Wednesday, August 31, 2022

ऋषीपंचमी शेगांव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांची ११२ वी पुण्यतिथी 🙏🌸🌺🚩

 


आज ऋषीपंचमी गजानन बाबांची ११२ वी पुण्यतिथी 🙏🌺
                      तब्बल एक शतक लोटून गेले आजच्याच दिवशी शेगावी प्रगटलेला ज्ञानगभस्ती योगीराज आपल्या निजस्थानी परतला.आपले सगुण रुप दूर सारून विश्वात्मक देह धारण करता झाला.विदर्भातील संत मांदियाळीत आजवर होऊन गेलेल्या संतांचे चुडामणी,जगभरातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या समर्थ सद्गुरु श्रीगजानन महाराजांचे चरित्र माहिती नसलेला भाविक व्यक्ती निराळाच.प.पू.दासगणु महाराजांनी लिहिलेल्या अतिशय प्रसादिक आणि रसाळ अशा "गजानन विजय" ग्रंथात बाबांच्या दिव्य लिला आपण सर्वांनी वाचलेल्या आहेच.तरीही संक्षिप्त रुपात ऋषीपंचमीच्या दिवशी झालेली समाधी लिला आपण आज बघूयात.
               
मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका |
कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||
                              महाराजांच्या समाधी प्रसंगासमयी गजानन विजय ग्रंथात आलेल्या या ओव्या किती सार्थ आहेत.आज एक शतका नंतरही महाराज भक्तांच्या हाकेला धावतात,त्यांच्यावर कृपा करत आहेत.आजही असंख्य आर्त, जिज्ञासू ,मुमुक्षू जनानां मार्ग दाखवित आहे.आजही "आम्ही गेलो ऐसे मानु नका" या त्यांच्या वचनाचा सर्व लोक अनुभव आजही घेत आहेत.

आपले ३२ वर्षांचे प्रदिर्घ अवतार कार्य पूर्ण करुन महाराजांनी देह ठेवण्याचा विचार केला.तो अतिशय हृद्य प्रसंग गजानन विजय पोथीत दासगणू महाराजांनी शब्दबद्ध केला आहे.महाराज आषाढ महिन्यात हरी पाटलांना बरोबर घेऊन आपल्या आराध्य विठुरायाच्या भेटीस्तव पंढरपूर येथे गेले.चंद्रभागेचे स्नान करुन महाराज विठुरायाच्या पुढे गेले.ते श्रीभगवंतांना म्हणाले,
"देवा तुझ्या आज्ञेने आजवर या भुमिवर भ्रमण केले,तु जे कार्य दिले ते पूर्ण केले.जे जे भाविक,भक्त,मुमुक्षू होते त्यांचे मनोरथ पूर्ण केले.आता माझे अवतारकार्य पूर्ण झाले आहे.हे तु ही जाणतो आहे.आता मला देह ठेवण्याची आज्ञा करावी.माझी येणार्या भाद्रपदमासी वैकुंठासी येण्याची इच्छा आहे.अशी पंढरीनाथांच्या चरणी हात जोडून महाराजांनी विनवणी केली,भगवंतांच्या विरहाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.पुढे पंढरपूरची यात्रा पूर्ण करुन महाराज शेगावी परतले.श्रावण मास गेला आणि भाद्रपद मास येऊन ठेपला.हरी पाटील व इतर मंडळींना महाराज देह ठेवणार आहेत हे ठाऊक होतेच.सर्व एक विलक्षण जड अंतःकरणाने मठात वावरत होते.गणेश चतुर्थी चा दिवस आला.महाराजांनी पार्थिव गणेशाची स्थापना ,पूजन केले .दुसर्या दिवशी महाराजांनी सर्वांना गणेश विसर्जनासाठी मठात बोलाविले.गणपती विसर्जनानंतर महाराज सर्व भक्तांना म्हणाले,
"दु:ख न करावे यत्किंचित| आम्ही आहोत येथेच |
तुम्हा सांभाळण्यापरी सत्य| तुमचा विसर पडणे नसे ||
                                  हे शरीररुपी वस्त्र आता जिर्ण झाले आहे.आता या वस्त्राचा त्याग करण्याचा वेळ समीप आला आहे. महाराजांनी आपल्या परमभक्त आणि परमशिष्य असलेल्या बाळाभाऊंना आपल्या हाताने धरुन आपल्या आसनावर बसविले.महाराज म्हणाले ,

मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका |
कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||
                                सर्व भक्तांना असे आश्वासन देऊन महाराजांनी योगाने आपले प्राण ब्रह्मरंध्री खेचले व प्राण रोधल्या क्षणी "जय गजानन" असा उच्चार केला.शके अठराशे बत्तीस साली साधारणनाम संवत्सरास भाद्रपद शुद्ध पंचमी गुरुवार या दिवशी हा सिद्धयोगी, युगपुरुष, पुराणपुरुष, कलियुगातील आधुनिक ऋषी आपल्या मुळ स्थानी परतला.आपल्या नश्वर देहाचा त्याग करुन महाराज विश्वरुप झाले.महाराजांनी देह ठेवल्याक्षणी सर्व शेगावात हाहाकार उडाला.आमचा त्राता गेला म्हणून नर नारी दु:खाने व्याकुळ झाले.महाराजांच्या देहाचे अखेरचे दर्शन घेऊन दु:खाश्रु ढाळू लागले.पुढे सर्व भक्त आल्यावर महाराजांच्या देहाची मिरवणूक काढण्यात आली.हजारो दिंड्या घेऊन भक्त नामघोष करु लागले.महाराजांना बुक्का ,तुळस वाहू लागले.रात्रभर अशी मिरवणूक सुरु होती.दुसर्या दिवशी ही मिरवणूक गावातील मठात आली.महाराजांनी आधीच सांगून ठेवलेल्या जागी महाराजांच्या देहाला समाधी देण्यात आली.महाराजांच्या समाधीवर पाषाणाची शिळा लावून पुढे दहा दिवस मोठा भंडारा करण्यात आला.
                               श्रीगजानन बाबा देहात असतांना सद्गुरु श्री साईनाथ महाराज शिरडी, सद्गुरु श्रीताजुद्दीन बाबा नागपूर,सद्गुरु श्रीशंकर महाराज पुणे, सद्गुरु श्री माधवनाथ महाराज चित्रकूट,श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज करवीर असे असंख्य अवतारी महापुरुष महाराष्ट्र सदेही उपस्थित होते ,एवढेच काय तर महाराजांचे त्यांच्याशी अतिशय प्रेमाचे व आदराचे नाते होते. विदर्भ भूमिला आपल्या पदस्पर्शाने पावन करण्यासाठी महाराजांनी ही भूमी निवडली व पुढे आजिवन आपले सदेह वास्तव्य याच भूमीत केले यावरुन याची कल्पना येते.महाराज तिर्थयात्रा सोडून कधीही विदर्भ सोडून इतरत्र गेल्याचे आढळत नाही.तरीही साईनाथ महाराज,माधवनाथ महाराज,ताजुद्दीन बाबा,रामानंद बिडकर महाराज,नाशिकचे गोपाळबुवा महाराज यांच्याशी त्यांचा पूर्वापार परिचय होता ,हे सर्व महाराजांना मोठ्या भावासारखा मान द्यायचे हे विशेष आहे.

                    गेल्या शतकात होऊन गेलेल्या लोकात्तर अध्यात्मिक महापुरुषांच्या मांदियाळीत सद्गुरु श्री गजानन महाराज हे अग्रगण्य आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.श्रीसद्गुरु गजानन बाबांचा भक्त परिवार हा महाराष्ट्रच काय तर भारतभर व जगभर विखुरलेले आहे. प.पू.श्रीदासगणू महाराजांनी लिहिलेला "श्रीगजानन विजय" नामक चरित्र ग्रंथ हा आम्हा सर्व भक्तांसाठी अमृतवल्लीच आहे. या ग्रंथात महाराजांच्या सर्व लिला अतिशय रसाळ ओव्यात शब्दबद्ध केलेल्या आहेत. श्रीगजानन बाबांच्या चरित्रा संबंधी विचार केला तर, सर्व लिला प्रसंग अगदी प्रगटदिना पासून ते समाधी लिले पर्यंत सर्वत्र एक समान दुवा आढळतो आणि तो म्हणजे महाराजांनी आपल्या प्रत्येक कृतीतून भक्तांना ,जगाला, संपूर्ण मानवजातीला काहीतरी शिकवणच दिली आहे. मग ते देविदास पातुरकरांच्या वाड्याबाहेर शिते वेचुन "अन्नम ब्रह्मेती" असो किंवा बापुना काळेला विठ्ठल दर्शन असो.प्रत्तेक कृतीत काहीतरी विशेष रहस्य असायचे.श्रीदासगणु महाराजांनी सद्गुरु बाबांच्या प्रगटीकरणावर फार सुंदर ओव्या रचल्या आहेत ,ते म्हणतात,
"त्या शेगांव सरोवरीं भले । गजानन कमल उदया आले । जें सौरभे वेधिते झालें । या अखिल ब्रह्मांडा ।।"
          खरंच श्रीगजानन महाराजांच्या या दिव्य प्रभेने सामान्य भक्तांनाच काय तर लोकमान्य टिळकांसारख्या युगपुरुषाला, सद्गुरु श्रीमाधान निवासी गुलाबराव महाराज, दत्तावतारी श्री टेंबे स्वामी महाराजांसारख्या जगविख्यात संतमंडळींनाही आपल्याकडे आकर्षित केले होते.ही काय सामान्य बाब नव्हे.असे अनेक संत मंडळींनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महाराजांची भेट घेतली होती  किंवा त्यांच्या बद्दल प्रेम व्यक्त केलेले होते. त्यातील असाच एक दिव्य प्रसंग म्हणजे,
श्रीगजानन बाबांनी ऋषी पंचमीला आपला देह अनंतात विलीन केला व ते वैश्विक देह धारण करते झाले.त्याच वेळी इकडे शिर्डीत सद्गुरु साई समर्थांनी जमिनीवर लोळण घेत दु:खाने आक्रोश केला होता."माझा भाऊ देह ठेऊन जातोय " म्हणून ते रडत होते.दुसर्या दिवशी त्यांनी आपले मुंडन केले व भक्तांकरवी नारळ फोडुन गुळ खोबरे वाटले होते.हा प्रसंग खुप काही सांगुन जातो.अकोट चे नरसिंग महाराज हे ही बाबांना मोठा भाऊ मानत असत.
                              आज श्रीगजानन बाबांचा समाधी दिन त्यामुळे त्यांच्या चरित्राचे स्मरण करणे हे क्रमप्राप्त आहेच.मला बाबांच्या चरित्रातील भावलेले दोन‌ प्रसंग जे आजवर माझ्या जिवनातील पाथेयच झाले आहेत ते इथे मांडतो.पहिला म्हणजे बंकटलाल यांच्या शेतातील मका खाण्याचा प्रसंग आणि दुसरा बापुना काळे यांना श्रीमहाराजांच्या जागी झालेले विठ्ठल दर्शन.हे दोन्ही प्रसंग सर्वांनाच माहिती आहेत असे मी गृहीत धरतो म्हणून ते सविस्तर वर्णन करत नाही.तरी यातील जो भाग मला भावला तो मांडतो. श्रीमहाराज जेव्हा बंकटलालच्या विनंतीला मान्य करून त्याच्या शेतात मक्याची कणसे खाण्यास जातात.कणसे शेकोटीवर भाजतांनी वरील गांधील माशीच्या पोळातील माशा उठतात व तो पूर्ण जत्था तेथील माणसांवर हल्ला करतो.त्यावेळी श्री महाराज तेथे अगदी निवांतपणे बसलेले असतात.कुणीही महाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न ही करत नाहीत.सर्व आपल्याला माशी चावणार नाही यासाठी धडपडत असतात.या सर्व प्रकारात एकमात्र बंकटलाल मनातुन दु:खी होतो व श्रीमहाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो.श्रीमहाराजांनाही त्याच्या मनातील शुद्ध भावाची जाणिव होते व ते त्या माशांना पुन्हा आपल्या जागेवर जाण्याची आज्ञा करतात.त्यावेळी श्रीमहाराज बंकटलालला उपदेश करतात तो खरच चिंतनीय असा आहे.श्रीमहाराज म्हणतात,

" अरे ते जिव विषारी । बैसले माझ्या अंगावरी । माझ्यापासून झाले दूरी । लड्डूभक्त येधवा ।।२८।।
याचा करी विचार । संकट आल्या कोणावर ।
कोणी न साह्य करणार । एका ईश्वरावाचुनी ।।२९।। "

              या दोन ओव्यात संपूर्ण जिवन प्रवासाचा सारचं सांगितला आहे.जिवनभर आपण कुठल्यातरी व्यक्तीसाठी,गोष्टीसाठी आसक्त असतो.त्या आसक्तीने आपला विवेक आणि अमुल्य असा वेळ आपण गमावून बसतो आणि एक दिवस जरा,व्याधीने ,संकटाने ग्रासल्यावर लक्षात येतं की 'माझा माझा' म्हणून मी ज्या नश्वर गोष्टींसाठी बेधुंद झालो होतो ,ज्या ऐहीकाच्या मागे जिवनभर वेळ व्यर्थ घालवला‌ ते सर्व संकटकाळी आपल्या सोडुन गेलेले असतात.कुणीही आपल्यासोबत संकटकाळी नसतात.हा अनुभव प्रत्येकाच्या जिवन प्रवासात कधीतरी आलेला असतोच आणि हे माहिती असुनही आपली बुद्धी भगवंतांच्या ,ईश्वराच्या चरणी वळवण्याची इच्छा कुणीही करत नाही.फक्त लड्डू भक्तासारखे त्यांच्याकडुन काहीतरी मिळवण्यासाठी आपणं फक्त मंदिराचे उंबरे झिजवत असतो.
दुसरा प्रसंग श्रीगजानन महाराज आपल्या शेगांवच्या भक्त मंडळींसमवेत जेव्हा आषाढी वारी करीता पंढरपूर येथे गेलेले होते.त्यावेळी बापुना काळे या गरीब भक्ताची चुकामुक झाल्यामुळे त्याला पांडुरंगाचे दर्शन घडतं नाही.दर्शन न झाल्यामुळे तो अतिशय खिन्न व उदास अंत:करणाने दिवसभर बसून असतो.सर्व लोक त्याची टिंगल टवाळी करत असतात आणि श्रीमहाराज खोलीतील त्यांच्या आसनावरून हा सर्व प्रकार बघत असतात. बापुनांच्या मनातील शुद्ध भक्ती,शुद्ध भाव बघून महाराज त्याच्या पुढे उभे राहतात व त्याला आपल्या ठिकाणी विठुरायाचे तेच मंदिरातील सगुण रुपाचे दर्शन घडवतात. आता यापुढे जेव्हा इतरही भक्त त्यांना असे दर्शन घडविण्याची विनंती करतात तेव्हा त्या सर्वांना महाराज म्हणतात,

ऐसें ऐकतां भाषण । बोलते झाले गजानन ।
बापुनासारिखें आधीं मन । तुम्ही करा रे आपुलें ॥४९॥

तें तसें झाल्यावरी । दर्शन घडवीन निर्धारीं ।
ही दर्शन वस्तु खरी । काय मिळे बाजारांत ? ॥१५०॥

म्हणून ती आणून । देऊं तुम्हांकारण ।
निष्पाप करा आधीं मन । तरीच पुढचें घडेल हें ॥५१॥
                   
                    संपूर्ण परमार्थाचे सार यात आले आहे.वरील प्रसंग पाहता एक गोष्ट ध्यानात येते ती म्हणजे तेथील सर्व लोक आधीच पांडुरंगाचे दर्शन करुन आले होते पण महाराज म्हणातात, "निष्पाप करा आधी मन" मनात पाप ,इर्षा , द्वेष ,कपट आणि ढोंग करुन केलेली प्रत्येक कृती ही फक्त बाह्य दिखावाच ठरतो मग ती पुजा असो,जप असो,देव दर्शन असो वा आणखी काही साधन असो.बापुनासारखे निष्पाप मन झाले तर प्रत्यक्ष भगवंतही पुढे उभे राहतात.हीच गोष्ट भगवान रामकृष्णांनी आपल्या भक्तांना सांगितली होती ,'तुमचे मन आधी निष्पाप करा ,लहान बाळ आपल्या आईच्या भेटीसाठी ज्या आकांताने रडतो ,त्याच्या मनात आईच्या भेटीशिवाय इतर कुठलाही भाव नसतो ,तसे निष्पाप अंतःकरणाने जर भक्ताने भगवंताला आळवलं तर तो धावुन येतोच यात शंका नाहीच." सर्व संतांनी एकमुखाने याची ग्वाही दिली आहे. महाराज म्हणातात परमार्थ हा काही व्यापार नव्हे, मी पाच वार्या करेन,एक नारळ चढवेल,अमुक दक्षिणा देईल ,अमुक पुजा करेन आणि मग भगवंत मला दर्शन देतील ,कृपा करतील तर हे अशक्यप्राय आहे. कारण जोवर बापुना सारखे शुद्ध ,निष्पाप मन होत नाही तोवर सर्व बाह्य अवंडंबराशिवाय काही नाही.
                          खरंतर महाराज सर्वांचेच आहेत , त्यांना महाराष्ट्र,भारत अशा प्रांतात आपण वाटु शकत नाही.ते या अखिल ब्रह्मांडाचे नायक आहेत.तरीही आम्हा विदर्भीय लोकांसाठी श्रीगजानन महाराज हे आराध्य दैवतच आहेत.लग्न झालं की आधी गजानन बाबांचे दर्शन ,बाळ जन्माला आलं की पहिलं दर्शन बाबांचे, सुट्टीत देवदर्शन म्हणजे आधी शेगांव, घरातील मुख्य संत ज्यांना आम्ही महाराज न म्हणता आमचे बाबाच मानतो ते म्हणजे गजानन महाराज.कुठल्याही शुभ प्रसंगी महिला मान तो गजानन बाबांनाच. आता ही एक पद्धत न राहता हा एक संस्कारच झाला आहे.
आज  ऋषीपंचमीच्या दिवशी अगदी गल्लीबोळात ठिकठिकाणी महाप्रसाद, पुजा , पारायण , उत्सव असतो. आम्हाला देव ,संत हे कळतही नव्हते तेव्हापासून ते आपल्या घरातील एक व्यक्ती आहेत ,आपले बाबा आहेत हा विचार नकळत आम्हा सर्वांच्या अंतर्मनावर बिंबविल्या जातो.तो एक भावनीक संस्कराच मनावर अधिराज्य करतो आणि हे सर्व देव व संतांच्या बाबतीत नसुन श्रीमहाराजांच्याच बाबतीत आहे हे विशेष.सर्व संतामध्ये बाबा म्हणजे कुठेतरी माझे हक्काचे आहेत हा भाव प्रत्येक विदर्भवासीयाच्या मनात असतोच.आधूनिक काळातील हा ऋषी दृष्यरुपात जरी दिसत नसला तरी निर्गुण रुपात महाराज गेली १०० वर्ष झाले शेगावातच आहेत.याचेच अनेक अनुभव आजही शरणागत भक्ताला येतात आणि येत आले आहेत.महाराजांनी देह ठेवल्यावर अनेक वेळा याची प्रचिती दिली आहे.त्याची काही उदाहरणे दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात दिली आहेत.त्यात शेगावातील गणपत कोठाडे नामक भक्ताच्या पत्नीला  महाराजांनी स्वप्नात दर्शन देऊन तो करत असलेल्या धर्मकार्याला अडथळा न करण्याची आज्ञा केली.तसेच बोरीबंदरावर लक्ष्मण हरी जांजाळ या हताश झालेल्या भक्ताला स्वतः सगुण रुपात भेट दिली व त्याला उपदेश करुन गुप्त झाले.तसेच कृष्णाजी पाटलांचा रामचंद्र नावाचा पुत्र होता.त्यांच्या घरी महाराज स्वतः भिक्षेकरीच्या रुपात गेले.त्यांच्या घरी जेवले व सर्व परिवारास आशिर्वाद देऊन रामचंद्रांना उपदेश केला.आपल्या मठाची व्यवस्था करण्याची आज्ञा केली व घराबाहेर जाऊन गुप्त झाले.असे एक नाही तर गेल्या शंभर वर्षात लाखो अनुभव पदोपदी करोडो भक्तांना आले आहेत आणि येत आहेत.या अनुभवांचे संकलन जर केले तर महाराजांच्या कृपा अनुभवांचा एक मोठा कोषच निर्माण होईल.भक्तवत्सल समर्थ सद्गुरु श्रीगजानन महाराजांच्या गादीवर काही काळ बाळा भाऊ राहीले व पुढे बाळाभाऊंनी देह ठेवल्यावर नांदुरा ग्रामीचे नारायण महाराज यांना महाराजांनी आज्ञा करुन आपल्या गादीवर बसण्यास सांगितले.त्यानंतर आजतागायत महाराजांच्या समाधी मंदिरात महाराजांच्या दर्शनासाठी जगभरातून भक्त येतात.महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन चिंतामुक्त होतात.
अशा या परब्रह्म भगवंतांचा आज ११२ वा समाधी दिन आणि याच परमपावन तिथीला बेळगाव निवासी सद्गुरु माउली कलावती आईंची जयंती असते.लवकरच आपण आईंच्या चरित्राचे चिंतन करण्याचा प्रयत्न करुयात.
सद्गुरु कलावती आईंच्या  व समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबांच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि त्यांनी आपल्या सर्वांना सद्गुरुप्रदत्त मार्गावर चालण्याची बुद्धी द्यावी हीच प्रार्थना करतो.
 
✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी/वाशिम✒️✍️

ॐ नमो भगवते श्रीगजानन बाबा । ॐ नमो सद्गुरु श्री गजानन बाबा ।। 

                ‌                 

श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तवत्सल भक्तप्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय 🙏🌺🌸🌼🙏🌺🌸🌼🙏🌺🌸🌼🙏🌺🌸


प्रथम दत्तावतार भगवान श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभुंची जयंती🌺🌸🙏🚩

 


भगवान_श्रीपाद_श्रीवल्लभ_महाप्रभुंची_जयंती:-

श्रीपाद_राजं_शरणं_प्रपद्धे ।। 🌺🌸🚩🙏

   

                                  आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी आज पिठापूर-कुरवपूर निवासी भक्तवत्सल भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभुंची जयंती.आजच्या तिथीला सुर्योदयावेळी भगवान श्रीदत्तात्रेय प्रभुंनी पिठापूर येथे भक्तोद्धारक असा अलौकिक असलेला अवतार धारण केला.सकल दत्तसंप्रदायाचे मुळ पिठ,प्रथम पूर्ण दत्तात्रेय अवतार असलेले आमचे इष्ट दैवत भगवान श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभुंचे दिव्य चरित्र आपल्याला श्रृत आहेच.आज पार्थिव गणेश स्थापना व‌ पूजनाचा परम मंगल दिन.या शुभ दिवशी आपण श्रीप्रभुंच्या दिव्य लिलांचे स्मरण करुयात.श्रीप्रभुंची अवतार लिला आपण "गुरुचरित्र" या दिव्य ग्रंथाच्या पाचव्या ते दहाव्या अध्यायात वाचली आहेच. गुरुचरित्रात आलेले श्रीप्रभुंचे चरित्र हेच या लेखासाठी व लिला कथा चिंतनासाठी आधारभूत आहे.

                            आंध्र प्रदेश येथे पिठापूर या गावात आप्पळराज शर्मा नावाचे आपस्तंभ शाखेचे ब्राह्मण राहत असत.त्यांच्या पत्नीचे नाव सुमती असे होते.या अतिशय धर्मपरायण आणि आचारनिष्ठ साध्वी होत्या.दोघेही परमभगवद भक्त असलेले हे दाम्पत्य नित्य विष्णू उपासनेत रममाण झालेले असे.एके दिवशी महालय अमावस्येच्या पर्वकाळी आप्पळराजांच्या घरी श्राद्ध विधी होता.सुमती मातेने ब्राह्मण भोजनाची पूर्ण तयारी करुन ठेवली होती.पण अद्याप ब्राम्हण लोक आले नव्हते.अशातच भक्तवत्सल भगवान दत्तात्रेय प्रभु विप्र वेषात मध्यान्ही आप्पाळराजांच्या दारात भिक्षेसाठी उभे ठाकले.दारी आलेले हे परम तेजस्वी भिक्षूक बघून सुमती मातेला अतिशय आनंद झाला.त्यांनी ब्राह्मण भोजनासाठी केलेले अन्न श्राद्ध विधी पूर्वीच देवांना भिक्षेत दिले.तिचा हा अतिशय सात्विक भाव बघून भगवान श्रीदत्तात्रेय प्रभु अतिशय आनंदीत झाले आणि त्यांनी तिला आपले निजरुप म्हणजे तिनं शिर ,सहा हात असलेल्या दिव्य रुपात दर्शन दिले.श्रीदत्तात्रेय प्रभुंनी सुमती मातेला वर मागण्यास सांगितले.दत्तप्रभु म्हणाले , 

"माग माते जे इच्छिसी । जे जे वासना तुझे मानसी । पावसी त्वरीत म्हणतसे ।।" अर्थात माते तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ती माग,ती तात्काळ मी पूर्ण करतो.

तेव्हा सुमती माता म्हणाली , "देवा आपण मला माता म्हणाले तेव्हा आता तेच वचन आपण सार्थ करावे.मला बरेच पुत्र झाले पण ते अल्पायुषी ठरले.त्यातील दोघे जे‌ राहिले ते अंध व पंगू आहेत.तेव्हा देवा आपल्यासारखा ज्ञानवंत,जगद्वंद्य,सुंदर,तेजस्वी,जगदोद्धारक असा पुत्र मला व्हावा" असा वर तिने मागितला.देवांनीही तसाच वर सुमती मातेला दिला.ते म्हणाले , "माते तुम्हाला जगदोद्धारक , जगद्वंद्य असा अलौकिक पुत्र होईल.तो तुमच्या संपूर्ण वंशाचा तर उद्धार करेलच पण कलीयुगात विश्ववंद्य होईल.त्याची किर्ती त्रिभुवनात गाजेल.तो तुमचे सर्व दु:ख दूर करेल आणि तुम्हाला सुख देईन. पण तो तुमच्या जवळ जास्त काळ राहणार नाही." असा वर देऊन भगवान दत्तात्रेय प्रभु गुप्त झाले.देवांचे हे वचन ऐकून सुमती माता अतिशय आनंदित झाल्या व त्यांनी हा सर्व वृत्तांत आप्पाळराजांना सांगितला‌.ते ही अतिशय आनंदित झाले आणि भगवंतांचे स्मरण करु लागले.यथावकाश सुमती माता गर्भवती झाल्या व प्रत्यक्ष दत्तप्रभु आपल्या भक्ताला दिलेल्या वरदानासाठी गर्भवासी झाले.खरंतर हा काही आपल्या मानवा सारखा गर्भवास नक्कीच नव्हता.तरी आता सुमती मातेच्या पुत्ररुपात प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक श्रीभगवंतच आता सगुण देह धारण करुन लिला करणार होते. पुढे नऊ मास पूर्ण झाल्यावर भाद्रपद शुद्ध चतुर्थी या शुभ दिवशी भगवान श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभुंनी अवतार धारण केला.जणूकाही आपणच ओंकार स्वरुप मुळपिठ श्रीगजानन आहोत याची जाणीव भक्तांना व्हावी म्हणून श्रीप्रभुंनी हा दिवस निवडला असावा.वडिलांनी जातकर्म करुन भरपूर दानधर्म केला व पुत्रमुखाचे अवलोकन केले.विद्वान असलेल्या ब्राह्मणांनी या बालकाची जन्मपत्रिका मांडली आणि त्यावरुन त्यांचे भविष्य माता-पित्याला सांगितले.ते म्हटले , "तुमचा पुत्र हा महान तपस्वी होईल ,तो जगदोद्धारक दिक्षा कर्ता जगद्गुरु होईल." आप्पळराज आणि सुमती मातेला भगवान दत्तात्रेय प्रभुंचे वरदान ठाऊक होतेच .हे जाणुन त्यांनी या दिव्य बालकाचे नाव "श्रीपाद" असे ठेवले.या दिव्य बालकाचे अतिशय आनंदाने हे दोघेही संगोपन करु लागले.यथावकाश बाल लिला करता करता बाल श्रीपादप्रभु सात वर्षांचे झाले.श्री आप्पाळराजांनी शुभ मुहूर्त पाहून श्रीपादांचे मौंजीबंधन केले‌.मुंज होताच श्रीप्रभु चारही वेद म्हणू लागले.ते न्यायशास्त्र, मिमांसा ,तर्कादी शास्त्रांवर भाष्य ,चर्चा करु लागले.त्यांची ही असामान्य कृती बघून शेकडो लोक श्रीप्रभुंच्या मुखातून निघणार्या ज्ञान गंगेचा लाभ घेण्यासाठी पिठापूरात येऊ लागले‌. { बालपणापासून ते सोळा वर्षांच्या कालावधीत श्रीप्रभुंनी केलेल्या लिलांचे वर्णन "श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत" या ग्रंथात आले आहे. या लेखातील चिंतन हे श्रीगुरुचरित्रात आलेल्या श्रीपाद प्रभूंच्या लिलांना आधारभूत धरुनच असल्याने संक्षिप्त आहे.सविस्तर लिला वाचनासाठी आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ वाचावा } सोळा वर्षांच्या श्रीपादांचा विवाह करण्याचा विचार त्यांचे माता पिता करु लागले.त्यावेळी श्रीपाद प्रभु म्हणाले , "माझा विवाह हा वैराग्य स्त्री शी झाला आहे.ती स्त्री सोडून इतर सर्व स्त्रिया माझ्यासाठी मातेसमान पूज्य आहेत.मी तापसी ब्रह्मचारी आहे.योगस्त्रीयेवाचुन इतर कोणत्याही स्त्री बरोबर मी विवाह करणारच नाही.तीच माझी पत्नी आहे.माझे नावच श्रीवल्लभ आहे.मी आता तप करण्याकरिता हिमालयात जाणार आहे." हे ऐकताच माता-पित्यांना अत्यंत वाईट वाटले.पण त्यांना दत्तात्रेय प्रभूंचे वरदान ठाऊक होते.दत्तप्रभु म्हणालेच होते , "तुम्हाला जगदोद्धारक सर्वपूज्य जगद्गुरु पुत्र होईल.तो जसे म्हणेल तसे वागा यातच तुमचे कल्याण आहे." त्यामुळे त्यांनी श्रीप्रभुंना तपाचरण करण्यासाठी प्रस्थान करण्याची परवानगी दिली. आपल्या आई वडिलांचे दु:ख बघुन श्रीपाद प्रभु त्यांना म्हणाले, "तुम्ही काही चिंता करु नका.तुम्हाला हवे तसे मिळेल." असे म्हणाल्यावर श्रीप्रभुंनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या भावाकडे नुसते अमृतदृष्टीने बघितले.तसे पाहिल्याक्षणीच जसे परिसाला लोखंड लागल्यावर सोने होते तसे तत्क्षणी त्यांच्या आंधळ्या भावाला दृष्टी आणि पांगळ्याला पाय आले.श्रीप्रभुंच्या या कृपा करुणेचा आविष्कार बघून दोघेही प्रभु चरणी नतमस्तक झाले.श्रीपाद प्रभुंनी दोघांनाही आशिर्वाद दिला.त्यांना आई वडिलांची सेवा करण्यास सांगितले.तसेच दिर्घायुष्य,सुख आणि मोक्षाची प्राप्ती होण्याचा शुभाशिर्वाद त्यांना दिला. आई वडिलांना आनंदात ईश्वर स्मरणात राहण्याचे सांगून "आता आम्ही उत्तरेकडे जाण्यास निघालो आहे.अनेक साधुजनांना मी दिक्षा देणार आहे." असे सांगून ते हिमालयाकडे निघाले.घरातून बाहेर‌ पडताच श्रीप्रभु गुप्त झाले‌ व गुप्तपणे काशीक्षेत्री आले.तेथून बद्रिकाश्रमी आले.तेथे नारायणाचे दर्शन घेऊन आपल्या अवतार कार्याला आता सुरवात झाली आहे असे सांगुन गोकर्ण क्षेत्री आले.

    

                             पुढे भगवान श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभु तिनं वर्ष गुप्त रुपाने गोकर्ण क्षेत्री वास करुन होते.त्यानंतर काही महिने श्रीप्रभु श्रीशैल्य क्षेत्री आले.श्रीशैल्य क्षेत्री अनेक सिद्ध महात्म्यांवर कृपा अनुग्रह करुन ते आपल्या निजस्थानास म्हणजे "श्रीक्षेत्र कुरवपूर" येथे आले.कुरवपूर हे महाक्षेत्र आहे.येथे ज्यावेळी श्रीप्रभु आले त्यावेळी तेथे त्यांच्या दर्शनासाठी मानवच काय तर देव,गंधर्व ,ऋषी, मुनी, सिद्ध, महासिद्ध येत असत.पुढे सोळा वर्ष श्रीप्रभुंचा कुरवपूर येथे वास होता. येथेच आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले आणि श्रीप्रभुंच्या अत्यंत करुणेनी ओतप्रोत भरलेली दिव्य "अंबामातेची" कथा घटली आहे. श्री प्रभु कुरवपूरात असतांनाच त्याच क्षेत्रात एक सत्पात्री ब्राह्मण राहत असे.तो व त्याची पत्नी अंबिका जी अत्यंत धर्मपरायण व सात्विक होती.हे दोघेही आनंदाने आपले जिवन व्यतित करित होते.ब्राह्मण भिक्षूकी करुन आपला व आपल्या पत्नीचा उदरनिर्वाह करीत असे.पुढे यांना एक पुत्र झाला जो जन्मतः मतिमंद होता.त्यावर त्यांनी अनेक उपाय केले पण त्याचा काही परिणाम झाला नाही.तो मुलगा आठ वर्षांचा झाला तेव्हा त्याचे मौंजीबंधन करण्यात आले.तरीही त्यात काहीही बदल झाला नाही.पुढे तो ब्राह्मण अकस्मात मृत्यू पावला.त्यामुळे त्या निराधार स्त्रीवर दु:खाचे डोंगर कोसळले.घरात दैन्य व पदरी असा जडमुढ मतिमंद मुलगा याचे आत्यांंतिक दु:ख तिला होत असे.एके दिवशी यातुन मुक्त होण्यासाठी ती त्या मुलाला बरोबर घेऊन कृष्णामाईत आत्महत्या करण्याकरिता निघाली.जाता जाता एका ठिकाणी नदीकाठी ती आली.जवळच भगवान श्रीपाद प्रभु तिथे स्नान करत होते.मरणाआधी साधू चे आशिर्वाद घ्यावे या विचाराने ती श्रीप्रभुंकडे आली.तिने श्रीचरणी पाण्यातच नमस्कार केला व श्रीपाद प्रभुंना म्हणाली , "मी या गंगेत मुलासोबत प्राणत्याग करण्याकरीता जात आहे.आत्महत्या करणे महापाप आहे त्यामुळे आम्हाला त्यानंतर सद्गती मिळावी असा आम्हाला आशिर्वाद द्यावा." "तुम्ही आत्महत्या का करीत आहात?" असा प्रश्न श्रीपाद प्रभुंनी तिला विचारला.तेव्हा तिने श्रीप्रभुंना सर्व हकिकत निवेदन केली.शेवटी ती प्रभुंना म्हणली, "यतिराज,आता पुढल्या जन्मी तरी आपल्यासारखा त्रैलोक्यपूज्य पुत्र मला व्हावा." तेव्हा श्रीपाद प्रभुंंनी तिला शिवाराधना करण्याचा उपदेश‌ केला.तिला प्रभुंनी शनिप्रदोषव्रत महात्म्य सांगितले.त्यासाठी त्यांनी त्या स्त्रीला दोन कथा सांगितल्या व "तू सुद्धा प्रदोष व्रत कर.तुला माझ्यासारखा पुत्र होईल.तू कसलीही चिंता करु नकोस.मनात शंकाही बाळगू नकोस." असे बोलून श्रीपाद प्रभुंनी त्या स्त्रीला अनेक आशिर्वाद दिले.तिच्या मतिमंद मुलाला जवळ बोलावून त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला.त्याचक्षणी त्या मतीमंद मुलाच्या ठिकाणी सर्व ज्ञान प्रगट झाले.तो मुलगा अत्यंत तेजस्वी दिसु लागला.हे बघून त्या स्त्रीला अत्यंत आनंद झाला.ती श्रीपाद प्रभुंना म्हणाली , "मला आपल्या रुपात प्रत्यक्ष परमेश्वरच भेटला आहे.पुढील जन्मी मला आपल्यासारखाच पुत्र होणार आहे याबद्दल आता मला तिळमात्र शंका उरली नाही." तिने श्रीपादांनाच श्रीशंकर मानून नित्य प्रदोष पुजा करण्याचे व्रत घेतले.तिच्या पुत्राचा पुढे विवाह झाला.श्रीपादांचे स्मरण करता करता ती स्त्री पुढे श्रीपादांच्या चरणी लिन झाली.हीच स्त्री पुढे विदर्भातील कारंजा क्षेत्री अंबीका याच नावाने जन्माला आली.ती या जन्मातही प्रदोष व्रत करित असे.या अंबामातेच्या पोटीच पुन्हा श्रीपाद प्रभु नरहरी नावे अवतार धारण करते झाले व पुढे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या नावे विश्ववंद्य जगविख्यात झाले.श्रीपाद प्रभुंचे श्रीगुरु महाराजांच्या रुपातील अवतार कार्य आपण सर्वांनी गुरुचरित्रात वाचले असेलच.तसेच श्रीपाद प्रभुंनी याच क्षेत्री रजकाला वरदान दिले होते.तो रजक पुढे बिदर चा सुलतान मुस्लिम राजा म्हणून जन्मास आला.या जन्मात तो देवांच्या वरदानाप्रमाणे त्यांच्या पुढील अवताराला म्हणजे श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना गाणगापूरात येऊन भेटला होता.आपले असे दिव्य अवतार कार्य पूर्ण करुन श्रीप्रभु कुरवपूर येथे श्रीगुरुद्वादशीच्या दिवशी कृष्णामाईत अंतर्धान झाले.कुरवपूर हे श्रीपाद प्रभूंचे निजस्थान आहे.आजही श्री प्रभू त्या क्षेत्री वास करुन आहेत.दत्तसंप्रदायाचे हे निर्गुण पिठ आहे.श्रीप्रभुंनी आपले अवतार कार्य पूर्ण करुन गुप्त झाल्यावर त्यांनी वल्लभेश ब्राह्माणाचे रक्षण करुन त्याला अभय दिले.स्वत: हातात त्रिशूळ व खड्ग घेऊन ते प्रगटले व त्यांनी चोरांचे निर्दालन केले .त्या वल्लभेश ब्राह्माणाचे रक्षण करुन पुन्हा प्रभु गुप्त झाले.ही कथा गुरुचरित्रातील दहाव्या अध्यायात आली आहेच.असे परमकरुणाघन, कृपामुर्ती, भक्तवत्सल, भक्ताभिमानी, भक्तकामकल्पदृम भगवान‌ श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभुंच्या चरणी माझे शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम.आपल्या सर्वांना श्रीप्रभुंनी त्यांच्या सुकोमल चरणांचा आश्रय द्यावा व आपल्या सर्वांवर कृपा करुणा करावी हेच मागणे मागतो आणि ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पण करतो.

  ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन: ।

द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ: ॥

"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा"

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺



   

Tuesday, August 23, 2022

आज सद्गुरु ताजुद्दिन बाबा नागपूर यांची पुण्यतिथी🌸🙏🏻🌺☘️


आज_सद्गुरु_श्रीताजुद्दीन_बाबांची_९७वी_पुण्यतिथी🙏🌺

               १९ व्या शतकात होऊन गेलेले श्रीताजुद्दीन बाबा हे एक लोकविलक्षण असे अवलिया संत होते. बाबांचा जन्म नागपूर पासुन जवळच १५ किमी असलेल्या कामठी या गावी झाला होता. या गावाला त्यावेळी १२५ वर्षांपूर्वी इंग्रजांच्या राजवटीचा फार मोठा तळ होता.बाबांचे वडील सैयद बद्रुद्दीन सैन्यामध्ये सुभेदार होते.आई मरीयम पण मद्रासी पलटन नं.१२ मध्ये सुभेदार पदावर काम करित होती. त्यामुळे ते कामठी भागातच राहत असत. २१ जानेवारी १८६१ पौष मास कृष्ण द्वितीया तिथीला आणि पहिजुबुल १२७९ हिजरी सन सोमवार सकाळी ५-१५ ला मरियम बी यांचे पोटी बाबांचा जन्म झाला.जन्मताच बाळ रडत नव्हते हा चमत्कार सर्व बघतच राहिले. कुणीतरी बाळाला जुन्या चालीरीती नवजात बाळाच्या टाळुवर व कानांच्या पाळ्यावर डाग देण्यात आले व तेव्हा बाळ रडायला लागलं.बाळाचा आवाज ऐकुन सर्वांना आनंद झाला.बाबा कधी-कधी डोळे बंद करुन रहात, कधी कधी बराच वेळ तोंडातुन आवाज निघत नसे.कधी कधी बराच वेळ एक टक पापनी न लवता बघत रहात हे सर्व चमत्कार लहानपणी पाळण्यातच त्यांची केले.त्यांच्या आई वडीलांनी त्यांचे नाव ताजुद्दीन ठेवले. जे आज सरकार ताज बाबा म्हणुन आपल्याला ठाऊक आहेत.बाबा एकवर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले.बाबांचा सांभाळ त्यांच्या आजीने व आईनेच केला.सहा वर्षाचे असताना त्यांचे नाव मदरशात घालण्यात आले.ते त्या मदरशात १५ वर्षे पर्यंत होते.या कालावधीत त्यांनी उर्दु, इंग्रजी फारसी भाषेचे ज्ञान प्राप्त केले. त्यांच्या शालेय जिवनात अशी घटना घडली ज्यामुळे त्यांच्या जिवनाला कलाटणीच मिळाली.एक दिवस मौलाना साहेब मुलांना शिकवत होते.एवढ्यात कामठीचे महान संत हजरत अब्दुल्ला शाह तिथुनच जात होते.त्यांनी जाता जाता वर्गात डोकावले तर यांची नजर ताजुद्दीन वर पडली.ते एकदम थांबले आणि वर्गात गेले आणि मौलाना साहेबांकडे पाहुन हसले व म्हणाले आपण याला काय शिकवता हा तर पूर्व जन्मीच सर्व शिकुन आला आहे.हजरत अब्दुल्ला शाह साहेबांचे हे वाक्य ऐकून मौलानांना अतिशय आश्चर्य वाटले कारण हजरत शाह बाबा फार मोठे संत होते.त्यांचे म्हणणे खोटे असू शकत नाही यावर सर्वांचा विश्र्वास होता. हळु हळु हे संत ताजुद्दीन बाबांकडे येत असत व त्यांच्या जवळ गेल्यावर त्यांनी आपल्या झोळीतील अंजन काढले व अर्धे स्वत: लावले आणि राहिलेले प्रासादाच्या स्वरुपात ताजुद्दीन बाबांच्या मुखात ठेवले व त्यांना उपदेश केला की कमी खा ,कमी झोप व कमीत कमी बोल. कुराण शरीफ असे वाच की जसे तुच महम्मद आहेस.बाबांनी जसा प्रसाद ग्रहन केला तसा त्यांच्यात लगेचच परिवर्तन दिसायला लागले.त्यांचे अष्टसात्विक भावा जागे झाले.डोळ्यातुन अश्रुधारा वाहायला लागल्या.त्या तिनं दिवस सतत वाहत होत्या.हजरत अब्दुल्ला शाह साहेबांमुळे ताजुद्दीन बाबांच्या आतील सुप्त शक्तीच जागृत झाली.ते संपूर्ण अंतर्मुख झाले.ही त्यांची अवस्था तिनं दिवस होती.या घटनेनंतर त्यांच्यात अमुलाग्र बदल घडला.त्यांचे हसणे खेळणे एकदम कमी झाले.ते एकांत प्रिय झाले.जसे जसे दिवस जाऊ लागले तसे तसे ते अधिकच अंतर्मुख झाले.आपला जास्तित जास्त वेळ ते चिंतनात घालवीत असत.खाण्यापिण्यावर त्यांची वासना नाहीशी झाली.ते मोठ्या मोठ्या संतांचे ग्रंथ वाचु लागले.त्यांच्या हृदयातुन त्यांचे स्फुरण त्यांना होऊ लागले. पाठ्यपुस्तकात काहीही नाही हे त्यांच्या विद्यार्थी दशेतच लक्षात आले.आता त्यांनी अध्यात्म मार्गावर पुढे जाण्याचाच ध्यास घेतला.


         सन १८७९ च्या ॲागस्ट महिन्यात कामठीच्या कन्हान नदीला पूर आला.अर्ध्या पेक्षा जास्त कामठी पाण्यात बुडाली.बरीच घरे वाहून गेली.लोक बेघर झाले बाबांचे घरही त्यात वाहून गेले.त्यावेळी बाबा १८ वर्षाचे होते. बाबांची देहयष्टी चांगली सुदृढ होती व बाबा सहा फुटा पेक्षा जास्त उंचही होते. त्यांच्या मामांनी त्यांना २० व्या वर्षी नागपूरच्या रेजिमेंट नंबर १३ मध्ये सैनिक म्हणून भर्ती केले.या रेजिमेंट ला मद्रासी रेजिमेंट म्हणून ओळखले जायचे.१८८४ मध्ये ही रेजिमेंट सागरला रवाना झाली.सैन्याच्या नोकरीच्या दरम्यान बाबांनी देश विदेशाचा दौरा केला.बाबांना फ्रांस ला पाठविण्यात आले.तिकडुन ते हैदराबाद येथे आले.तिथे मिस्टर बेंस सैनिक अधिकारी त्यांच्या संपर्कात आले.त्यांना बाबांनी कुराण शरीफ शिकवीले.सैन्यात नोकरी करतांना ही बाबांच्या भक्तीत फरक पडत नव्हता.ते परमेश्वराची उपासना अखंत करत होतेच.त्यांच्या दैनंदीन जिवनात फार नियमीतता होती.सैन्यात असुन सुद्धा त्यांचे आचरण अतिशय पवित्र होते. पूर्वसंकेतानुसार सागरला असतांना बाबांना आपल्या सद्गुरुंचे स्थान मिळाले.त्यावेळी सागरला योगी हजरत दाऊद साहेब हुसैनी जंगलात राहत असत. त्यांनी या आपल्या जन्मोजन्मीच्या शिष्याला ओळखले होते व आपल्या कडे त्याला खेचण्यास सुरु केले होते.ते सुफी परंपरेतील श्रेष्ट चिप्ती या पंथाचे होते .आता बाबा आपले सैन्यातील काम करुन पिर साहेबांकडे जात असत.तेथेच त्यांची सेवा करीत असत.बरेच दिवस त्यांचा हा नेम अखंड चालु होता.काहीदिवसांनी पिर साहेबांनी ताजबाबांवर पूर्ण कृपा केली.बाबांना आत्मज्ञान दिले व आपला देह तिथेच ठेवला.तिथेच त्यांची समाधी बांधन्यात आली.आता बाबा रात्री अपरात्री जाऊन आपल्या गुरुंच्या समाधीजवळ बसुन ध्यान धारणा करु लागले होते.त्यांत त्यांची पूर्ण रात्र जाऊ लागली.बघता बघता ही वार्ता संपूर्ण मद्रासी रेजिमेंट मध्ये पसरली. यातुनच त्यांना पूर्ण आत्मोन्नतीचा अनुभव येऊ लागला. एक दिवस अचानक ते आपल्या अधिकार्या समोर आले व म्हणाले "सांभाळ आपली फौज आणि हा घे माझा राजीनामा." तो सैनिक अधिकारी बघतच राहिला.त्यांनी ही गोष्ट लगेचच बाबांच्या मामांचे सासरे जे तिथेच काम करत होते त्यांना कळवली.त्यांनी ही गोष्ट बाबांच्या आजीला कळवली.आजीला ही गोष्ट कळताच ती म्हणाली "माझा नातू पागल झाला आहे." ती ताबोडतोब सागरला गेली.तिथे गेल्यावर तिने पाहिले की बाबा सागरच्या गल्ली बोळात भ्रमीष्ठासारखे फिरत आहेत.त्यांना कसलेही भान राहीले नव्हते.कधी कधी ते जंगलात निघून जात तर कधी कुठल्याही झाडाखाली बसून ध्यान करु लागत.हे बघुन तीचा पक्का विश्र्वास झाला की आपला नातु ठार वेडा झाला आहे.ती लगेचच बाबांना घेऊन नागपूर ला परतली.हे वर्ष होते १८८७.कामठीत आल्यावर आज्जीने आपल्या नातवावर अनेक हकीम ,वैद्य,मांत्रिक,तांत्रिकाकडून उपचार करुन बघितले पण कशालाही यश आले नाही.हे बघुन ती फार दु:खी झाली.पण तिला काय ठाऊक बाबा कोणत्या आत्मानंदाच्या मस्तीत डुंबून गेले होते.बाबा आता बालोन्मत्तपिशाच्च वृत्तीत वावरु लागले.त्यांना कसलेही भान राहिले नाही.बाबा कामठीच्या गल्लीतुन फिरत असले की लहान मुळे त्यांच्या मागे फिरायची व त्यांना दगडं मारायची.त्यांच्यावर बाबा न रागवता ती दगडं गोळा करुन त्या पोरांना परत करतं.काही दिवसांनी बाबांची आज्जी स्वर्गवासी झाली.नंतर त्यांच्या मामांनी त्यांना चंद्रपुरात नेले.तिथे वन विभागात ते नोकरी करत असत.त्यामुळे जंगलातील आदीवासी लोकांकडुन बाबांचा इलाज करून बघितला पण काहीही झाले नाही.बाबा जंगलात फिरु लागले.चंद्रपूरच्या किल्ल्यात ध्यान करु लागले.त्यांना खाण्या पिण्याचेही लक्ष राहिले नाही.हे सर्व पाहून बाबांना परत कामठ्यात पाठविण्यात आले.आता कामठीत बाबांना अटकाव करणारे कुणीही राहिले नाही.ते आता मुक्तपणे संचार करु लागले.पाऊस पाण्याची चिंता नाही.आता ते नग्न होऊन तासन् तास फिरत राहतं.जर कुणी खायला दिले तर खात, नाहीतर कुणाला काहीही मागत नसत.अशा अवस्थेत ते कामठीत चार वर्ष राहीले.या चार वर्षांत त्यांनी असंख्य चमत्कार केले. (तुर्तास ते देण्याचे टाळतो...शब्द मर्यादेमुळे या पोस्ट मध्ये देणे शक्य नाही.पुढे यावर एक वेगळी पोस्ट करता येईल) बाबांच्या दैवी चमत्काराची बातमी पूर्ण कामठीभर पसरली हजारो लोक बाबांच्या दर्शनाला कामठीत येऊ लागले.कुणाला मुलगा हवा होता,कुणाला नोकरी,कुणाला पैसा तर कुणाला बढती.या सर्व प्रकाराला कंटाळून बाबा एक दिवस म्हटले की "आता मी पागलखान्यात जाणार" याचा लगेच दुसर्या दिवशी सर्वांना प्रत्यय आला .बाबा दुसर्या दिवशी छावणीतील एका युरोपियन महिला क्लबच्या समोर विवस्त्र जाऊन उभे राहले.बाबांना या अवस्थेत बघुन बायकांनी आरडाओरडा केला. वरिष्ठ अधिकारी येऊन बाबांना खुप मारु लागले.बाबा हसत म्हणत होते "हौजी हम तो पागल खानेमे जायेंगे."२६ अॉगस्ट १८९२ च्या गुरुवारी कामठीच्या कॅन्टोन्मेंट अधिकार्याने व जिल्हा न्यायाधिशांनी आदेश काढला की हा माणुस पागल आहे याला पागलखान्यात घेऊन जावे.बाबांना पागलखान्यात पाठविण्यात आले.पागलखान्यातील नोंद वहीत याची नोंद आहे.त्यावेळी बाबांचे वय ३१ होते.बाबा पुढे १६ वर्ष पागलखान्यातच होते.त्या १६ वर्षात बाबांनी हजारो चमत्कार केले.त्यांना सदेही कामठीत फिरताना अनेकांनी बघितले होते. तो प्रसंग असा, एका गुरवारी बाबांना पागलखान्यात ठेवण्यात आले त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना कामठीच्या रस्त्यावर फिरतांनी अनेकांनी बघितले.ही गोष्ट विजेसारखी सैनिकी तळावर पोचली.शुक्रवारी सकाळी बाबांना कामठीच्या बाजारात फिरतांनी एका सैनिकाने बघितले व तो कावराबावरा झाला.कारण त्यानेच काल बाबांना बंद केले होते.तो ताबडतोब आपल्या वरिष्ठांना हे सांगायला गेला.विरीष्ठ हे तपासण्यासाठी घोड्यावर कामठीत आला ,पाहतो तर बाबा एका झाडाखाली बसलेले.त्या अधिकार्याने ताबडतोब आपला घोडा नागपूर ला वळवला तो रागाने लाल झाला होता.तिथे जाऊन तो डॉक्टरांवर गरजला की "वह पागल कैसा है जिसे मैने कल यहाँ भेजा था" डॉक्टर म्हटले तो खोलीत आहे.अधिकारी त्यांच्या सोबत खोलीत बघायला गेला तर बाबा खोलीत बसलेले. हे बघुन तर त्याच्या तोंडचे पाणीच पळाले व हे कुणीतरी मोठे महाराज आहेत हे तो समजला .तोच बाबा म्हटले "हौजी तुम अपना काम करते, हम अपना काम करते" नंतर हा अधिकारी बाबांना शरणं आला व दर रविवारी तो आपल्या परिवाराला घेऊन बाबांच्या दर्शनाला येऊ लागला. पागलखान्यात राहुनही बाबांचा सर्वत्र संचार असायचा.ते विविध देह धारण करुन अनेक ठिकाणी सदेही असायचे.पागलखाण्यात त्यांना असंख्य संत,सत्पुरुष भेटायला जात असतं.असंख्य भक्तही पागलखान्यातच बाबांच्या दर्शनाला न चुकता येत असत.


           पागल खान्यात जे हजारो लोक येत त्यात नागपूर चे श्रीमंत रघोजीराजे भोसले (चतुर्थ) हे ही बाबांना भेटायला येत असत.त्यांना बाबांनी पूर्वसंकेत दिले व तोच शुभ शुकुन समजुन आपणच बाबांना सांभाळणार आहोत असा अर्ज करुन २००० रुपयांची जमानत भरुन आपल्या महलात बाबांना घेऊन आले. तो दिवस होता सोमवार २१ सप्टेंबर १९०८ .सक्करदरा महलाच्या आवारातच लालमहाल ही कोठी होती. तिथेच बाबांच्या राहण्याची सोय केली गेली. पण त्याच ठिकाणी हिरोजी महाराज हे ही संत राहत होते.यांचीही सेवा रघोजी महाराज करत असत.ताजुद्दीन बाबा लाल महालात आले आणि हसत रघोजी राजाला म्हटले "बडे भैया,जंगल घुमने आते,फिर तो यही बिस्तर लगेगा". बाबा इतर संतांना खुप मान देत असत.त्यांनंतर बाबा एक महिना राहले व वाकीच्या जंगलात निघून गेले. तिथून बाबा नागपूर पासुन २४ किमी जवळ असलेल्या वाकी या गावी आले.वाकीत ही बाबांनी असंख्य चमत्कार केले.अनेक लोकांच्या दु:खाचे हरण केले. अनेकांच्या अडचणी दुर केल्या.लोकांना भक्तीमार्गाला लावले.नागपूरच्या श्रीरघोजी राजांची बाबांवर अनन्य निष्ठा ,अतिव प्रेम होते.ते वारंवार वाकीला बाबांच्या दर्शनास येत असत.बाबांचेही त्यांच्यावर खुप प्रेम होते.हेच प्रेम बाबांना वाकीहून नागपूर ला परत घेऊन आले. राजांनी लाल महाल बाबांसाठी राखीव ठेवला होता.राजांनी काही पहेलवानांना बाबांच्या सेवेत ठेवले होते.फिरण्यासाठी एक बग्गीही दिली होती.तिथेही बाबांच्या दर्शनाला अफाट गर्दी जमत असे.बाबांच्या दर्शनाला भारतातुन हिंदु,मुस्लीम ,इंग्रज,राजा-महाराजा,पारशी विवीध लोक येत.त्या सगळ्यांची चोख व्यवस्था रघोजी राजे ठेवीत.हे सर्व लोक बाबांना काहीतरी अर्पन करीत . बाबांना येणारे कपडे,मिठाया या गरीबांना व पैसे बाबांच्या मामा आणि मावस भाऊ अब्दुल्ल जफ्फार ला देण्याचे चोख नियोजन रघुजी राजेंनी केले होते.पण काही मुसलमान लोकांना रघुजी राजांबद्दल असुया निर्माण झाली.त्यांनी बाबांच्या नातेवाईकांना रघोजी राजांविरुद्ध भडकावणे सुरु केले.मग काय १९२४ मध्ये रघोजींच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.याचा उद्देश एकच की रघोजींना बाबांपासून दूर करणे.या मुळे रघुजी राजे खुप दु:खी झाले.त्यांने हे दुःख बाबांजवळ बोलुन दाखवले .पण बाबा त्यांचे आपल्या वरिल निखळ निर्मळ प्रेम जाणुन होते. बाबा रघुजी राजांना म्हटले "मुझे यहॉसे कोन निकाल सकता है | मेरा बिस्तर तेरे घरमे लाखो बरस रहेगा ||" आणि हे आजही बघायला मिळते .आजही रघुजींच्या त्याच महालात बाबांचा पलंग आहे.जे आज छोटा ताज म्हणुन ओळखल्या जातं. जुनं १९२५ नंतर बाबांची तब्येत बिघडायला लागली. राजे रघुजीवरील न्यायालयातील केस मुळे बाबा आता जास्त कुठे जात नसत.जास्त कुणाशी बोलत नसत.आपल्या प्रेमळ भक्तावर असा आळ आणल्यामुळे बाबांना फार वाईट वाटे. इतर भक्तांमध्ये आता वाद सुरु झाले होते. काही लोकांनी बाबांना आपल्या सोबत ताजबाद मधे नेले.तिथे त्यांनी बाबांना राहण्यास फार आग्रह केला पण बाबा तिथे थांबले नाहीत.शनिवार दि.१५ ऑगस्ट १९२५ च्या सायंकाळी संपूर्ण नागपूर शहरात ही बातमी पसरली की ताजुद्दीन बाबांची तब्येत बिघडली आहे.मागील काही महिन्यापासून चालु असलेल्या दावे प्रतिदाव्यांमुळे बाबा खरोखरच नाराज झाले होते.त्याचवेळी त्यांनी हा नश्वर देह ठेवण्याचा निर्णय केला होता.काही भक्तांच्या स्वप्नात जाऊन त्यांनी तसे सांगितले ही होते. रघोजी राजे जातीने बाबांच्या सेवेत लक्ष घालू लागले व आता ते स्वत: सेवेत रुजू झाले.डॉक्टरही आले त्यांनी बाबांना तपासले पण कुठल्याही आजाराचे चिन्ह त्यांना दिसेनात त्यामुळे उपचार काय करायचा हा प्रश्न त्यांना पडला. बाबांच्या चेहर्यावरील तेज दिवसेंदिवस वाढत चालले होतं. रघोजी राजांच्या लक्षात आले की बाबा आता समाधी अवस्थेकडे चालले आहेत ते सर्व जगाशी आपला संबंध तोडत आहेत.बाबांच्या चेहर्यावर प्रगाढ शांतता होती. श्रावण वद्य त्रयोदशी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी तारीख १७ ऑगस्ट १९२५ ला लांब लांबून भक्त दर्शनाला येत होते.बाबांनी त्यांना आपल्या महानिर्वाणाची आधीच स्वप्नात माहिती दिली होती. त्यामुळे दुरवरुन लोक दर्शनाला आली होती. त्या भक्तांच्या रांगेत एक भगवेवस्त्रधारी साधु होता.त्याने बाबांच्या पायाला स्पर्ष करताच बाबांनी डोळे उघडले आणि म्हणाले ,"क्यु बाबू अभी तक यही हो" साधूने विचारले ,"हुजूर कहा जाऊ यह समझमे नहीं आता इसलिये यहाँ आता हू" बाबा हसत बोलले "आज हम जाते कल तुम जाना" अश्रुभरीत नेत्रांनी त्याने बाबांना नमस्कार केला व तो निघून गेला.हळु हळु संध्याकाळ होत आली.बाबांनी आपले डोळे उघडले पाहिले तर रघुजी राजे समोर उभे होते त्यांच्या डोळ्यातुन अश्रु वाहत होते बाबा हसुन म्हणाले "हो जी बडे भैया रोते काहे को हो हमारा बिस्तर तो यहा लाखो बरस तक लगा रहेगा" .आणि मग ते भक्तांकडे पाहुन आशिर्वाद देत पलंगावर जाऊन आडवे झालेत. त्यांनी एक खकार मारला व आपला आत्मा ब्रम्हांडात विलीन केला. ही बातमी वार्या सारखी सर्वत्र पसरली.हिंदु मुस्लिम सर्व लोक धाय मोकलून रडू लागले. नंतर बाबांच्या देहाला ताजबाग या जागेत मुस्लिम पद्धतीने कबरीत समाधी देण्यात आली. आजही बाबांच्या कृपेची करुणेची अनुभूती असंख्य लोक घेत आहेत. आज मोठा ताजबाग येथे बाबांची समाधी आहे आणि लालमहालाला छोटा ताज असे म्हटले जाते त्या ठिकाणी बाबांचा पलंग आजही आहे. 

बाबांच्या समाधी नंतर दहाव्या दिवशी काजी अमीनुद्दीन साहेब ताजाबाद दर्ग्याच्या पासून थोडे दूर अंतरावर उभे राहून मनातल्या मनात बाबांना विनंती करत होते की बाबा आपण सक्करदरा (लालमहाल)सोडून ताजाबादला रहायला आलात मी आपल्या आपल्या आदेशाप्रमाणे रघुजी राजांकडे काम करत होतो.जर आपली हरकत नसेल तर मी पण इथेच राहायला येऊन का? काजी साहेब मनातल्या मनात हे बोलत होते  इतक्यात करीम बादशाह उर्फ अल्लाह करीम जे बाबांचा चांगला शिष्य व संत पण होते ते त्यांना म्हणाले "तुझे बंगलेमे रहकर राजा को सलाम करने का हुकूम है" लाला बंगल्यातुन अजून बाबांचा पहारा उठला नाही.लाला बंगला महाराजांच्या महालात आहे आणि अजून तिथे ताजुद्दीन बाबा रहते है तु जा और खिदमद कर. आजही त्याठिकाणी बाबांच्या अस्तित्वाचा ,त्यांच्या कृपेचा अनुभव भक्तांना येतो.


अशा या दिव्य महात्म्यांच्या श्रीचरणी या पुण्यतिथी दिनी माझे श्री चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌼🍀


#श्रीदत्त_शरणं_मम🙏🏻🌺☘️🌸


#ताज_बाबा❤️🙏🌿


                त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✍🏻


( Note :- पुष्कळ लोक ताज बाबांचा जन्मोत्सव हा तारीखेने २७ जानेवारी ला ही साजरा करतात.पण मेहेर बाबांनी ही तारीख २१ जानेवारी सांगितली असल्याने मी तीच गृहीत धरली आहे. )

थोर दत्तावतारी महापुरुष सद्गुरु श्री नारायण महाराज केडगावकर यांची आज ७७वी पुण्यतिथी 🌸🙏🌺🚩



सद्गुरु_श्रीनारायण_महाराज_केडगावकरांची_आज_७७वी_पुण्यतिथी :-

                               श्रीदत्त संप्रदायातील थोर संत,दिव्य विभूती म्हणजे सद्गुरु श्री नारायण महाराज केडगावकर.आज सद्गुरु श्री नारायण महाराजांची ७७ वी पुण्यतिथी.माझे अत्यंत आवडते व जवळच्या तिर्थ क्षेत्रापैकी एक क्षेत्र म्हणजे केडगावचे दत्त क्षेत्र.पुण्याजवळच सोलापूर हायवे लगत चौफुला हे गाव आहे.तेथुन ७/८ किमी अंतरावर हे क्षेत्र आहे.श्रीमहाराजांनीच हे क्षेत्र वसविले.महाराजांची ही तपोभूमी.याच क्षेत्री प्रत्यक्ष दत्तप्रभुंनी महाराजांना आपल्या दिव्य निर्गुण पादुका दिल्या होत्या.या ठिकाणी महाराजांनी अतिशय दुर्मिळ अशी शिवप्रधान दत्तप्रभुंची स्थापना केली आहे.ही जागी महाराजांच्या दिव्य अनुष्ठानाने इतकी भारलेली आहे की आजही त्या सकारात्मक स्पंदनाची अनुभूती अनेक भक्तांना येते.

सद्गुरु नारायण महाराजांचे चरित्र अतिशय दिव्य आणि विलक्षण आहे.या आधी आपण श्री महाराजांचे संक्षिप्त चरित्राचे चिंतन केलेच आहे.त्या लेखाची ब्लॉग लिंक खाली देत आहे.आपण पुन्हा तो लेख लिंकवर क्लिक करुन वाचु शकता.ज्यांनी महाराजांचे चरित्र वाचले नसले किंवा ज्यांना महाराजांची माहिती नाही त्यांनी जरुर ब्लॉग लिंकवर क्लिक करुन महाराजांचे संक्षिप्त चरित्र वाचाच.अतिशय दिव्य, अलौकिक आणि चमत्कारिक असे महाराजांचे चरित्र आहे.

श्रीनारायण महाराजांच्या संक्षिप्त चरित्राची ब्लॉग लिंक👇

https://akshayrjadhav.blogspot.com/2022/06/blog-post_7.html

                                     आज महाराजांची पुण्यतिथी आज आपण महाराजांच्या चरित्रातील काही विलक्षण घटनांचे स्मरण करुयात.

श्रीमहाराज जुन्या बेटावर आल्यानंतर तिथे दत्तप्रभुंच्या दृष्टांतानंतर त्यांना जमिनीत निर्गुण पादुका प्राप्त झाल्या हा प्रसंग सविस्तरपणे आधीच्या लेखात आला आहे.एकदा महाराज सहज बसले असता त्यांना देवांचा दृष्टांत झाला की , "पुण्याला जाऊन श्रीमाळीबाबांचे दर्शन घे." हे माळी बाबा म्हणजे पुण्यातील अतिशय अधिकारी व महासिद्ध असलेले महात्मे.अतिशय प्रसिद्धीपराङमुख असलेले माळी बाबा म्हणजे साक्षात भगवंतांची विभुतीच होते.याच सद्गुरु सयाजीराव माळी महाराजांना भेटायला भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पुण्यात आले होते.तसेच धनकवडी चे सद्गुरु श्री शंकर महाराजांनी आपल्या समाधी पश्चात देहासोबत श्रीमाळी महाराजांच्या समाधीचे निर्माल्य ही ठेवायचे सांगितले होते.यावरुन श्री माळीबाबांचा अधिकार आपल्याला लक्षात येतो.श्रीमाळीबाबांचे चरित्र लवकरच आपण चिंतनासाठी घेऊयात.तर दुसर्या दिवशी श्री नारायण महाराज पुण्यास आले.एका करंडीत दोन हार, फुले,नारळ असे पुजा साहित्य घेऊन टांग्यात बसुन ते माळी बाबांकडे जाण्यास निघाले.पण माळीबाबांचा पत्ता काही केल्या त्यांना सापडेना.ते खुप वेळ तसेच फिरत राहिले.रात्री अकरा वाजता श्रीमाळीबाबांचे शिष्य व पुत्र मारुती महाराज यांच्याशी त्यांची गाठ पडली.दोघेही मग टांग्यातून महाराजांच्या ठिकाणी आले.आश्चर्य असे की एवढी रात्र झाल्यावरही श्रीमाळीबाबा हातात कंदील घेऊन दारात नारायण महाराजांची वाट बघत उभे होते.महाराजांना बघताच ते म्हणाले, "सांजपासून तुमची वाट पाहून राहिलो आहे की हो.इतका उशीर का हो केला?" त्यांनी श्री नारायण महाराजांना आपल्या मठीत नेले व जवळ बसविले. श्री महाराजांना लगेच भावसमाधी लागली.तसे होताच माळी बाबा त्यांच्या कानात हळूच म्हणाले , "अहो, अगुदर आम्ही काय सांगतो ते ऐका व मग समाधी सुखात रंगून जा.तुम्हाला एकट्याला हा आनंद नाही मिळवायचा बरं का हो.दुसर्यिलाही हा आनंद द्यायचा आहे तुम्हाला." हे ऐकताच श्री महाराज आपल्या पूर्वावस्थेत आले.तेव्हा माळी बाबा परत म्हणाले , "तुम्ही बेटावरील औदुंबर वृक्षाखाली काही दिवस सेवा करावी व मग कार्याला लागवे. ते ठिकाण सिद्धाचे आहे.तेथे तुमच्या अनुष्ठानाला तात्काळ फळ मिळणार आहे." हे ऐकल्यावर श्री नारायण महाराजांनी एक हार माळी बाबांच्या गळ्यात घातला,नारळ ठेवला व त्यांना वंदन करुन दुसरा हार त्यांच्या गुरुंच्या समाधीला घालणार इतक्यात 'थांबा! त्या हाराचे मला काम आहे." असे म्हणून श्रीमाळीबाबांनी श्रीमहाराजांचे हातातून हार घेतला व "आजपासून तुम्ही श्री नारायण महाराज झालात व हा हार श्री नारायण महाराज म्हणून आम्ही तुम्हांस घालतो." असे म्हणून त्यांनी श्रीमहाराजांचे गळ्यात तो हार घातला व त्यांना आशिर्वाद दिला.

                             श्री नारायण महाराज हे लोकविलक्षण सत्पुरुष होते.त्यांचा प्रचंड अधिकार आणि त्यांचे नावलौकिक सामान्य माणसांनीच काय तर संतांनी ही धन्योद्गाराने गौरविले होते.महाराजांबद्दल चा असाच एक विलक्षण प्रसंग चरित्रात आला आहे.बेलापूर बनातील श्रीमत परमहंस श्री विद्यानंद स्वामी महाराज हे श्रीमहाराजांचे समकालीन होते.ते अतिशय प्रसिद्ध महायोगी होते.या योगी श्री विद्यानंद स्वामी महाराजांनी सन १९०५ ला आपले अवतारकार्य संपविण्याचा निर्णय घेतला.त्यांनी आपल्या प्रमुख शिष्यांना बोलाविले.त्यांना महत्वाच्या सुचना‌ दिल्या.ते म्हणाले , "मी आता समाधी घेणार आहे.तुम्हाला बजावून सांगतो की , कोणीही माझ्या देहावर समाधी,छत्री,देऊळ वैगेरे बांधू नका.मी येथे येण्यापूर्वी ही जमिन गोचर म्हणजे गाईच्या चरण्यायोग्य होती.ती तशीच रहावी अशी माझी इच्छा होती.मी आता झोपतो.माझे घोरणे बंद झाले की माझा प्राण गेला‌ असे समजा.काही वेळातच १९०६ साली त्यांनी आपला देह ठेवला.समाधीस्थ होण्यापूर्वी त्यांनी आपल्या शिष्यांना अजुन एक महत्वाची सुचना दिली.ते म्हटले , "मी या पुढे कर्नाटकात जन्म घेणार आहे.व बालस्वरुपात प्रकट होणार आहे." नंतर एक दिवस ते म्हणाले , "मला नारायणाच्या शरीरात प्रवेश करायचा आहे,कारण ते शरीर अतिशय पवित्र आहे.पण तेथे पूर्वीच दुसरा दिव्य महात्मा येऊन बसला आहे.या वरील विधानांमुळे सर्व भक्तांची श्रद्धा आणि ठाम विश्वास बसला की नारायण महाराज हेच विद्यानंदांचे अवतार आहेत.तसेच एक विलक्षण घटना ही घडली होती.ज्यावेळी विद्यानंदांनी समाधी घेतली,त्याच दिवशी त्याच वेळेस इकडे श्री नारायण महाराज काही काळ अचेतन अवस्थेत होते.थोडा वेळ ते तसेच निर्जीव होते व त्या नंतर त्यांचे शरीर सचेतन झाले. श्रीविद्यानंद स्वामी महाराजांच्या भक्तांना अनेक अनुभव आले होते.त्यापैकी एक म्हणजे श्रीविद्यानंदाचे भक्त भोरचे श्री नानासाहेब गांडेकर यांना विद्यानंद महाराजांनी आपली एक तपकिरी ची डबी ठेवावयास दिली व म्हणाले, "आम्ही मागू तेव्हा ती आम्हाला परत द्याल." जेव्हा पुढे नारायण महाराज भोरला नानासाहेबांच्या घरी गेले,तेव्हा त्यांनी नानासाहेबांना म्हटले, "आम्ही तुमच्याजवळ आपली तपकिरीची डबी दिली होती ती आम्हास परत द्या." असे म्हणतात नानासाहेबांना नारायण महाराजांची ओळख पटली.असाच एक अनुभव मायजी गावचे स्टेशनमास्तर यांनाही आला होता.त्यामुळे विद्यानंद स्वामी महाराजांचे सर्व शिष्य महाराजांना शरणं आले व त्यांची सेवा करु लागले. यामुळे बेटात गुरुपौर्णिमेचा उत्सवाची ही विलक्षण पद्धत सुरु झाली.विद्यानंदांचीच पूर्ण विभुती हे नारायण महाराज आहेत ही ओळख पटल्यावर सर्व शिष्यांनी महाराजांच्याकडेच म्हणजे बेटावरच गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे ठरविले होते‌.पण श्री विद्यानंद स्वामी महाराजांनी आषाढ शुद्ध पौर्णिमेलाच समाधी घेतली होती.त्यामुळे सर्व शिष्य मंडळी श्रीविद्यानंदांच्या समाधी उत्सवाला बेलापूर येथे जात असल्यामुळे त्यांना आषाढ पौर्णिमेला बेटावर येणे शक्य नव्हते.म्हणून श्री नारायण महाराजांची गुरुपौर्णिमा ही भाद्रपद म्हणजे प्रौष्ठपदी पौर्णिमेला होऊ लागली.तेव्हापासून बेटावर गुरुपौर्णिमेचा उत्सव हा भाद्रपद पौर्णिमेला साजरा केला जाऊ लागला. आजही बेटावर गुरु पौर्णिमेचा उत्सव हा भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्याचा प्रघात आहे. असे श्री महाराजांचे दिव्य चरित्र आहे.आजच्या पुण्यपावन दिनी श्रीमहाराजांच्या चरित्राचे व त्यातील‌ काही लिलांचे आपण स्मरण करुन आपली स्मरण सेवा श्रीचरणी रुजू करुयात.श्रीमहाराजांच्या चरणी मी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो व ही शब्दसुमनांजली आपल्या सर्वांच्या तर्फे श्रीचरणी अर्पण करतो.

          ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

आज पावस निवासी प.पु.सद्गुरु श्री स्वामी स्वरुपानंदांची ४८ वी पुण्यतिथी.🚩🌺🌸🙏

 


आज पावस निवासी प.पु.सद्गुरु श्री स्वामी स्वरुपानंदांची ४८ वी पुण्यतिथी. श्री स्वामींच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌺🌸🕉️
                       भगवान करुणाब्रह्म ज्ञानेश्वर माउलींपासुन सुरु झालेल्या अनंत परंपरेतील एका दिव्य गुरुपरंपरेतील हे अलौकिक असे संतश्रेष्ठ... भगवान श्रीज्ञानेश्वर माउली हे स्वामी स्वरुपानंदाचे आराध्य स्थान. त्यामुळे कदाचित मला ही ते फारचं जवळचे भासतात... माउलींवरील स्वामींची श्रद्धा इतकी उत्कट आणि अनन्यसाधारण होती की त्यांच्या उत्तरकाळात ते म्हणत की "जर आम्ही माउलींच्या समाधी दर्शनाला समाधी समोर गेलो तर भावावेशात तिथेच हा देहत्याग होईल." त्यामुळे नंतर च्या काळात ते परत केव्हाही आळंदीला आले नाही... त्यांनीच श्रीक्षेत्र पावस येथे देह ठेवण्यापूर्वी,महासमाधी घेण्या आधी आपल्या अवताराबद्दल, कार्याबद्दल स्वत:च सांगुन ठेवले आहे ते त्यांच्याच शब्दांत इथे देतो...

"आजकालचे नहोंच आम्ही ।।
माऊलीनेच आम्हाला इथं पाठवलं.
दिलं काम तिच्याच कृपेने पुरं झालं.
आता आम्हाला नाही कुठं जायचं.
इथंच आनंदात राहायचं ।।
आणि माऊलीनंच अन्यत्र पाठवलं आणि तिथं अवतीर्ण व्हावं लागलं तरी आता चैतन्य स्वरुपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहेच."

                    अशा या दिव्य आणि अलौकीक संतांच्या परमपावन पुण्यतिथी दिवशी आपण त्यांच्या अतिशय विलक्षण, रसाळ व दिव्य चरित्राचे चिंतन करुयात.

आपल्या पावन महाराष्ट्र तथा भारत भुमीत आजवर असंख्य अलौकिक संत ,सत्पुरुष अवताराला आलेत... त्यापैकीच एक महत्तम विभुती म्हणजे श्रीस्वामी स्वरुपानंद... स्वामींच्या फोटोकडे बघताक्षणीच एक विलक्षण आकर्षण जाणवतं. त्यांची ती अतिव सात्त्विक दृष्टी, तो मायाळु ,प्रेमळ चेहेरा बघितला तरी मनात आनंदाच्या उर्मी उठतात. जणु चराचरातील सर्व कारुण्य या देहाच्या आश्रयाने येऊन राहिलं होतं. श्रीस्वामीजींचे जिवनचरित्र अगदी थक्क करणारे आहे. महाराष्ट्रातील या संत कवींची पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांचे चरित्राचे ओझरते दर्शन.
             करुणाब्रह्म भगवान भक्तवत्सल श्री ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेतील ,त्याच प्रभावळीतील श्रीस्वामीजी यांचा जन्म रत्नागिरी येथील पावस या गावी श्रीविष्णपंत व सौ.रखमाबाई यांच्या पोटी मार्गशीर्ष वद्य द्वादशी मंगळवारी १५ फेब्रुवारी १९०३ या दिवशी झाला.श्रीस्वामीजींचे नाव 'रामचंद्र' असे ठेवण्यात आले होते परंतु सर्व मंडळी त्यांना 'आप्पा' असेच संबोधीत असत. श्रीस्वामींच्या घरातील वातवरण शिस्तप्रिय,धार्मिक असे होते.लहानपणी त्यांचे आजोबा मुलांना स्तोत्र, गीतेतील काही अध्याय शिकवत असत. तसेच आपल्या आई-वडिलांचे उत्तम आचरण ,धर्मावरील श्रद्धा यांचा ठसा घरातील सर्व मुलांवर विशेषतः स्वामीजींवर पडला होता. श्रीस्वामींचे इयत्ता पाचवी पर्यंतचे शिक्षण हे पावसलाच पूर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी त्यांचे व त्यांचे बंधु महादेव यांचे नाव रत्नागिरी येथील नागु स्कूलमध्ये घातले गेले. आप्पांना म्हणजे स्वामीजींना लहानपणापासूनच ज्ञानार्जनाची अतिव ओढ होती. त्यामुळे ज्ञानप्राप्तीची एकही संधी ते दवडत नसत.तसेच त्यांना वाचनाची ही अतिशय आवड होती. पुढे वयाच्या १६ व्या वर्षी श्रीस्वामीजी इंग्रजी सातवी पासुनचे पुढील शिक्षण घेण्यासाठी मुंबई येथे आले.आंग्रेवाडीतील 'आर्यन एज्युकेशन सोसायटी' या विद्यालयात त्यांचे शिक्षण सुरू झाले. या विद्यालयाचे विशेष म्हणजे यात धर्मशिक्षण ही दिले जाई.रोजची प्रार्थना झाली की अर्धा तास धर्मशिक्षण व नंतर अभ्यास सुरु होत असे.चौथीपासून पुढच्या वर्गांना भगवद्गीतेतील काही अध्याय नेमलेले असत.मुळात स्वामीजींवर लहानपणापासूनच उत्तम धार्मिक संस्कार घडले होते व गितेचा छंदही लागलेला होता. आता आपल्याला हवे तसे विद्यालय मिळाले असे वाटून त्यांना विद्यालयाचाही अतिव अभिमान वाटु लागला.
                  
श्रीस्वामींचे राहण्याचे ठिकाण सर्वोत्तम होते. ते आपल्या मामाकडे म्हणजे केशवराव गोखले यांच्याकडे आनंदी चाळीत राहत असत.त्यांचे मामा हे पारमार्थिक वृत्तीचे होते व पुढे स्वामीजींचे मार्गदर्शकही झाले.ते पुण्याच्या बाबामहाराज वैद्य यांचे अनुग्रहीत होते व महाराजांचे लाडके शिष्य होते. जणु नियतीने सद्गुरुचरणांजवळ पोचवीण्यासाठी प.पु.स्वामीजींना मुंबई पर्यंत आणले होते. विद्यालयात घारपुरे नावाचे अनुभवी शिक्षक स्वामीजींना होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली गीतेबरोबर 'गीतारहस्य' व 'ज्ञानेश्वरीचा' ही काही भाग स्वामीजींकडुन अभ्यासला गेला. याचा परिपाक म्हणुन की काय पण स्वामीजींना गीता ज्ञानेश्वरी ची अवीट गोडी लागली. त्याकाळात स्वातंत्र चळवळीचे नेतृत्व प.पु.श्रीलोकमान्य टिळक यांच्याकडे होते‌.स्वामींजी टिळकांचे विचार केसरीतुन वाचतच होते त्यातुनच देशप्रेमाची ज्वाला त्यांच्या हृदयात तिव्र होत होती. १ आॅगस्ट १९२० ला लोकमान्यांचे देहावसान झाले. संपूर्ण भारत या शोकसागरात बुडून गेला.सरदारगृहाकडे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी शेकडो लोकांची गर्दी झाली.स्वामीजींच्या मनात लोकमान्यांबद्दल अपार प्रेम असल्याने ते ही तिथे पोचले.दर्शनाच्या रांगेत उभे राहिले. लोकमान्यांबद्दलचा सर्वसामान्य जनतेचा आदरभाव ,प्रेम पाहून स्वामीजींचे मन अंत:करण भरुन आले.दिवसभरातील सर्व घटनाक्रम पाहून स्वामीजींचे मन देशप्रेमासाठी वेडे झाले. शिक्षणाबरोबरच राजकारणाचा ही विचार त्यांच्या मनात सुरु झाला. लोकमान्यानंतर देशाच्या स्वातंत्र चळवळीचे नेतृत्व गांधीजींकडे आले. यांच्या सारखा नंगा फकीर ,त्यागी देशभक्त आता लोकमान्यांचे कार्य पुढे चालु शकेल असा भाव श्रीस्वामीजींच्या मनात निर्माण झाला.पुढे गांधीजींच्या असहकार चळवळीला पाठिंबा म्हणुन १९२१ मध्ये स्वामीजींनी 'आर्यन सोसायटी' या आपल्या आवडत्या विद्यालयावर तत्वाकरीता बहीष्कार घातला. सर्व आवडत्या शिक्षकांचा निरोप घेऊन ते  बाहेर पडले यावरुन स्वामीजींच्या मनातील देशभक्तीची भावना किती तीव्र होती याची जाणीव होते. अभ्यास बहुतेक झालेला होताच त्यामुळे आता मुंबई ला राहण्याची गरज नव्हती.आता ते पावसला परतले होते .त्यावेळी त्यांचा संपूर्ण वेश म्हणजे संपूर्ण खादीचा पोषाख होता.धेय्यनिष्ठ व विरक्त तरुण बघुन पावस येथील सर्वांना हा तरुण एक आदराचा केंद्रबिंदू ठरला होता. पुढे दोन वर्षांत अजुन काही घडामोडी स्वामीजींच्या जिवनात घडल्या पण आता त्यांच्या जिवनाला नवी दिशा मिळणार होते, त्यांच्या अवताराचे प्रयोजन त्यांना कळणार होते म्हणजेच आता त्यांच्या वर गुरुकृपा होण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती.  

                                 स्वामीजींना आता विसावे वर्ष लागले होते.देशासाठी सर्वस्वावर लाथ मारुन ते देशभक्त झाले होते.पण त्यांच्या जिवनाचे धेय्य काही वेगळेच होते आणि त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांच्यावर लहानपणापासून तसे पारमार्थिक संस्कार घडत आले होते.त्यांचे मामा  केशवराव गोखले यांच्या मुळे स्वामीजींच्या वडिलांना म्हणजे विष्णुपंतांना श्रीसद्गुरु बाबामहाराज वैद्य पुणे यांचा अनुग्रह कृपेचा मार्ग मिळाला होता. तसेच स्वामीजी त्यांच्या मामा कडे मुंबईला राहत असतांनाच त्यांची पारमार्थीक जिज्ञासा वाढू लागली होती.त्याचबरोबर गीता व ज्ञानेश्वरीचे चिंतनही सुरु होतेच.यातुनच पावसला ते परत आले पण चिंतन,वाचन हे सुरुच होते.श्रीस्वामीजींचे मामा हे आपल्या भाच्याचे हे सद्गुण हेरुनच होते त्यातुनच त्यांना खात्री पटली की आपला भाचा हा पारमार्थासाठी पूर्ण अधीकारी आहे.त्यांनी श्रीस्वामीजींना पुण्यास नेऊन सद्गुरु बाबामहाराजांचे चरणावर सोपविण्याचे ठरविले.तसे पत्र त्यांनी आप्पांना म्हणजे स्वामीजींना लिहीले. आपल्या अनंत जन्माचे सुकृत फळला येणार या विचाराने स्वामीजीही सचखावले होते. मुंबईहून आप्पा (स्वामीजी) आपल्या मामाबरोबर पुण्यास गेले. पुण्यास गेल्यावर केशवराव‌ (स्वामीजींचे मामा ) व आप्पा (स्वामीजी) बाबामहाराजांचे दर्शनास गेले. बाबामहाराजांची दृष्टी आप्पांवरती पडली. महाराजांनी आप्पाबद्दल ची सर्व माहिती केशवरावांकडुन घेतली व हा परमार्थाचा उत्तम अधिकारी आहे हे पाहून बाबांनी त्यांचा अंगीकार करण्याचे तात्काळ मान्य केले व दुसर्या दिवशी अनुग्रह होईल असे सांगितले. त्यानंतर हे मामा-भाचे मुक्कामी परतले. उत्सुकतेपोटी आप्पांना रात्री झोपच लागली नाही .सद्गुरुंच्या स्मरणात आणि सुखमय विचारात ते फक्त पडुन होते.सर्व रात्रभर विसावुन आप्पा आपल्या मामांच्या आधी उठून प्रातर्विधी उरकुन मोकळे झाले.काही वेळाने मामाचेंही स्नान वगैरे उरकल्यावर सद्गुरुंच्या पुजनाकरीता फुले ,हार, उदबत्त्या,नारळ वैगेरे घेऊन आप्पा मामांसोबत बाबामहाराजांकडे गेले. इकडे बाबा आपली सर्व प्रातर्विधी आटोपून ज्ञानेश्वरी वाचनात मग्न झाले होते. परंतु आज यांचे लक्ष नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचनात गढून न जाता आप्पांच्या चिंतनात खेचले गेले होते. कारण आदल्या दिवशी पाहिल्यापासून त्यांचे मन आप्पांकडे मोहित झाले होते.हा कोणी योगभ्रष्ट जन्माला आला आहे अशी त्यांची ठाम समजूत झाली होती.आपल्या संप्रदायात हा अलौकिक ठरून हा महान लोकोध्दाराचे कार्य करेन असं त्यांना जाणवले. बाबा आसनस्थ बसुन ध्यानस्थ होते. मामांनी त्यांना वंदन केल्यावर आप्पांनीही त्यांना वंदन केलं व मामांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी गुरुमहाराजांची पुजा केली.बाबा  आपल्या गुरुपरंपरेचे स्मरण करुन भावतन्मय अवस्थेत होते‌. आप्पा समोरच बसुन सद्गुरुंकडे बघत होते.आपली अर्धोन्मिलीत दृष्टी मोकळी करुन ते आप्पाला कृपादृष्टीने न्याहाळू लागले.नंतर बाबांनी त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेऊन गुरुगुह्य ज्ञानाचा उपदेश केला .संप्रदायातील सोऽहं मंत्राची दिक्षा दिली.आप्पांची (स्वामीजींची) लगेच भावसमाधी लागली. सोऽहं च्या अनुसंधानात ते रंगुन गेले. गुरुकृपेने उथुन पुठे फक्त अखंड सोऽहंचाच ध्यास लागला व त्यांचे चित्त अखंड अनुसंधानात रमू लागले.

                                    पुढे लवकरच स्वामीजी गुरुकृपेचा हा आशिर्वाद अनुग्रह घेऊन अंतर्बाह्य बदलले.या बदलेल्या स्थितीत स्वामीजी लवकरच पावसला परतले.पण परतल्यावर स्वामीजी नुसतं साधनारत झाले नाहीत तर त्यांनी लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकित ते विविध समाजकार्य करण्यासाठी सरसावले.त्यांनी मुलांसाठी "स्वावलंबन" आश्रम सुरु केला.तसेच पुष्कळ लोकांना त्यांनी शिक्षणाकडे वळविले.अशा पद्धतीने श्रीस्वामी महाराजांचे समाजकार्य ही अखंड सुरु होते‌.त्याचप्रमाणे आध्यात्मिक साधना व अभ्यास ही त्यांचा सुरुच होता.आपल्या सद्गुरु श्रीबाबांची ज्ञानेश्वरी जिर्ण झाल्याचे पाहून श्री स्वामींनी आपल्या हस्ताक्षरात अतीशय सुंदर अशी ज्ञानेश्वरी लिहून काढली आणि आपल्या सद्गुरुंना अर्पण केली.हीच ज्ञानेश्वरी जेव्हा ते अर्पण करण्यास पुण्यात आले तेव्हा त्यांनी पुण्यातील टिळक महविद्यालयात पुढील उच्चशिक्षण घेण्याचा विचार केला.त्यांनी यथावकाश विद्यालयात प्रवेश घेतला आणि काम ही सुरु केले.पुढे १९२८ साली त्यांना कारकून म्हणून काम मिळाले.आता त्यांना नित्याचे सद्गुरु सानिध्य मिळू लागले .याचा ते पुरेपूर फायदा आपल्या परमार्थात करुन घेऊ लागले.आता त्यांच्या साधनेला चांगलीच धार आली.अखंड साधना व गुरुकृपा यामुळे त्यांना अतिशय अफाट असे साधनेतील अनुभव यायला लागले. यावेळी एका पत्राद्वारे त्यांनी काही वाक्य म्हटले त्यातील एक महत्वाचे वाक्य ज्याचा त्यांनी सद्गुरु कृपा संपादन करण्यासाठी पुरेपूर उपयोग केला ते वाक्य म्हणजे , "जितकी भक्ती तितकी प्राप्ती." यानंतर ही बर्याच मोठ्या घडामोडी श्री स्वामींच्या चरित्रात आहेत पण त्या इथे सध्या तरी मांडणे शक्य होणार नाही.स्वामींनी स्वातंत्रयुद्धात भाग घेतला होता त्यामुळे त्यांना दोनदा जेल मध्ये ही जावं लागलं होतं.त्यावेळी हे सर्व तरुण मंडळी महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीला खंबीरपणे पाठिंबा ही देत होते. पण सद्गुरु आपल्या या उत्तराधिकार्याला उत्तमपणे ओळखून होते.त्यांना श्री स्वामींच्या भावी आयुष्यातील विश्वविख्यात कार्याची जाणिव होती.श्रीस्वामींनी जेल मधून परतल्यावर सद्गुरु चरणी नवरत्नांचा म्हणजे नवओव्यांचा हार अर्पण केला.

श्री स्वामी महाराज वाङमय विशारद पदवी घेऊन १९३४ ला पावस ला परतले.यावेळी श्रीस्वामींचे तीस वय पूर्ण झाले होते.पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते.श्रीस्वामींची तब्येत अचानक बिघडली.सर्वांगाला कंप सुटू लागला,बोलण्याची शक्ति राहिली नाही,अंगात अतिशय ताप होता, अशक्तपणा आल्याने डोळ्यांची उघडझाप ही करणे अवघड होत होते.श्रीस्वामींची प्रकृती इतकी बिघडली की ती रात्र सर्वांनी जागुन काढली.पण दुसर्या दिवशी त्यांना थोडी हुशारी आली.पुढे हे आजारपण सहा महिने जसेच्या तसे राहिले.स्वामींना परस्वाधीनपणे हा काळ काढावा लागला.या आजारपणातच थरथरत्या हाताने स्वामींनी "अमृतधारा" हे काव्य रचले होते.श्रीअण्णा देसाई यांच्या मदतीने थोडे फार मंद गतीने चालनेही स्वामींनी सुरु केले.पुढे ते अण्णा देसाई यांच्याकडे राहण्यास गेले.स्वामी त्यावेळी खोलीत ,झाडाखाली तासंतास ध्यानासाठी बसुन राहिलेले  दिसत.लोकांना श्रीस्वामींना भुताने झपाटले आहे असेच वाटायला लागले.पण त्यांना काय माहिती स्वामी महाराज आत्मानंदाच्या अनंत सागरात खोल डूबत चालले होते.पुढे पंधरा दिवस देसाईंकडे व पंधरा दिवस आपल्या घरी असा क्रम त्यांनी केला.येवढ्या अशक्तपणातही त्यांनी आपला नित्यक्रम ,नित्यनेम चुकविला नाही.या काळातच स्वामींनी गुरुआज्ञेने अनुग्रह देण्यास सुरुवात केली होती. इ.स. १९४२ साली श्री स्वामींना भगवंतांचा सगुण साक्षात्कार झाल्याची अलौकिक घटना चरित्रात आली आहे.त्यानंतर श्री स्वामींनी भगवदगीतेचा साकीबद्ध अनुवाद केला.( साकी हे लिखाण शैलीतील एक वृत्त आहे.ते स्वामींना अतिशय आवडायचे व आपल्या बहुतेक रचना स्वामींनी याच वृत्तात केल्या आहेत.) इ.स.१९४४ ला हा अनुवाद लिहून पूर्ण झाला व प्रकाशित ही झाली.इ‌.स १९४५ साली "संजीवनी गाथा" हा अतिशय रसाळ ,उच्च कोटीच्या अनुभवांच्या अभंगांचा गाथाही प्रगट होऊ लागला.इ.स १९४९ सालापर्यंत स्वामी  अप्रकाशित होते.त्यांच्याबद्दल कमीच लोकांना माहिती होती.पण लवकरच पावसाच्या या ज्ञानसुर्याच्या तेजामुळे संपूर्ण जगच उजळून निघणार होते.स्वामींचे वाङमय लोकांपर्यंत पोचावे यासाठी देसाई बंधूंनी त्याचे मोठ्या प्रमाणात प्रकाशन केले.१९४९ पर्यंत बर्याच लोकांना स्वामींनी अनुग्रह देऊन कृतार्थ केले होते.याच सर्व मंडळींनी १९५० ला स्वामींचे घरी सामुदायिक भजनाचा कार्यक्रम सुरु केला.स्वामींची शांत ,सात्वीक मुर्ती बघूनच लोकांना समाधानाची प्राप्ती होवू लागले.इ.स १९५३ पासून स्वामींनी ज्ञानेश्वरीचा आपला विश्वविख्यात असलेला "अभंग ज्ञानेश्वरी" हा अनुवाद लिहीण्यास सुरुवात केली. हा अनुवाद पुर्ण होता होता स्वामींकडे बरेच लोक येऊ लागले.बरेच लोक अनुग्रहासाठी, पारमार्थिक मार्गदर्शनासाठी येत असत.या सर्वांना स्वामी प्रेमाने मार्गदर्शन करित.पुढे दिड महिना स्वामींचे रत्नागिरीत वास्तव्य होते.खुप दिवसांनी स्वामी प्रथमच पावसच्या बाहेर आले होते.इथे लोकांची दर्शनासाठी बरीच गर्दी होऊ लागली.काही लोकांच्या घरी स्वामींनी भेट ही दिली होती‌.बरेच अनुग्रह घेऊन कृतार्थ झाले.इतके प्रकृती अस्वास्थ असल्यावरही स्वामींनी मुमुक्षू, आर्त लोकांना मार्गदर्शन देऊन कृतार्थ केले ही काही सामान्य बाब नव्हे.स्वामी यानंतर पावसाला परतले.आता स्वामींची किर्ती मुंबई,पुणे वैगेरे भागत पसरली व त्यांच्या दर्शनासाठी दूरदूरच्या भागातुन लोक येऊ लागले.इ.स १९६० देसाई बंधूं व डॉ मिराशी यांनी नाथषष्टीच्या शुभमुहूर्तावर स्वामींच्या हस्ते "अभंग ज्ञानेश्वरीचे" प्रकाशन केले.यावेळी मुंबई पुणे तसेच रत्नागिरी आणि जवळपासच्या भागातील ७००/८०० स्त्री पुरुष भक्तांचा समुदाय पावसला जमला होता.या वेळी स्वामींना भरजरी पोषाख अर्पण करण्यात आला.स्वामींना त्याची यत्किंचितही आवड नव्हती पण भक्तांसाठी त्यांनी तो पोशाख केला. १९६१ साली स्वामींचा सर्व भक्तांनी मिळून जन्मोत्सव साजरा केला. इ.स १९६३ साली स्वामींच्या षठ्यब्धीचा भव्य दिव्य उत्सव ही साजरा करण्यात आला.  इ.स १९३४ ते इ.स १९६० हा विलक्षण आणि अद्वितीय असा काळ होता.याकाळात स्वामींनी अने काव्य ,अभंग ,आत्मज्ञान शब्दरुपात प्रगट केले.या वेळी अनेक मुमुक्षू,आर्त , जिज्ञासू भक्तांना,साधकांना स्वामींनी मार्गदर्शन केले.स्वामींच्या कृपा अनुग्रहाचा विलक्षण अनुभव अनेक लोकांना आला.त्यांची किर्ती उत्तरोत्तर वाढत गेली.पावसच्या या छोट्या गावात दूरवरचे लोक येऊन कृपार्थ होऊ लागले. आपल्या सद्गुरुंनी दिलेलं नाम बिज,आपल्या परमप्रिय ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेचे नामबिज स्वामी महाराज शरणागताला मुक्त हस्ताने दिले.हा मोठा काळ व त्या वेळी घडलेल्या घडामोडी ,पत्र व इतर घटनांचा उल्लेख जरी केला तरी अनेक लेख त्यावर तयार होतील.त्यामुळे मी तो भाग गाळतो आहे.( आपण सर्वांना विनंती की स्वामींचे अतिशय विलक्षण चरित्र आपण जरुर वाचाच .एका लेखातून मांडणे ते अशक्य आहे.कारण तो नुसता जीवन प्रवास नाही तर आपल्यासारख्या शिक्षण घेणार्या,नोकरी घेणार्या व्यक्तीचा सामान्य ते सिद्ध करणारा अचंबित करणारा विलक्षण जिवन वृतांत आहे.स्वामी महाराज जरी अवतारी असले तरी त्यांनी सामान्य माणसासारखे जिवन जगून दाखविले.इतके प्रकृती अस्वास्थ असल्यावर ही त्यांनी आपली अध्यात्मिक बैठक ,आपले अखंड अनुसंधान कधीही मोडले नाही.स्वत: प्रकृती अस्वास्थ्यामुळे जर्जर झाले तरीही शरणं येणार्याला त्यांनी मार्गदर्शन दिले.त्यांनी नुसता अनुग्रह नाही तर शरणागताला पारमार्थिक अनुभव  देऊन कृतार्थ केले. अनेकांना त्यांच्या त्यांच्या इष्ट दैवताच्या रुपात दर्शन देऊन भक्तिमार्गात अग्रेसर केले.अनेकांना परमार्थातील उच्च‌ कोटी च्या पातळीवर नेऊन पोचवले.स्वामींचे जिवन म्हणजे एक गाथा आहे.जी गाथा आपण स्वतः वाचल्यावरच त्याचे अलौकिकत्व कळेल.स्वामींनी लिहीलेली अभंग ज्ञानेश्वरी आणि संजीवनी गाथा एकदा चाळली जरी तरी हृदयात सात्विक प्रेम उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही.इतके ते रसाळ ,प्रसादीक आणि उच्च कोटीचे आहे. शब्दमर्यादेस्तव मी लेख आटोपता घेत आहे त्याबद्दल क्षमा मागतो पण येणार्या काळात या दिव्य चरित्रातील एक एक मोती वेचून त्यावर चिंतन मांडण्याचा मी नक्की स्वामी चरणांना स्मरूण प्रयत्न करेन.स्वामींची कृपा असेल‌ तर ते ही घडेलच.)
                                   प्रचंड धर्म कार्य ,अनेकांवर कृपा अनुग्रहाचे अखंड कार्य सुरु असतांना वयाच्या साठ वर्षा नंतर दिनांक १२ जून १९६३ रोजी स्वामींची प्रकृती पडशाच्या आजाराने अकस्मात बिघडली.हे दुखने अतिशय जास्त विकोपाला जाऊ लागले.डॉ जोगळेकर यांचे उपचार सुरु होतेच.अनेक लोक स्वामींच्या सेवेसाठी तत्पर होते.आजवरपणात थोडेफार स्वस्थता लाभून स्वामींना ठिक वाटायला लागले.पण चार महिन्यानंतर प्रचंड अशक्तता वाढली.त्यामुळे दर्शन आता दुरुनच सुरु झाले.स्वामी क्वचितच गरज असली तर कुणाशी बोलू शकत व शक्य असले तर आलेल्या व्यक्तीकडे कृपापूर्ण दृष्टीने थोडा वेळ पाहत.स्वामींकडे येणार्यांकडे भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती.त्यामुळे जवळून दर्शन व बोलणे स्वामींना शक्य होत नव्हते.प्रकृती बिघडू लागली .जवळच्या भक्तांनी स्वामींना फार विनवणी केल्यावर स्वामींनी दुरून दर्शनाला संमती दिली‌.इ.स १९६५ ला आजार बळावला. एवढा आजार वाढत असतांनाही १९६५ ते १९७० या पाच वर्षांच्या कालावधीत स्वामींच्या दर्शन अनुग्रह घेऊन अनेक लोकांनी आपले जिवन धन्य करुन घेतले.हजारो मुमुक्षूंना त्यांनी अनुग्रह देऊन साधकाच्या पाऊलवाटेवर आणले.स्वामींनी आपले अवतार कार्य पूर्ण होण्याआधी आपल्या तिनं शिष्यांना सद्गुरु पदावर आरुढ केले.ते तिनं शिष्य म्हणजे ल.रा.फडके ज्यांना आपण "अमलानंद" या नावाने ओळखतो.दुसरे म्हणजे "सत्यदेवानंद सरस्वती" हे आधी आळंदी ला राहत.वैराग्य होऊन यांनी संन्यास घेतला होता.यांना स्वामींनी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या रुपात दर्शन दिले होते.त्यामुळे ते स्वामींचे अनन्य भक्त बनले.स्वामींची प्रकृती अत्यंत क्षीण झाल्यावर ज्यावेळी ते अनुग्रह देत, त्यावेळी अनुग्रहाचे रहस्य व इतर समाधानकारक उपदेश देण्याचे कार्य हे सत्यदेवानंद यांचेकडे स्वामींनीच दिले होते.त्यांना संप्रदाय चालविण्याची आज्ञा स्वामींनीच दिलेली होती.तिसरे श्री बाळासाहेब वाकडे ज्यांना आपण "माधवनाथ" म्हणून जाणतो.यांना पहिल्या भेटीत स्वामींच्या जागी ज्ञानेश्वर माउलींचे दर्शन घडले.काही काळाने स्वामींनी त्यांना लेखी संप्रदाय चालविण्याची आज्ञा केली‌ आहे.इ.स १९७३ साल उजाडले.स्वामींचा देह आता फारच थकला होता.त्या वर्षाआधी १९७२ च्या ऑक्टोबर मध्ये स्वामींनी आपल्या महासमाधीची जागा सांगून ठेवली होती.त्या समाधीच्या आतील लांबी,रुंदी ,खोली सर्वांचा तपशील कागदावर मांडून स्वामींनी त्याबद्दल मार्गदर्शन केले होते.स्वामींची प्रकृती बिघडत चालल्यामुळे अनेक भक्त दर्शनाला येऊन गेले.शेवटी दिनांक १५ ऑगस्ट १९७४ साली स्वामींनी आपल्या देहाची खोळ सांडली आणि पावसचा हा महायोगी निर्गुण रुप धारण करुन विश्वात्मक झाला.पुढे २४ तासांसाठी स्वामींचा देह दर्शनासाठी ठेवण्यात आला.सर्वत्र "राम कृष्ण हरी" नामाचा अखंड नामघोष सुरु होता.अश्रुपूर्ण डोळ्यांनी सर्व भक्त आपल्या या देवांचे दर्शन घेऊ लागले.आधी स्वामींनी आज्ञा दिलेल्या जागी स्वामींच्या पवित्र देहाला समाधी देण्यात आली.या विधीसाठी सज्जनगडाहून प.पु.मारोतीबुवा रामदासी यांना बोलाविण्यात आले. पावस हा ज्ञानदीप आपली सगुण खोळ सांडता झाला.स्वामी आजही आपल्या दिव्य वाङमयातुन आपल्याला भेटतातच.स्वामींचे अत्यंत रसाळ, प्रासादिक आणि सुंदर असे वाङमय आहे.ज्यात "संजिवनी गाथा" , "भावार्थ गीता" , "अभंग ज्ञानेश्वरी", "अभंग अमृतानुभव", "चांगदेव पासष्टी", "तीन प्रवचनें", "स्वरुप पत्र मंजुषा" अशा ग्रंथांचा समावेश होतो.श्रीस्वामी महाराजांच्या सुकोमल चरणी ही शब्दसुमनांजली अर्पण करतो आणि स्वामींनी आपल्या सर्वांकडून भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या चरणांची अखंड सेवा करुन घ्यावी ही कोटी कोटी दंडवत पूर्वक प्रार्थना 🙏🌸🌺🚩
     ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

#रामकृष्णहरी🙏🌸🌺🚩
#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺🚩
#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ 🙏🌸🌺🚩


Thursday, August 18, 2022

दत्तावतारी बाळेकुंद्रीचे अवधूत समर्थ सद्गुरु श्री पंत महाराजांची आज १६७ वी जयंती 🌸🌺🚩

 


#श्रीपंत_महाराज_बाळेकुंद्री_यांची_१६७वी_जयंती🙏🌼🌸🌺☘️

                      अनादी काळापासून चालत आलेल्या दत्त संप्रदायात अनेकाविध संतांनी अवतार धारण करुन प्रचंड असे धर्म कार्य,लोकोद्धाराचे कार्य केले.दत्तप्रभुंनी अनेक उपासना मार्ग ,संप्रदायाची सुरुवात केली.यात आनंद संप्रदाय,अवधूत संप्रदाय,स्वरुप संप्रदाय अशा अनेक मार्गाचा समावेश होतो.याच दत्त संप्रदायाची एक शाखा म्हणजे अवधूत पंथ.संपूर्ण दत्त संप्रदायातील एक अवतारी विभुती ,ज्यांचे स्थान दत्त संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे.अशा दत्तावतारी श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची आज १६७ वी जयंती.दत्तसंप्रदायातील अवधूत पंथातील मेरुमणी म्हणजे पंतमहाराज होत.श्री पंतमहाराजांनी अवधूत पंथाला नवसंजीवनी दिली.

                   अठराव्या शतकात श्रीक्षेत्र गाणगापूर येथील राजादेऊळगावचे वतनदार कूलकर्णी श्रीपंतमहायाजांचे पूर्वज होत.ते ऋग्वेदी भारद्वाजगोत्री देशस्थ ब्राम्हण होते.त्यांचे कुलदैवत कोल्हापूरची अंबाबाई आणि आराध्य गाणगापूरचे दत्तप्रभु होते.या सर्व घराण्याच्या श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे चरणी अनन्यभाव होता आणि गुरुचरित्र या ग्रंथावर अपार श्रद्धा होती.या घराण्यातील एक पूर्वज श्री नरसिंहपंत हे नेहमी मोठ्या श्रद्धेने श्रीगुरुचरित्राचे सप्ताह करीत.एकदा एका पायावर उभे राहून त्यांनी गुरुचित्राचा सप्ताह केला.तेव्हा श्रीदत्तप्रभुंनी प्रसंन्न होऊन त्यांना स्वप्नात दर्शन दिले व "तुझ्या सातव्या पिढीत मी अवतार घेईन" असा वर दिला.पुढे निजामकाळात बाळेकुंद्रीच्या आसपासच्या सतरा गावांचे कुलकर्णिकीचे काम नरसिंहपंतांकडे आले व त्यामुळे ते बाळेकुंद्रीस येऊन राहिले. याच घराण्यातील, वर लिहिलेल्या दृष्टांताप्रमाणे सातव्या पिढीत जन्मास आलेला मुलगा 'दत्तात्रेय' हाच पुढे "श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर" या नावाने प्रसिद्धीस आला. 

                       श्रीपंतांचा जन्म ,त्यांचे मातुलगृही 'दड्डी' येथे मिती श्रावण वद्य ८ सोमवार शके १७७७ म्हणजे ३ सप्टेंबर सन १८५५ रोजी रोहीनी नक्षत्रावर झाला.त्यांचे बालपण मातुलगृहीच गेले.तेथील मंडळीही निष्ठावंत दत्तभक्त, धार्मिक वृत्तीची व आचारसंपन्न अशी असल्याने बाळपणीच त्यांना गुरुभक्तीचे बाळकडु लाभले होते.पुढे वयाच्या १४/१५ वर्षी ते इंग्रजी शिकण्यासाठी बेळगावात येऊन राहिले.त्या काळात कर्नाटकात दुष्काळ पडल्याने त्यांना अतिशय कष्टपूर्वक आपला शिक्षणक्रम पुरा करावा लागला.श्रीपंत इंग्रजी ५व्या वर्गात शिकत असतांनाच वयाच्या २० व्या वर्षी इ.स.१८७५ मध्ये श्रीबालमुकुंद तथा श्रीबालावधूत -बाळाप्पा या नावाच्या एका परमहंस ,पूर्णाद्वैती सिद्धपुरुषाच्या कृपेचा त्यांना लाभ झाला.श्रीपंतांचे चुलते चिंताप्पा तसेच पंतांची मावशी बहिणाक्का ,मावसबंधू गणपतराव व एक आप्त हणमू दड्डी या सर्वांवर ही बाळप्पांनी अनुग्रह कृपा केली होती.अशा तर्हेने पंतांच्या पितृ व मातुल गृही श्रीबाळप्पा महाराजांची कृपादृष्टी पसरली होती.

#श्रीबालमुकुंद_महाराजांनी_पंतांवर_केलेल्या_कृपेची_हकीकत:-

           पूर्वी पंथांचे मन बाळप्पा महाराजां (बालमुकुंद) बद्दल कुलुषित होते. त्यांचे कारण असे की बाळप्पांच्या अधिकारासंबंधी श्रीपंतांचे घरातील व इतर पुष्कळांना कल्पनाच नसल्याने ते त्यांना वेडा समजून त्यांची निंदा करीत.एकदा तर काही कामा निमित्त बाळप्पा बाळेकुंद्रीस पंतांचे घरी गेले असता ओट्यावर कोणी न दिसल्याने माजघरात गेले.इतक्यात श्रीपंतांचे आजोबा बाळकृष्णपंत हे मागील बाजूतून तेथे आले तो त्यांना विचित्र पोषाखातील बाळप्पा दिसले तेथे दिसताच राग येऊन त्यांनी बाळप्पांना शिव्या देऊन हाकलून दिले.श्रीपंतांच्या कानावर ही बाळप्पासंबंधी प्रतिकुल गोष्टी आल्यामुळे ते त्यांना "जोगडा"  

"कर्मभ्रष्ठ" वैगेरे नावे ठेवून निंदा करीत.त्यामुळे त्यांगे नातेवाईक गणु याने बाळप्पाचे कितीही गोडवे गाईले तरी त्याचा परिणाम उलट होई. एकदा तर गणूने श्रीबाळप्पांची पदांची चोपडी तरी पहा म्हणून पुढे केली असता, पंतांनी ती रागाने फाडून टाकली.इतकेच नव्हे तर बेळगावहून गणू मारीहाळास गेला असता त्याला एक खरमरीत पत्र लिहून त्यात "तू बाळप्पाच्या नादी लागला आहेस .पण ते बरे नव्हे,हे बाबालोक भोळ्याभाबड्या लोकांना नादी लावून फसवतात."वैगेरे मचकुर लिहून बाळप्पांची संगत सोडण्याचा उपदेश केला. नेमके गणू हे पत्र वाचत असतांना तेथे बाळप्पाची स्वारी आली व कोणाचे पत्र म्हणून विचारु लागली.पत्र पंतांच्याकडून आहे असे समजल्यावर त्याला ते वाचून दाखविण्याचा आग्रह करु लागले.अर्थातच गणूने ते भीतभीतच वाचून दाखवले.तेव्हा बाळप्पांना मोठा राग येऊन ,"हा पत्र लिहीणारा मरतो बघ" असे ते म्हणाले. त्यासरशी गणू घाबरून रडु लागला व बाळप्पाचे पाय धरुन शाप मागे घेतल्याबद्दल विनवू लागला.तेव्हा बाळप्पा हसतच त्याला म्हणाले ,"अरे तुझा दत्तू माझाच रे,तो मरतो म्हणजे माझ्याकडेच येतो बघ.माझ्या बोलण्याचे वर्म तुझ्या ध्यानी आले नाही." हे ऐकताच मोठ्या आनंदाने व हर्षाने गणूने ताबडतोब श्रीपंतांना कर्डेगुद्दीस येण्यास पत्र लिहीले. इकडे त्याच सुमारास श्रीपंतांची तब्येत बिघडली,एकाएकी पोट दुखू लागला व भयंकर ताप येऊ लागला. त्या स्थितीचे गणूचे पत्र आल्याचे समजून व त्यातील कळवळून लिहीलेला मजकूर वाचून त्यांना मोठा अचंबा वाटला व त्यांनी आपण आजारी असल्याचे कळविले.गणूने ताबडतोब ही गोष्ट बाळप्पांच्या कानावर घालताच,त्यांनी विभूती व प्रसाद देऊन "ही विभूती त्याचे सर्वांगास लावून प्रसाद दे.सतत नामस्मरण व भजन करण्यास सांग." असे सांगून त्याला पंतांकडे पाठवले.गणू पंतांकडे गेला व त्यांना बाळप्पांना निरोप व प्रासाद विभूती दिली.पंतानी प्रसाद ग्रहन केला,विभूती सर्वांगास लावली व मोठ्या श्रद्धेने नामस्मरण व भजन करण्यास सुरुवात केली.लवकरच त्यांना आराम पडला व त्यामुळे बाळप्पासंबंधीचे त्यांचे प्रतिकूल मत पालटून त्यांच्यावर श्रद्धा बसली. जरा बरे वाटल्यावर श्रीपंत बाळप्पांचे दर्शनासाठी कर्डेगुद्दी येथे गेले. आपण ज्यांची एवढी निंदा केली त्यांना आता एकदम भेटून क्षमा मागण्याचे धैर्य श्रीपंतांना होईना. अशा मन:स्थीतीत ते असता बाळप्पा त्यांना भेटण्यास आले.तेव्हा श्रीपंत घाबरून व लाजून घरच्या बाजूला असलेल्या गोठ्यातील गवतात लपून बसले. बाळप्पा त्या ठिकाणी गेले व "माझ्या अनादीपुत्रा,आता किती दिवस तू लपून बसणार ? मी तुझी कित्येक दिवस वाट पाहात आहे, ऊठ " असे म्हणून त्यांनी श्रीपंतांना उठवले व मोठ्या प्रेमाणे पोटाशी कवटाळून सद्गदीत कंठाने ते पुढे म्हणाले ,"बाळ,तू माझा अनादिपुत्र,माझा कुलोद्धारक आहेस तेव्हा माझ्याकडे येण्याला संकोच का? भीती का?"

         हा सर्व प्रकार पाहून श्रीपंत अगदी चकित झाले व त्यांच्या अशा अनपेक्षित भेटीने,अत्यंत प्रेमळ व सलगीच्या वागण्याने, त्यांच्या ठिकाणीचे सर्व संशय ,पूर्वग्रह ,तर्ककुतर्क नाहीसे होऊन ते त्यांना अंत: करणपूर्वक शरण गेले. पुढे लवकरच म्हणजे शके १७९७ (इ.स.१८७५) च्या श्रीगुरुद्वादशीच्या शुभदिनी बाळप्पांनी कर्डेगुद्दीच्या डोंगरावरील आपल्या आश्रमात श्रीपंतांना गुह्य तत्वबोध करुन, अनादिसिद्ध श्रुतिसंमत अशा अवधूत - संप्रदायाची दीक्षा दिली व त्यांना विधियुक्त अनुग्रह दिला. पुढे त्यांनी श्रीपंतांकडुन खडतर योग्याभ्यास करवून घेतला. एकदा पंतांनी पुढे असे म्हटले आहे की "इतर पाहिजे ती वस्तु केव्हा ना केव्हा तरी हाती लागेलच ,परंतु सद्गुरु मिळणे फार कठीण.अपार पूर्वसुकृत असल्याशिवाय गुरुंची गाठ पडणे नाही.तराजूच्या एका पारड्यात ब्रह्मांडांची ब्रह्मांडे घातली तरी दर्शनलाभाचे पारडेच अचल राहील व किंचीतही जागा सोडणार नाही.सद्गुरु दर्शनदिवस हा अनंत जन्मांतील एक सुदिन,पर्वकाळ व दिव्य योग-घटिका आहे.सद्गुरु दर्शनच बुद्धी-सूर्याचे उत्तरायण ,स्वर्ग-द्वाराचे-मुक्तिद्वाराचे उद्घाटन व भाग्योदय महायोग,सर्व तीर्थाटणे ,सर्व व्रते ,सर्व साधने,सर्व उपासना, सर्व जपतप-अध्ययन,सत्कर्मे ,सर्व परोपकार ही एकाच वेळी एकाच क्षणी सद्गुरुयोगरूपे फळतात."

#श्रीपंतांची_गुरुपरंपरा:-

                         श्रीपंतांनीच आपल्या आत्मज्योती लेखात पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. "दुजाभाव दवडून अतिगुप्तपणाने श्रीदत्तात्रेयस्वामींनी रामचंद्र अवधूत यांस ज्या गुह्यगोष्टी सांगितल्या त्याच रामावधूतांने एकांती बसून,दुजेदृष्टीस न पडेल अशा गुह्य मार्गाने श्रीबालावधूतांस उपदेशिल्या,श्रीसद्गुरु बालमुकुंदांनी जंबुनगरी निर्जन गुहेंत दीनदत्तास निजबोध सांगितला." याच मार्गाने कांहीं एकांना यथार्थस्थिती प्राप्त झाली‌.एवं परंपरेने उपदेशस्थिती गुप्तमार्गाने चालत आली."

इ.स.१८७७ मध्ये बाळप्पांनी श्रीपंतांची सत्पात्राता पाहून त्यांना गृहस्थाश्रमीच राहून आपला संप्रदाय चालवावा अशी आज्ञा केली व "हा फार अधिकारी आहे व तोच माझा मार्ग पुढे चालवीत,तरी त्याचे आज्ञेत सर्वांनी राहावे" असा उपदेश इतर शिष्यांना करून निर्याणाच्या संकल्पाने श्रीशैल्य मल्लिकार्जूनस गमन केले.त्यानंतर ते परत आलेच नाहीत अथवा त्यांचा शोधही लागला नाही. 

श्रीपंत १८८० मध्ये मॅटिक्युलेशनची परीक्षा झाले व लगेच त्यांनी लंडन मिशन हायस्कुल मध्ये नोकरी धरली. इ.स.१८८२ मध्ये वैशाख व.१ रोजी श्रीपंतांचा विवाह यमुनाक्का यांच्याशी झाला. यमुनाक्कांचा विवाह झाल्यावर बाळेकुंद्रीकरांच्या घरात प्रवेश झाल्यापासून त्या घराण्याच्या उत्कर्षाला सुरुवात झाली.तेथे सुख, शांती,समाधान व एकोपा यांचे वास्तव्य सुरु झाले.त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अल्पकालीन अपत्ये झाली. श्रीपंतांचे सांसारिक जीवन म्हणजे प्रवृत्ती-निवृत्तीचा सुरेख संगम होता.

श्रीपंतांचे वाचन सखोल व विविध असे.त्यांनी इस्लामी,पारशी,ख्रिश्चन,बौद्ध तसेच लिंगायत लोकांचेही पूज्य ग्रंथ वाचले होते‌.त्यांना इंग्रजी,मराठी,कानडी, संस्कृत व हिंदी भाषा चांगल्या अवगत होत्या.उपनिषदे,अवधूत गीता,श्रीमद् भगवत गीता, आद्यशंकराचार्यांचे भाष्ये, उपदेशसहस्त्री, श्रीगुरुचरित्र, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी व वामनपंडितांची यथार्थदिपीका इ.ग्रंथ त्यांंचे आवडते व नित्य अभ्यासातले होते. श्रीपंत आपली शिक्षकाची नोकरी सांभाळून इतर वेळ आध्यात्मिक ग्रंथांचे परिशीलन करण्यात व वेदान्तचर्चा करण्यात शर्यतीत करीत.त्यांना भजनाची गोडी फार असे व ते दररोज एकतारीवर श्रीदत्ताची व आपले गुरु बालमुकुंद महाराज यांची भजने म्हणत.त्यांच्या घराण्यात पूर्वापार चालत आलेले श्रीगुरुद्वादशी, दत्तजयंती व गुरुप्रतिपदा हे उत्सव ते मोठ्या थाटाने व उत्साहाने करीत. 

                        श्रीपंतांनी सन १८८० सालापासून शिष्यप्रबोधन कार्यास सुरुवात करून अखेरपर्यंत ते चालू ठेवले आणि हजारो शिष्यांना ब्रह्मविद्येचे शिक्षण दिले‌.तसेच शेकडो तरुणांना त्यांच्या अभ्युदयाचा मार्ग दाखवून व तो त्यांच्याकडून गिरवून घेऊन त्यांना स्वावलंबी केले. श्रीपंतांनी आपल्या शिष्यांना उद्देशून बरेच तर्कप्रधान ,विचार प्रवर्तक असे बोधपर स्फुट लेख लिहीले आहेत.त्याचप्रमाणे आपल्या गुरुचे प्रेम ,बोधशक्ती यांवरही गुणवर्णन निबंध लिहीले आहे.त्यांपैकी "भक्तलाप" ,"बालबोधामृत सारं","प्रेमतरंग", "आत्मज्योती", "परमानुभवप्रकाश", "अनुभववल्ली", "ब्रह्मोपदेश", "प्रेमभेट" हे विस्तीर्ण प्रबंध लिहीले आहे. श्रीपंतांचा त्यांच्या भक्तमंडळींशी मोठा पत्रव्यवहार असे‌. त्यांमधुनही अध्यात्मपर बोधावर विशेष भर असे. त्यापैकी काही निवडक पत्रे प्रकाशित झालेली आहे‌‌. "श्रीदत्तप्रेमलहरी" ह्यामध्ये पंतांचे सर्व गद्य वाङमय संपादित झालेले आहे. अशा दत्तावतारी पंत महाराजांनी शेकडो लोकांना अनुग्रह देऊन भक्तीमार्गाला लावले.अवधूत पंथाची दृष्टी दिली.सर्व शिषृयमंडळीना दत्त भजनात रंगविले. पुढे अश्विन वद्य ३ शके १८२७ सोमवारी श्रीपंत महाराजांनी आपल्या नश्वर देह ठेवला व दत्त स्वरुपी लिन झाले. आज बाळेकुंद्री येथे पंत महाराजांचे भव्य असे समाधी मंदिर ,पादुका मंदीर बघायला मिळते. श्रीपंत महाराजांच्या कृपेने आज अवधूत पंथांची ध्वजा सर्वदूर परदेशातही फडकली आहे. आज श्रींचे भजनमंडपात सेवेकर्यांचे कडुन अखंड अहोरात्र बारा महिने "ॐ नमः शिवाय" या महामंत्राचे नामस्मरण चालू आहे.

अशा दत्त अवतारी श्रीपंत महाराजांचे चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌺🌸

     ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

Wednesday, August 17, 2022

श्रावण वद्य अष्टमी जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभु आणि भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचा जन्मोत्सव 🌺🙏🌸❤️

 


श्रीकृष्ण_जन्माष्ठमी_आणि_श्रीमाउलींचा_जन्मोत्सव

कृष्ण गोकुळी जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ।।

होता कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ।।

सदा नाम वाचे गाती । प्रेमे आनंदें नाचती ।।

तुका म्हणे हरिती दोष । आनंदाने करीती घोष ।।

                       आज श्रावण कृष्ण अष्टमी आज पूर्णब्रह्म ,सकलगुणनिधान,भक्तवत्सल,राधाप्राणवल्लभ, यदुकुलभुषण भगवान श्री कृष्णपरामात्माचा ५२४८ वा जन्मोत्सव... यशोधाघरी राहणारे बालक्रिडेत रंगणारे भगवान बालगोपाल, गोपिकांसोबर रासक्रीडा करणारे मधुसूदन, कंस आणि चाणुरादी राक्षसांना ठार मारणारे भगवान श्रीकृष्ण, सोन्याच्या द्वारकेचे अधिपती श्रीद्वारकाधीश, योग्यांचे प्राण,भक्तांचे निधान योगीराज श्रीभगवान ,अर्जुनाचे प्राणसखा, आराध्य माधव ,गीतेचा उपदेश करणारे पूर्णब्रह्म पुरुषोत्तम महाविष्णु अशा असंख्य लिला करणारे लिलाविष्वंभर प्रभु श्रीहरी कृष्ण आजच्याच तिथीला प्रगट झाले. पण आजच्या तिथीला आमचे परमाराध्य , भक्तवत्सल ,भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या रुपात प्रभु श्रीकृष्णांनी आपल्या करुणेचा ,वात्सल्यतेचा आविष्कारच पुन्हा एकदा प्रगट केला. आजची तिथी ही या मुळे आम्हा सर्वांसाठी द्विगुणीत परमानंदाची तिथी ठरते. माउलींच्या रुपात भगवान श्रीमहाविष्णुच आज आळंदी क्षेत्री प्रगट झाले.

श्रीसद्गुरु नामदेवराय माउलींच्या जन्माचे अवतराचे वर्णन करतांना लिहीतात


अधिक सत्याण्णव शके अकरा शती । 

श्रावण मास तिथी कृष्णाष्टमी ।।१।।

वर्षाऋतु युवा नाम संवत्सर ।

उगवे निशाकार रात्रिमाजीं ।।२।।

पंच महापातकी तारावया जन ।

आले नारायण मृत्युलोकां ।।३।।

नामा म्हणे पूर्णब्रह्म ज्ञानेश्वर ।

घेतसे अवतार अलंकापुरी ।।४।।

           कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती माउली ज्ञानोबारायांच्या रुपात भगवंत पुन्हा एकदा श्रीगीता तत्व प्रगट करण्यासाठी अवतरले आहेत. यावेळी हा श्रीमहाविष्णु अवतार  गुरु रुपात प्रगट झाला त्यामुळेच जणू देवांनी गुरुवार हा दिवस निवडला असावा. श्रीमाउलींचा जन्म आळंदी क्षेत्री शके ११९७ ,श्रावण वद्य अष्टमी ,मध्यरात्रीस झाला.

श्रीसंत सच्चिदानंद बाबा थावरे म्हणतात


श्री शालिवाहन भूपती । अकराशे सत्याण्णव मिती ।

युवनाम संवत्सरा प्रती । श्रावणकृष्ण अष्टमी ।।

गुरुवार रोहिणी । पर्वकाळ परार्ध रजनी ।

बैसोनि देवगण विमानीं । कुसुमवृष्टी करिताती ।।

विठ्ठल रुक्मिणीचे पोटीं । अवतरले जगजेठीं ।

ज्ञानदेव नामें सृष्टि । श्रीगुरु माझा मिरवतसे ।।

          देवांनीच तीच तिथी,तेच नक्षत्र, तोच वेळ अशी संधी साधुन गुरुवार हा वार जणु आपण यावेळी सद्गुरु स्वरुपात प्रगट होणार आहोत अशी खूनच दर्शविण्यासाठी गुरुवारी अवतार धारण केला. कृष्णाष्टमीच्या मध्यरात्री हा जगजेठी अलंकापुरीत अवतार धारण करता झाला .. अज्ञान अधंकाराला दूर सारण्यासाठी मध्यरात्रीला माउली स्वरुपी ज्ञानसूर्य आजच्या तिथीला अलंकापुरीत अवतार धारण करता झाला.

माउलींच्या जन्मस्थानाबाबत नामदेव राय म्हणतात

"नामा म्हणे पूर्णब्रह्म ज्ञानेश्वर । 

घेतसे अवतार अलंकापुरी ।।" 

         माउलींचे जड भिंत चालवणे,मशीद बोलती करणे, रेड्यामुखी वेद वदवने, मृत व्यक्तिस उठवणे अशा असंख्य लिला आपल्या सर्वांना श्रृतच आहेत...

माउलींनी भावार्थदीपिकेद्वारे श्रीगीतामाईतील ज्ञानगंगा सर्वांसाठी मोकळी केली ,सर्वांना त्या अमृताचे प्राशन करविले आणि आपल्या "माउली" या अनन्यकरुणारुपालाच जणु त्यांनी प्रगट केले आहे. 

नामदेवराव माउलींच्या या करुणेचे वर्णन आपल्या अभंगात करतात -

ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्लि प्रगट केली ।।१।।

गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ।।२।।

अध्यात्म विद्येचे दाविलेसें रुप । चैतन्याचा दिप उजळिला ।।३।।

छप्पन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारिली ।।४।।

श्रवणाचे मिषें बैसावे येऊनी । सामराज्य भुवनीं सुखी नांदे ।।५।।

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ।।६।।

       अशी ही ज्ञानदेवी म्हणजे माउलींच्या करुणेचा ,मायेचा, अपार दयेचा सारंच आहे. "अनुभवामृत" या आपल्या रचनेद्वारे माउलींनी सिद्धांच्या अनुभवाचेच प्रगटिकरण केले आहे. म्हणुनच या ग्रंथाला "सिद्धानुवाद" असेंही नाव आहे. "हरिपाठ" हा आज आपल्या सर्व वैष्णवांघरी नित्य म्हटला जातो वरवर सोपा वाटणारा हा हरिपाठ म्हणजे माउलींनी प्रगट केलेले दिव्य गुरुपरंपरेचे ज्ञानच आहे... कुट दृष्टीने, गुह्यार्थाने हरिपाठाचे अवलोकन ,मनन,चिंतन केले तरं त्यातील गहन अर्थ, त्याचा गुढार्थ प्रत्येकाला स्थंभीत करणारा आहे. प्रत्येकाने त्याचा अभ्यास,चिंतन ,मनन करुन त्या दिव्य ज्ञानाला ग्रहन करायलाच हवे.  माउलींनी श्रीचांगदेव महाराजांना पाठवलेले पत्र "चांगदेव पासष्टी" तसेच माउलींचे अभंग हे सर्व म्हणजे अतिदिव्य अशी ज्ञानगंगाच आहे...एकाएकाचे चिंतन करायला एक एक जन्म अपुरा पडेल असे हे दिव्य ज्ञान आहे. प.पु.श्रीमामा साहेब दांडेकर तर म्हणतात की "महाराष्ट्रात जन्म घेऊन एकदा तरी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचायलाच हवा"...

माउलींच्या नामाचे वर्णन करतांना संत म्हणतात

"ज्ञानदेव ज्ञानदेव वदता वाचे ।

नाही कळीकाळाचे भेव जींवा ।।"

              असे माउलींच्या नामाचेच अतिदिव्य महात्म्य आहे... श्रीमाउलींनी श्रीसंत एकनाथ महाराज,श्रीसंत हैबतराव बाबा व श्रीसंत गुलाबराव महाराज या तिन्ही सत्पुरुषांना आपल्या स्वनामाचाच अनुग्रह दिला होता.असे हे माउलींचे नाम सर्वश्रेष्ट आणि स्वयंसिद्ध आहे... श्रीनाथ महाराज म्हणतात

"श्रीज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञा |"

 माउलींचे चरित्र, माउलींचे नाम, माउलींचे रुप सर्वकाही अतिदिव्य आणि शब्दातीतच...

अशा करुणाब्रह्म भक्तवत्सल श्रीज्ञानोबारायांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम आणि त्यांनी आपल्या कृपेची,करुणेची पाखर आपल्या सर्वांवर नित्य धरावी... नित्य आपल्या सर्वांवर आपल्या अमृत दृष्टीने कृपा करावी हीच श्रीचरणांशी कोटी कोटी दंडवत प्रणाम...माउलींच्या बद्दल बोलने,लिहीने म्हणजे सुर्याला पणती दाखविल्याप्रमाणे आहे.तरी देखील माउलींनीच ज्ञानदेवीत एका दृष्टांतात म्हटले आहे की , "बाळ जरी बोबडे बोल बोलत असले तरी बापाला त्याचे अपार कौतुक आणि आनंद वाटत असतो." त्याचप्रमाणे मी माझ्या या माय-बापा पुढे हे बोबडे बोल बोललो ,जे त्यांनीच वदवून घेतले आणि तेच प्रेमाने या तोडक्या मोडक्या शब्दांचे कौतुकही करतील यात शंका नाही.शेवटी ज्ञानाबाई आमची "माउली" ना!!!पुढे ही माउलींनी आपल्या सर्वांकरवी अखंड सेवा ,स्मरण करुन घ्यावे हीच त्यांच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग दंडवत पूर्वक प्रार्थना...

🙏🌼"नमामी सद्गुरुं शातं सच्चिदानंदं विग्रहं | 

पूर्णब्रह्मं परानंदं इशं आळंदीवल्लभम् ||"🙏🌼

#ज्ञानदेव_ज्ञानदेव_ज्ञानदेव_ज्ञानदेव_ज्ञानदेव🌺🌸

  

   ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✍️✒️

Tuesday, August 16, 2022

भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांच्या परंपरेतील थोर सत्पुरुष श्री सद्गुरु काटकर साहेबांची पुण्यतिथी 🙏🌸🌺🚩

 



ज श्री सद्गुरु काटकर साहेबांची ०८ वी पुण्यतिथी:-🌺                                                  आज शुभराय मठाचे मठाधिपती प.पु.सद्गुरु श्रीमधू बुवांचे शिष्य व अक्कलकोट स्वामींच्या परंपरेतील अतिशय अधिकारी सत्पुरुष प.पु.श्री ज्ञानेश्वर हरी काटकर साहेब यांची ०८ वी पुण्यतिथी.पश्चिम महाराष्ट्रात स्वामीनामाची ध्वजा उत्तुंग करणारे अलिकडच्या काळात होऊन गेलेले एक दिव्य विभूती म्हणजे साहेब.साहेबांनी अनेक जिवांना स्वामी नामाचे दान देऊन त्यांचे इह व पारलौकिक कल्याण केलं.धनकवडीचे सद्गुरु शंकर बाबांचे शिष्य मधू बुवा हे साहेबांचे सद्गुरु.म्हणजे सद्गुरु शंकर बाबा आणि स्वामींच्या परंपरेतील साहेब एक महापुरुष होते.साहेबांच्या कृपेचा अनुभव घेणारे शेकडो लोक आजही आहेत आणि ते सर्व लोक साहेबांच्या कृपेने कृतकृत्य झालेत व आज भक्ती पूर्ण जिवन जगत आहेत.आज साहेबांची ८ वी पुण्यतिथी.साहेबांचा अफाट जिवन प्रवास म्हणजे एक दिव्यच आहे.तब्बल २९ थोर संतांच्या सहवास ,आशिर्वाद त्यांना लाभला होता.अशा या दिव्य चरित्राचे आज आपण चिंतन करुयात.

                                 ‌‌श्री.काटकर साहेबांचा जन्म कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशीच्या पावन दिवशी २९ नोव्हेंबर १९२८ साली एका सत्शील दांम्पत्य श्री हरी व सौ. पार्वतीबाई यांच्या पोटी झाला. त्यांचे आई-वडील हे कोल्हापूर येथील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज (कुंभार स्वामी) यांचे निस्सिम भक्त होते.घरातील आत्यंतिक गरीबी असतांनाही भगवंतांच्या चरणी त्यांची अनन्य निष्ठा श्रद्धा होती.अनेक वर्षे कोल्हापूरातील गंगावेश येथील व्यासमठी येथील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या पादुका मंदिरात सकाळी ५ ते ६ रोज न चुकता वीणा घेण्याचे त्यांचे व्रत होते.ही त्यांची सेवा अविरतपणे अखंड सूरु होती.भगवंतांकडे त्यांचे काहीही मागणे नसे.इतक्या अतिव समाधानात हे दाम्पत्य आपले जिवन जगत असे.साहेब लहानपणी आपल्या आई-वडिलांबरोबर समाधी मठात दर्शनाला जात.त्यांच्या आई-वडिलांच्या भक्तीचा आणि समाधानी वृत्तीचा एक प्रसंग सांगताना साहेब नेहमी गहिवरुन जात.तो प्रसंग असा की ,साहेब नेहमी प्रमाणे लहान असतांना व्यासमठीत दर्शनाला निघाले.तेव्हा त्यांची आई या छोट्या ज्ञानोबाला म्हणाल्या, "अरे ज्ञानबा रोज संध्याकाळी मठीत जातोस ना,दत्त महाराजांना सांग की ,आम्हाला दोन वेळ पोटभर खायला मिळू दे." आपल्या संसारातील इतक्या हलाखीच्या परिस्थितीत ही साहेबांच्या मातोश्रींचे हे मागणे खरंच किती अंतर्मुख करणारे आहे.या मागण्यातच त्यांच्या समाधानी अंत:करण्याची स्थिती दिसून येते.देवांकडे मागतांना काय मागावे याचे भान असणे हेच आत्मभान नव्हे काय? असो! बालपणी घरची परिस्थिती बेताची त्यामुळे इतर गोष्टी ,छंद तर दूर पण शिक्षण घेण्यासाठी ही साहेबांना तारेवरची कसरत करावी लागली.आदर्श हायस्कूल येथे शिकत असतांना एक वेळी शाळेची फीज भरायला पैसे नसल्यामुळे त्यांना शाळा अर्धवट सोडून जायचा वेळ आला पण ईश्वरी कृपा तारक असते त्याप्रमाणे एक शिक्षण स्वतः पुढे आले व त्यांनी साहेबांची शाळेची फी भरली होती.पण या कष्टाच्या दिवसांत ही साहेबांचे "श्रीकृष्ण विजय" या ग्रंथाचे अखंड पारायण, वाचन सुरुच होते.शिक्षण घेता घेता साहेबांनी हॉटेल मध्ये कपबशा धुन्याचेही काम केले.परिस्थीतीला न जुमानता त्यातून मार्ग काढत पुढे जाणारे साहेबांचे चरित्र बघितले तर थक्क व्हायला होते.साहेब रडत बसले नाही तर कष्ट करत राहिले.जणू स्वामींकार्याची ही मुहूर्तमेढच स्वामी कृपेने  रोवल्या चालली होती.श्रीस्वामीराय आपल्या या प्रिय भक्ताला तावून सुलाखून बावनकशी सोने बनवत होते.त्यावेळी श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे शिष्य नामदेव महाराज यांचा सहवास व मार्गदर्शन साहेबांना लाभले होते.अगदी कोवळ्या वयातच श्रीसद्गरु नामदेव महाराजांसारखे दिव्य सत्पुरुष त्यांना मार्गदर्शन करु लागले.त्याचा साहेबांच्या अंतरंगात खोलवर परिणाम झाला.त्यांची वृत्ती अतिशय सात्विक होऊ लागली.नामदेव महाराजांचे त्यांच्या वर बारिक लक्ष होते.मठात होणार्या अध्यात्मिक चर्चा साहेबांच्या कानी पडत होत्याच.जणू शेत सुपीक करण्याचे कामच नामदेव महाराजांनी केले .गुप्त रुपाने हे सर्व स्वामीरायच करुन घेत होते यात शंका नाही. यथावकाश साहेबांचे दिवस अध्यात्मिक चिंतनात ,मठात नामदेव महाराजांच्या समवेत व शिक्षण घेत जाऊ लागले.साहेब १९४८ साली १९ वर्षांचे झाले.त्यावेळी त्यांचे अनाथ बोर्डींग स्कुल मध्ये शिक्षण सुरु होते.शिक्षण सुरु असतांनाही अंतरंगात पारमार्थिक चिंतन हे अखंड प्रवाहित होत होतेच.एकदा असेच बसले असतांना साहेबांच्या मनात विचार घोळू लागला की, "श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज जर एवढे विलक्षण अधिकारी,महान आहेत तर त्यांचे सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज किती थोर ,महान असतील." अशातच साहेबांच्या आईला पोटाचा दुर्धर आजार झाला.आईची परिस्थिती अत्यंत गंभीर होती.आईची ही अवस्था बघून ते अत्यंत व्याकुळ झाले.आईला आपल्या या चिमुकल्या लेकराला सोडून जाण्याचे दु:ख अत्यंत होते हे जाणल्यावर साहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.बोर्डिंगमध्ये आल्यापासून ते पंचगंगा नदीकाठी जाऊन काही काळ एकांतात बसु  लागले.असेच एकदा दु:खद अंत:करणाने ते सायंकाळी नदीकाठी जावयास निघाले.मनात विविध प्रश्न आणि दु:खाचे काहूर माजले असतांना रस्त्यावर समोरुन विजार व शर्ट घालून एक व्यक्ती झपझप पावले टाकत साहेबांजवळ आली.त्यांना आईच्या प्रेमाने आलिंगन दिले आणि डोळ्यात पाणी येतं असल्याने गदगदून अत्यंत कारुण्यपूर्ण  वाणीने साहेबांना म्हणाले, "अरे किती सोसलेस? किती कष्ट घेतलेस?" साहेब म्हणाले , "बाबा हा तर प्रारब्धाचा खेळ आहे." एकदम बाबांचा चेहेरा उग्र झाला,डोळे वर आकाशाकडे गेले आणि ते साहेबांना म्हणाले ,. "अरे अक्कलकोट स्वामी दुधारी तलवार आहे ,पाणी ही कापेल.जन्मभर सोडू नकोस.ही त्यांची सहजलिला, त्यांच्या पदरी तू आहेस". ते बाबा दुसरे तिसरे कुणी नसुन आपल्या सर्वांचे पैजारवाडीचे दत्तप्रभु ,भक्तांसाठी सामान्य माणूस बनुन राहिलेले नृसिंहवाडी चे दत्त परमप्रिय सद्गुरु श्री चिले महाराज होते. यानंतर काही दिवसांतच साहेबांच्या आईने साहेबांच्या मांडिवरच देह ठेवला.
               अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत      लौकिकार्थाने श्रीसाहेब बी.एस्सी पर्यंत शिकले .त्यानंतर त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी बरीच खटपट केली.पुढे "बॉम्बे टेक्सटाईल्स" या कंपनीत साहेबांना फॅक्टरी इन्स्पेक्टर म्हणून अतिशय चांगली नोकरी मिळाली.नोकरी करतांना साहेबांचे वाचन सुरु होतेच.याच दरम्यान साहेबांना शांति ब्रह्म एकनाथ महाराजांचे "श्री एकनाथी भागवत" हाती आले.ते‌ वाचल्यावर भक्ती,विरक्ती या बाबतच्या नाथांच्या वर्णनांनी साहेब अतिशय अंतर्मुख झाले.अशातच साहेबांच्या वडिलांचेही निधन झाले.आता साहेब पूर्णता एकाकी पडले होते.पण साहेबांच्या या काळात त्यांच्या फॅक्टरी मॅनेजरने त्यांना श्रीअक्कलकोट स्वामी महाराजांचा एक फोटो दिला.आता स्वामीरायच साहेबांचे माता,पिता सर्वस्व बनले होते.साहेबांनी नोकरी करतांना कधीही परपैशाला स्पर्श देखील केला नाही.कधीही कुणाला दुखविले नाही.लबाडी करुन कधीही जास्त पैसे उकळले नाहीत.ते कधीही मोहाला बळी पडले नाहीत.परपैसा ,परनिंदा हे परमार्थाला घातक असते हे पथ्य साहेबांनी कटाक्षाने पाळले.नोकरी करतांनाही सायंकाळी घरी परतल्यावर साहेब जप,ध्यान,भजन,सायंकाळी आरती,दिवसभरात काय काय घडले हे सर्व स्वामींना सांगत असत.मुंबईच्या चेंबूर येथील स्वामीमठात साहेब नेहमी जाऊ लागले.एकदा असेच मठात जप करत असतांना माणिकबाबा नावाचे एक थोर ब्रह्मचारी स्वामीभक्त मठात आले.चेंबुरच्या मठात गेल्यावर ते स्वामी नामाचा जप करीत बसण्याचा त्यांचा नियम होता.एक दिवस नामस्मरण करतांना साहेबांचा चित्तलय झाला व साहेबांना समाधी लागली.त्यामुळे त्यांच्या हातातील माळ खाली जमिनीला लागली.अशातच माणिकबाबा आले व त्यांनी हे बघितले.हे बघितल्यावर ते साहेबांना मोठ्याने म्हटले, "अरे हे काय करतो आहेस.माळ जमिनीला लागली आहे." साहेब निरुत्तर झाले‌.पण यांचा परिणाम असा झाला की माणिकबाबांना सारख्या वांत्या सुरु झाल्या.त्यामुळे ते इतके हैराण झाले की काय करावे हे त्यांना सुचत नव्हते.मठात आले तरी तेच घडले.शेवटी ते साहेबांजवळ आले व साहेबांना म्हणाले, "अरे माझी चुक झाली आता माझ्या छातीवरुन हात फिरव म्हणजे माझ्या वांत्या कमी होतील." साहेबांनी तसे करताच त्यांच्या वांत्या थांबल्या.त्यानंतर काही दिवसांनी स्वामीरायांचे लिलाक्षेत्र अक्कलकोट पहावे या हेतूने चार दिवस रजा काढून साहेब अक्कलकोट ला गेले.स्वामींचे दर्शन सेवा करुन ते पंढरपूरला गेले.पंढरपूरला गेल्यावर पंढरीनांथांनी आपल्या डोळ्याची उघडझाप करुन साहेबांना प्रचिती दिली.त्यानंतर ते आळंदीला माउलींच्या दर्शनाला आले व घरी परतले.या प्रवासात बर्याच लिला घडल्या.घरी आल्यावर आपल्या मनातील पारमार्थीक चिंतन कुणाजवळ तरी व्यक्त करावं असे साहेबांना सतत वाटू लागले.अशातच त्यांची भेट अक्कलकोट स्वामी महाराजांच्या परंपरेतील सत्पुरुष,थोर स्वामी भक्त नाना महाराज परांजपे यांची भेट झाली.त्यामुळे त्यांच्या स्वामी चिंतनाला एक वेगळीच धार चढली.पुढे एकदा अक्कलकोट चे गजानन महाराज मुंबई ला आले होते.त्यांनी साहेबांना आपली पाद्यपुजा करावयास सांगितली व स्वामीकृपेची प्रचिती दिली.एकदा वज्रेश्वरीच्या नित्यानंद बाबांच्या दर्शनाला साहेब गेले होते.
बाबांचे दर्शन घेताच बाबा जोरदार आवाजात म्हणाले , "मेरे पास क्या है? चेंबूर मे जावो!" असं म्हटलं व लाकडी खर्चीवर जोरदार हात मारला.१९८३ ला स्वामींनी साहेब पुण्यात शंकर बाबांच्या मठात आले असता त्यांना दर्शन देऊन आत्मप्रचिती दिली.
                 साहेबांनी ८० वर्षाच्या आयुष्यात ३२ वर्षे नोकरी केली.त्या काळात व जिवनातील उत्तर आयुष्यात ही साहेबांना जवळ जवळ २९ संतांचा सहवास लाभला. प.पू.श्री नामदेव महाराज, प.पू.श्रीचिले महाराज, प.पू.श्री राऊळ महाराज पिंगुळी, अकोल्याचे प.पू.बाबा घोंगडे महाराज, प.पू.नागपूरकर स्वामी, चिपरीचे प.पू.अवधूत महाराज, हत्तरगीचे प.पू.हरिकाका, कणकवलीचे प.पू.फलाहारी महाराज, कोल्हापूरचे प.पू.भैरु महाराज, प.पू.तोरस्कर महाराज, प.पू.शंकर महाराज (लुगडी ओळ कोल्हापूरचे) या सर्व सत्पुरुषांचा त्यात समावेश होते‌. या प्रत्येक संतांनी साहेबांना विविध अनुभव ,प्रचिती , मार्गदर्शन केले.त्या लिला फार विस्तृत आहे पण शब्दमर्यादेस्तव त्या इथे देणे शक्य होणार नाही.पुढे कधीतरी साहेबांच्या कृपेने त्यावरही स्वतंत्र चिंतन करुयात.
अकोल्याचे घोंगडे बाबांनी साहेबांच्या बाबतीत असे भाकीत केले होते की, "तुझ्या हातून स्वामी मंदिरे होतील आणि स्वामी तुला सगुण रुपात दर्शन देतील." बाबांचे हे भाकीत तंतोतंत खरे ठरले‌. स्वामींच्या कृपेने साहेबांनी सोळा मंदिरे उभारली व छत्तीस पादुका स्थापन केल्या. परमार्थासाठी लागणारी तळमळ ,विवेक,स्वामींच्यावरचे अपरंपार प्रेम व निष्ठा हे सर्व असताना सुद्धा जोपर्यंत आपल्यावर गुरुकृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला पारमार्थिक पूर्णत्व प्राप्त होणार नाही या ध्यासाने साहेब अत्यंत तळमळीने त्या क्षणांची वाट पाहत होते. तो दिव्य क्षण आता समिप येऊन ठेपला होता. एकदा साहेब धनकवडीला श्री शंकर महाराजांच्या मठात गेले होते.साहेबांबरोबर नेहमी आठ ते दहा लोकं असायचे‌.मठात गेल्यावर महाराजांना नमस्कार केला तेव्हा त्यांच्या मनात असे भाव आले की महाराज जणू सांगत होते की "तुझा गुरु आमच्या पठडीतील आहे.साहेब बाहेर आले व तिथल्या ट्रस्टीला भेटले. त्यांच्याकडून शंकर महाराजांच्या शिष्यांची माहीती घेतली आणि त्यांना भेटायला सुरुवात केली. एकदा सर्व लोक सोलापुरला आले असतांना प.पू.भस्मे काकांना भेटले. भस्मे काकांनी त्यांना सर्व भक्ताकडे नेले होते. भूक लागल्यामुळे पंचमी हॉटेल मध्ये सर्व जेवायला गेले.साहेबांनी आपल्याला धनकवडीच्या मठात आलेला अनुभव भस्मे काकांना सांगितला. जेवल्यानंतर भस्मे काका सर्वांना घेऊन शुभराय मठात आले आणि मधू बुवांना म्हणाले "बुवा हे घ्या तुमचे गाठोडे यांना तुम्हीच सांभाळा." बुवांना भेटून सर्वजण कोल्हापूरकडे रवाना झाले.

अनुग्रहाची हकिकत :-
       परत एकदा काटकर साहेब काही लोकांना घेऊन अक्कलकोटला गेले असता त्यांनी गुरुलीलामृत ग्रंथाचे तिथे पारायण केले.त्या पहाटे स्वामी महाराजांनी साहेबांना काही संकेत दिले.त्याप्रमाणे दुसर्या दिवशी स्वामींचा निरोप घेऊन सकाळी आठच्या दरम्यान सोलापूरला शुभराय मठात आले. त्यावेळी प.पू.मधूबुवा झोपले होते.प.पू.शुभाताई त्यांच्याशी गप्पा मारत होत्या. तेवढ्यात बुवा झोपेतुन जागी झाले.तोंड धुऊन शुभरायांच्या समाधीजवळ आले आणि सर्वांना हाक मारली.देवघरातले पळीभांडे आणायला सांगितले.सर्वांना संकल्प करायला लावले व गुरुमंत्र दिला.काटकर साहेब व सर्व मंडळींना अपार आनंद झाला.त्यांच्या जिवनातील सार्थकतेचा क्षण ते अनुभवत होते‌.
               असंख्य भक्त साहेबांमुळे स्वामीभक्तीत मुरली आहेत.साहेबांनी सर्वांचे कोटकल्याण केले.छोट्या-छोट्या सांसारिक अडचणींपासून मोठी संकटे निवारण केली. स्वामींची स्वामीनामाची सर्वांना गोडी लावली आहे‌.सकाळी ६ वाजल्यापासून झोपेपर्यंत घरचा दरवाजा सर्वांसाठी उघडाच असायचा. कोल्हापूर ला प्रज्ञापुरी म्हणुन स्वामी महाराजांचे एक शक्तीपिठच स्थापन केले. स्वामींच्या प्रगटदिनाचा महोत्सव सुरु केला.सुरवातीला अत्यंत साध्यापणाने चालणारा हा उत्सव नंतर हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पाडु लागला. या उत्सवाला प्रत्यक्ष साहेबांचे सद्गुरु प.पू.मधू बुवा म्हणजे आपले दादा ८/९ वेळा येऊन गेले होते. अशाच एका उत्सवाला प.पू.मधु बुवा कोल्हापूरला गेले होते. उत्सवानंतर प.पू.मधु बुवा अनेकांच्या घरी साहेबांबरोबर गेले.प्रत्येक ठिकाणी मधु बुवांच्या पाद्यपूजा झालेल्या आणि हेही कळले हा प्रगटदिन हा दोन महिने रोज कोणीना-कोणी १००/५००/५००० माणसांना आपल्या ऐपतीप्रमाणे महाप्रसाद करुन संपन्न करतात.शेवटचा उत्सव हा विजय पवारांच्या मळ्यात मंदिरासारखा मोठा होतो.
               या उत्सवात मधु बुवा आणि साहेबांचे एकांतात बोलणे झाले.(प.पू.शुभाताई त्यावेळी तिथे हजर होत्या,त्यांनी ही हकीकत सांगितली आहे) त्यावेळी बुवांनी काटकर साहेबांना श्रीशंकर महाराजांनी बुवांना दिलेल्या बिजमंत्राचा अनुग्रह केला आणि सांगितले "तुझे-माझे गोत्र एक झाले.तू ब्राह्मण झालास.कोल्हापूर , सोलापूर एक झाले.साहेबांच्या पत्नी आणि मुलीसही त्यावेळी बुवांनी अनुग्रह दिला. प.पू.बुवा स्वामी मंदिराच्या प्रतिष्ठापनेलाही गेले.अनेक उत्सवात सहभागी झाले.साहेबांकडे अनेकदा जाऊन राहिले. अशा श्रीकाटकर साहेबांनी भारतातील व भारताबाहेरील स्वामीं भक्तांना जोडले .स्वत:चा संसार करतांना स्वामींचा मोठा संसार सहजतेने साहेबांनी केला.स्वामी भक्ती कशी करावी हे आपल्या कृतीतून समजावले.अशा साहेबांनी आपल्या संपूर्ण जिवनात फक्त स्वामीरायांच्या नामाचाच प्रचार प्रसार केला .आपले संपूर्ण जिवन चंदनासारखे स्वामी कार्यासाठी झिजवले व वयाच्या ८६ व्या वर्षी श्रावण वद्य षष्टी या दिवशी आपला देह स्वामी चरणी विलीन केला.आज कोल्हापूरातील स्वामींच्या प्रज्ञापुरी मंदिरात साहेबांचे ही समाधी स्थान निर्माण झाले आहे.जे आजही साहेबांच्या अस्तित्वाची साक्ष देऊन जातं. साहेबांना ठेवलेली घोंगडी, त्यांच्यावर घातलेली फुले, त्यांच्या अस्थि या सोलापुरातील शुभराय मठातील शुभरायांच्या समाधीत विसावले आहेत. जणु साहेब आपल्या गुरुस्थानीही सद्गुरु सेवेसाठी विसावले आहेत.
अशा या थोर विभूती च्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम.श्रीसाहेबांच्या कृपेने आपल्या सर्वांनाही स्वामीनामाची गोडी लागो हीच अनंत कोटी प्रार्थना साहेबांच्या चरणी करतो. 🙏🌺🌸🙏
                
     ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✍️✒️


कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...