यास्तव इतका त्रास घेतला या विचारांनी त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.दुसर्या दिवशी जहागिरदार अक्कलकोटला जातात व हे वृत्त सेवेकर्यांना सांगतात तर सेवेकरी ही स्तब्ध होतात आणि अक्कलकोट येथील स्वामी समाधी बघून जहागिरदार तर अवाक् होतात.कारण जनमानसासाठी समाधी झाल्याचा एकीकडे प्रसंग ,तर दुसरीकडे दर्शनाच्या ग्वाहीनुसार निलेगावात प्रकट होणे! मग समाधी कसली?? ही तर "हम गया नहीं जिंदा है" हा अभयवचनाची प्रत्यक्ष प्रचितीच.


मुळातच श्रीस्वामी भगवंत अक्कलकोटला अवतरले त्यावेळी त्यांची काया ही पुराण वटवृक्षाप्रमाणे होती. स्वामी माउलींच्या अवतार संबंधी स्वामीसुत महाराज आणि श्री आनंदनाथ महाराज वेंगुर्ले यांनी ठळकपणे माहिती दिली आहेच आणि त्याला श्रीस्वामीरायांनीही दुजोरा ही दिला आहे.त्यामुळे स्वामींचे प्राकट्य हे इ.स. ११४९ रोजी पंजाब मधील छेली खेडे ग्रामी झाले होते.अक्कलकोटला स्वामी प्रगटले त्यावेळी त्यांचे वय हे ७०० वर्षांहून अधिक होते. याविषयीचा स्वामी प्रगटदिनाच्या वेळी मी एक स्वतंत्र लेख‌ लिहीला आहे. त्या लेखाची लिंक खाली देतो आहे आपण जरुर वाचा.

https://akshayrjadhav.blogspot.com/2022/04/blog-post.html

त्यामुळे स्वामी माउली त्याच देहाने गेली अनेक शतकं लिला करते झाले होते व पुढील कार्यास जातो असे बाळाप्पा महाराजांना सांगितले म्हणजे ते समाधी तून गुप्त झाले‌ होते. या सर्व लिलेतुन एक गोष्ट लक्षात येते की समाधी लिला अथवा देहत्याग ही स्वामींचीच माया. आपल्या सर्वांना भुलविण्यासाठी त्यांनी हा खेळ रचला होता आणि त्यानंतर ते पुढील कार्यासाठी निघून गेले‌. समाधी घेतांनी स्वामीरायांनी गितेतील जो श्लोक निवडला तो त्यांच्या अभय वचनाला सार्थ करुन जातो."हम गया नहीं जिंदा है" पण केव्हा आणि कुणासाठी तर , "जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योग-क्षेम मी सांभाळतो" म्हणजे अनन्य भक्ती करणार्यांसाठी. स्वामीरायांनी निलेगावात केलेली लिला ही अतिशय विलक्षण आणि अघटित अशीच आहे.अशीच एक घटना परब्रह्म पूर्णब्रह्म भगवान श्री कृष्णचंद्र प्रभुंनी गोकुळात केली होती.श्रीभगवंतांनी गोप-गोपी, गाय-वासरु आपल्या योगमायेने पुन्हा निर्माण केले व वर्षभर त्यांना सोबत घेऊन लिला केल्या होत्या.हीच लिला श्री भगवंतांनी पुन्हा स्वामी अवतारात प्रज्ञापुरीत केली.

 "हम गया नहीं जिंदा है" आज या अभयदानाला १४४ वर्ष उलटून गेले तरी हे अभयदान आजही नित्य नुतन,अखंड आणि अक्षय्य आहे. श्रीस्वामी रायांच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करुन प्रार्थना करतो की त्यांनीच आपल्या सर्वांकडून त्यांच्या सुकोमल श्रीचरणांची सेवा करुन घ्यावी व श्रीचरणांना अनन्य शरण जाण्याची बुद्धी द्यावी.

🌸🌺"श्री स्वामी समर्थ" 🌺🌸

Sunday, April 10, 2022

समर्थ सद्गुरु माउली श्री भाऊसाहेब उमरीकर महाराज 🙏🌸🌺🚩

उमदीश्वर श्रीगुरु महाराज

चैत्र_शुद्ध_नवमी_रामनवमी_समर्थ_सद्गुरु_श्रीभाऊसाहेब_महाराज_उमदीकर_यांची_१७८वी_जयंती:-

                     भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज आपल्या एका प्रवचनात भारत भूमी चे महत्व प्रतिपादन करतांना म्हणतात की," ज्याप्रमाणे घरात एक देवघर,देवपाट असतो त्याप्रमाणे ही भूमी या सबंध जगाचे देवपाट आहे." या पुण्यभूमीत असंख्य संत,सिद्ध,महासिद्ध, महापुरुष,अवतार आजवर होऊन गेले.अनेक गुरुपरंपरेनी ही भुमी मंडीत झाली आहे.त्यातीलच एक श्रेष्ठ आणि दिव्य परंपरा म्हणजे निंबर्गी परंपरा आणि त्या निंबर्गी परंपरेचे आधारवट म्हणजे समर्थ सद्गुरु श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर.सर्वच संत सत्पुरुष हे नित्य वंदनीय,नित्य स्मरणिय असतातच पण प्रत्येकाच्या मनामध्ये काही संतांची विशेष छाप पडलेली असते.तशीच काही संतांच्या विलक्षण चरित्राची गहरी छाप माझ्या मनावर पडली आहे त्यातीलच एक संत म्हणजे भाऊसाहेब महाराज.अतिशय दिव्य चरित्र,अनन्य गुरुनिष्ठा ,अत्यंत नामनिष्ठा, अगदी सामान्य जिवन पण असामान्य व्यक्तिमत्व अशा अनेक गुणांनी मंडित असलेले भाऊसाहेब महाराजांचे चरित्र वाचल्यावर कुणीही स्तिमीत झाल्याशिवाय राहणार नाही.अतिशय लोकविलक्षण महापुरुष असलेल्या महाराजांची नामावरील निष्ठा,श्रद्धा ही एकमेवाद्वितीयच आहे.खरंतर चरित्रावर लिहीतांनी अंतिम संदेश हा शेवटी लिहायचा असतो पण मी मुद्दाम तो आधी लिहीतोय कारण त्या एका वाक्यातुन महाराजांनी आपल्याला परमार्थाचे सारंच सांगितले आहे.महाराज म्हणतात "आकाशातून वीज कडाडून अंगावर कोसळली,धरणी दुभंगली ,आकाश कोसळले, तरी तुम्ही नाम सोडू नका." आपल्या संपूर्ण जिवन कालात महाराजांनी हीच एकमात्र शिकवण ,हेच तत्व ,याचेच प्रात्यक्षिक केल्याचे आपल्याला दिसेल.महाराजांनी हे फक्त सांगितले नाही तर महाराजांनी याचे स्वतः आचरण करुन दाखविले.आपल्याला सर्वश्रुत असलेले,महाविद्वान व भारतातील सर्वमान्य महापुरुषांपैकी एक असलेले श्री गुरुदेव रानडे हे सद्गुरु भाऊसाहेब महाराजांचेच शिष्य.

                      प.पू.श्रीभाऊसाहेब महाराजांचा जन्म शके १७६५ इ.स १८४४ ला रामनवमी च्या परमपावन पुण्यदिनी उमदी या गावी झाला.त्यांचे नाव व्यंकटेश असे ठेवण्यात आले पण सर्व त्यांना भाऊराव याच नावाने हाक मारीत व पुढे तेच रुढही झाले.भाऊसाहेब महाराजांचे कुटुंब अतिशय सुखवस्तू होते.अतिशय सत्शिल व सुखी कुटुंबात महाराजांचा जन्म झाला होता.त्यामुळे देवपुजा,भक्ती याचे संस्कार महाराजांवर बालपणापासून झाले होते.महाराजांची लहानपणापासून श्रीमारोतीरायांवर अतिशय भक्ती होती.महाराज सगुण उपासनेला विशेष महत्त्व द्यायचे.सकाळी स्नान झाले की ते सोवळं नेसुन, पुजा साहित्य घेऊन आधी गावातील मारोती मंदिरात जायचे ,देवांची पुजा केल्यावरच ते बाकी काम करीत.अगदी लहानपणापासून त्यांचा हा नियम होता.उमदी गावातील मारोतीचे देऊळ हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.महाराजांचा रोज देवपुजा , प्रदक्षिणा असा अत्यंत आखिव कार्यक्रम ठरलेला असे.त्याच काळात त्या मंदिरात साधुबुवा महाराज तथा रघुनाथप्रिय महाराजांचे वास्तव्य होतं असे.श्रीसाधुबुवा या लहानग्या भाऊरायाला बघत असतं.त्यांनी या भावीक मुलाची योग्यता ओळखली व त्याचे मन सगुणातुन निर्गुणाकडे ओढून घेण्यासाठी कार्यरत झाले.ते १४ वर्षांच्या भाऊरायांचे खुप कौतुक करीत ,त्याला म्हणत काय तुझी श्रेष्ठ भक्ती!काय तु पुण्यवान ! असे म्हणून ते त्याच्या पायाही पडत. असे करता करता त्यांनी भाऊसाहेब महाराजांचे मन सगुणातुन निर्गुणाकडे वळविले व १८५७ साली ते भाऊरायाला घेऊन निंबर्गी महाराजांकडे गेले. महाराजांनी या लहानग्या भाऊरायाला बघताच त्याचा अधिकार जाणला व त्याला नाम देऊन , अनुग्रह देऊन कृतार्थ केले.निंबर्गी महाराजांनी आशिर्वाद देऊन भाऊरायाला सांगितले की ,"भाऊराया तुला दिलेले नाम हे माझे नव्हे, ते स्वर्गातून आले आहे.तुझे त्याकडे निरंतर ध्यान असु दे." त्यादिवशी पासून त्यांनी आपल्या सद्गुरुंची आज्ञा तंतोतत पाळली. निंबर्गीकर महाराजांची गुरुपरंपरा ही नाथ परंपरा.नवनाथांतील भगवान श्री रेवणनाथ यांच्या पासून ही परंपरा सुरु झाली.निंबर्गी संप्रदायाची परंपरा पुढील प्रमाणे आहे 

भगवान रेवणनाथ - श्रीकाडसिद्धरामेश्वर महाराज - निंबर्गी महाराज - श्री भाऊसाहेब उमदीकर महाराज - श्रीअंबुराव महाराज/श्रीगुरुदेव रानडे.

                  नाम मिळाल्यापासून अत्यंत निग्रहाने व निश्चयाने त्यांनी उमदीस नामस्मरण (नेम) करण्यास सुरुवात केली.सकाळी  दूर गावाबाहेर रानात नेमास जात,ते मध्यान्हीच स्नान करुन परत येत.आल्यावर पोथी,भजन आणि भोजन झाले की थोड्या वेळात आपले सर्व लौकिक कामे उरकून घेत व पुन्हा नेमाला बसत. याप्रमाणे पुढील १८ वर्ष शरीराची पर्वा न करता त्यांनी अखंड त्रिकाल नेम केला.जसेजसे नाम वाढु लागले तसा तसा अनुभव त्यांना येत गेला.त्यामुळे त्यांच्या अंगी प्रखर वैराग्य बाणत गेले.पुढे निंबर्गीकर महाराजांनी त्यांना अनुग्रह देण्याचा व संप्रदाय वाढविण्याची आज्ञा दिली.संप्रदायाची पूर्ण जबाबदारी भाऊसाहेब महाराजांवर देऊन पुढे १८८५ ला निंबर्गीकर महाराज समाधिस्थ झाले.सद्गुरुंच्या निर्याणानंतर महाराज अतिशय विव्हळ झाले.पण या विव्हळतेनी महाराज खचले नाहीत तर महाराजांनी आपले साधन दुपटीने वाढविले.श्रीसद्गुरुरायांनी सांगितलेले साधन अधिक दृढतेने ,अधिक प्रखरतेने करु लागले. आता महाराज रोज दिवसातील १२-१३ तास नेम करु लागले.हा काल थोडा थोडका नसुन तब्बल १८ वर्षाचा होता. १८ वर्ष अहोरात्र महाराज साधनामग्न होते.दिवसभर ते नेम ,पोथी ,भजन यातच जास्तित जास्त वेळ रममाण झाले.बाकीच्या वेळात देव करील तेच होणार या निष्ठेने आपल्या प्रपंचाची कामे करत.पण या सर्वात आपल्या नेमाची वेळ ते काटेकोर पाळीत.या सर्वांमुळे महाराजांना अद्वैतसिद्धी प्राप्त झाली.त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली.

                         निंबर्गीमहाराजांच्या निर्याणानंतर लगेच काही काळाने महाराजांनी उमदी येथे नाम सप्ताह सुरु केला.हा सप्ताह १८८५ पासून १९०३ पर्यंत असा १८ वर्षे महाराजांच्या वाड्यात ते स्वखर्चाने करीत.त्यावेळी बरेच साधक हे आपले साधन वाढविण्यासाठी येत म्हणून याला 'साधना सप्ताह' असे म्हणत.या सप्ताहातील सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी सहा ते दुपारी तिनं वाजेपर्यंत तब्बल सलग ९ तास आलेले साधक महाराजांसोबत नेमाला बसत. एका साधकाकडे पोथी वाचण्याचे काम असे.या सप्ताहात सर्व जेष्ठ व अधिकारी साधक भाग घेत ज्यात प.पू.श्री अंबुराव महाराज, शिवलिंगाव्वा अक्का आणि श्रीभाऊराव सवळसंग यांचा आवर्जुन सहभाग असे. आपल्या वाड्यातील एक खोली महाराजांनी आवर्जून नित्य नेमासाठी वेगळी ठेवली होती.आपल्या नेमाच्या खोलीच्या भिंतीला लागून मध्यभागी एका मनुष्यास उभे राहण्याइतकी रुंदीची जागा सोडून दोन फुट अंतरावर दुसरी भिंत महाराजांनी बांधून घेतली होती.आपल्या खांद्याच्या उंचीबरोबर,मध्ये एक माणूस उभा राहू शकेल इतकी जागा सोडून दोन्ही भिंतीत दोन बांबु बसवून घेतले होते.या बांबुच्या मध्ये उभे राहुन रात्री १२ ते २ कठोर साधना महाराजांनी १८ वर्ष केले.शरीर धर्माची तमा न बाळगता महाराजांनी कठोर साधना केल्यामुळे त्यांच्या अंगी प्रखर वैराग्य बाणले होते.या वैराग्याबरोबर त्यांनी आत्मसाक्षात्काराचे शिखर गाठले. महाराजांनी या नेमाच्या खोलीतील अणु-रेणुतही भगवंत पाहिला होता. आपल्या सद्गुरुरायाचे सुंदर समाधी मंदिर बांधावे व त्यावर आपण कळस चढवावा ही महाराजांची इच्छा होती व त्यामुळे महाराजांनी पांडुरंगाकडे साकडे ही घातले होते.हा त्यांचा संकल्प पूर्ण झाल्यावर महाराज शिष्यांना घेऊन आपला नवस फेडण्यासाठी १९१० ला पंढरपूरला गेले होते. या भेटीचे वर्णन महाराजांच्या थोर शिष्या शिवलिंगव्वा अक्का यांनी आपल्या पत्रात केले आहे ,त्या लिहीतात, "पंढरपूरास गेल्यावर महाराजांनी दंडवत घालून आपला नवस फेडला.नमस्कार घालून झाल्यावर महाराजांनी विठु माउलीला कडाडून आलिंगन देऊन भेट घेतली.ही भेट म्हणजे एक सोहळाच होता.महाराज विठ्ठल भेटी झाली.आकाशातून पुष्प वर्षाव झाला,तो सोहळा वर्णन करता येत नाही.ज्यांनी दृष्टी देऊन पाहिजे त्यांना ते दिसले.महाराज पांडुरंग एक झाले."  पंढरपूरातुन महाराजांनी अंबुराव महाराजांना पत्र लिहीले त्यात ते लिहितात , "देवाचा नवस फेडला संपूर्ण आनंदी आनंद जाहला.आम्ही पौष शुद्ध ३ अगर ४ ला इंचगेरीस येत आहोत.साक्षांत विठ्ठलराजास आणीत आहोत.तुमचे भक्तीने विठुराया येत आहेत." आपल्या सद्गुरुंच्या सगुण रुपातील समाधी बरोबर नित्य पांडुरंगाची सेवा घडावी या भावनेने महाराजांनी विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची स्थापना निंबर्गीकर महाराजांच्या समाधी मंदिरातील गाभार्यात मागील भिंतीतील कोनाड्यात केली.अशा रितीने श्रीनिंबर्गीकर महाराजांनी देह ठेवल्यावर तब्बल २८/२९ वर्षे भाऊसाहेब महाराजांनी संप्रदायाचे ,भक्ती प्रसाराचे कार्य उत्कृष्टपणे केले. श्री भाऊसाहेब महाराजांनी आपला देह परमार्थाच्या प्रसारासाठी चंदनाप्रमाणे झिजविला व शेवटी वयाच्या ७१ वर्षी ता.२९ /०१/ १९१४ रोजी माघ शुद्ध तृतीया शके १९३५ रोजी इंचगेरी येथे ते समाधिस्थ झाले.आत्मसाक्षात्कारी पुरुष देवाचा अनुभव घेत देह कसा ठेवतो हे महाराजांच्या निर्याणसमयी दिसून आले. 

#ते_देवाकडून_आले_व_देवाकडे_गेले🌸🚩🙏


महाराजांचा नित्यक्रम आवर्जुन लक्षात घेण्यासारखा आहे.

पहाटेचा नेम ५ ते ८ ,सुर्योदय झाला की काही वेळ माडीवर जाऊन सूर्याकडे पाहत नेम करीत असत. या नेमानंतर गुरु आज्ञेप्रमाणे १०० ओव्या ज्ञानेश्वरीच्या ,१०० ओव्या दासबोधाच्या ,३० मनाचे श्लोक असे त्यांचे रोजचे पारायण असे.त्यानंतर कापुर लावून ५ नमस्कार घालीत.दुपारच्या जेवणानंतर १ तास नेम असे.त्यानंतर पत्रव्यवहार व हिशोब पाहत.संध्याकाळी ५ वाजता पोथी,भजन, आरती होतं असे.संध्याकाळी ६ ते ९ असा ३ तासांचा नेम असे.नंतर भजन ,आरती होतं असे.त्यानंतर १२ ते २ असा दोन तासांचा नेम.प्रवासात ही ते नेमाची वेळ अजिबात चुकवित नसत.खाता जेवता नाम विसरु नये.समर्थांच्या या वचनाप्रमाणे अखंड नामस्मरणाचे शिखर महाराजांनी गाठले होते.बैलगाडीतुन प्रवास करतांना तोंडावर पांघरूण घेऊन महाराज नेम साधीच.घोड्यावर बसल्या बसल्या नेम करीत असत.श्रीभाऊसाहेब महाराजांएवढी विलक्षण नामनिष्ठा क्वचितच इतरत्र बघायला मिळते.ही साधनेवरील निष्ठा प्रत्येक साधकाला नित्य मार्गदर्शक आहेच यात तुसभर ही शंका नाही.अशा दिव्य महापुरुष समर्थ सद्गुरु श्री भाऊसाहेब महाराजांच्या परमपावन चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम. महाराजांच्या चरित्रातुन थोडी जरी साधने विषयी ,नेमा विषयी आपल्याला निष्ठा घेता आली तर आपल्या जिवनाचे नक्कीच सोने झाल्याशिवाय राहणार नाही.

      ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️


Wednesday, April 6, 2022

परमहंस सद्गुरु श्री पुंडलिक बाबा मुर्तिजापूर🙏🌺🌸❤️

 



परमहंस श्रीपुंडलिक बाबा मुर्तिजापूर यांची ९० वी जयंती  :-

                    परमपवित्र भारत भूमी ही जगाची अध्यात्मिक राजधानी आहे आणि महाराष्ट्र हे या राजधानीचे मुख्य केंद्र आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्याचे कारण ही तसेच आहे आजवर या महाराष्ट्राच्या परमपावन भूमीत गेल्या हजार वर्षात लाखो अवतारी संत ,महात्मे ,अवलीया ,मस्त, अवधूत यांनी अवतार धारण केला. माउली ,तुकोबा,नामदेवराय,नाथ महाराजांनी समाजाला अध्यात्मिक उर्जा पुरवली,समाजाला नवी दिशा दिली.याच महाराष्ट्रात विदर्भाची परम पावन भूमी आहे ज्यात आजवर शेकडो संतांनी अवतार घेऊन लोकोद्धार केला व या विदर्भ भूमीला वेळोवेळी पावन केले.याच विदर्भातील संत मांदियाळीतील एक रत्न म्हणजे परमपावन प्रात:स्मरणीय ,नित्य वंदनीय परमहंस सद्गुरु



श्री पुंडलिक बाबा. धामणगाव येथील भगवान श्री  मुंगसाजी माउलींनी ज्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून निवडले. "मीच याला जगात आणला आहे.हाच माझ्या गादीचा खरा वारस आहे" व "हा देवच आहे" असे उद्गार काढून परमहंस पुंडलिक बाबा यांचा अधिकार व अवतारीत्वाचा दाखलाच भगवान श्रीमुंगसाजी माउलींनी दिला होता.तत्कालिन महापुरुष तुकडोजी महाराज,गाडगे बाबा,मेहेर बाबा,नाना महाराज तराणेकर अशा अनेक संतांनी पुंडलिक बाबांबद्दल धन्योद्गार काढले होते.माझ्या मनात बाबांबद्दल विशेष प्रेम असण्याचे कारण ही तसेच दिव्यच आहे.परमहंस पुंडलिक बाबा हे माझ्या मातुल घरण्यात आजोळी एक/दोनदा येऊन गेले होते.माझ्या आईकडे आजोळी बाबा येऊन गेले होते त्यांनी सर्वांना कृपा आशिर्वाद आणि तिर्थही दिले होते.त्यामुळे ही मला कदाचित बाबांबद्दल जास्त प्रेम वाटत असेल.

                             परमहंस पुंडलिक बाबा यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा नदी तिरावर वसलेल्या गोरेगाव या गावी एका धनगर कुटुंबात झाला होता.चैत्र शुद्ध पंचमी शके १८३४ दि.१० एप्रिल १९३२ ला रविवारी रात्री दोन प्रहरी रोहिणी नक्षत्रावर पिता खंडूजी व माता मंजुळाबाई या सत्शिल दांपत्यापोटी बाबांनी अवतार धारण केला.बाबांच्या जन्मावेळी एक भल्या मोठ्या नागाने घरातील वळचणीवर बसून भिंतीवर दुग्धारा सोडल्या ,नंतर तो नाग गुप्त झाला.परमहंस पुंडलिक बाबा यांचे वडिल खंडूजी हे संत श्री गाडगे बाबा यांचे शिष्य व अनुयायी होते.पुंडलिक बाबांच्या जन्मावेळी ते गावातील "श्री भक्त पुंडलिक" या नावाच्या नाट्यप्रयोगात काम करत होते.त्यावेळी मंचावर त्यांना अचानक एका तेजस्वी महापुरुषाचे दर्शन घडले.ते महापुरुष खंडुजींना म्हणाले , "मी माझा दिसण्यास सुंदर असा ,आरसारुपी पुत्र तुला दिला आहे,त्याचा सांभाळ कर." एवढे बोलून ते महापुरुष गुप्त झाले.हे ऐकल्याबरोबर खंडूजी गडबडीने घरी आले.पाहतात तर घरी खरंच त्यांना पुत्रजन्म झाल्याची गोड बातमी कळली."भक्त पुंडलिक" या नाट्याच्या मधे एका योग्याने पुत्र जन्माची वार्ता सांगितली त्यामुळे लहान बाळाचे नामकरण "पुंडलिक" असे करण्यात आले.पुंडलिक बाबा लहानपणापासून काहीही बोलले नाही.आई -वडिलांना ते मुक आहे असेच वाटले.सहा वर्षा पर्यंत ते फक्त खाणा-खूणाच करित असत.वयाच्या ७ वर्षा नंतर पिंपळोद येथील योगीराज श्रीपरशराम बाबा अचानकपणे गोरेगावी आले. 'मन्या मन्या' म्हणत महाराजांनी बाळ पुंडलिकाला जवळ घेतले व त्यांच्याशी काही गुप्त संवाद केला.अगम्य आणि अनाकलनीय अशा या भेटीनंतर पुंडलिक बाबांच्या मुखातुन प्रथमच मंजुळ शब्द बाहेर पडले व ते म्हणजे "राधे गोविंद".हा चमत्कार बघुन सर्वांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही.वयाच्या नवव्या वर्षी कुरणखेडचे गोविंद साधु गोरेगावी आले.बाल पुंडलिकाची तेजस्वी मुर्ती बघुन आई-वडिलांच्या संमतीने ते त्यांना घेऊन कुरणखेडला गेले.तेथे गेल्यावर पुंडलिक बाबांनी यशवंत माळ्याच्या पाच वर्षाच्या मुलाला जिवंत केले,दिव्यातील तेल संपताच बाळ पुंडलिकाने दिव्यात पाणी ओतून ते दिवे रात्रभर तेवत ठेवण्यासारखे अतर्क्य आणि अघटीत चमत्कार तेथे केले.एके दिवशी घरी वडिलांनी जातांना दार ओढून घेतले.त्यात बाबांची चार बोटे चेंगरली.वडिल बाहेरून येऊन दार उघडून पहातात तो बाबांची बोटे चेंगरलेली पण बाबांच्या डोळ्यात अश्रूचा थेंबही नव्हता.मुख कमलावर ब्रह्मानंद विलसत होता. पुढे बाबा कुटासा येथे गेले असता.तेथील तळ्यात ते वेळी अवेळी पोहत असत,बुडी मारुन तासंतास तळ्यात बसून राहत.एकदा राधाकिसन नावाचे श्री गाडगेबाबांचे शिष्य यांचे कुटासा या गावी किर्तन होते.बुवा असेच तळ्याकडे गेले असता गौरकाय , सुंदर,तेजस्वी अशी बाबांची लहानशी मुर्ती तळ्याच्या काठावर त्यांच्यासमोर उभी राहिली व त्यांना "आमचे पाय धुवा धुवा,आम्ही कृष्ण आहोत बुवा" असे म्हणू लागले.राधाकिसन महाराजांनी बाबांचे चरण धुतले व त्यांना साष्टांग दंडवत घातला.त्याच कुटासा गावी एक व्यापारी राहत असे.त्याने आपल्या दुकानासमोर लाल मिर्ची वाळत घातल्या होत्या.बाबांनी त्या मिर्ची पायाने तुडवल्या.यामुळे तो व्यापारी रागाने लालबुंद झाला व त्याने बाबांना मिर्चीच्या पोत्यात रात्रभर कोंडून ठेवले.पण त्याचा काहीही परिणाम बाबांवर झाला नाही.उलट ते आनंदसमाधीत रमले होते.याच गावात बाबा नागवे फिरत त्यामूळे काही नतद्रष्ट लोकांनी त्यांच्या पाठी पोटाला बिबा  ठेचून लावला.त्याची जखम झाली व ती चिघळली.पण बाबा त्यावर उपचार औषध घेण्यास तयार नव्हते.पुढे औषधाशिवाय ती जखम बरी झाली.याच गावातील कलावती बाई टाकोणकर या भोळ्या पण अत्यंत शुद्ध भक्ती असलेल्या निरक्षर बाईवर बाबांनी कृपा केली व ती बाई ज्ञानेश्वरी वाचायला लागली व पंढरपूर येथे चातुर्मास करु लागली.

                 पूज्य बाबांच्या द्वारे हे अद्दभूत चमत्कार घडत असले तरीही लौकिक व्यवहारी जगाच्या द्ष्टीने त्यांचे एकंदर विचित्र वागणे-बोलणे पाहून श्री खंडूजीनाना व सौ.मंजुळाबाई फारच चिंताग्रस्त असत. त्यावेळी धामणगाव(देव) येथील महान सत्पुरुष श्री मुंगसाजी महाराजांची सर्वत्र फारच ख्याती पसरली होती.एका द्ष्टांतानुसार खंडुजीनाना बाळ पुंडलिकास त्यांच्याकडे घेऊन गेले.तेथे जाताच बाळ पुंडलिक मुंगसाजी महाराजांच्या शेजारी त्यांच्या गादीवर जाऊन बसले.खंडुजीनाना भितीने मुंगसाजी महाराजांना हात जोडून,’बाळ पुंडलिक वेडा आहे,त्यावर कृपा करा’असे सांगू लागले.तेव्हा मुंगसाजी महाराज हसत हसत म्हणाले. "धनगराला रत्न गवसले’.काय पारख त्याला? अरे हे अमुल्य रत्न आहे. हे केवळ माझेच स्वरूप आहे.याचे जतन कर." नंतर मुंगसाजी महाराजांनी आपले परमभक्त यशवंतराव राजे घाटगे बडोदेकर सरकार यांच्या हातून बाल पुंडलिकास अभ्यंग स्नान घालून नवीन कफनी परीधान करून त्यांना गादीवर बसविले.त्यानंतर मुंगसाजी माउलींनी मुंबई येथे प्रयाण केले व काही काळाने ते तिथेच समाधीस्थ झाले.यावरुन एक कळतं की पुंडलिक बाबांवर आपले सर्व कार्य सोपवून ,आपल्या गादीवर बसवून, उत्तराधिकारी बनवून मुंगसाजी माउलींनी पुढे काही काळाने समाधी घेतली,आपल्या उत्तराधिकार्यावर कार्याची सर्व जबाबदारी सोपवली.त्यानंतर बाबा पाच सहा महिने धामणगाव ला राहिले व काही महिन्यांनी गोरेगावला परतले. पुढे १९४७ ला चैत्र शुद्ध पंचमीला श्रीबाबांचा न भुतो न भविष्यती असा जन्मोत्सव गोरेगाव येथे साजरा करण्यात आला व ती परंपरा आजही अखंड सुरु आहे.(या उत्सवाला माझ्या मातुल घरण्यातील सर्वजण आज्जी, आजोबा,मामा,मावशी,आई सर्वजन दरवर्षी न चुकता जात असत) 

 यानंतर बाबांचा किर्तीसुंगध चहुकडे पसरला.दुरवरुन लोक बाबांच्या दर्शनास येऊ लागले.गोरेगावला रोजच यात्रा भरायला सुरुवात झाली.१६/१७ वर्षांच्या वयाच्या बाबांचा दरबार आता गोरेगावात भरायला सुरुवात झाली.लोक आपल्या अडचणी,दु:ख दूर करण्यासाठी बाबांकडे येत असत.बाबांच्या कृपा कटाक्षाने लोकांचे दु:ख दूर होत असत,बाबांच्या कृपेचा अनुभव असंख्य लोकांना येऊ लागला. बाबा चिखली मुक्कामी असता वाशिमचे सरकारी नोकरीत असलेले गोडाऊन सुपरवाईजर श्रीअनंतराव पारदकर हे दर्शनास आले असता बाबांनी त्यांना फुले फेकून मारली त्याबरोबर पारदकर हे मुर्छीत पडले.बाबांच्या या कृपेनंतर पारदकरांना आत्मसाक्षात्कार झाला.पुढे पारदकरांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व संन्यास घेतला.चिखलीवरुन वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा नदीचे उगमस्थान असलेले काटा या गावाला बाबांचे आगमन झाले.तेथील श्रीमंत सद्भक्त शिवराम बापु उर्फ काटेकर दादा यांच्याकडे बाबा बरेच दिवस राहिले.काटा या गावावर बाबांचे विशेष प्रेम होते.काट्याला बाबांच्या कृपेचा अनेक लोकांनी अनुभव घेतला.काट्याला अनंत चमत्कार घडले त्यांचे वर्णन शब्दमर्यादेस्तव येथे करणे शक्य होणार नाही.पुढे गोरेगावचे वास्तव्य बाबांनी पूर्ण करुन १९७२ ला बाबा मूर्तिजापूर येथील पुंडलिक नगरीत वास्तव्यास आले. मुर्तीजापूरला आल्यानंतर बाबांचे धाकटे बंधू श्रीनारायणभाऊ यांनी पुढे बाबांच्या दरबाराचा सर्व कारभार आपल्या हाती घेतला.बाबांची सर्व व्यवस्था ,दौरे यांची सोय ते अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करु लागले.परमहंस पुंडलिक बाबांच्या दर्शनासाठी हजारो लोक मुर्तिजापूर येथे रोज येत असत.परगावी दर्शनाच्या तारख सुरु झाल्या.नागपूर येथील बाबांची मिरवणूक व रथयात्रा अभूतपूर्व अशी होती.बाबांचे जिथे जिथे वास्तव्य होतं असे तिथे तिथे यात्राच भरत असे.बाबांचा अधिकार अतिशय मोठा होता.पुंडलिक बाबांवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी एक पद ही रचले आहे. महाराजांचे बाबांवर विशेष प्रेम होते. परमहंस पुंडलिक बाबांच्या अधिकाराची जाणीव आपल्याला विविध संतांनी त्यांच्याबद्दल काढलेल्या धन्योद्गार वाचल्यानंतर होईलच.विविध संप्रदायाचे अवतारी ,अधिकारी संत बाबांचा गौरव करतांनी म्हणतात :-


 श्री पुंडलिक बाबा हे अमुल्य रत्न आहे,यांचे जतन कर,हे माझे केवळ स्वरुपच आहे.

     ---श्री मुंगसाजी महाराज,धामणगांव(देव)


अरे हा देवच आहे.त्याच्या केवळ दर्शनाने जिवाचे कल्याण होते.

     ---संत गाडगे महाराज


श्री पुंडलिक महाराज अवतारी पुरूष असून माझे आराध्यदैवत आहेत.

     ---श्री संत विक्तबाबा टाकरघाट(नागपुर)


श्री पुंडलिक बाबा संतामधले युवराज आहेत.

    ---श्री संत लहानुजी महाराज,टाकरखेड


श्री पुंडलिक बाबा रामाचे अवतार आहेत,केवळ रामच आहेत.

     ---श्री संत गुलाबबाबा काटेल,कोलद


हा पुंडलिक मोठा खेळ खेळ्या आहे.हा लिलामय मोठ्या लिला करणारा आहे.

         ---श्री बद्रीनाथ महाराज,मुर्तिजापुर


श्री पुंडलिक बाबा ही दर्शनीय मुर्ती आहे.

       --श्री मारोती बाबा,सालबर्डी


श्री पुंडलिक बाबा साधारण संत नाहीत जन्मोजन्माचे तपश्चैयेने अशी स्थिती प्राप्त

होत असते.असे संत अढळपदी असतात मानवाचे कल्याणासाठी ते स्वेच्छेने

मॄत्युलोकात अवतार घेतात.त्याचे कार्य अक्षम्य व अत असते.

        --श्री संत सितारामदास महाराज


श्री पुंडलिक बाबा माझा आत्मा आहे.

     ---श्री संत परशराम बाबा,पिंपळोद


श्री पुंडलिक बाबा संतश्रेष्ठ साक्षातकारी विभूती होय.

        ---श्री संत अच्युत महाराज,कौडण्यपूर


देव पहावयाचा असेल तर श्री पुंडलिक बाबा कडे जा ते साक्षात देवच आहे.

               ---श्री संत देवमन महाराज,लोधीखेड


परमहंस स्थितीत रममान असलेले श्री पुंडलिक बाबा यांचा अधिकार फार मोठा आहे.

 -श्री नाना महाराज तराणेकर(इंदोर)


            आपले अवतार कार्य पूर्ण करुन बाबांनी पूर्व संकेत ,पूर्वसुचना दिल्यानुसार भाद्रपद वद्य दशमी दिनांक ९ ऑक्टोबर १९८५ या दिवशी लाखो लोकांच्या उपस्थितीत आपला देह विसर्जन केला. बाबांनी ज्या दिवशी समाधी घेतली त्या दिवशी पुंडलिक नगर आश्रमात तब्बल पाच लाख लोक उपस्थित होते.सर्वांनी आपल्या या सगुण रुपी भगवंतांचे अंतिम दर्शन घेतले व तेथेच बाबांना विधीवत समाधी देण्यात आली.आज मुर्तिजापूर येथील पुंडलिक नगरीत बाबांचे भव्य समाधी मंदिर आकारास येत आहे.अतिशय भव्य अशी मुर्ती समाधीवर स्थापन करण्यात आली आहे.बाबांचा पलंग ,पादुका,वस्तु आजही आपल्याला बघावयास मिळतात.अशा या दिव्य परमहंस सद्गुरुंच्या श्रीचरणी ही त्यांनीच लिहून घेतलेली शब्द सेवा अर्पण करतो.बाबांनीही आपल्या सर्वांवर सदैव त्यांचा कृपा करुणेचा आशिर्वाद अखंड ठेवावा हीच प्रार्थना श्रीचरणी करुयात.

   ✍️ ✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

Saturday, April 2, 2022

🌺|| अक्कलकोटस्थ भगवंताचा प्रगटदिन ||🌺


स्वामी समर्थ माउलींचे प्राकट्य आणि त्या संबंधी तत्कालिन दाखले :-

आज चैत्र शुद्ध द्वितीया अक्कलकोट निवासी परब्रह्माचा आज प्रगटदिन.स्वामी माउलींच्या प्राकट्याबद्दल आपल्याला बरीच मतांतरे आणि रुढ कथा,गोष्टी ऐकायला मिळतात. त्यात सर्वश्रुत आणि प्रसिद्ध गोष्ट म्हणजे स्वामी माउली कर्दळीवनातून एका वारुळात ध्यान समाधीत होते व एका लाकुडतोड्यामुळे त्यांची समाधी भंग पावली व पुन्हा ते सदेही कार्यरत झाले.पण या कथेला कितपत सत्य मानावे हा ही एक महत्वाचा भाग आहे.कारण गुरुचरित्रात ज्या कर्दळीवणाचा उल्लेख आला आहे ते आपल्याला आत्ता श्रुत असलेले कर्दळीवन नसुन ते दत्त लोकातील 'कदली' म्हणजे केळाचे बन आहे व भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे "ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनी" असे गुरु चरित्रात सांगितल्याप्रमाणे श्रीशैल्य मल्लिकार्जुन ज्योतीर्लिंगातुन त्या दत्तलोकातील कदलीवनात निजानंदगमन करते झाले.यावर दत्त संप्रदायातील थोर सत्पुरुष सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांनी अतिशय सुंदर आणि विश्लेषण पूर्वक माहिती दिली आहे. मग प्रश्न असा उरतो की मग नक्की प्रमाण काय ? तर त्यासाठी आपल्याला भगवान श्री अक्कलकोट स्वामी माउलींचे तत्कालीन परमशिष्य ,त्यांचे सुत असलेल्या हरिभाऊ तावडे अर्थात सर्व स्वामीभक्तांचे लाडके असे स्वामीसुत महाराज आणि स्वामी माउलींचे परमशिष्य असलेल्या सद्गुरु श्रीआनंदनाथ महाराज वेंगुर्ले यांचे अभंग ,रचना आणि चरित्र अभ्यासायला हवे म्हणजे आपल्याला सत्याचा उलगडा नक्की होईल.बरं हे दोन्ही सत्पुरुष कुणी सामान्य लेखक नव्हते.श्री स्वामी माउलींनी ज्यांना आपल्या आत्मलिंग पादुका दिल्या व ध्वजा देऊन दर्या किनारी म्हणजे मुंबापुरीत आपला मठ स्थापन करण्याची आज्ञा केली ते स्वामी सुत आणि ज्यांना आपल्या मुखातुन तुळशीपत्राएवढे अलौकिक असे आत्मलिंग काढून दिले असे आनंदनाथ महाराज होत.या अवतारी व अलौकिक महापुरुषांनी करुन ठेवलेल्या नोंदी या नक्कीच विश्वासार्ह आणि सत्य प्रमाणभूत आहेत यात तिळमात्र शंका नाही.
( शब्द मर्यादेमुळे इथे स्वामीसुत महाराज आणि आनंदनाथ महाराज यांची विस्तृत माहिती देणे शक्य नाही पण जिज्ञासू वाचकांनी या दोघांचेही चरित्र आवर्जून वाचा.) आता आपण पुढे क्रमवार स्वामींच्या प्राकट्याबद्दलची हकीकत बघुयात.

१) स्वामी सुत महाराजांनी केलेली नोंद :-
                      स्वामी सुत महाराज हे पूर्वाश्रमीत एक सुखवस्तु व्यापारी गृहस्थ होते.त्यांना व्यापारात झालेले नुकसान व त्यासाठी त्यांनी केलेला स्वामींना नवस हे आपल्याला माहिती आहेच.नंतर त्यांचे अक्कलकोटला येणे झाले.स्वामींची कृपा,त्यांना चांदीच्या पादुका अर्पन करण्यास सांगणे व त्या पादुका १४ दिवस आपल्या पायात घालून त्या पादुका ,छाटी व कफनी देऊन स्वामी माउलींनी त्यांना सांगितले, "आपला संसार लुटवून टाक.ही वस्त्रे परिधान कर.दर्याकिनारी ध्वजा लगाव," आणि मग काय स्वामींच्या या शब्दांनी हरीभाऊचे झाले 'स्वामीसुत महाराज' ही स्वामी चरित्रातील लिला पुष्कळ मोठी आणि विस्तृत आहे. यानंतर स्वामीसुतांनी आपले घरदार,पैसा ,अडका,सर्व संसार यावर तुळशीपत्र ठेवून ते सर्व लुटवून टाकले.त्यांच्याकरवी श्रीस्वामी महाराजांची असंख्य पदे,अभंग ,रचना रचल्या जाऊ लागल्या.त्यांनी असंख्य भक्तांना भक्तीमार्गास लावले,दिक्षा दिल्या.स्वामींनी सर्वांसमक्ष सांगितलेच होते की "हा माझा सुत आहे." त्याप्रमाणे अंतर्बाह्य बदल हा स्वामीसुतां मध्ये घडुनही आला होता.
एकदा स्वामीसुत अक्कलकोट ला स्वामी दर्शनाला गेले असता त्यांना स्वामींनी जवळ बोलावून आपल्या पोटावर हात फिरवण्यास सांगितले.अनंतकोटी ब्रह्मांडे ज्याने रचली व ज्यांच्या उदरातील पोकळीत ती सहज लिलेने प्रस्थापित झाली आहेत त्यांच्या बाह्य पदराला स्पर्श होताच स्वामीसुतांना आपल्या पूर्व जन्माचे अनेक प्रसंग दृश्य स्वरुपात दिसायला लागले.त्या दर्शनाने ,त्या दिव्य प्रकाशाने ते चक्रावून गेले.त्यांना दिसले की ते पूर्वजन्मात मध्य हिंदुस्थानातील  हस्तिनापूर पासून चोवीस मैलांवर असलेल्या छेली खेडे गावात विजयसिंह नामक एक रजपुत बालक होते.एका पवित्र वटवृक्षाखाली श्री विनायक मंदिरासमोर ही अवतार लिला घडली.
                       विजयसिंह बालक रोज एकटाच गोट्यांचा खेळ खेळत असे.एक डाव भगवंतांचा  व एक डाव स्वतःचा अशी त्याच्या खेळण्याची पद्धत होती.जवळच्या लोकांना,मुलांना हा प्रकार हास्यास्पद वाटते असे.परंतु चैत्र शुद्ध द्वितीया ,बहुधान्य संवत्सरे,गुरुवार दिनी,शालीवाहन शक १०७१ सन ११४९ या पवित्र दिनी एक अघटित प्रकार घडला.आधी 'कडकड' असा मोठा आवाज झाला.हा आवाज धरणीच्या गर्भातून येत होता.आसपासची सारी माणसे भयाने इतस्तत: पळू लागली.विजयसिंह मात्र तिथेच उभा होता.काही क्षणात धरणी दुभंगली व त्यातून एक अष्टवर्षीय सुकुमार मूर्ती बाहेर आली.श्रीस्वामी महाराज हे त्या दिवशी नुसतेच प्रगटले नाहीत तर त्यांनी विजयसिंह बरोबर गोट्याही खेळल्या.श्रीस्वामीसुतांनी स्वामी माउलींवर "स्वामी विजय" नामक एक ग्रंथ लिहीला त्याचा द्वितीय खंड म्हणजे श्रीस्वामीअवतारकांड होय.त्यात त्यांनी स्वामींच्या प्राकट्यासंबंधी सखोल वर्णन केले आहे.ते ही आपण जरुर वाचा तसेच स्वामीसुत आपल्या अभंगातून ही या लिलेचे वर्णन करतात.स्वामी सुत लिहीतात

"स्वामी अवताराचि काय सांगु मात । मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा ।।१।। गोटी खेळामाजी अवतार हा जाला । रामशिंग भला दास त्यांचा ।।२।। गुरुवार द्वितीय चैत्र शुद्धबरी । हरी ( इथे स्वामी सुत स्वत:चा उल्लेख करीत आहेत )  होता बरोबरी खेळावया ।।३।। आश्विन नक्षत्र प्रीती योग होता । जगाचा दाता अवतरला ।।४।।"
             पुढील एका अभंगात ते लिहीतात -

"दत्त माझा अवतरला ।। दीन भक्ताच्या काजाला ।।
छेलीखेड्या ग्रामामाजी ।। जाला अवतार सहजी ।। गोटी खेळण्याचा रंग ।। तेव्हा हरी झाला दंग ।।"
    
पुढील एका अभंगात म्हणतात -
"धर्णी दुभंगून केली दरी ।। स्वामीराज आले वरी ।।
अष्टवर्षी सुकुमार ।। रुप दिसे हे सुंदर ।।"
        स्वामीसुतांनी स्वामींच्या प्राकट्यासंबंधी आपल्याला स्पष्ट पुरावाच इथे दिला आहे.या प्राकट्य लिलेला ,त्या दिनाला,तिथीला प्रत्यक्ष स्वामीरायांनीही कसा दुजोरा दिला व आपला प्रकटदिन साजरा करण्याची स्वामीसुतांना अनुमती दर्शविली हे पुढील प्रसंगांमध्ये कळेल.
२) श्रीनानाजी रेखी व स्वामीसुत :-
                    नगरचे विख्यात ज्योतिषी श्रीनानाजी रेखी हे त्याकाळातील विख्यात ज्योतिषी तर होतेच त्याचबरोबर ते एक धार्मिक वृत्तीचे सत्पुरुष ही होते.त्यांना पिंगला जोतिष विद्या अवगत होती म्हणजे त्यांना पक्ष्याची भाषा येत असे व त्याच्या आधाराने त्यांच्या भाकीतात सत्यत्व विलसत असे.शके १७९१ ऑक्टोबर आरंभी  सन १८६९ ला नानाजी काही महत्वपूर्ण कामाकरीता मुंबई ला गेले होते.काम आटोपल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे देवभक्तांची चौकशी सुरु केली तेव्हा त्यांना स्वामीसुतांची माहिती कळली.ते स्वामीसुतांच्या भेटीसाठी कामाठीपुर्यातील मठात गेले.तेथे जाताच स्वामीसुत म्हणाले, "नगरचे नाना जोशी आपणच आहात ना?" हे शब्द ऐकून नानांना फार आश्चर्य वाटले कारण स्वामीसुतांना त्यांनी व त्यांनी स्वामी सुतांना आधी कधीही बघितले नव्हते.त्यांना स्वामीसुतांच्या अधिकाराची जाणीव झाली.नानांनी सद्गदित अंत:करणाने स्वामीसुतांच्या चरणी मस्तक ठेवले.स्वामीसुतांनी नानांना हृदयाशी धरले व आशिर्वाद दिला , "आजपासून तुम्ही समर्थांचे जोशी आहात,तुमचे पागोटे जाऊन झोळी प्रसाद मिळून नगरास तुमच्या येथे श्रीस्वामी समर्थांचा मठ होणार आहे." स्वामी सुतांकडून समर्थांची माहिती मिळाल्यावर त्यांची आज्ञा घेऊन नाना हे सहपरिवार स्वामी दर्शनाला जाऊन आले. स्वामीसुतांच्या आज्ञेने नानाजींनी स्वामी माउलींची कुंडली बनवावयास घेतली.तिथी,वार,नक्षत्र श्रीस्वामीसुतांनीच सांगितले. नानांनी लागलीच स्वामींची कुंडली तयार केली.मग नाना व स्वामीसुत हे अक्कलकोटास गेले.त्यांनी कुंडली स्वामीचरणांपुढे ठेवली.स्वामींनी 'कुंडली माळावर फेकून द्यावी' अशी सेवेकर्यांना आज्ञा केली.त्यावेळी भजन चालु होते.भजन संपल्यावर समर्थांनी कुंडली परत आणण्यास सांगितली.कुंडलीची पुजा झाल्यावर पत्रिकेची कागदाची सुबक घडी झाली होती आणि त्या घडीत हळद कुंकू आणि अक्षता निघाल्या.ती पत्रिका स्वामी महाराजांच्या पसंतीत उतरली व महाराज म्हणाले , 'क्या देखता है ,नौबत बजाव" हे शब्द महाराजांच्या मुखातून निघताच नाना दर्ग्यातील नौबती जवळ जाऊन ती वाजवू लागले.प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री अक्कलकोट स्वामी माउलींनी त्या कुंडलीला आशिर्वाद दिला ,दूजोरा दिला यातच सर्व काही आले. स्वामी प्राकट्याच्या लिलेला प्रत्यक्ष स्वामींनीच शिक्कामोर्तब केले होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.पुढे स्वामीसुत महाराजांनी व नानाजी रेखी यांनी चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामींचा प्रगटदिन साजरा करण्यास सुरुवात केली.

३) सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज :-
             ‌‌.                श्रीस्वामीरायांच्या शिष्य प्रभावळीतील अत्यंत थोर महापुरुष म्हणजे आनंदात महाराज.स्वामीरायांची त्यांच्यावर अखंड कृपा होती.त्यांना स्वामींनी आपले आत्मलिंग दिले ,आनंदनाथ महाराजांनीच शिरडीच्या साईदेवांना प्रकाशात आणले व शिरडीकरांना सांगितले होते की हे रत्न,हिरा आहेत आणि काही वर्षांनंतर यांच्या साठी सर्व जगभरातून लोक इथे येतील.तेव्हा साईमाउली ३७ वर्षाचे असतील. स्वामी माउलींनी आत्मलिंग दिल्यावर आनंदनाथांमध्ये अंतर्बाह्य बदल झाला.त्यांच्या जिव्हेवर सरस्वतीचाच जणु वास झाला व त्यांना स्तोत्र,पदे यांचे स्फुरण होऊ लागले.आनंदनाथ महाराजांकडून अफाट आणि अलौकिक अशी दिव्य प्रासादिक स्तोत्रांची रचना झाली‌.श्रीआनंदनाथांनी स्वामीसुताप्रमाणे ग्वाही दिली की "श्रीस्वामीमहाराज हे चैत्र शुद्ध द्वितीयेलाच प्रगटले". ते म्हणतात -
वटवृक्षामाजी जन्म हाची झाला ।। तारक तो भला जगामाजी ।।१।। गुरुवार दिनी द्वितीया हे जाण ।। शुद्ध चैत्र पूर्ण मांस खरा ।।२।। जग तारावया अवतार धरिला ।। उद्धार केला पतितांचा ।।३।। बाळरुपी लीला परब्रह्मी कळा ।।शुभ्र न सांवळा रंग ज्याचा ।।४।। रंग नसे काही संगरहित पाही ।। निराकारी तोही एक खरा ।।५।। आनंद म्हणे माझा स्वामी हा समर्थ ।। अवतार यथार्थ कलियुगी ।।६।।
आनंदनाथ महाराजांनी सांगितले आहे की स्वामी महाराज हे चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी सुतांनी जे साल सांगितले आहे सन ११४९ यापूर्वी कलियुग चैत्र शुद्ध द्वितीया, शालिवाहन शके ३४०,सन ४१८ ला हिमालयात प्रकटले व काही कार्यानंतर ते पुन्हा गुप्त झाले. श्री स्वामी सुतांच्या वचणांवर आनंदनाथ महाराजांनी आपल्या अभंगातून शिक्कामोर्तबच केला आहे व चैत्र शुद्ध द्वितीया हीच तीच मुळी प्राप्त तिथी आहे याचा जणु पुरावाच दिला आहे.
शेवटचे व महत्वाचे असे की स्वामी महाराज वारुळातुन प्रगटले या कथेला मिळतीजुळती एक कथा श्रीगोपाळबुवा केळकरांच्या बखरीत आपल्याला बघायला मिळते.त्यातही त्यांनी स्वामी माउली हे उत्तर हिंदुस्थानातच प्रगटल्याचा उल्लेख केला आहे.श्रीस्वामी माउली उत्तर हिंदुस्थानात भागिरथी च्या उत्तरेस एका अरण्यात तप करित असता एका लाकुडतोड्याची कुर्हाड वारुळावर पडली ती वारुळातील स्वामींच्या मांडीवर लागली व स्वामी तपातून उठले.त्या कुर्हाडीचा घाव स्वामींच्या मांडीवर पुढेही दिसत असे. अशी ही कथा पण यातही कर्दळीवनाचा पुसटसा उल्लेख नाही.काही ग्रंथात आला ही आहे पण स्वामी सुत महाराज ज्यांचा अधिकार एवढा मोठा होता की स्वामींनी त्यांना माझा सूत असे म्हटले होते ,तसेच आनंदनाथ महाराज यांनीही त्याच तिथीला दुजोरा दिला आहे.
यावरुन एकचं निष्कर्ष निघतो की निर्गुण, निराकार पूर्णब्रह्म भगवंत आजच्या तिथीला सुर्योदयवेळी हस्तिनापूर जवळील छेली खेडे ग्रामी आठ वर्षांच्या बालस्वरुपात इ.स.११४९ मध्ये प्रगट झाले...आज स्वामी भगवंतांचा ८७४ वा प्रगटदिन... आजच्या या परम पावन तिथीला श्री स्वामी समर्थ माउलींच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला अखंड श्रीचरणांची सेवा,स्मरण करण्याचे सामर्थ द्यावे ,आमच्या या जिवनात स्वामी नामाचा सुगंध दरवळत रहावा व स्वामी राया़्ंच्या कृपा करुणेने या जिवनाचं ही सोनं व्हावं.

स्वामींच्या शिष्य मंडळींचाच जर विचार केला तर स्वामी माउलींचे व्यापक ,पूर्णब्रह्म तत्व, भगवंतस्वरुपाचे ओझरते दर्शन होऊ शकेल... राजाधीराज श्रीस्वामी महाराजांच्या शिष्य प्रभावळीमध्ये श्री सद्गुरु स्वामीसुत महाराज, कोल्हापूर चे श्रीकृष्ण सरस्वती कुंभार स्वामी महाराज,श्रीदेव मामलेदार, पुण्याचे श्रीसद्गुरु शंकर महाराज, श्रीसद्गुरु बाळप्पा महाराज,श्रीसद्गुरु बिडकर महाराज, श्रीसद्गुरु मातोश्री पार्वती देवी,श्रीसद्गुरु आनंदनाथ महाराज,श्रीसद्गुरु तात महाराज,श्रीसद्गुरु कृष्ण सरस्वती दत्त महाराज करविर, श्रीसद्गुरु ब्रम्हानंद स्वामीकुमार यती,श्रीसद्गुरु दत्तगिरी गोसावी खानोलकर,सद्गुरु बाळकृष्ण महाराज सुरतकर,श्रीकैवल्याश्रम बोठेस्वामी,श्रीसद्गुरु पिठले स्वामी महाराज,आळंदी चे नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज,श्री वामनराव जी वैद्य, श्री सद्गुरु गोपाळबुवा केळकर,काळबुवा महाराज,रांगोळी महाराज, अशा असंख्य अवतारी संतांचा समावेश होतो.स्वामींच्या लिलाकाळात त्यावेळी देहात असलेले असंख्य अवतारी सत्पुरुष त्यांच्या मार्गदर्शनासाठी अक्कलकोटी येऊन गेले होते त्यात प्रामुख्याने गोंदवल्याचे श्रीब्रम्हचैतन्य महाराज रामदासी, शेगावचे श्रीगजानन महाराज हे प्रमुख...स्वामींची ही जगापुढे असलेली दृष्य माहीती फक्त त्यांच्या काही काळ अक्कलकोटी केलेल्या लिलाविलासामुळेच आपल्यापुढे आली आहे.छेली खेडे ग्रामातुन निघालेली ही परब्रम्ह मुर्ती, भवतारक मुर्ती कुठे कुठे गेली ,त्यांनी काय काय लिलाविलास केला,त्यांनी त्या काळात हिंदुस्थानात फिरुन असंख्य जिवांचा केलेला उद्धार, घडवलेले अनंत शिष्य मंडळी हा सर्व ठेवा आजही गुप्तच आहे... अशा अक्कलकोटस्थ परब्रह्माच्या चरणी आजच्या या पावन दिनी शिरसाष्टांग दंडवत करुयात आणि अखंड स्वामीनाम मुखात रहावे यासाठी त्या पूर्णब्रह्म भगंतांच्या दिव्य चरण कमलांकडे हेच अखंड मागणे मागुयात....
         
    ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...